सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ रुक्मिणी – लेख क्र. ११ ☆ सौ. मंजिरी येडूरकर

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.) 

कृष्ण हस्तिनापूराहून परत आले ते तिथला संहार पाहून, राणी गांधारीने दिलेली शापवाणी ऐकून, विमनस्क स्थितीत! त्यातच इकडे आल्यावर यादवांच्या संहाराबद्दलही ऐकावं लागलं आणि हताश झाले. वनातून जातांना शिकाऱ्याच्या हातून निघालेला बाण कृष्णांना लागला आणि त्यांनी लगेच अर्जुनाला बोलावून घेतलं. यादवांच्या विधवा, त्यांची अनाथ मुलं यांचं पुनर्वसन करण्यास सांगितलं. हे माझ्या कानावर येताच, त्यांच्या मनात काय चालू आहे याचा मला अंदाज आला. आणि त्यांचा जीव माझ्यात गुंतू नये, अर्थात कुणाच्यात गुंतणारे ते नव्हतेच, पण तरीही माझी आपली समजूत, म्हणून मी देह विसर्जित करण्याचे ठरविले व त्यांना निर्णय घेण्यासाठी मुक्त केलं.

आठवतोय तो सगळा भूतकाळ! लहानच होते मी त्यावेळी. नारदमुनी घरी आले की आम्हाला कृष्णाच्या गोष्टी सांगायचे. बालपणीचा यशोदेला सळो कि पळो करून सोडणारा कृष्ण! बासरीच्या सुरांनी साऱ्या गोकुळाला भिजवणारा, रिझवणारा कृष्ण! बालपणापासूनच दैवी शक्तीची प्रचिती देणारा, दुष्टांचा विनाश करणारा, कृष्ण!! ते अगदी आत्मीयतेने सांगायचे आणि मी वेडी भान हरपून ऐकत बसायची. हळूहळू कधी मी मनाच्या देव्हाऱ्यात कृष्णांची स्थापना केली व मानसपूजा करायला लागले कळलेच नाही. आणि समजलं कि माझा शिशुपालांबरोबर विवाह निश्चित झाला आहे. बापरे! मला एवढा धक्का बसला की मी कृष्णाचा धावा करायला सुरुवात केली. माझा धावा ऐकून ते येतील याची मला खात्री होती. कारण मी त्यांची निस्सिम भक्त होते. लग्नाआधी गावकुसाबाहेरच्या देवीच्या दर्शनाला जाण्याची प्रथा होती. तिथे काही सैन्य घेऊन कोणी जात नाही हे जाणून, रथावर अरुढ होऊन कृष्ण आले आणि मला अलगद उचलून घेऊन गेले सुद्धा. पण ही बातमी तिकडे बलरामदादा आणि इकडे शिशुपाल व रुक्मि यांनाही कळली. आधीपासूनच शत्रुत्व असल्याने उभय पक्षांना कल्पना आली व घनघोर युद्ध झाले. इतका वेळ रथात बसून त्या राजस चेहऱ्याचे मी अवलोकन करत होते. आता मात्र क्रुद्ध चेहरा बघितला नि मी थरथरायला लागले. काय करावं ते न सुचल्यानं, मी कृष्णांचे पाय घट्ट धरले व रुक्मिला जीवदान द्या म्हणून विनवणी करत राहिले. रुक्मिला जीवदान मिळालं. आम्ही सही सलामत मथुरेला पोचलो. पण माझं माहेर मात्र तुटलं, कायमचं!!

घरी गेल्यावर जणू काही झालंच नाही अशा थाटात म्हणाले, तुमच्या अनिच्छेने होणाऱ्या लग्नाला थांबविण्यासाठी तुम्हाला येथे घेऊन आलो. पण विवाहाचा निर्णय घेण्यापूर्वी कल्पना द्यावी म्हणून सांगतो. मी राजा नाही, राजकुमारही नाही. माझा महाल नाही, धनसंपत्ती, ऐश्वर्य काही नाही. मी फक्त जनतेचा सेवक आहे. आपण राजकन्या आहात, राजवाड्यात राहणाऱ्या! तुम्ही या कफल्लकाबरोबर राहू शकाल कां? अन्यथा शिशुपाल राजकुमार आहे. शूर आहे. आपली त्याच्याशी विवाह करण्याची इच्छा असेल तर सांगा. मी परत पोचवायला येऊ शकतो. मीही मग तेवढ्याच धीटपणे सांगितलं की, ऐश्वर्याचा, दाग दागिन्यांचा, उंची वस्त्रांचा मोह मला कधीच नव्हता, नाही, व पुढेही असणार नाही. आपण मला पत्नीचा दर्जा देता आहात, यासारखे माझे दुसरे भाग्य कोणते? फक्त शेवटच्या श्वासापर्यंत आपला सहवास लाभावा एवढीच या भक्ताची इच्छा आहे. आपण तर माझे परमेश्वर आहात.

