श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

मोरारजी देसाई सरकारच्या काळात परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी अटलजींकडे देण्यात आली. दोन वर्षांच्या या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत अटलजींनी भारत -चीन आणि भारत – पाक संबंध सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. १९७९ मध्ये ते चीन भेटीवर गेले. १९६२च्या युद्धानंतर दोन देशांदरम्यान संबंध सुधारण्याचा हा प्रयत्‍न होता. त्यांनी नंतर पाकिस्तानलाही भेट दिली. त्याआधी १९७१च्या युद्धानंतर भारत व पाक दरम्यान चर्चा आणि व्यापार ठप्प होता. अटलजींनी निःशस्त्रीकरण परिषदेत देशाचे प्रतिनिधित्व केले आणि भारताच्या अणुकार्यक्रमाचे जोरदार समर्थन केले. विदेशमंत्री म्हणून १९७७च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हिंदी भाषेबद्दल प्रेम असलेल्या अटलजींनी हिंदीतच भाषण करण्याचे ठरवले. राष्ट्रसंघात हिंदीला मान्यता नव्हती. त्यामुळे हिंदीत भाषण करताना त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. पण ते मागे हटले नाहीत. त्यांना इतका आनंद झाला की ते म्हणाले 

गूंजी  हिंदी विश्वमें 

स्वप्न हुआ साकार 

राष्ट्रसंघ के मंच से 

हिंदी की जयकार!

अटलजींनी आपल्या कार्यकाळात पुढील काही अत्यंत महत्वाची कामे केली. 11 आणि 13 मे 1998 ला पोखरण येथे पाच भुमिगत परमाणु परिक्षण विस्फोट करून अटल बिहारी वाजपेयींनी भारताला परमाणु शक्ती संपन्न देश घोषित केले. ही सगळी प्रक्रिया अत्यंत गोपनीयरित्या पार पाडली गेली. या भारताने टाकलेल्या यशस्वी आणि धाडसी पावलांमुळे पाश्चिमात्य राष्ट्रांना धक्का बसून त्यांनी अनेक अटी भारतावर लादल्या. पण वाजपेयी सरकारने या सर्व गोष्टींचा खंबीरपणे सामना केला.

19 फेब्रुवारी 1999 ला पाकिस्तान समवेत चांगले संबंध प्रस्थापित करण्याकरता पुढाकार घेत सदा. ए. सरहद नावाने दिल्ली ते लाहौर बस सेवा सुरू करण्यात येऊन स्वतः वाजपेयी पाकिस्तानला जाऊन आले. भारत पाक संबंध सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला. महत्वाची शहरे महामार्गांनी जोडण्यासाठी स्वर्णिम चतुर्भुज परियोजना कार्यान्वित केली. 100 वर्षांपेक्षा अधिक जुना असलेला कावेरी जलविवाद सोडविला.

देशातील सर्व विमानतळांचा आणि राष्ट्रीय महामार्गांचा विकास केला: कोकण रेल्वे व नव्या टेलीकाॅम नितीची सुरूवात करून पायाभूत विकास करण्याकरीता पाऊले उचलली. आर्थिक सल्लागार समिती, व्यापार व उद्योग समिती, राष्ट्रीय सुरक्षा समितीची रचना केली त्यामुळे कामांचा वेग वाढला. याशिवाय लोकहिताच्या दृष्टीने अनेक महत्वाची कामे तडीस नेली.

अटलजी म्हणजे एक कवी मनाचा राजकारणी. संगीत, कलांचा आस्वाद घेणारा एक रसिक. काव्यशास्त्र विनोदात रमणारा एक जिंदादिल माणूस… राजकारणाच्या धामधुमीतही अटलजींची काव्य आणि लेखन प्रतिभा कार्यरत होती. मेरी संसदीय यात्रा, मेरी इक्यावन कविताये, संकल्प काल, शक्ती से शांती, फोर डीकेड्स इन पार्लमेंट, कैदी कविराज की कुंडलिया आदी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. जीवनाबद्दल एका कवितेत सुरेख भाष्य करतात 

 जन्म मरण का अविरत फेरा

जीवन बंजारो का डेरा

आज यहाँ कल कहाँ कूच  है

कौन जानता किधर सवेरा…

भविष्याचा वेध घेणारी त्यांची नजर सर्व समाजाला आणि दिशाहीनांना नवी दिशा देत होती.

हम पडाव को समझे मंझिल

लक्ष्य हुआ आँखो से ओझल

वर्तमान के मोहजाल मे

आनेवाला कल न भुलाए

आओ फिर से दिया जलाएँ…

आपल्या वाणीनं सार्वजनिक सभा आणि संसद गाजवणारे अटलजी तसे मितभाषी होते. त्यांना निसर्गात रमायला, निसर्गाची विविध रुपं बघायला आवडायची. ते संगीताचेत्यांचा छंद होता. गीत रामायण ऐकायला त्यांना अतिशय आवडायचं. त्यामुळे बाबुजींशी म्हणजेच सुधीर फडकेंशी त्यांची खास मैत्री होती. भीमसेन जोशींनाही ऐकायला ते अतिशय उत्सुक असत. भीमसेन जोशींची खास मैफिल वाजपेयी पंतप्रधान असतानापुण्यात झाली होती. पण कवी मनाच्या अटलजींनी कारगिल युद्धाच्या वेळी कणखर भूमिका घेतली.

दांव पर सब कुछ लगा है

रुक नही सकते, टूट सकते

है मगर हम झुक नही सकते…

ते आपल्या कवितांबद्दल बोलताना म्हणतात 

’’माझ्या कविता म्हणजे युध्दाची घोषणा करण्यासारख्या आहेत ज्यात हारण्याची भिती नाही, माझ्या कवितांमधे सैनिकाला हरण्याची भिती नाही तर जिंकण्याची आस असेल. माझ्या कवितांमधे भिती चा आवाज नव्हें तर जिंकण्याचा जयघोष असेल. ’’

अटलजींना आपल्या आयुष्यात अनेक मोठमोठे सन्मानाचे पुरस्कार लाभले. या विद्वान, कवी मनाच्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याचा गौरव 25 डिसेंबर 2014 ला भारताचा सर्वोच्च पुरस्कार ’’भारतरत्न’’ देण्यासाठी देऊन करण्यात आला. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी स्वतः 27 मार्च 2015 ला अटलजींच्या घरी त्यांना हा पुरस्कार देण्याकरता गेले. अटलजींना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे त्यांनी भारतवासीयांच्या हृदयात कायमचे आदराचे स्थान मिळाले आहे. हीच खरी त्यांच्या कामाची पावती आहे.

२५ डिसेंबर हा अटलजींचा जन्मदिवस “गुड गव्हर्नन्स डे” अर्थात “सुशासन दिन” म्हणून साजरा केला जातो. आजच्या काळात खरी गरज अटलजींसारख्या स्वच्छ, चारित्र्यवान, अभ्यासू आणि निष्कलंक नेत्यांची आहे. अटलजी आज जरी आपल्यात नसले तरी जीवन कसं जगावं याचा आदर्श त्यांनी आपल्या उदाहरणातून घालून दिला आहे. ज्यांना वाजपेयींना समजून घ्यायचं असेल त्यांनी त्यांच्या विविध विषयावर केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणांचा जरूर अभ्यास करावा.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments