सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
मनमंजुषेतून
☆ ओटी अधिक मासातील — ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
अधिक महिना सुरू झाला आणि त्याचं माहात्म्य सांगणारे वेगवेगळे लेख सोशल मिडियावर धबाधबा कोसळू लागले आहेत. या अधिक महिन्याचं एक वेगळेपण म्हणजे या महिन्यात लेकीनं आईची ओटी भरावी असं म्हणतात. इतर वेळी कधीही मुलगी आईची ओटी भरत नाही. हं, आता ओटी भरायची म्हणजे ती खण-नारळ, साडी/वस्त्र
अशी जगरहाटी. मग ती सवाष्णीनी आणि सवाष्णीचीच/देवीची भरायची अशी आपली परंपरा.
पण ओटी भरणं म्हणजे केवळ सौभाग्याचा सन्मान एवढाच अर्थ अभिप्रेत आहे का? तर नाही. स्त्रीच्या मातृत्वाचा आणि सृजनतेचाही सन्मान करण्याची ही परंपरा आहे. आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आहे. मग ती आई प्रत्यक्ष जन्म देणारीच असली पाहिजे असं नाही, तिच्या मातृत्व भावनेचा आदर आणि सन्मान करण्यासाठी ही संधी आहे, असं मला वाटतं. याआधी माझ्या आईची शब्दरूप ओटी मी सादर केली होती.
आजही अशीच शब्दरूप ओटी भरणार आहे… मातृसमान माझ्या सासूबाईंची.
सुमारे ३३ वर्षांपूर्वी लग्न होऊन मी सासरी आले. पण आजपर्यंत एकही दिवस माझ्या सासूबाईंनी मला सून म्हणून वागवलं नाही. आमचं नातं माय-लेकीचंच राहिलं. बऱ्याच घरात सुनेच्या आगमनानंतर स्वैपाकघराला युद्धभूमीचं स्वरूप प्राप्त होतं. आता कोणत्याही दोन घरातील स्वैपाकाच्या पद्धतीत फरक हा असतोच. नव्याने आपल्या घरात आलेल्या सुनेला स्वैपाकाची नवीन पद्धत लगेच कशी स्वीकारता येणार?
तर आमच्या घरी म्हणजे माझ्या सासरची एकूण सगळी मंडळी तर मूळ मध्यप्रदेशातील आणि मी महाराष्ट्रात वाढलेली. मला स्वैपाक येत होता. पण दोन्हीकडच्या पद्धतीत खूपच फरक. आमच्याकडे घडीची पोळी, यांच्याकडे टम्म फुगलेले गरम-गरम फुलके.
सालासहित मुगाच्या डाळीचं वरण जास्त आणि तुरीचं वरण केलं तरी ते चिंच/कोकम आणि गूळ न घालता. म्हणजे हे आपलं रोजच्या जेवणातला उदाहरण. दीर आणि सासऱ्यांना आंबटगोड भाजी-आमटी अजिबातच चालायची नाही. पण सासूबाई म्हणायच्या तू त्यांची भाजी-आमटी वेगळी काढून ठेव आणि बाकीच्यात घाल चिंच-गूळ, आम्हाला चालेल.. म्हणजे त्या आणि नणंद.
माझं लग्न झालं तेव्हा सासरेही नोकरीत होते. आम्ही दोघं, दीर, नणंद आणि सासूबाई, अशी सहा माणसं घरात. एकावेळी ४०-४० फुलके लागायचे. नणंदेला आणि मला एकत्र फुलके करायला लावून मला त्यांनी ते सहज शिकवले. तसेच इतर वेगळे पदार्थही.
लग्नानंतर चारच महिन्यांनी मला प्रमोशन मिळालं. माझी बदली वसईला झाली. डोंबिवली ते वसई.. व्हाया दादर जायचं म्हणजे येऊन – जाऊन, पाच तास प्रवासात जाणार… डोंबिवलीहून दादरला उतरायचं आणि मग पश्चिम रेल्वेच्या विरार लोकलने, वसईला जायचं. प्रमोशन स्वीकारायचं की नाही, मी दुविधेत पडले होते. माझ्या आई-वडिलांचाही नकारच होता. नुकतंच लग्न झालेलं, त्यामुळे मी आधी घरात स्थिरस्थावर व्हावं असं त्यांना वाटत होतं. पण माझ्या सासू-सासऱ्यांनी मला सांगितलं, प्रवास त्रासदायक आणि वेळखाऊ आहे, तो तुला झेपेल का? हा विचार करून काय ते ठरव. बाकी घरातली काही जबाबदारी तुला घ्यावी लागणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ. मी प्रमोशन स्वीकारलं. पोळ्यांना बाई ठेवली. मी घरातून सकाळी साडेसातला बाहेर पडायचे आणि रात्री आठच्या सुमारास घरी परतायचे. सकाळी आई माझा डबा सुद्धा भरून द्यायच्या. रात्री आल्यावर तर स्वैपाक झालेलाच असायचा. मागची आवरा-आवर तेवढी मी करायचे. कधीकधी मी खूप थकलेय असं दिसलं तर आई म्हणायच्या, राहू दे मी बघते ते. झोप तू, परत सकाळी उठून धावायचंय तुला!
… किती जणींना हे भाग्य लाभतं हो? असे तब्बल तेरा महिने काढले आणि मग माझी बदली डोंबिवलीला झाली.