अखेरीस विवाह संपन्न झाला आणि माझी आनंदाच्या डोहात डुंबायला सुरुवात झाली. प्रत्येक दिवस कृष्णांची निरनिराळी लोभस रुपे घेऊन यायचा आणि मला त्यांना कुठे ठेवू आणि कुठे नको असं व्हायचं. सुखी संसाराला गालबोट लागायलाच हवं, त्याशिवाय नियतीचं अस्तित्व आपल्याला कळणार तरी कसं!

दुर्वास ऋषींना नेण्यासाठी आणलेला रथ त्यांनी आम्हा दोघांना ओढायला सांगितला. थोड्या अंतरावर गेल्यानंतर दोघेही दमलो व पाणी पिऊ लागलो. पण दुर्वास ऋषींना आम्ही पाणी हवे कां हे आधी विचारले नाही. त्यामुळे संतापून आम्हाला शाप दिला. या शापाने १२ वर्षे दुराव्याची शिक्षा मिळाली. नंतर लवकरच बाळराजाची चाहूल लागली आणि मी सुखाच्या सर्वोच्च बिंदूवर‌ झुलायला लागले. बाळाचा जन्म झाला. ते निरागस, गोंडस रूप पाहून मातृत्व पाझरू लागलं. एक दिवस बाळाला पाळण्यात घातलं. नाव ठेवलं, प्रद्युम्न!! म्हणजे तेजस्वी, सुंदर, जणू कामदेवच. दाई म्हणाली, आता बाळाला सारखे कुशीत घेऊ नका. पाळण्यात ठेवा, हात पाय हलवू दे. भूक लागली की थोडं रडू दे. यामुळेच बाळाची वाढ चांगली होते. तरी मी त्यादिवशी पाळण्याची दोरी घट्ट हातात धरली. न जाणो आपल्याला बाळाचं रडणं ऐकू आलं नाही तर निदान पाळणा हलला की कळेल. पण कशी काळ झोप लागली कुणास ठाऊक! सकाळी उठून पाहते तर पाळणा रिकामाच! बाळ रडलेला आपल्याला ऐकू आलं नाही आणि आपली झोपमोड होऊ नये म्हणून दाई त्याला घेऊन दुसऱ्या कक्षात गेली की काय म्हणून सगळं घर फिरून आले. शेवटी कृष्णांना उठवलं. बाळ कुठेच नाही, कोणी पाहिलाही नाही. माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. मन सैर भैर झालं. कृष्णांनी तर अख्खा गाव पिंजून काढला. पण काहीही कळलं नाही. ते निरागस रूप डोळ्यासमोरून जाईना. तो कुशीत असल्याचा भास व्हायचा. त्याच्या बाललीला, खोड्या यांची दोघांनी मिळून रंगवलेली स्वप्नं, धुळीला मिळाली होती. माझ्या बाळावर कुणाचा कां राग असेल? माझा बाळ कुठे असेल? कसा असेल? कोण दुध पाजत असेल? शांत व संयमी कृष्ण मात्र माझी समजूत काढत होते. म्हणाले, त्याला कांही होणार नाही. तो येईल परत. काळजी करू नकोस. आणि मी वाटेला डोळे लावून बसायला लागले. हिशेब करायचे, बाळ आता केवढा झाला असेल. मग त्या वयाच्या प्रत्येक मुलाला तो प्रद्युम्न तर नाही ना म्हणून जवळ जाऊन पाहून घ्यायची. जस जसे दिवस सरले, तस तसं वाट पाहणं कमी झालं. पण एक मूल जाणं म्हणजे काय असतं हे कळायला आईच व्हावं लागेल!

दरम्यानच्या काळात कृष्णांची इतर लग्ने झाली. प्रत्येक लग्न हे कोणत्यातरी हेतूने केलं होतं. पण ते कधीच आपली कोणतीही पत्नी दुर्लक्षित ठेवणार नाहीत. तिच्याप्रती असणारी आपली जबाबदारी, कर्तव्यं पार पाडणार, यांची मला खात्री होती. मी कधीच कुठल्या पत्नीचा द्वेष केला नाही किंवा त्यामुळे माझ्यावरचं प्रेम कमी होईल असा ग्रह करून घेतला नाही.

