विभावरी कुलकर्णी
पुस्तकावर बोलू काही
☆ ‘माझे कथाविश्व’ – लेखिका : जयश्री लेंभे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
पुस्तक : माझे कथाविश्व
लेखिका : जयश्री लेंभे
प्रकाशक : मुद्रिका कमर्शिअल प्रिंटर्स
अनुभूतींच्या विविध रंगांचे रसाळ कोलाज: ‘माझे कथाविश्व‘
जगण्यातील साधेपणा जेव्हा शब्दांचे बोट धरून कागदावर उतरतो, तेव्हा ‘माझे कथाविश्व’ सारखी एक नितांत सुंदर साहित्यकृती आकारास येते. श्रीमती जयश्री लेंभे लिखित आणि मुद्रिका कमर्शिअल प्रिंटर्स (शुक्रवारपेठ) तर्फे प्रकाशित झालेला हा कथासंग्रह म्हणजे केवळ कथांचा पुंजका नसून, मानवी स्वभावाच्या, नातेसंबंधांच्या आणि भावभावनांच्या विविध छटांचे एक देखणे शब्दविश्व आहे. लाभलेले सुबक मुखपृष्ठ (स्वराली लेंभे) आणि मा. किसन चौधरी सरांची पुस्तकाविषयीची उत्सुकता वाढवणारी अभ्यासपूर्ण प्रस्तावना पुस्तकाच्या सौंदर्यात भर घालते. लेखिकेचे छोटेखानी पण प्रगल्भ मनोगत वाचकाला या विश्वात प्रवेश करण्यासाठी उद्युक्त करते.
दैनंदिन जीवनातील तत्त्वज्ञान आणि मिश्कील निरीक्षण यातून साकारलेल्या या संग्रहातील कथांची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे लेखिकेची विलक्षण निरीक्षणशक्ती. ‘निर्मलाची पाककृती’ मधील खुसखुशीतपणा असो वा ‘आजीची शाळा’ मधील त्या इवल्याशा बाळाने दिलेली आर्त साद प्रत्येक गोष्ट थेट काळजाला भिडते. ‘भैरवनाथ प्रसन्न’ आणि ‘मान न मान में तेरा मेहमान’ (मांंजराच्या रूपातील पाहुणीची कथा) या कथांमधून लेखिकेचा मिश्कील आणि हसता-हसता अंतर्मुख करणारा स्वभाव दिसून येतो. ‘समज’ आणि ‘वेडी माणसं’ या कथा मानवी मनातील गैरसमज आणि स्वभावातील विक्षिप्तपणाचे अचूक पण तितकेच सहानुभूतीपूर्वक चित्रण करतात.
संस्कार, कर्तव्य आणि भावनांचा त्रिवेणी संगम
दीर्घकाळ शिक्षण क्षेत्रात घालवलेल्या आदर्श मुख्याध्यापिकेचे संस्कारक्षम पैलू ‘सत्वपरीक्षा’, ‘२५ नंबरचा विद्यार्थी’ आणि ‘चांदण्यातली चांदी’ या कथांमधून प्रकर्षाने जाणवतात. विद्यार्थ्यांबद्दलची प्रामाणिक आपुलकी आणि नातवंडांवर होणारे मूल्यांचे संस्कार वाचकाच्या मनावर गारुड करतात. कौटुंबिक जिव्हाळ्याचे दर्शन घडवणारी ‘कोटाची कोपरी’ आणि प्रत्येक गृहिणीला स्वतःचा शोध घ्यायला लावणारी मैत्रिणीची गोष्ट म्हणजे ‘रखमी’ या कथा कौटुंबिक मूल्यांची वीण घट्ट करतात.
परमेश्वरी अधिष्ठान आणि अध्यात्माची प्रचिती
लेखिकेच्या संवेदनशील मनाला लाभलेली अध्यात्माची जोड पुस्तकाला एक वेगळीच उंची देते. ‘वारी पंढरीची’, ‘अतर्क्य’ (अपघातातून आजोबांचे बरे होणे), आणि ‘विठ्ठला पांडुरंगा’ या कथांमधून विठ्ठलनामाचा गजर आणि परमेश्वरी अस्तित्वाची प्रचिती वाचकाला भारावून टाकते. ‘मेडिटेशन’ सारख्या गंभीर विषयावर स्वतःचीच गंमत सांगत लेखिकेने मांडलेले जीवन जगण्याचे मोठे तत्त्वज्ञान कौतुकास्पद आहे.
ऋतूंचे आणि आठवणींचे सोहळे
दिवाळीच्या फराळाची पंगत डोळ्यांसमोर उभी करणारी ‘फराळ’ ही काव्यात्मक कथा आणि ‘आठवणीतील दिवाळी’, ‘आठवणीतला पाऊस’ या रचना वाचकाला स्वतःच्याच बालपणात आणि भूतकाळात घेऊन जातात, जिथे वाचकही त्या आठवणींच्या पावसात चिंब भिजून निघतो. ‘आनंदाचा चष्मा’ चढवून मस्त आनंदी राहण्याचा संदेश देणाऱ्या आणि ‘येन केन प्रकारेण’ मधून संस्कृत श्लोकांचा मतितार्थ सोप्या भाषेत मांडणाऱ्या कथा संग्रहाची समृद्धी वाढवतात.
अनुभवावर आधारित सुंदर कथाविश्व!
साध्या सोप्या भाषेचे आत्मियता वाढवणारे लेखनविश्व!
वाचकांचा मूड आनंदी करणारे एक नितांत सुंदर शब्दविश्व!
वाचकांना खिळवून ठेवणारे माझे कथाविश्व!
‘माझे कथाविश्व’ हे पुस्तक वाचताना केवळ पानांवरचे शब्द वाचल्याचा भास होत नाही, तर लेखिकेसोबत एका समृद्ध प्रवासाला निघाल्याचा अनुभव येतो. साधी, ओघवती आणि मनाला भिडणारी भाषा, प्रसंगांची जिवंत गुंफण आणि सकारात्मक शेवट ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत. वाचकाचा मूड क्षणात आनंदी करण्याचे आणि त्याला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य या पुस्तकात आहे. प्रत्येक रसिकाने संग्रही ठेवावे आणि आवर्जून वाचावे असे हे एक उत्तम ‘कथाविश्व’ आहे!
पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







