श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ नऊ नरकासूर आणि एक श्रीकृष्ण! – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
मेजर जनरल सुनीलकुमार राझदान (सेवानिवृत्त)
तो भगवान श्रीकृष्णासारखा मथुरेत जन्माला आलेला नसला तरी त्याचं बालपण, तारुण्य मथुरेत आकार घेत गेलं. त्याच्या मूळ जन्मस्थानाला दिल्या जाणा-या ‘नंदनवन’ या उपमेत ‘नंद’ हा शब्द आहे.. हेही एक साम्य म्हटले तर ते वावगे ठरणार नाही! त्याची कृती प्रत्यक्ष श्रीकृष्णासारखीच बरीचशी! भौमासुर उर्फ नरकासुर.. होय तोच नरकासूर ज्याचं कंसाशी सख्य होतं.. कंस आणि नरकासुर म्हणजे एकाला झाकावा आणि एकाला दाखवावा असे! त्यावेळच्या प्राग्ज्योतिषपुरवर (म्हणजे आताचा असाम) नरकासुर राज्य करीत होता आणि तो मातला होता… अत्याचार एवढे की त्याने तब्बल सोळा हजार एकशे माता-भगिनी कैदेत ठेवल्या होत्या… पुढे भगवान श्रीकृष्ण यांनी माता रुक्मिणी यांच्या साथीने नरकासुर नरकात धाडला… ओघात मुरा नावाचा असुर मारून मुराचा अरी म्हणजे शत्रू अर्थात मुरारी हे नाव मिळवले…! देवाच्या या लीलेची आठवण यावी, असाच पराक्रम आपल्या कथानायकाने करून जन्म सार्थकी लावला…. ती ही कथा… मराठी जणांना बहुदा काहीशी अपरिचित अशी!
भारताचे नंदनवन म्हणवल्या जाणा-या जम्मू-कश्मीरमधील श्रीनगरमध्ये त्याचा जन्म आठ ऑक्टोबर, १९५२ रोजी झाला… ठिकाण होते दहाव्या शतकातील पुरुश्यार शिवमंदिरासाठी प्रसिद्ध असलेले पुरुश्यार गाव… इथला झेलम नदीवरील हब्बा कडाल नावाचा लाकडी पूल प्रसिद्ध. यांचे कुलनाम राझदान.. अर्थात लढवय्ये आणि जहागीरदार.. जमीनदार लोक… शिवाय पंडित! जन्मवेळ श्रीकृष्णासारखीच रात्रीची…. दहा वाजून दहा मिनिटे.. धनिष्ठा नक्षत्र. मंगळाशी संबंधित असलेल्या या नक्षत्रावर जन्मलेली माणसं शिस्तबद्ध आणि प्रचंड धाडसी असतात, असं म्हणतात… याचा प्रत्यय या मुलाच्या, अर्थात सुनील कुमार राझदान यांच्या जन्मानंतर बरोबर बेचाळीस वर्षांनी आला!
सुनील कुमार राझदान यांचे आजोबा दुस-या महायुद्धात ब्रिटीश सेनेतून लढले. आणि सुनील कुमार यांच्या वडिलांनीही भारतीय सेनेत तोफखाना रेजिमेंट मध्ये सेवा बजावली. त्यांची शेवटची नेमणूक श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा येथे होती… सेवानिवृत्तीनंतर ते मथुरेतच स्थायिक झाले.
आरंभी अभ्यासापेक्षा गोट्या खेळण्यात अतिशय रुची असलेल्या सुनील कुमार यांना एकदा वडिलांनी गोट्या खेळण्यात वेळ घालवतो म्हणून श्रीमुखात भडकावली… हे बाल महाशय यामुळे अतिशय अपमानित झाले.. कारण परिसरात ते बाल राजकुमार म्हणून ओळखले जात असत… सर्वांसमोर वडिलांनी राजकुमाराला मारावे म्हणजे काय? त्यांनी थेट यमुनातीरावरचे चामुंडा देवीचे मंदिर गाठले. पुढे याच मंदिरात त्यांचा अधिकाधिक वेळ जाऊ लागला…. आणि देवभूमीचा गुण म्हणावा… सुनील कुमार हे अध्यात्मिक वृत्तीत रममाण झाले. याच मंदिराच्या परिसरात सैनिकी अधिका-यांचा गोल्फ क्लब होता. येथे खेळायला आलेल्या अधिका-यांशी तारूण्यात पदार्पण करीत असलेल्या सुनील कुमार यांचा परिचय आणि संभाषण होत असे. परंतु वडिलांसारखे लष्करात जाण्याचे त्यांच्या मनातही नव्हते. अध्यात्मासोबत त्यांनी गणित विषयाच्या अभ्यासाचा प्रचंड ध्यास घेतला होता… हेच गणित त्यांना पुढे उपयोगी पडणार होते! वडिलांकडून काहीही घ्यायचे नाही, शिकवण्या घेत घेत शिकायचे हा त्यांचा खाक्या होता! गणितात पदव्युत्तर पदवीचा अभ्यास करताना त्यांचा बराच वेळ महाविद्यालयाच्या ग्रंथालयात जाई. त्याच ग्रंथालयात त्यांचा एक सहपाठी सी. डी. एस. अर्थात कम्बाईन्ड डिफेन्स सर्विसेस परीक्षेचा अर्ज भरत बसला होता. या परीक्षेतून इंडियन मिलिटरी अकादमी, इंडियन नेवल अकादमी, इंडियन एअर फोर्स अकादमी, ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी साठी प्रशिक्षणार्थी अधिकारी निवडले जातात. त्या सहपाठी विद्यार्थ्याने सुनीलकुमार यांना म्हटले… ”तुझ्या क्षमतेच्या बाहेरची आहे ही गोष्ट… तू पंडित, अभ्यासू कीडा! तू पाहूही नकोस हा अर्ज. तू प्रोफेसर हो गणिताचा! ”
यावर अपमानित झालेल्या सुनील कुमार दिल्लीला पोहचले… काहीसा रागानेच सीडीएस परीक्षेचा फॉर्म भरला… अभ्यास केला… सहपाठी त्यावर्षी अनुत्तीर्ण झाला आणि सुनीलकुमार ऑफिसर्स ट्रेनिंग मधून लष्करी अधिकारी म्हणून प्रशिक्षित होऊन देशसेवेत रुजू झाले.. त्यांना हिणवणारा तो विद्यार्थी एक वर्षाने उशीरा उत्तीर्ण झाला, आणि यांना ज्युनिअर ठरला! वर्ष होते १९७२ आणि वय होते अवघे २२ वर्षे. सेवेच्या पहिल्याच वर्षात त्यांची सेनेने एक फार मोठी परीक्षाच घेतली! पॅरा एस. एफ. अर्थात पॅराशूट रेजिमेंट स्पेशल फोर्सेस हा भारतीय सैन्याचा एक अत्यंत खडतर काम असलेला विख्यात विभाग आहे. इथे सामान्य लोकांच्या कल्पनेतही येणार नाही, असे कठीण प्रशिक्षण पूर्ण केल्यावरच सैनिकाला मरून रंगाची बेरेट अर्थात विशिष्ट प्रकारची कॅप परिधान करता येते…. आणि ही कॅप मिळवणे खरंच कर्मकठीण मानले जाते! पण अभावितपणे ही कॅप डोक्यावर घालून सुनीलकुमार साहेब या विभागात रुजू होण्यासाठी आग्रा येथील पॅराशूट रेजिमेंट स्पेशल फोर्सेसच्या तळावर गेले आणि मोठ्या रुबाबात तेथील कॅप्टन एस. एम. कुंजरू साहेबांसमोर उभे राहिले… सुनीलकुमार