प्रेम हे ओरडून सांगायचं नसतं की हरघडी पुरावे देऊन सिद्ध करायचं नसतं. प्रेम हे अबोल, अव्यक्त असतं. दुसऱ्यानं ते समजून घ्यायचं असतं. सत्यभामा, कृष्णांची दुसरी पत्नी! तिचा कक्ष माझ्या कक्षाजवळच होता. ती कायम दाग – दागिन्यांनी नटलेली, उंची वस्त्रांनी सजलेली असायची. थोडी अहंकारी होती पण युद्ध कलेचे शिक्षण घेतलेली व शूर होती. तिने हट्टाने स्वर्गातून पारिजातकाचे झाड कृष्णांना आणायला सांगितले व ते तिच्या अंगणात लावले. तिला वाटलं आपण या फुलांचा सुंदर गजरा माळला तर त्याच्या सुवासाने कृष्ण अनुरक्त होतील व आपल्या सहवासात जास्त वेळ घालवतील. झाड बहरलं पण त्याची फुलं वाऱ्याने माझ्या अंगणात आली. मी ती गोळा करून त्यांचा हार माझ्या दैवताला अर्पण केला. सत्यभामेला मी वेडीच वाटले. तिला तर हे ही कळेना, झाडाची मुळे माझ्या अंगणात पण फुले मात्र तिच्या अंगणात कशी? तिला किती सांगितलं, मी त्यांची भक्ती करणारी आहे तर तू त्यांची शक्ती आहेस, आधार आहेस. म्हणून तर तू नरकासुराचा वध करू शकलीस. अगं, मूळं घट्ट असल्याशिवाय झाड बहरत नाही. आणि फुलांना काय, वारा घेऊन जाईल तिकडे जातात. पण मी लाडकी कां ती लाडकी, या प्रश्नाने तिला कायम घेरलेलं असायचं. तिचा अहंकार कमी करण्यासाठी नारदांनी तो बिल्वदलाचा प्रसंगही घडवून आणला. खरं तर मला कृष्णांची खरी ओळख कधी झाली सांगू? एकदा आम्ही सगळे मिळून वृंदावनाला गेलो होतो त्यांना पुन्हा एकदा यमुना नदी, गोपगोपी यांना भेटायचं होतं. त्यांच्या पदस्पर्शाने यमुना नदीही खळाळली. गोप गोपी पण आनंदित झाले. त्याच्या समवेत भोजन सुरू असताना मला यमुनेच्या पैलतीरावर दुर्वास ऋषी दिसले. मनात आलं भोजन झालं आहे की नाही कुणास ठाऊक! थोडं नेऊन द्यावं. पण यमुनेवर कुठे नाव दिसेना. मी कृष्णांना विचारलं, नावाडी कोणी आहे का विचारता कां? तर म्हणाले, यमुनेला सांग, माझा पती ब्रह्मचारी असेल तर मला पलीकडे जाण्यासाठी वाट दे. मला कळेच नां, आठ लग्नं झाली, त्याशिवाय सोळा सहस्त्र स्त्रियांचा उद्धार झाला. हे ब्रह्मचारी कसे? पण त्यांना काही उलट प्रश्नही नाही करायचा आणि उलट उत्तरही नाही द्यायचं, हाच माझा स्वभाव! यमुनेजवळ जाऊन मी ते वाक्य म्हटलं आणि खरोखरच नदीने वाट करून दिली. आणि मी दुर्वास ऋषींना भोजन देऊन त्यांना विचारलं हे असं कसं झालं? तर ते म्हणाले, तो जे काही करतो ते कर्म म्हणून, धर्म म्हणून करतो निर्लेप आहे तो! अगदी जेवणाच्या बाबतीत सुद्धा! बघ जाताना म्हण, माझा पती रोज उपवास करत असेल तर वाट दे. आणि खरंच तिने वाट करून दिली. अशा माणसाचं प्रेम कुणावर जास्त आहे, कोण जास्त लाडकी आहे, यावरून आम्ही खुळ्या भांडत होतो.

काही दिवस सगळं सुरळीत चालू होतं त्यातच शंबरासुराचा वध करून त्याची मुलगी पत्नी म्हणून स्वीकारून प्रद्युम्न घरी आला. आणि आमच्या गोकुळातील रिकामी जागाही भरून निघाली. एकच गोष्ट बोचत राहिली. कुरुक्षेत्रावरचे युद्ध आणि यादवी आम्ही थांबवू शकलो नाही. कुरुकुलाचा, यादव कुलाचा विनाश उघड्या डोळ्यांनी पाहत होतो. मी एवढे तातांकडे राज्यकारभाराचे गिरवलेले धडे सुद्धा निकामी ठरले. धर्म व अधर्म यांच्या युद्धात सगळेच होरपळून निघाले. माझ्यापुरतं एवढेच सांगेन कि माझी कथा ही फक्त रुक्मिणी-हरणाची नाही, तर ती भक्ती, निष्ठा व अमरप्रेमाची गाथा आहे.

– – लेख क्र. ११ 

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted