श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र २९ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

 नारद भक्तीसूत्र क्र. २९.

अन्योन्याश्रयमित्यन्ये ॥ २९ ॥

अर्थ : दुसरे काही आचार्य ज्ञान आणि भक्ति परस्परांना आधारभूत आहेत असे प्रतिपादन करतात. थोडक्यात, भक्तीस ज्ञानाचा आश्रय आणि ज्ञानास भक्तीचा आश्रय आहे असे मानतात.

विवेचन : संत एकनाथ महाराज सांगतात,

“भक्तीचे उदरीं जन्मलें ज्ञान । भक्तीनेंक ज्ञानासी दिधलें महिमान ॥१॥ भक्ति तें मुळ ज्ञान तें फळ। वैराग्य केवळ तेथीचें फुल ॥२॥ फुल फळ दोनी येरयेरा पाठीं । ज्ञान वैराग्य तेविं भक्तिचें पोटीं ॥३॥ भक्तिविण ज्ञान गिवसिती वेडे । मूळ नाहीं तेथें फळ केवी जोडे ॥४॥ भक्तियुक्त ज्ञान तेथें नाहीं पतन । भक्ति माता तया करितसें जतन ॥५॥ शुद्धभक्तिभाव तेथें तिष्ठे देव । ज्ञानासी तो ठाव सुख वस्तीसी ॥६॥ शुद्ध भाव तेथें भक्तियुक्त ज्ञान । तयाचेनी अंगें समाधी समाधान ॥७॥ एका जनार्दनीं शुद्ध भक्ति क्रिया । ब्रह्मज्ञान त्याच्या लागतसे पाया ॥८॥”

थोडक्यात भक्ति आणि ज्ञान यांचा परस्पर संबंध आहेच आहे.

– – भक्तीने ज्ञानाची प्राप्ती होणे सहज शक्य आहे. अनेक संतांनी ते स्वानुभवाने सांगितले आहे. तसेच भगवतांची प्राप्ती झाल्यावर सुद्धा भक्ति करणारे अनेक साधक आहेत, संत आहेत. एखाद्या माउलीला दिवस राहिले. ज्यादिवशी तिला आपण आई होणार हे कळते, त्यादिवसापासून ती होणाऱ्या बाळावर जिवापाड प्रेम करू लागते. इथे त्या माउलीने बाळ स्त्री होईल की पुरुष, ते काळ असेल की गोरे, ते सदृढ असेल की पंगू ? यातील तिला काहीच माहीत नाही, तिला इतकंच माहित आहे की काही महिन्यांत तिला बाळाचे दर्शन होणार आणि अनंत काळासाठी आई होणार, ती कोणाची तरी आई होणार….. आणि हीच तिची कायमची ओळख ठरणार… !

इथे गर्भारपणात आई जे आपल्या लेकरांवर प्रेम करते ते ज्ञानपूर्व प्रेम आहे. तिची प्रसूती झाली, की तिला आपण आई झालो याचे खरेज्ञान तिला प्राप्त होणार आणि मग ती आई झाली म्हणून त्या बाळावर ती प्रेम करणार, माया करणार, त्याची सर्वोतोपरी काळजी घेणार…. ! सर्व संत हेच करतात… आणि आपण ही तसेच करावे असे त्यांची अपेक्षा असते.

निर्गुण निराकार असलेल्या भगवंताला भक्त आपल्या भावाने सगुणात आणतो. साधनेच्या विशिष्ट टप्प्यावर जिवाशिवाची भेट होते. थोडक्यात ज्ञान प्रसवते. पण आता भक्ताला भगवंत आणि यातील भेद पूर्णपणे गळून गेलेला असतो. भगवंत आणि भक्त एकच झाल्याने आधी तो जे नाम घ्यायचाझ तेव्हा त्याला जाणवायचे की मी नाम घेतो, आता तोच नाम घेतो, पण आता तो एक उपकरण झालेला असतो.

“राम हमारा जप करे.. हम बैठे आराम”

अशी त्याची सहजस्थिती झालेली असते….

जय जय रघुवीर समर्थ 

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः लेख क्र. २९

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted