सुश्री प्रभा हर्षे
इंद्रधनुष्य
☆ “सोनम वांग्याल – –” – हिन्दी लेखक : श्री दिलीप मिश्रा ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
(…सध्या सोनम वागचुंगची खूप चर्चा सुरू आहे, पण आधी त्यांच्या वडिलांविषयी, सोनम वांग्याल यांच्याविषयी थोडं जाणून घ्या…)
सन १९६५. फक्त २३ वर्षांचा एक तरुण पॅरामिलिटरी जवान. डोळ्यांत फक्त एकच स्वप्न तिरंगा सर्वात उंच शिखरावर फडकवायचा! सोनम वांग्याल यांनी एव्हरेस्ट सर केले. त्याच वर्षी त्यांना अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री सन्मान मिळाला.
१९६५ मध्ये भारत आणि अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी एक गुप्त मोहिम सुरू केली. नंदा देवी प्लूटोनियम मिशन. चीनच्या अणु चाचण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी नंदा देवीच्या उंच शिखरावर गुप्त उपकरण बसवायचं होतं. सोनम वांग्याल या मोहिमेचा भाग बनले. डोंगरांचा मुलगा स्वतःचा जीव धोक्यात घालून राष्ट्राच्या सुरक्षेसाठी उभा राहिला.
काळ पुढे गेला. १९८४ मध्ये जेव्हा लडाखमधील लोक अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा म्हणून रस्त्यावर उतरले, तेव्हा हाच सोनम वांग्याल त्यांच्या आंदोलनाचा नेता झाला. त्यांनी उपोषण सुरू केलं. तेव्हा देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. त्या स्वतः लेहला आल्या, संवाद साधला, संवेदनशीलतेनं बोलल्या आणि आंदोलनाला मार्ग दिला. एक उपाशी माणूस जिंकला, कारण त्याच्यासमोर सत्ता नव्हती तर संवेदना उभी होती.
मग १९९३ आले. सोनम वांग्याल इंटेलिजन्स ब्युरोचे असिस्टंट डायरेक्टर पदावरून सेवानिवृत्त झाले. आयुष्यभर त्यांनी राष्ट्राच्या सुरक्षेसाठी, राष्ट्राच्या सन्मानासाठी, राष्ट्राच्या अस्मितेसाठी स्वतःला झोकून दिलं.
आणि आज? त्या देशाच्या सर्वोच्च सन्मानित वीराचा मुलगा सोनम वांगचुक जो शिक्षणासाठी, पर्यावरण सुधारासाठी लढला, जो स्वतःच्या लोकांसाठी उपोषणाला बसला; त्याला देशद्रोही ठरवलं जातं आहे.
किती विचित्र विडंबना!
ज्या वडिलांनी चीनच्या अणुबॉम्बवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतःचा जीव हातावर धरला, त्याच्याच मुलावर आज ‘चीन समर्थक’ असल्याचा संशय घेतला जातोय. ज्यांना वडिलांना पद्मश्री मिळाली; त्याच्या मुलाला देशद्रोहाची शिक्कामोर्तब मिळतंय. ज्या वडिलांच्या उपोषणाला इंदिराजींनी स्वतःच्या संवेदनशीलतेनं तोड दिलं; त्याच मुलाच्या उपोषणाला नरेंद्रजी सरकार पोलिसी बंदोबस्त आणि टीव्ही प्रचारयंत्रणेतून तोडत आहे.
ही फक्त सोनम वांगचुकची कहाणी नाही. ही त्या सत्तेची प्रतिमा आहे जी संवादावर नाही तर दडपशाहीवर उभी आहे. जी प्रश्न विचारणाऱ्याला शत्रू मानते. जी देशभक्तीच्या वारशालाही देशद्रोहाच्या फाइलमध्ये ढकलून देते.
हा नवा भारत आहे, जिथं देशाच्या सर्वात उंच शिखरावर तिरंगा फडकवणाऱ्या वीराचा मुलगा, लोकशाहीच्या जमिनीवर उभाही राहू शकत नाही…
हिन्दी लेखक : श्री दिलीप मिश्रा
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