दोन वर्षांनी मी गरोदर असतानाच माझे वडील गेले. त्यावेळीही त्यांनी मला खूप आधार दिला. माझ्या आईला पार्किन्सन होता. त्यामुळे माझं बाळंतपण सासरीच झालं. अर्थात माझ्या बहिणींनीही खूप मदत केली. पण त्याही नोकरी करणार्या आणि त्यांना त्यांचेही संसार होतेच, त्यामुळे मदतीला थोडी मर्यादा होती. आईंनी सगळं खूप मायेनं केलं, माझं आणि नातवाचंही.
सासरी थोडं धार्मिक वातावरण होतं. पण आई-दादांनी मला कधीच कोणत्या गोष्टीची जबरदस्ती केली नाही. किंवा अमुक एक पूजा आहे, तर मी सुट्टी घ्यावी अशी अपेक्षाही ठेवली नाही. काहीवेळा कार्यालयीन जबाबदारीमुळे रजा घेणं शक्य नसायचं, पण त्यांनी कधीच तक्रार केली नाही.
दिराचं लग्न झाल्यावर आम्ही वेगळे झालो. पूर्वेला घर घेतलं. दोन्ही घरं म्हणजे दोन टोकं होती. पण मनात कधी अंतर निर्माण झालं नाही. रोज मी लेकाला पाळणाघरात ठेवायचे. पण माझ्या अडीअडचणीला आई-दादा कायम हजर असायचे. लेकाच्या तब्येतीच्या लहान-सहान तक्रारींसाठी मला कधी फारशी रजा घ्यायला लागली नाही. त्या माझ्याकडे येऊन राहायच्या नाहीतर मग लेकाला त्यांच्याकडे ठेवून घ्यायच्या. दादा तर रोजच संध्याकाळी आमच्याकडे यायचे, गौरवला सांभाळायचे, रात्री राहून, सकाळी माझ्याबरोबर बाहेर पडायचे. प्रशांतना सकाळी लवकर जावं लागायचं आणि रात्री पण नऊ वाजून जायचे घरी यायला. बँकेचं डबल टायमिंग होतं.
मला कधी बरं नसलं तरी आई आमच्याकडे येऊन राहायच्या. काही वर्षांपूर्वी तर मला खूप ताप आला होता, तोंडाची चव गेली होती. डॉ. च्या औषधाने ताप गेला तरी जेवण अजिबात जात नव्हतं. आई दिवसभर काहीतरी वेगवेगळं करून माझ्यापुढे ठेवायच्या, मी चार घास तरी खावे म्हणून. प्रसंगी स्वतःच्या हाताने त्यांनी मला भरवलंही आहे.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एवढं सगळं केलं तरी त्याचा त्यांनी चुकुनही उच्चारदेखील केला नाही कधीच. ना मला ऐकवलं ना इतर कोणालाही. कधीतरी छोटे – मोठे वादही व्हायचे आमच्यात. पण त्यांनी कधीच ते मनात ठेवलं नाही. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमोकळा आहे. घरात येणाऱ्या पाहुण्यांची आवड-निवड लक्षात ठेवून, त्यांना भरपेट जेवायला घालणं, ही तर त्यांची खासियत. सुगरण आहेत त्या आणि नवीन पदार्थ शिकण्यासाठी कायम तयार!
माझ्या मिस्टरांच्या आकस्मिक मृत्यूने मात्र आई-दादा अगदी खचून गेले. त्यांचा जीवनातला रस संपून गेला. खरंच किती कठीण आहे उतारवयात हा आघात पचवणं! नंतरच्या काळात माझे सासरेही गेले. वयानुसार आईंचीही तब्येत खालावली. तसं त्यांना बी. पी. , डायबिटीस वगैरे काही नाही हं आधीपासून!
मला आठवतं काही वर्षांपूर्वी मी लेकाला घेऊन ठाण्याला गेले होते. माझ्या हातातल्या चार सोन्याच्या बांगड्यांपैकी एक बांगडी चोरीला गेली. कशी काय ते कळलं नाही, गाडीला गर्दीही नव्हती. दुसऱ्या दिवशी फक्त एक मोठ्ठा ओरखडा दिसला हातावर. मी आईंना फोन करून सांगितलं, त्या पटकन म्हणाल्या, तुझ्या हाताला काही झालं नाही ना, हे महत्त्वाचं, बांगडी काय पुन्हा करता येईल!
असे किती म्हणून प्रसंग सांगावे. माझी शब्दसंपदा अपुरी आहे ते वर्णन करायला.
आजच्या घडीला मात्र त्यांच्याशी फक्त फोनवरून संपर्क आहे. माझ्या पाठीच्या आॅपरेशनमुळे मी त्यांचे तीन मजले चढून जाऊ शकत नाही आणि वयोमानानुसार त्यांनाही आता ते जिने उतरून येणं शक्य नाही. तरीही एकदा नणंदेला घेऊन त्या मला भेटायला येऊन गेल्याच. मी फोन केला की खूप आनंद होतो त्यांना. बरेच दिवस फोन केला नाही तर त्यांचा फोन हमखास येतो.
तब्येतीची काळजी घे, दगदग करू नकोस. काही लागलं तर सांग हं! हे त्यांचे शब्द किती मानसिक बळ देतात.
त्यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच प्रेम, आदर आणि कृतज्ञता राहिल. आई, जीवेत् शरदः शतम्! याहून अधिक काय बोलू?
© प्रणिता खंडकर
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈





