श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “दार उघड बया दार उघड…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
ट़ोक टोक… टोक.. कुणी आहे का आत? या बंद खिडकीतून ऐकू कसं जाईल म्हणा! … पण कुणी तरी या दिवाणखान्यात येऊन जाईलच कि! .. सगळीच मंडळी का स्वयंपाक घरात कायमची बसून राहणार आहेत… बसली असतील म्हणा या असल्या राक्षसी पावसाच्या दिवसात.. गरमागरम कांदा भजी नि सोबत तो वाफाळता चहाचे दमा दमाने घुटके घेत… गारठली असावीत तना ने नि मनाने… उबदार पांघरूणात गुरफटून मुस्कट मारून पडून राहावंसं वाटतं असेल त्यांना… पण मला काय करायच्या त्यांच्या या कविकल्पनां ना घेऊन…. माझा कुठे प्रश्न सुटलाय अजून… आहे का त्यांना कशाचं व्यवधान.. जरा दारावरची बेल वाजू दे अशी कर्कश आवाजात की मग जातील धावत पळत आता कोण तडमडलंय या असल्या धुंवाधार पावसात? म्हणत दार उघडतील… आणि हवी असलेली व्यक्ती असेल तर हास्याचा गडगडाट करून आनंदाची कारंजी फुटून त्या अभ्यागताचं स्वागत करतील.. अरे आधी आत तर ये.. पावसाने किती भिजलास बघ बरं आधी बाथरूम जाऊन कपडे बदलून घे… आणि मगं गरमागरम चहा घे… आणि सोबत कांदा भजी पण आहे बरं… आज तुझं नशिब चांगलच फळफळलयं बघ.. आम्ही सगळेच घरात तुला या वेळी भेटतोय शिवाय सोबत चहा नि भजी… त्या पाहुण्यानं काढलं ते नशीब.. आं आणि मगापास्नं या खिडकीच्या काचेवर टोक टोक करून बोलवतोय आहे का कुणाचं लक्ष माझ्याकडे.. सगळे एकजात बहिरे कशाने झाले एव्हढे… का कानात एअरफोनचा बोळा कोंबून हरिहरनची गज़ल मधे गुंग झालेत…. अरे कुणी तरी या रे या दिवाणखान्याच्या खिडकी जवळ… या मुसळधार पावसात मी ही चिंब चिंब भिजलोय… बराच लांबन उडत उडत आलोय रे.. आणि जरा अजून थोडसंच लांब घरटं राहिलय़ माझी मैत्रिण चिमणीचं… पावसात उडत उडत इथवर आलो खरा पण आता त्याच पावसाच्या ओल्यानं पंख पाठीला नि पोटाला इतके चिकटून बसले मला उडताच येईना… शिवाय पावसात भिजून गेलो त्याने अंगात चांगलीच हुडहुडी भरली आहे… थोडसं अंग शेकून काही वेळ विसावा घेऊन पुढे निघावं असा विचार करून या खिडकीच्या कठड्यावर येऊन टेकलो.. पण पावसाचा मारा काही चुकवता आलाच नाही… अरे असं नका करू रे… अहो ताई माई अक्का…. दादा भाऊ, काका… अरे कुणी तरी यांना या खिडकीच्या जवळ.. आणि हि खिडकी उघडून मला आत घ्या… मला ठाऊक आहे ती कावळ्याची नि चिमणीची चिऊ ताई चिऊ ताई दार उघडं.. जुनी गोष्ट चांगली आठवत असणार तुम्हाला.. तेव्हाचा माझा धूर्त स्वार्थी स्वभावही चांगलाच तुम्ही लक्षात ठेवलेला असणार.. म्हणुन तर तुम्ही बघून न बघितल्यासारखे करून मला टाळायचं पाहताय… काय कलियुग आलयं असं तुम्ही एकमेकांना सांगताय चिमणीचं घर मेणाचं जवळच तर आहे तिकडे जायचं सोडून हा इकडे माणसांच्या फ्लॅट कडे कसा आला… का त्याला तिकडे चिमणीने तिच्या कटू पूर्वानुभवाने त्याला हाकलुन दिलं असणार तेव्हा कुठेच थारा मिळत नाही हे पाहून हा आमच्या घराच्या खिडकीच्या कठड्यावर टेकलायं काय? …. अरे पण तुम्ही असं दुष्टपणानं वागणार नाही याची मला खात्री आहे… अजूनही तुमच्या मनात माणूसकी, भूतदया शिल्लक आहे… तुम्ही मला नक्कीच आत घ्याल… थोडावेळ कोरडं होऊ द्याल… काही बाही चटकमटक खायला ही पुढ्यात टाकाल… अशी माझी आशा आहे… बाकी तुम्ही काहीही म्हणा पण तुम्ही सुध्दा माझ्याही पेक्षा जास्त स्वार्थी, आपमतलबी निघालात हं… कसं काय म्हणतात अहो तुमच्या या वाढलेल्या स्फोटक लोखसंखेला सामावून घेणाऱ्या लक्ष लक्ष संखेने बांधल्या जाणाऱ्या घरासाठी, महामार्ग बांधण्यासाठी आणि काय काय उभा करण्यासाठी वृक्षतोड किती केलीत… अहो सिमेट जंगल उभा केलत ते नैसर्गिक जंगलाची आहुती देऊन… आम्हा पक्षांची घरटी उद्ध्वस्त करून आमचा संसार धुळीला मिळवलात आणि छान छान घर बांधलीत आणि राजाराणी टुकीचा संसार करू लागलात… तुम्हाला ठाऊक आहे का या तुम्ही केलेल्या उध्वस्त पणात आमची गण संख्या रोडावत चालली.. आणि एकवेळ तर अशी येईल कि तुम्ही आमचं चित्रच बघाल… का म्हणून तुम्ही असं आमच्याशी उभा दावा केलात… काय घोडं मारलं होतं आम्ही तुमचं… गरज आम्हाला नाही गरज तुम्हालाच जास्त होती आमची… तुमच्या पितरांना ठेवलेले पिंडांना आम्ही शिवल्या शिवाय मुक्ती कशी मिळणार आहे… हा आमचा मान होता पण तुमच्या कृत्याने आमचा अपमान झाला आहे… या गोष्टी मी तुम्हांला तुमच्याच घरात येऊन बोलणार नव्हतो… पण वेळच तशी आणली तुम्ही आमच्यावर.. मग नाईलाजच झाला… आता कसं प्रायश्चित्त घेणार आहात… बघा राग आलाना तुम्हाला म्हणून तर बंद खिडकीच्या आतूनच मला हुसकावून लावण्यासाठी आलात नां? जातो बाबा बाबा इथून जातो… मला वाटलं नव्हतं आम्हा कावळ्यांपेक्षा तुम्ही डोमकावळेच फार भीतीदायक असाल म्हणून…. ह़ं चला तर मग तुमच्या पाशी सहृदयता, सहानुभूती, भुतदया, दयाळूपणा संपलेलाच दिसतोय… आता आपल्या मैत्रीण चिऊताई शिवाय आहे कोण दुसरं…. शेवटी आपल्याच बिरादारीतलीच माणसं एकमेकांच्या मदतीला धावून येत असतात हेच निर्विवाद सत्य आहे… चिऊ ताई चिऊ ताई दार उघड जरा बाई… आलोय तुझ्या कडे मदत मागायला… माझं घरटं वाहून नेलय पाऊसानं… मी निघालोच तुझ्याकडे.. काव काव काव….
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







