शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ मी.. एक अपघाती शिक्षक ☆ शीला पतकी ☆
☆
वरील शीर्षक वाचून अपघाती शिक्षक म्हणजे काय? हा प्रश्न मनामध्ये सहजच निर्माण झाला असेल पण खरच मी अपघाती शिक्षक आहे.
– – झालं काय की लहानपणापासून जरा अभ्यासात हुशार असल्यामुळे आपण पुढे जाऊन डॉक्टर व्हायचं हे ठरवलं होतं आणि त्या काळात ते शक्य पण होतं आणि अभ्यास करून मार्क मिळवले तर पैशाचा फारसा प्रश्न नव्हता अर्थाचा प्रश्न मला नव्हता पण पालकांना असणार आहे लहानपणीचे हे स्वप्न एफ वाय बी एस सी नंतर भंग पावलं कारण जानेवारी 23 पर्यंत मी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी पैशाची जमवाजमव आणि लग्न पार पडणे यातच होते 135 रुपयाच्या शिकवण्या घरोघरी जाऊन मी घेत असे त्यातून अभ्यासाला जो मिळेल तो वेळ आणि ग्रंथालयात मिळतील ती पुस्तके त्यामुळे आमची गाडी जमतेम 58% अर्थात त्याकाळी 59- 60% ला मिरज मेडिकलला मिळत होते पण परगावी ठेवून शिकण्याची ऐपत नव्हती तो विषय तिथेच संपला.
मग सरळ B.Sc. केलं शिक्षक होण्याचा विचार मनात नव्हता मग ठरवलं वकील व्हावे पण नेमके बीएससी झाल्यावर मला सेन्सेक्स टॅबयुलेशन येथे नोकरी लागली ती सरकारी होती पुढे सरकारी नोकरीत सामील करून घेतले. त्याच वर्षात मी एल एल बी ला ऍडमिशन घेतली ऑफिस सहा सहा वाजता सुटत असे चार किलोमीटर अंतरावरच्या कॉलेजमध्ये जायचे रात्री नऊला कॉलेज सुटायचे सकाळी परत दहाला ऑफिस.. पगार फक्त दीडशे रुपये.
नोकरी संपली वर्ष संपले मी सुट्टीमध्ये वैजापूर या ठिकाणी आले तिथे माझी बहीण शाळेत शिक्षिका होती त्यांच्या शाळेत गणित शिकवायला कोणी नव्हते सरकारी शाळा, सरकारी नोकरी ताबडतोब नोकरी लागली आणि गणित विषया असल्यामुळे मी सकाळपासून शिकवण्या घेत होते 17 नंबर फॉर्म भरलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना सगळेच विषय शिकवत होते त्यामुळे माझे उत्पन्न हजारापर्यंत गेले 150 रुपये तोळा सोना होते त्यावेळेला माझे हजार रुपये म्हणजे खूप झाले नवनवीन प्रयोग करता येत होते विद्यार्थिनींची शाळा होती मुली जवळपास माझ्यापेक्षा दोन तीन वर्षांनी लहान होतया खेडेगावात शिक्षण उशिरा सुरू होते. माझ्यापेक्षा अनेक शिक्षक वरिष्ठ होते त्यामुळे माझ्या प्रत्येक उपक्रमाचे कौतुक कामाला खूप प्रोत्साहन मिळाले आणि मग शिक्षकी पेशा आवडायला लागला पण त्याला आवश्यक आपल्याकडे डिग्री नाही परत सोलापूरला आले आणि दयानंद महाविद्यालयात प्रवेश घेतला b. ed चे वर्ष पूर्ण केले त्या काळात आमचे शिक्षक शिक्षण क्षेत्रातील गुरू आदरणीय डॉक्टर सुरेश करंदीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि दुसऱ्या विभागात विद्यापीठात पहिल्या येण्याचा मान मला मिळाला माझ्या शाळेत अर्थात सेवासदन मध्ये मला नोकरी मिळाली कारण त्यावेळेला बीएससी बीएड शिक्षक मिळत नसे त्यामुळे नोकऱ्यांना काही कमी नव्हते माझ्या शिक्षकी पेशाची अशी अपघाती सुरुवात झाली…
… आणि मला एका घटनेची आठवण झाली मी सेवा सदन मध्ये असताना इयत्ता दहावी मध्ये मी एक छोटी कविता केली कवितेचे नाव होते आमची हि सर्विस करते आणि आमच्या मराठीच्या बाईंना दाखवली त्यांचं नाव होतं आदरणीय प्रतिभा बाई देव! बाई कौतुकाच्या त्यांनी माझी कविता आमचे मुख्याध्यापक नानासाहेब पाठक यांना दाखवली वरंड्यात उभे राहूनच ती कविता वाचली आणि मला म्हणाले माझ्याबरोबर चल मी त्यांच्या मागोमाग गेले ऑफिसमध्ये त्या ठिकाणी असलेल्या भिंतीवर श्री स्वामी समर्थांचा फोटो लावलेला होता. आजही आमच्या ऑफिसमध्ये तो आहेच त्यांनी मला सांगितले तू यांना नमस्कार कर मी फोटोला नमस्कार केला नानानाही नमस्कार केला त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला “खूप मोठी होशील माझा तुला आशीर्वाद आहे समर्थ पाठीशी आहेत आणि या शाळेला तुझा खूप उपयोग होणार आहे. ” दहावी म्हणजे शिंगं फुटायचे दिवस कशाला आम्ही शाळेत परतुन येतोय पण आपण मोठे होणार मग शाळेला मोठी देणगी देणार कारण त्या काळात देणगी देणाऱ्यांचे आमच्या शाळेत खूप मोठे सत्कार होत असत कदाचित त्यासाठी आपण परत येऊ असे वाटले होते मी ती गोष्ट फार गांभीर्याने घेतली नव्हती माझ ते ध्येय सुद्धा नव्हते.
नानासाहेब हे शंकर महाराजांच्या शिष्याचे शिष्य त्यांनाही काही सिद्धी प्राप्त होत्या पुढे पुढे तर ते आलेल्या माणसाचे मनातले ओळखत होते. आचार्य अत्रे अत्यावसथ आपल्या गुरूंच्या आज्ञावरून ते त्यांना भेटावयास गेले त्यांनी त्यांना घट्ट मिठी मारली आणि आचार्य अत्रे उठून बसले कारण त्यांच्या गुरुने एक शक्ती त्यांना प्रदान केलेली होती ही घटना मी अनेक पुस्तकात वाचली आहे. एकूण काय तर नानासाहेबांना सिद्धी प्राप्त झाली होती. माझे काहीही ठरले नसताना आणि सेवा सदन शाळेतच तिथेच माझ्या आयुष्याची कारकीर्द घडली नानासाहेब बसत त्याच खुर्चीवर मी बसले तोच स्वामींचा फोटो माझ्याही मागे होता यशाची कवाडे खुली झाली सामाजिक कार्याला दिशा मिळाली आणि कार्यामुळे नावलौकिक वाढला तो माझ्या शाळेचा आणि माझाही.
आजच्या शिक्षक दिनाला माझ्या शिक्षकी पेशाबद्दल विचार करताना मला हे जाणवतं की इथे सुद्धा मला खूप संघर्ष करावा लागला अनेकदा स्वतःला सिद्ध करावे लागलं बरीच आव्हान पेलावी लागली शिक्षकाची नोकरी साधी नव्हती विद्यार्थिनींना घडवताना अनेक प्रसंगातून मी सुद्धा तावूनसुलाखून पार पडत होते.
अपघाती घडले असले तरी मनापासून मी या क्षेत्रात रमले स्वतःला शिक्षक म्हणून शोधत गेले अर्थात अजूनही हा शोध सुरू आहे माझ्या सर्व शिक्षक मित्रांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!
© शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈






