श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ मूकं करोति वाचालं! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
☆
मूकं करोति वाचालं!
– – – एका साधू हृदयी सैनिकाची अजरामर कहाणी!
ती केवळ पाच-सात वर्षांची अजाण बालिका… कोणत्याही काश्मिरी कन्येसारखी छान, सुंदर आणि निष्पाप! रुक्साना तीच नाव… रुखसाना म्हणजे गुलाबी गालांची मुलगी! त्या रात्री तिच्या घरातले सर्वजण निद्रेच्या अधीन असतानाच घराच्या दारावर थाप पडली… तिच्या बाबांनी दरवाजा उघडला. एवढ्या रात्री कोण आलं असावं याचं आश्चर्य वाटून डोळे किलकिले केलेली रुक्साना एके-४७ रायफलींच्या गोळीबाराच्या भयावह आवाजाने खडबडून जागी झाली… ती उठून दाराकडे धावली आणि वडीलांना रक्ताच्या प्रचंड थारोळ्यात पडलेली पाहून जागीच थिजली… जणू बर्फाचा एखादा कडा! रुक्सानाच्या वडिलांचा अतिरेक्यांनी खून केला होता… ते भारतीय फौजेला साहाय्य करतात अशा संशयातून. गोष्ट आहे वर्ष १९९८ ची. या प्रचंड मोठ्या मानसिक धक्क्याने रुक्साना अशी अबोल झाली जणू जन्मत:च मुकी!
इकडे याच महिन्यात एक तरुण लष्करी अधिकारी, विजयंत थापर नेमणुकीस आला होता. विजयंत यांच्या रूपाने थापर कुटुंबातील चौथा पुरुष भारतीय लष्कराच्या सेवेत दाखल झाला होता… वय केवळ २१ वर्षांचं. डॉक्टर कॅप्टन कर्ताराम थापर पणजोबा, आर्मी ऑफिसर जे. के. थापर आजोबा आणि कर्नल वीरेंद्रनाथ थापर वडील आणि आता लेफ्टनंट विजयंत थापर अशी ही वंशवेल होती. मातोश्री तृप्ता या गृहिणी होत्या. वडील १९९९ मध्ये सेवानिवृत्त व्हायचे होते त्याआधी १९९८ मध्ये विजयंत सेनेत दाखल झाले… एक परंपरा पुढे पाऊल टाकीत होती!
बारकुड्या पण देखण्या, तरतरीत सरळ नाक असलेल्या विजयंतला वडिलांनी ‘रॉबिन’ हे लाडाचे नाव दिले होते… विजयंत होताच तसा रॉबिन पक्षासारखा दिसायला नाजूक पण अत्यंत उत्साही… मृदू काळजाचा. अगदी लहानपणापासून विजयंतच्या वर्तनात एखाद्या साधूची झलक दिसे. कधी कुणाला दुखावणे नाही की शब्दांनी घायाळ करणे नाही. जवळच्या वस्तू आनंदाने दुस-याला देऊन मोकळे होणे त्याला सहजी जमायचे. घरी पाळलेल्या श्वानांचे लाड करणे त्याला आवडायचे. पण हाच नाजूक विजयंत त्याच्या हातात सैनिकी बंदूक आली की एकदम निराळा अवतार धारण करी. तो मोठ्या भावाला ‘पाकिस्तान’ व्हायला लावायचा आणि स्वत: ‘हिंदुस्तान’ बनत युद्धात ‘पाकिस्तान’वर मात करायचा… थापर घराण्यातील आणखी एक तरुण सैनिक होण्याच्या मार्गावर अग्रेसर होत होता! लहानपणी म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षी विजयंतने त्याच्या वडिलांच्या मांडीवर बसलेला असताना त्यांचे पिस्टल अचूकपणे फायर करून दाखवले होते!
सैनिकी शाळेतून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून विजयंत प्रतिष्ठित राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासला, पुणे येथे सैनिकी अधिकारी प्रशिक्षणास पात्र ठरले. मांसाहार, मद्यपान, धुम्रपान यांपासून आयुष्यभर दूर राहण्याचा संकल्प केलेले, विजयंत हे इंद्रदेवाचे नाव धारण केलेले, धार्मिक उपासनेत रत असणारे विजयंत व्यायाम करून शरीर संपदा कमावण्यात मात्र खूप गंभीर असत. त्यामुळे बारीक चण असली तरी त्यांची शारीरिक क्षमता अतिशय उत्तम होती. त्यामुळे एन. डी. ए. आणि पुढे इंडीयन मिलिटरी अकदामी, देहराडून येथून ते उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यांना खरेतर लढाऊ वैमानिक व्हायचे होते पण २, राजपुताना रायफल्स या पायदळ विभागात त्यांची कारकीर्द घडायची होती… ते वडिलांच्या पावलावर पाऊल टाकीत लढाऊ सैनिक बनले. वडील मराठा लाईट इन्फंट्रीचे अधिकारी होते!
२, राजपुताना त्याच वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या बंदोबस्तासाठी पाठवली गेली. पंजाब राज्यातील रुपनगर मधल्या नांगल येथे बालपण गेलेला विजयंत नावाचा तरुण आता थेट बर्फाळ प्रदेशात आला होता. कुपवाडा येथे नेमणूक असताना रुक्सानाची घटना घडली. कोमल हृदयाच्या विजयंत यांची आणि रुक्सानाची योगायोगानेच गाठ पडली आणि त्यांचे अबोल मैत्र जुळले! तिच्या घरच्यांनी आता रुक्साना कायमची मुकी झाली, असेच गृहीत धरले होते. मात्र विजयंत साहेबांनी हा समज खोटा ठरवला… आणि चमत्कार करून दाखवला.
धकाधकीच्या लष्करी कारवाया आणि अन्य कामांतून वेळ काढून विजयंत साहेब रुक्सानाची भेट घ्यायचे.. तिला खाऊ द्यायचे आणि तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचे… दुस-या महिन्यात रुक्सानाची वाचा परत आली… देवाची कृपा असेल तर ‘मुकं करोति वाचालं… हा श्लोक खरा ठरला होता!
१९९९. मे महिन्याच्या आरंभी भारत-पाकिस्तान दरम्यान कारगिल युद्ध सुरु झाले… भारतीय हद्दीत विश्वासघात करून घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैन्याला हाकलून लावण्यासाठी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन विजय’ हाती घेतले!
युद्धात पराक्रम गाजवण्याची मनोमन इच्छा असलेल्या कॅप्टन विजयंत थापर यांना हे युद्ध म्हणजे lifetime opportunity म्हणजे नशीबाने मिळणारी संधी वाटली नसती तरच नवल.
वीरचक्र विजेते कमांडिंग ऑफिसर कर्नल एम. बी. रबिन्द्रनाथ साहेबांच्या नेतृत्वात आणि कंपनी कमांडर मेजर पद्मपाणी आचार्य यांच्या सोबत विजयंत तोलोलिंग पर्वत पाकिस्तानी सेनेकडून हिसकावून घेण्याच्या कामगिरीवर निघाले. १२ जून, १९९९ची रात्र. मेजर मोहित सक्सेना साहेबांनी चढवलेल्या हल्ल्याला अपेक्षित यश मिळालेले नव्हते, आपली बरीच हानी झालेली होती. पर्वतावर ‘बर्बाद’ नावाचा एक बंकर (खंदक) होता. यात बसून पाकिस्तानी सैनिक भारतीय सैनिकांवर तुफान हल्ला चढवत होते. त्यामुळे पुढे जाण्याचे आपले सर्व प्रयत्न फोल ठरत होते. मग निकराचा प्रयत्न म्हणून याच बंकर वर एकाच वेळी अनेक बोफोर्स तोफांनी तुफान मारा करण्यात आला… आणि त्याच्या आडोशात भारतीय सैनिकांची तुकडी त्या बंकरच्या दिशेने निघाली… समोरून स्वयंचलीत आधुनिक रायफलीमधून अचूक गोळीबार सुरु होता… दगडांचा जमेल तसा आडोसा घेत विजयंत साहेब आणि त्यांचे सहकारी त्या गोळीबाराच्या वर्षावात भिजत पुढे गेले… काहीजण धारातीर्थी पडले! विजयंत साहेबांवरही तुफान गोळीबार झाला… पण ते बचावले… आणि त्यांनी खंदकात झेप टाकली… दोन पाकिस्तानी सैनिकांशी त्यांची झटापट झाली… पण विजयंत यांनी त्यांना यमसदनी धाडले… खरं तर त्यांची शत्रूला जिवंत पकडायची इच्छा होती… पण बाकीचे शत्रूसैनिक पळून जाण्यात यशस्वी ठरले! विजयंत यांनी त्याच रात्री आपल्या रोजनिशीमध्ये या लढाईची थरारक हकीकत लिहिली… दोन शत्रू टिपले… पण शत्रूला जिवंत पकडण्याची मनीषा अपुरी राहिली! पण या चकमकीतील Point 4590 वरील विजय कारगिल लढाईला भारताच्या बाजुने झुकवून गेला! इथे कशमिरी अतिरेकी नव्हते.. संपूर्ण पाकिस्तानी फौज होती… त्यांनी कित्येक महिने आधी तयारी करून ठेवली होती. त्यांच्यापर्यंत पोहोचायला भारतीय सैनिकांना अगदीच चिंचोळी जागा होती… त्यांच्या तोफखान्याच्या मा-यातून पुढे जावे लागत होते… उंच चढण होती, थंडी होती… खाली खोल द-या होत्या!
तोलोलिंग वर भारतीय ध्वज फडकवल्यावर विजयंत साहेबांनी आईशी फोनवर संवाद साधून तिला त्याच्या कामगिरीची खबर दिली होती.
अनेक बलिदाने द्यावी लागली पण आता यशही मिळू लागले होते… भारतीय फौजेचा आत्मविश्वास खूप वाढला होता. २८ जून. आता आणखी मोठी कामगिरी २, राजपुतानाकडे आली. थ्री पिंपल्स, नोळ आणि लोन टेकडी भाग ही तीन महत्त्वाची ठिकाणे काबीज करायची होती. पौर्णिमेची रात्र होती. शुभ्र चांदणे पडले होते.
हल्ल्यावर निघण्यापूर्वी विजयंत यांना काही तरी जाणवले… बहुदा या मोहिमेतून आपण जिवंत परतू शकणार नाही आहोत… कारण त्यांचे अनेक सहकारी माघारी येऊच शकले नव्हते… लढाई थांबणार नव्हती जिंकल्याशिवाय! त्यांनी घाईघाईत एक पत्र लिहायला घेतलं… विजयंत साहेब कारगिल युद्धात लढायला गेले आहेत… हे त्यांच्या घरी ठाऊक नव्हते.
अतिप्रिय पपा आणि आई,… आणि आज्जी!
तुमच्या हाती हे पत्र लागेल तेंव्हा मी स्वर्गातील सुंदर अप्सरांचा पाहुणचार घेत घेत आकाशातून तुमच्याकडे पहात असेन!
मला माझ्या आयुष्याबाबत कोणतीही खंत नाही. खरं तर, पुन्हा मानव देह मिळाला तर मी पुन्हा भारतीय फौजेत भरती होईन आणि मातृभूमीसाठी लढेन!
आपल्या सैनिकांनी जिथे देह ठेवले, ती जागा तुम्हांला शक्य झाल्यास इथे प्रत्यक्ष भेट देऊन एकदा पहा… बघा… देशाच्या भविष्यासाठी तरुण सैनिकांनी त्यांचा सुंदर वर्तमानकाळ कसा अर्पण केला ते!
नवीन सैनिकांना या बलिदानांबद्दल माहिती द्यायलाच हवी. मला आशा आहे, माझे छायाचित्र माझ्या ए कंपनीच्या मंदिरात लावले जाईल… हुतात्मा विजयंत थापर! कारगिल युद्ध, १९९९!
माझे शक्य होतील ते अवयव दान करावेत! अनाथश्रमांना शक्य होतील तेवढ्या देणग्या द्याव्यात. आणि हो… रुक्सानाला दरमहिना रोख रक्कम पाठवीत रहा माझ्यातर्फे… ती आता आणखी छान बोलायला लागली असेल! आणि योगी बाबांचीही भेट घ्या.. त्यांना चरणस्पर्श सांगा माझा!
सैनिकांचे बलिदान विसरू नका! पपा, तुम्हांला माझा अभिमानच वाटेल… तुम्हीही सैनिकच होता. तुम्हांला न मिळू शकलेलं सैन्य शौर्य पदक मला मिळेल…!
आई, तू ——–ला भेटलंच पाहिजे हं! तिची माझी प्रेमकहाणी पूर्ण होऊ नाही शकली या जन्मी. तिला माझ्या शुभेच्छा सांग! तिच्यावर माझं जीवापाड प्रेम होतं!
चला, आता माझ्या डझनभर मित्रांन सोबत घेऊन लढाईला निघायची वेळ झाली आहे… सर्वांना शुभेच्छा… राजा सारखं जगा!
तुमचा रॉबिन…
आणि मरणावर स्वार व्हायला दल निघाले… पाकिस्तानी तोफखाना आग ओकत होता… मग १२० भारतीय तोफा अचूक गोळाबारी करू लागल्या… धुराचे लोट, आगीचा डोंब उसळत होता… विजयंत साहेब त्यातून पुढे निघाले… त्यांचा प्रिय सहकारी शिपाई जगमल सिंह धारातीर्थी पडला… काही वेळाने कंपनी कमांडर पद्मपाणी आचार्य साहेब हुतात्मा झाले… आता विजयंत यांच्या तळपायाची आग मस्तकी गेली! नाईक तिलक सिंग यांना हाताशी घेत ते त्या गोळीबाराच्या वर्षावात सरळ पुढे घुसले! आता शत्रू आणि त्यांच्या केवळ १५ मीटर्स एवढेच अंतर उरले होते… दोन मशीनगन्स यांच्याच दिशेला फायर करीत होत्या… लपायला नीट जागा नव्हती… गोळीबाराला तशाही स्थितीत उत्तर दिले जात होते… यात दीड तास गेला! आता मात्र विजयंत साहेबांचा संयम संपला… आता माघारी फिरणे तर शक्य नव्हतेच… पुढेच जावे!
गोलियां आणि गालियां यांचेही आदान-प्रदान सुरु होते दोन्ही बाजूंनी. पाकिस्तानी म्हणत होते… काफरांनो, तुम्ही काय लढणार आमच्याशी? यावर विजयंत साहेब म्हणत… तुमची इथून पळून जाण्याची संधीही आता निघून गेली आहे… आता आम्हीच तुमचे जनाजे काढू!
त्यांनी पुढे मुसंडी मारली… एवढ्यात मशीनगनचा एक मोठा फायर आला आणि साहेबांच्या मस्तकाचा वेध घेऊन गेला… साहेब त्यांच्या सहका-याच्या बाहुपाशात कोसळले… लहानगा रॉबिन पक्षी आसमंतात कायमचा उडून गेला होता… कधीही न परतण्यासाठी! पुढे भारताने शत्रूला यमसदनी धाडले! पण आपले मोती विखुरले गेले होते… मातीत मिसळून गेले कारगिलच्या पर्वतांवरच्या!
कॅप्टन विजयंत थापर यांच्या वडिलांनी लेकाचा शब्द लक्षात ठेवला… वाढते वय… बिघडणारी प्रकृती यांची तमा न बाळगता… ते तोलोलिंगची चढण चढत त्यांचा लेक जिथे धारातीर्थी पडला त्या ठिकाणाला भेट देतात… दरवर्षी… आई तिथे जाऊ शकत नाही… पण तिच्या मनात मात्र तिचा रॉबिन अजून भरारी घेतच असतो…! मरणोत्तर वीर चक्र देऊन देशाने कॅप्टन विजयंत थापर साहेबांचा गौरव केला आहे. साहेबांच्या आठवणी त्यांच्या कुटुंबाने, मित्रांनी आणि त्यांच्या दलाने मोठ्या प्रेमाने जतन करून ठेवल्या आहेत. तोलोलिंगवर त्यांच्या स्मृती एक छोटे मंदिर उभारून जतन केल्या गेल्या आहेत… आणि त्यांच्या ए कंपनी मंदिराच्या भिंतीवर एक छान, सुरेख तैलचित्र लावलेले आहे… हुतात्मा कॅप्टन विजयंत थापर… दी रॉबिन!
१९९९ मध्ये अर्थात युद्धासाठी कारगिल येथे जाण्यापूर्वी लेफ्टनंट वैजयंत थापर यांनी आपल्या दैनंदिनीमध्ये आयुष्याची रूपरेषा लिहून ठेवली होती… स्वत:शीच काही गोष्टी ठरवून ठेवल्या होत्या…
मी भारताचा ध्वज सतत उंचावत राहीन. मला माझ्या आई-वडिलांचा खूप अभिमान आहे. मी मरणोत्तर नेत्रदान करेन, अवयवदानही करेन. मी धुम्रपान करणार नाही, मांसाहार करणार नाही, अंडी खाणार नाही. मी माझ्या सैनिकांसमवेत राहीन. मी स्वत:ला खाली बघायला लागेल असे वर्तन करणार नाही. मी आयुष्यात एका तरी अनाथ मुलाचा शिक्षणाचा आणि इतर सर्व खर्च करीन… आणि मी मरताना राम स्मरेन!
कॅप्टन विजयंत थापर यांच्या सारखे, वयाच्या एकविसाव्या-बाविसाव्या वर्षी एवढे स्पष्ट विचार, ज्ञान, चारित्र्य कमावलेला सैनिकी अधिकारी आपल्याला आणखी खूप वर्षे लाभायला हवे होते… असे राहून राहून वाटते. त्यांच्या शौर्याच्या कथा काही लोकांना ठाऊक आहेत… पण त्यांची ही वैचारिक बाजू तशी कमी प्रकाशात आलेली आहे. कॅप्टन विजयंत थापर डॉट कॉम या संकेतस्थळावर साहेबांच्या आयुष्याचा अतिशय सविस्तर आणि सुंदर आलेख मांडण्यात आला आहे. इंटरनेटवर साहेबांच्या पालकांनी अनेक विडीओज मधून खूप छान माहिती दिली आहे. कुणाला ना कुणाला तरी देशसेवेसाठी पुढे यावेच लागेल… असेही विजयंत साहेबांचे वडील नेहमी म्हणतात! वरील बरीचशी माहिती मी तिथूनच घेतली आहे. छायाचित्रे साभार. आणखी खूप काही लिहायचे होते. विशेषत: त्यांच्या कुटुंबाविषयी, त्यांच्या वडिलांविषयी. पण त्यासाठी स्वतंत्र लेख लिहावा लागेल.
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





