अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २६ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

व्यावहारिक ज्ञान

ठरल्याप्रमाणे लेखमालेच्या या २६व्या भागात आपण तुकाराम महाराजांच्या काही व्यावहारिक ज्ञानाविषयीच्या अभंगांचा विचार करू.

दान, धर्म, पुण्य कर्म करणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे, परंतु पुण्य कर्म करताना ते योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

या अभंगात महाराज काय सांगतात पहा…

सर्वांभूती द्यावे अन्न/ द्रव्य पात्र विचारोन//

उपतिष्ठे कारण/ तेथे बीज पेरीजे//

सर्व भूतमात्रांना अन्नदान करावे, पण द्रव्य मात्र योग्यता पाहूनच द्यावे. जेथे बी उगवेल असे वाटते तेथेच ते पेरावे. थोडक्यात दान हे सत्पात्री असावे.

पुण्य करिता होय पाप/ दुग्ध पाजोनी पोशीला साप//

करोनी अघोर जप/ दुःख विकत घेतले//

भूमी पाहता नाही वेगळी/ माळ बरड एक काळी//

उत्तम निराळी/ मध्यम आणि कनिष्ठ //

म्हणोनी विवेके /काही करणे ते निके//

तुका म्हणे फिके/ रुची नेदी मिष्ठान्न//

सापाला दूध पाजले तर पुण्य कर्म न होता पाप होते, कारण दूध पिऊनही साप गरळच ओकणार. एखादा जारण मारण मंत्र म्हणून दुसऱ्याचे वाईट करता करता, आपले स्वतःचेच वाईट करून घेतो. पृथ्वी सगळी सारखी असली तरी त्यातही माळ जमीन, खडकाळ जमीन, काळी जमीन, कमी जास्त कसाची जमीन असे भेद असतात, म्हणून कोणतीही गोष्ट करताना विचारपूर्वक करणे, नीट पारखून करणे फार महत्त्वाचे आहे. मिष्ठान्न केले आणि त्यात साखरच घातली नाही, तर ते चविष्ट लागेल का? याचसाठी आयुष्यात कोणतीही गोष्ट मोठ्या विवेकाने केली पाहिजे.

माणूस कसा ओळखावा याविषयी तुकाराम महाराज सांगतात.

नाही सर्व येत जोडील्या वचनी/

कवित्वाची वाणी कुशलता//

सत्याचा अनुभव वेधी सत्यपणे/

अनुभवाच्या गुणे रुचो येते//

काय आगी पाशी शृंगारिले चाले/

पोटीचे उकले कसा पाशी//

तुका म्हणे येथे करावा उकल/

लागेचिना बोल वाढवूनी//

मनात ईश्वराची भक्ती नसताना जर कोणी शब्दाला शब्द जोडून काव्य करील तर ते देवाला कसे मान्य होईल? ज्याच्या ठिकाणी खरा अनुभव आहे, त्याच्या बोलण्याने दुसऱ्याला वेधक वाटते कारण ते सत्य असते. अनुभवामुळे त्यातील तथ्य कळते. तुकाराम महाराज अधिक स्पष्टतेसाठी उदाहरणे देतात. हिणकस धातूला सोन्याचा मुलामा केला तर तो शृंगार अग्निपुढे उघडा पडतो. आणि कसोटी पुढे त्याच्या आतील हिणकस धातू ओळखू येतो. ज्या ठिकाणी हृदयात खरा अनुभव असेल तेथे स्पष्टीकरण देण्याची जरुरी पडत नाही, खरी योग्यता लगेच कळते. ते पुढे म्हणतात…

लचाळाच्या (अजागळ) कामा नाही ताळा वाळा/

न कळे ओंगळा उपदेश//

वचनचर्येची नकळे चाचणी/

ऐसी संघस्टनी अमंगळ//

समय न कळे वेडगळ बुद्धी/

विजाती ते शुद्धीचाच चाट//

तुका म्हणे याचा धिक्कारची बरा/

बहुमती खराहुनी हीन//

याचाच अर्थ असा की, जो कोणी अजागळ मनुष्य आहे, त्याच्या कामात काहीच ताळमेळ नसतो आणि त्या मुर्खाला (महाराज त्याला घामट म्हणतात) कितीही समजावून सांगितले तरी त्याची समजण्याची क्षमताच नसते. त्याला शास्त्र, त्यातील मर्म, काही कळत नाही. तेव्हा अशा लोकांपासून चार हात दूरच राहावे. या मतिमंद लोकांना काळ, वेळ समजत नाही. त्यांची बुद्धी विसंगत असते. अशा लोकांपासून दूर राहणे उत्तम! अशी कितीतरी माणसे आपल्या आयुष्यात येतात. ” बरे बाबा तुझेच खरे. ” असे बोलून जास्त वाद न घालता त्याच्यापासून लांब जावे असे महाराज सांगतात. अशा माणसांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटतात. ते लोक गाढवाहुनही नीच समजावे. त्यांचा धिकार करावा.

स्वभावोदुरतिक्रमः– भिन्न भिन्न स्वभावाची माणसे रोजच्या रोज आपल्या जीवनात येत असतात. महाराज म्हणतात की ज्यांचा स्वभावच चोरी करण्याचा असतो, त्यांच्या ध्यानीमनी तोच ध्यास असतो.

चोराचिया धुडका मनी / वसे ध्यानी लांछन//

त्याचप्रमाणे पाऊस पडावा तसे आम्ही बोलत असतो. परंतु ज्यांच्या अंगी दोषच आहेत त्याला आमचे बोलणे झोंबते. आम्ही हिताचे बोललो तरी त्याची तडफड होते. आपल्यालाही हा अनुभव वारंवार येतो कारण आपले सरळ बोलणे समोरचा वाकडेच धरतो. अशा माणसांच्या वाऱ्याला उभे राहू नये.

एक एका सहाय्य करू/ अवघे धरू सुपंथ//

कोण जाणे कैसे परी/ पुढे उरी ठेविता//

अवघे धन्य होऊ आता/ स्मरविता स्मरण//

तुका म्हणे अवघी जोडी/ ते आवडी चरणांची//

यासाठी तुकाराम महाराज सर्व लोकांना सांगतात की, तुम्ही आम्ही मिळून एकमेकांच्या सहाय्याने चांगल्या वाटेवरून चालू या, चांगले जगूया, नाहीतर म्हातारपणी परमार्थ करू अशी चालढकल केली तर पुढे काय वाढून ठेवले आहे ते कोणास ठावे? म्हणून उद्या वर काही ढकलू नका. जे काही करायचे ते आज करा, आत्ता करा. नामस्मरण करणारा व करून घेणारा असे आपण सर्वजण धन्य होऊ. विठोबाच्या चरणांची आवड धरली म्हणजे सर्व काही जोडले जाते व महान पुण्य प्राप्त होते.

चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती/

व्याघ्रही न खाती सर्प तया//

विष ते अमृत आघात ते हित/

अकर्तव्य नीत होत त्यासी//

दुःख ते देईल सर्व सुख फळ/

होतील शितळ अग्नी ज्वाळा//

आवडेल जीवा जीवाचिये परी/

सकळा अंतरी एक भाव//

तुका म्हणे कृपा केली नारायणे/

जाणिजे ते येणे अनुभवे//

तुकाराम महाराज सांगतात, आपले चित्त शुद्ध असेल तर शत्रूही मित्र होतात. वाघासारखे हिंस्र आणि सापासारखे विषारी प्राणी आपल्याला काही त्रास देत नाहीत. (भगवान शंकराच्या गळ्यातील नागाप्रमाणे) विषाचे अमृत होते.

मीराबाईच्या सच्य्या भक्तीमुळेच तिने राणाजीने दिलेला विषाचा प्याला रिचविला.

शरीरावर आघात झाले तरी ते हितकर ठरतात. आपल्या हातून चुकून एखादे अनुचित कर्म घडले पण ते नीतीला धरून असले तर शुभंकरच ठरेल. दुःखातही सुख प्राप्त होईल आणि आगीचा जाळ शांत होईल. शुद्ध चित्ताचा माणूस लोकांना प्राणप्रिय असेल. त्याच्याविषयी सर्वांच्या मनात आदरभावच राहील. असा अनुभव स्वतःबद्दल ज्याला येतो त्याला भगवंत कृपावंत झाला आहे असे समजावे.

कंथा प्रावर्ण/ नव्हे भिक्षेचे ते अन्न//

करी यापरि स्वहित/ विचारूनी धर्मनित//

देऊळ नव्हे घर/ प्रपंच परउपकारक//

विधीसेवन काम/ नव्हे शब्द राम राम//

हत्या शास्त्र धर्म/ नव्हे निष्काम ते कर्म//

तुका म्हणे संती/ करुनी ठेविली आईती//

वरील अभंगात तुकाराम महाराज काय सांगतात?

व्यावहारिक आणि अध्यात्मिक दृष्टीने काही वस्तूंमध्ये कसा फरक असतो याविषयी महाराज बोलतात.

संन्याशाची कंथा(झोळी) आणि सामान्य जनांची वस्त्रे सारखी समजू नयेत. त्याचप्रमाणे पवित्र भिक्षान्न इतर अन्नाप्रमाणे समजू नये. धर्म व नीती विचारात घेऊन स्वहित साधावे. देवालय हे इतर घरांप्रमाणे सामान्य घर नव्हे. परोपकार करताना तो संसारी माणूस इतरांप्रमाणे नव्हे. शास्त्राने सांगितलेल्या नियमांनुसार विषय सेवन केले असता तो माणूस विषयलोलूप नव्हे. राम हा शब्द इतर शब्दांप्रमाणे साधा नाही. क्षत्रियाने युद्धात शत्रूचा वध केल्यास ती हत्या न होता क्षात्रधर्मपालन होते. आणि निष्काम बुद्धीने केलेले कोणतेही कर्म हे इतर कर्माप्रमाणे बंधक नाही. हे नीतिशास्त्र आहे, याप्रमाणे सर्वांनी वागावे.

याचाच अर्थ असा रोजच्या जीवनात इतरांसमवेत वावरत असताना व्यावहारिक ज्ञान वापरून आणि नैतिक धर्माचे पालन करून माणसाने आपले आचरण ठेवावे.

क्रमशः… २६ 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted