डॉ. धनंजय देशपांडे
मनमंजुषेतून
☆ “ज्योत से ज्योत जगाते चलो- – – ” ☆ डॉ. धनंजय देशपांडे☆
(एक सत्यकथा)
… ज्योत से ज्योत जगाते चलो
… भुखो को आनंद देते रहो
जिथे मी काही सूचना केली तर ती आनंदाने स्वीकारली जाते, अशा सिंहगड रोडवरील माझ्या एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो. तयारीसाठी दोन दिवस आधी एक चक्कर टाकावी म्हणून गेलो होतो. मित्राने मांडव, केटरिंग, आसन व्यवस्था इत्यादी दाखवले. ते बाकी सर्व ओके होते.
तर मित्र म्हणाला, “काहीतरी हटके एखादी आयडिया दे न, की जी सर्वानाच आवडेल”
मी फक्त म्हणालो, “आपण अक्षतांमध्ये तांदूळ वापरणे टाळू. वऱ्हाडी मंडळीनी जरबेरा / शेवंती सारख्या फुलाच्या पाकळ्या उधळाव्यात… आणि लोकांना आपण तांदळाचे दाणे असलेली छोटी बॅग देऊ. दाराजवळ ठेवलेल्या बॉक्स मध्ये ती अक्षता बॅग जाताना त्यांनी सोडून जावी. ते तांदूळ नंतर आपण गरिबांना देवू. ”
– – मित्रानी ते ऐकले. विशेषतः त्याच्या आईवडिलांनी त्याला आनंदाने होकार दिला.
आणि मग मित्राने लग्न सुरु होण्यापूर्वी माइकवरून तसे जाहीर केले.
सर्वांनी त्याचे स्वागत केले. आणि लग्न लागल्यावर आम्ही पाहिले तर त्या बॉक्स मध्ये तब्बल वीस किलो तांदूळ जमा झाला होता.
– – तोच सुमारे २० किलो तांदूळ नंतर मित्राच्या हाताने एका गरीबाच्या घरी गेला.
डीडी क्लास : मंडळीनो तुम्हाला वाटेल की २० किलो म्हणजे काही फार नाही !
पण तसेही ते २० किलो तांदूळ पायदळी जाणार होते, आणि नंतर कार्यालय सफाईवाल्याकडून कचऱ्यात !
ते टळले आणि ते तांदूळ एका घरात चार माणसाच्या पोटात किमान तीन महिन्यासाठी गेले. हे काय कमी आहे ?
अजून एक म्हणजे फक्त पुण्याचा विचार केला तरी एका सिझनला किमान एक हजार लग्न पुण्यात होतात असं गृहीत धरू. (जास्तच होतात पण मी किमान धरलेत) तर या पैकी किमान निम्म्या लोकांनी जरी हे मनावर घेतलं तरी पाचशे x वीस = दहा हजार किलो तांदूळ ! गरजू प्रत्येक घरी दहा किलो दिले गेले तरी एक हजार लोकांना दोन महिन्याचा तांदूळ मिळेल आणि त्यांचे आशीर्वाद नवरा नवरीला अगदी मनापासून मिळतील. हे किती छान आहे !
हे एकट्या पुण्याचे बोलतोय आता कल्पना करा, राज्यातील प्रमुख शहरातील लग्ने धरली तर हीच तांदूळ किलोची संख्या कित्येक टनामध्ये जाईल हो !
जुन्या प्रथा त्या त्या काळात चांगल्याच होत्या कारण त्यात काहीतरी विज्ञान आणि संस्कृती होती. मात्र काळाप्रमाणे त्या प्रथा जर आपण थोड्या बदलून अंमलात आणल्या तर संस्कृती पण टिकेल आणि सामाजिक बांधिलकी देखील !!
आपण असे बरेच काही करू शकतो. ज्याची सुरुवात अगदी छोटीशी का होईना असू शकते. डेरेदार मोठा वृक्ष सुद्धा इवलुश्या बिजातूनच वाढतो न ?
काय म्हणता ? बरोबर न ?
—
© डॉ. धनंजय देशपांडे (dd)
(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)
मो न. ९४२२३०४३४४
1) Global Cyber Crime Helpline National Award winner
2) Digital Hero of the year National Award winner
3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State
4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