यांच्या डोक्यावर असलेली ती बेरेट पाहून अडज्यूटंट साहेबांच्या तळपायाची आग अगदी मस्तकात गेली. साहेब काही बोलले नाहीत… त्यांनी सुनीलकुमार या सेकंड लेफ्टनंट तरुणाचा उपरोधाने ‘सर’ असा उल्लेख केला आणि बजावले… ”ही बेरेट कमवावी लागते! ” त्यांनी सुनीलकुमार साहेबांची एक परीक्षा आयोजित केली….. काही नाही… वीस-पंचवीस किलोचा सिमेंटचा ठोकळा, युद्धासाठी सैनिकाकडे असावे लागते ते साहित्य, रायफल इत्यादी पाठीवर घेऊन वीस किलोमीटर जायचे आणि तेवढेच अंतर परत यायचे… मी-जून महिन्यातले दुपारचे कडक ऊन, दुपारची वेळ… अंगावर डांगरी नावाचा पोशाख… दहा मिनिटांत एक किलोमीटर अंतर चाललेच पाहिजे ही अट. सुनीलकुमार यांनी मोठ्या आत्मविश्वासाने वाटचाल सुरु केली खरी… पण काहीच वेळात पिशवीचे बंद खांद्यांना काचू लागले… तेथील कातडी सोलवटून निघाली… रक्ताने बनियन भिजून गेला… पण थांबायचे नव्हते… पायांत गोळे येऊ लागले होतेच… उस्ताद सायकलवर मागे होतेच… त्यांनी केवळ थोडे ग्लुकोजचे पाणी प्यायला दिले मध्ये… एकदाच! एक क्षण सुनीलकुमार यांना वाटले.. उगाच पडलो या फंदात… सरावात घाम गाळला तर युद्धात रक्त गाळावे लागणार नाही… असे म्हटले जाते… इथे तर रक्तच गळत होते.. पण दुस-याच क्षणी त्यांनी केलेला अध्यात्मिक अभ्यास त्यांना आठवला… अष्टावक्र गीता.. त्यातील तत्वज्ञान स्मरले… शरीर आणि मन वेगळे करता येते… या वेदना शरीराच्या… मन वेगळे त्यापासून. गुरु गोबिंदसिंग साहेबांचे शब्द त्यांना पाठ होते… देशासाठी मस्तक अर्पण करण्याची वेळ आली तर… विलंब करू नये! आईचे शब्द आठवले… सर्व उपकार फेडता येतात.. पण पृथ्वीचे, मातृभूमीचे उपकार फेडता येत नाहीत… पण प्रयत्न मात्र केलाच पाहिजे… निश्चय झाला… आणि हा साधक ती चार तासांची शर्यत साडेतीन तासात पूर्ण करूनच थांबला… चेह-यावर वेदना नावालाही नव्हती! … अंगावर प्रचंड जखमा झालेल्या होत्या… त्या पाहून कमांडर साहेबांनी सुनील कुमार यांना थेट रुग्णालयात धाडले… खांद्यावर टाके पडले… साहेबांनी दोन दिवसांची सुट्टी दिली… आणि सन्मानाची मरून बेरेट सुद्धा! ही सुनीलकुमार साहेबांची पहिली कमाई…. या प्रसंगाने साहेबांना प्रचंड आत्मविश्वास आणि सहकारी अधिका-यांचा सन्मान, आदर मिळवून दिला!
देशाच्या विविध भागांत विविध जबाबदा-या सांभाळत सुनीलकुमार साहेब सर्वार्थाने एक सैन्याधिकारी म्हणून घडत गेले! त्यांनी मणिपूरमध्ये जीवाचा धोका पत्करून अतिरेकीविरोधी कारवाईत शौर्य गाजवले. कैलास पर्वत मोहिमेमध्ये धाडसाने सहभागी झाल्याबद्दल वरिष्ठ अधिका-यांनी सुनील कुमार यांना सन्मानित केले होते. एका मोहिमेत सहकारी सैनिक बर्फाच्या वादळात गाडले गेल्याचे वृत्त कानी येताच त्यांची सुटका करण्याच्या मोहिमेवर निघायचा आदेश सुनील कुमार यांनी वरिष्ठ अधिका-यांना मागितला. परंतु तशा वातावरणात पर्वतावर जाणे धोक्याचे आहे, असे त्यांना सांगण्यात आले. परंतु सुनील कुमार साहेबांनी आग्रह धरला… वेदिक गणिताचे कसब पणाला लावून दिशा शोधल्या, पावले मोजली.. बर्फात मार्ग शोधला, बर्फात गाडल्या गेलेल्यांचा ठावठिकाणा अचूक शोधला आणि कित्येक जीव वाचवले! दूर अंतराच्या धावण्याच्या स्पर्धेत सुनीलकुमार नेहमीच अव्वल असत… त्यांना सहकारी ग्रे हाउंड (प्रचंड वेगाने धावणारी एक श्वान प्रजाती) नावाने हाक मारीत. पिस्टल शुटिंग (नेमबाजी)मध्ये सुनीलकुमार अव्वल होतेच. दूरपर्यंत ते अचूक नेम साधीत असत… लहानपणी गोटया खेळण्याचा असाही फायदा! नेमबाजीसाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा चेटवुड चषक त्यांनी जिंकला होता. योगाभ्यास होताच… पाण्याखाली श्वास रोखून राहणे याचा त्यांनी मोठा सराव केला होता. मथुरेत असताना तिथल्या गोल्फ कोर्स मध्ये ते ज्या अधिका-यांना खेळताना पहात असत, त्यांच्या बरोबरीने आता तेही त्याच गोल्फ क्लबमध्ये सन्मानाने जाऊ शकत होते. त्या ठिकाणी पी. टी. प्रशिक्षकाने सुनीलकुमार यांना ओळखले… हाच तो तरुण जो चामुंडा मंदिरात असायचा, दिवसभर अभ्यासात मग्न असायचा, आणि गोल्फ क्लबमधील सैनिक-अधिकारी लोकांशी संवाद साधायचा! खरे तर सुनील कुमार साहेब नौदल विभागासाठी निवडले गेले होते. ऐरा गैरा.. नत्थू खैराचे हे कामच नव्हते… १३५ जणांच्या समुहातून सुनील कुमार यांची एकट्याची निवड झाली होती! मुष्टियुद्ध आणि पोहण्यात, पळण्यात ते अत्यंत तरबेज होते. पण दैवाने त्यांना पायदळ विभागात धाडले! काही तांत्रिक कारणांमुळे साहेबांची तुकडी एक महिना उशिराने प्रशिक्षण सत्रात रुजू झाली होती. पण याच तुकडीने तब्बल चार जनरल भारतीय सेनेला दिले!
प्रारंभिक सेवा लेह मध्ये झाल्यानंतर सुनील कुमार साहेबांना त्यांच्या जन्मभूमीत सेवा करण्याची संधी प्राप्त झाली… काश्मीर! साहेबांना काश्मीर मधील एक नव्हे तर तीन तीन लोकभाषा अवगत होत्या, तिथल्या चालीरीती ठाऊक होत्या… त्यांनी थोडेसे जरी वेषांतर केले की ते तिथले स्थानिक नागरिक भासत असत. स्थानिक जनतेत स्थानिक वेश परिधान करून ते मिसळून जात.. त्यामुळे अनेक गुप्तवार्ता त्यांना आपसूक समजत असत… त्याचा उपयोग अतिरेकी विरोधी मोहिमांमध्ये खूप होत असे.
एका नेमणुकीत त्यांना काश्मिरातील दोन नद्यांच्या संगमाजवळ राहणायची संधी मिळाली… साहेब त्या संगमावर जाऊन ध्यान करण्याची संधी साधत असत. अशाच एका रात्री त्यांना स्वप्न पडले… अर्जनसागर येथे तुमची आणि गुरुंची भेट होईल… त्यावेळी नेमका पितृश्राद्ध महिना सुरु होता.. ते तिथे पोहोचले…. सरोवरात स्नान करून मंदिरात पोहोचले… तिथले पुजारी बाहेर आले… म्हणाले… कुणी साधक गुरुदीक्षा घेण्यासाठी येणार आहेत.. असे मी स्वप्न पाहिले… तुम्ही तेच आहात का? आणि त्यांनी गुरुदीक्षा दिली… असे हे योद्धा साधक… सुनील कुमार राझदान… त्यांच्या संपूर्ण आयुष्यास एक मोठे वळण देणारी घटना पुढे घडायची होती….
राष्ट्रीय रायफल्समध्ये कर्तव्यावर असताना वेषांतर आणि नामांतर करून साहेब आणि त्यांचे पाच सहा सहकारी तेथील स्थानिक नागरीकांच्या भूमिकेत वावरत होते. सहा ऑक्टोबर १९९४ तारीख होती… काझीगुंड मधील एका चहाच्या टपरीवर साहेब आणि त्यांचे सहकारी चहा पीत बसले होते. स्थानिक आरोग्य केंद्रात काम करणा-या एका व्यक्तीची आणि सुनील कुमार साहेबांची उत्तम जानपहचान होती… सुनीलकुमार हे अस्सल कश्मीरी मुसलमान आहेत अशी त्या माणसाची खात्रीच होती. त्याने एक भयावह बातमी दिली… तेथून सुमारे पंचवीस किलोमीटर्स दूर असलेल्या त्याच्या डोंगरी गावात हिजबुल मुजाहिद्दीन, हिक्मतेयार या अतिरेकी संघटनांच्या अतिरेक्यांनी त्या गावातील अर्थात दमाल हाजीपूर गावातील तब्बल चौदा तरुण महिलांचे गेल्या महिनाभरापासून अपहरण केले आहे… त्या महिलांचे लैंगिक शोषण सुरु आहे… बंदुकीच्या धाकावर… विरोध केल्यास आई-वडिलांना ठार मारू अशा धमक्या देत… हा बलात्कार सुरु होता. या महिलांना या अतिरेक्यांसाठी स्वयंपाकही करावा लागत होता… आणि सुनीलकुमार साहेबांना ही बातमी देणा-या माणसाची मुलगी सुद्धा या दुर्दैवी महिलांपैकी एक होती! त्या गावात तब्बल नऊ नरकासुर वावरत होते… त्यांचे निर्दालन करायला भगवान श्रीकृष्ण हवे होते.. जे सुनीलकुमार साहेबांच्या रूपाने अवतरले जणू!
सुनील कुमार साहेबांच्या हृदयात प्रचंड कालवाकालव झाली… नवरात्रीचे दिवस सुरु होते… साहेबांचा कडक उपवास सुरु होता… महिला मग त्या कोणत्याही जातीच्या, धर्माच्या असोत.. त्यांचा सन्मान राखणे हे प्रत्येक पुरुषाचे आद्य कर्तव्यच आहे… ही आईची, भारतीय सेनेची शिकवण त्यांना प्रकर्षाने आठवली! त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिका-यांच्या कानावर ही बाब त्वरीत घातली… कारण घटनास्थळ साहेबांच्या जबाबादारीच्या क्षेत्राच्या बाहेरचे होते… त्यामुळे मुख्यालयातून परवानगी घेणे गरजेचे होते, अतिरेक्यांची नेमकी संख्या माहीत नव्हती. साहेबांनी सात ऑक्टोबर रोजी सेक्टर कमांडर साहेबांपुढे योजना मांडली.. आणि रीतसर परवानगी घेऊनच मोहीम आखली गेली. मोहीम सुरु करण्याचा दिवस अर्थात आठ ऑक्टोबर हा योगायोगाने साहेबांचा वाढदिवसच होता. अतिरेक्यांवर छापा घालण्यासाठी दोन अधिकारी, चोवीस जे. सी. ओ. आणि इतर कमांडोज हे सुद्धा पथकात सामील झाले. पंचवीस किलोमीटर्स अंतर तसे बोलायला कमी वाटेल.. पण हा जंगली, डोंगरभाग… उंच उंच कडे… बर्फ. गुप्तता राखण्यासाठी साहेबांनी आणखीन लांबचा रस्ता निवडला. वीर भल्या पहाटे कामगिरीवर निघाले… त्या गावाजवळ पोहोचायला सायंकाळ झाली… सुमारे सतरा तास सैनिक चालत होते. अंधार पडू लागला. आरोग्य कर्मचा-याने सांगितलेल्या ठिकाणाजवळ साहेब पोहोचले… पण निश्चित काही समजेना. तेवढ्यात एक गदडीया अर्थात मेंढपाळ डोंगर उतरून खाली येत होता. साहेबांनी त्यांच्या खास काश्मिरी बोलीभाषेत त्याच्याशी संवाद साधला… मेंढपाळ लगबगीने, भीतीने पुढे निघून गेला… पण जाताना त्याने थोडक्यात पण महत्त्वाची माहिती दिली…. तिथून दोन किलोमीटर्स उंचीवरील एका मोक्याच्या जागी काही घरे आहेत… त्यातील एका घरात काही लोक आहेत! या चार मजली घराला मोठे कुंपण आहे… चौथ्या मजल्यावर एक रायफलधारी पहारेकरी कायम उभा असतो… इत्यादी इत्यादी!
– क्रमशः भाग पहिला
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







