श्री दिवाकर बुरसे
इंद्रधनुष्य
☆ वंदे वाल्मिकी कोकिलम्… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
अश्विन पौर्णिमा… महर्षी वाल्मिकी जयंती….. त्यानिमित्त महर्षींना वाहिलेली ही आदरांजली…..
श्रीबुधकौशिक ऋषींनी रामरक्षा स्तोत्रात वाल्मिकींचे केलेले वर्णन किती समर्पक आहे!
कूजंतं रामरामेति मधुरं मधुराक्षरम्।
आरुह्यकविताशाखां वंदे वाल्मीकि कोकिलम्।
भावार्थ:-
राम राम अशा मधुर अक्षरांनी कूजन करणाऱ्या, कवितारूपी शाखेवर बसलेल्या वाल्मिकीरुपी कोकिळास वंदन असो.
वाल्मिकींची स्तुती करणारे हे दुसरे सुभाषित पहा,
सदूषणोsपि निर्दोषः सखराsपि सुकोमलः।
नमःस्तसै कृतायेन रम्या रामायणी कथा।।
भावार्थ:-
‘दूषण (दोष, एक राक्षस) असूनही निर्दोष आहे, ‘खर’ (खरखरीत, एक राक्षस) असूनही जी कोमल आहे अशी रम्य रामयण कथा ज्याने रचली, केली त्याला (वाल्मिकींना) नमस्कार असो.
रामायणात ‘खर’ आणि ‘दूषण’ या नावाच्या दोन राक्षसांचा उल्लेख आहे. पंचवटीतील वास्तव्यात रामाने त्यांचा वध केला. वरील श्लोकात सुभाषितकाराने या राक्षसांच्या नावावर ‘श्लेष’ केला आहे. ‘श्लेषालंकार’ हे संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य आहे. जगातील अन्य कोणत्याही भाषेत इतका विपुल व समृद्ध श्लेष अभावानेच आढळतो. असो.
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः।
यत्क्रौञ्चमिथुनादेकमवधीः काममोहितम्।।
– – या श्लोकाद्वारे अनुष्टुप् छंदाचा आविष्कार करून ‛रामायण’ या लोकविलक्षण काव्याची रचना करणारे आद्यकवी महर्षी वाल्मीकि यांची आज (अश्विन पौर्णिमा) जयंती. या आद्यकवीला शतशः वंदन!
महर्षि वाल्मिकींच्या काव्यकर्तृत्वाला अभिवादन म्हणून कविवर्य भा. रा. तांबे यांनी रचलेली पुढील सुंदर कविता वाचनात आहे.
जय वाल्मीकी!
*
जय वाल्मीकी! तुज हें तर्पण;
तव चरणीं सर्वस्व समर्पण! ।।ध्रु।।
*
त्रिभुवनपति जो राम रघूत्तम
सुरनरकिन्नरनुत पुरुषोत्तम
हे वाङ्मयतरुकोकिल, निरुपम
त्या रामा तूं देशि रामपण ।।१।।
*
विधिहि शकेना द्याया कवणा
तीं दश वदनें देशि रावणा
राम यमाधिप दे ज्यां मरणा
अमर करिशि तो सुरारि रावण ।।२।।
*
अधनांचें धन, अबलांचें बल
अमंगलांचें श्रेयोमंगल
जन्मांधांचे लोचन निर्मल
दुर्वृत्तांचें दुरितनिवारण ।।३।।
*
हात दिला तूं किती बुडत्यांना!
धीर दिला किती तूं व्यथितांना!
उरीं लाविलें किती पतितांना!
जय भवनाविक पतितोद्धारण! ।।४।।
*
कालाच्या अति कराल दाढा
सकल वस्तुंचा करिति चुराडा
कालशिरिं झडे तुझा चौघडा
जय मृत्युंजय! जय कविभूषण! ।।५।।
*
भा. रा. तांबे
तमसा नदीवर स्नानाला जात असताना एका काममोहित क्रौंच मिथुनातील नराला बाण मारण्याचे क्रौर्य बघून महर्षिंच्या मुखातून बाहेर पडलेली ही शापवाणी……
“मा निषाद प्रतिष्ठां……. ”
शाप दिल्यानंतर महर्षिंना वाईट वाटले. आपली सारी तपश्चर्या वाया गेल्याचे दुःख झाले.
ते तसेच विचारमग्न अवस्थेत आश्रमात परतले. त्यांची विचारमग्न चर्या पाहून एका शिष्याने कारण विचारले, तेव्हा महर्षिंनी सारा वृत्तांत कथन करून आपल्या मुखातून निघालेली शापवाणीही पुन्हा सांगितली.
ते सांगत असताना त्यांच्या लक्षात आले की ह्या शापवाणीत काही छंद दडलेला आहे. महर्षींना त्या ही अवस्थेत आश्चर्य वाटले. हा योगायोग पाहून ते अधिकच विचारमग्न झाले… तेवढ्यात महर्षि नारद तेथे आले. घडलेला वृत्तांत वाल्मिकींनी नारदांना सांगितला. नारदांनाही आश्चर्य वाटले आणि त्यामागचा ईश्वरी संकेतही जाणवला. यावर चिंतन करून नारदांनी वाल्मिकींना रामकथा लिहिण्याचा समादेश दिला.
… त्या रचनेसाठी नव्याने गवसलेल्या या वृत्ताचा उपयोग करण्याचे महर्षिंनी ठरविले. ते वृत्त म्हणजेच ‘अनुष्टुप् छंद’. या वृत्ताचे द्रष्टेपण जाते आद्य कवी महर्षि वाल्मिकींकडे जगातील व रामायणातील पहिला अनुष्टुपातील श्लोक ‘मा निषाद प्रतिष्ठां…’
आद्यकवींनी रामायणासाठी हा सुलभ असा अनुष्टुप् छंद योजला. या नंतर बहुतेक सर्व महाकवींना आपल्या प्रदीर्घ रचनांसाठी हाच छंद सोईस्कर वाटला.
– – एका पंक्तीत आठ अक्षरे, पाचव्या अक्षरावर यति इ. यमक, अनुप्रासादि अलंकाराचा हट्ट नाही. सरळ लिहित रहा, वर्ण्यविषय संपेपर्यंत, असे साधे प्रवाही स्वरूप या वृत्ताचे. म्हणून सर्वांनाच तो सोईचा वाटला.
स्वा. सावरकरांनी अंदमानात जेव्हा महाकाव्य रचायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनीही हाच छंद निवडला.
पण वृत्तदर्पणातून शिकलेली लक्षणे त्यांना कारावासात काही केल्या नीट आठवेनात. संदर्भग्रंथ उपलब्ध नाहीत. मिळण्याची सुतराम शक्यता नाही. अशा परिस्थितीत काही पाठ असलेल्या श्लोकांवरून त्यांनी अनुष्टुपाची लक्षणे शोधून त्याप्रमाणे आपल्या रचना केल्या. पुढे काही सहस्र रचना झाल्यावर लक्षात आले की आपण केलेल्या रचनांमधे अनुष्टुप् छंदाच्या नियमाचा भंग झालाय. आठ ऐवजी आपण नऊ अक्षरांचे एक वेगळेच, पण अस्तित्वात नसलेले वृत्त नकळत योजले आहे! अपघात असला तरी ही एक वेगळी निर्मिती आहे. अपघाताने ज्या नव्या वृत्ताचा शोध लागला त्याला मग स्वा. सावरकरांनी “वैनायक वृत्त” असे नाव दिले.
– – सात सहस्त्र वर्षापूर्वी आद्य महाकवीने आम्हाला ‘अनुष्टुप्’ दिले तर एका अधुनिक महाकवीने ‘वैनायक’ दिले!
पुरंदर तालुक्यात, पालखी मार्गावर ‘वाल्हे’ नावाचे एक गाव लागते. या गावात वाल्या कोळ्याचा जन्म झाला. वाल्मिकींचे हे जन्मग्राम आहे असा येथील लोकांचा विश्वास आहे. तिथे वाल्मिकींचे मंदिरही आहे.
रामचरित्र सात सहस्त्र वर्षापूर्वीचे आहे. त्यावेळी महाराष्ट्रात दंडकारण्य होते. याच अरण्यात ‘वाल्हे गावचा वाल्या’ वाटमाऱ्या करीत होता.
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





