सौ शालिनी जोशी
विविधा
☆ संतांची दिवाळी… ☆ सौ शालिनी जोशी ☆
ज्ञानेश्वरी वाचताना लक्षात येतं की, संतांचा दिवाळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांची दिवाळी पाच-सहा दिवसापूर्वी मर्यादित नाही. जीवनात कायमची दिवाळी कशी राहील ते संताने पाहिलं व तसं मार्गदर्शन आपल्या ग्रंथातून केलं. संतांची दिवाळी ही ज्ञानप्रकाश देणारी, दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सुष्ट प्रवृत्ती जागृत करणारी आहे. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात,
मी अविवेकाची काजळी l फेडूनि विवेक दीप उजळी l
तरी योगिया पाहे दिवाळी l निरंतर ll ज्ञा.४/५४
यातून ते आपल्या अवताराचा हेतूच स्पष्ट करतात. भगवंतांनी तीन सांगितले हा चौथा. माणसाच्या जीवनात अविवेक हेच दुःखाचे मूळ आहे. काजळी दीपाच्या प्रकाशाला झाकून टाकते. तसाच अविवेक माणसाच्या सद्बुध्दीला झाकून टाकतो. तोच दूर झाला तर सद्विचाराची वाट दिसेल. अविवेक म्हणजे कामक्रोधादि षड्रिपु. ते दूर झाले की आत्मानात्म विवेकाचा दीप प्रकाशेल.अनात्म, त्याज्य गोष्टीचा त्याग आणि मग राहील ते एकमेव ब्रह्म. ते मी आहे हा विवेक आणि त्या ब्रह्मासारखे सच्चिदानंद आपले रूप ही खात्री म्हणजे अखंड आनंद. अशी अवस्था योग्यांना प्राप्त होते तशी सर्वांनाच होऊदे अशी ज्ञानेश्वरांची इच्छा.
जैशी पूर्वदिशेच्या राउळी l उदयाची सूर्ये दिवाळी l
की येरा हि दिशा तियेचि काळी l काळीमा नाही ll ज्ञा.५/८६
ज्याप्रमाणे पूर्व दिशेच्या राजवाड्यात सूर्योदय रुपी दिवाळी आली असता दुसऱ्या दिशेतील अंध:कार ही दूर होतो . तशीच
तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची l दिवाळी करी ll ज्ञा.१५/१२
तसेच ज्ञानेश्वरानी आपल्या रसाळ व आल्हाददायक वाणीने सांगितलेले ज्ञान सगळ्या श्रोत्यांना ज्ञानी करून टाकते. ‘ज्ञानेश्वरांच्या वाणीतून जो ज्ञानाचा प्रकाश पडेल तो इतका व्यापक असेल की जो कोणी ते शब्द ऐकेल तो ज्ञानप्रकाशाने न्हावून निघेल. त्यांना ज्ञानाची दिवाळी अनुभवायला येईल.’ अज्ञान गेले त्रैलोक्य ऐक्याने प्रकाशित होते. हीच जीवब्रह्म ऐक्याची स्थिती व ब्रह्मानंद आणि महासुखाची दिवाळी हाच मोक्ष.
तैसे होय तिये मेळी l मग सामरस्याच्या राउळी l
महासुखाची दिवाळी l जगेसि दिसे ll ज्ञा.६/८९
अशाप्रकारे ज्ञानेश्वरांना ज्ञानाची दिवाळी म्हणजे निरंतर महासुख देते ती अभिप्रेत आहे. ज्ञान, विवेक आणि सामरस्य अवस्था अशा तत्वातून ती साजरी केली आहे. म्हणून ती महासुखाची ठरली.
ज्ञानाचा दिवा अंतर्बाह्य उजळून टाकतो. सर्वच संताना अशी दिवाळी अपेक्षित होती म्हणून संत तुकाराम म्हणतात,
साधु संत येती घरा l तोचि दिवाळी दसरा l
संत निवृत्तीनाथ म्हणतात, नित्यता दिवाळी l नाही तेथे द्वैत l
संत नामदेव म्हणतात, विठोबाचे राज्य l आम्हा नित्य दिवाळी l
संत सेना महाराज म्हणतात,
देखता संतचरण lआजी दिवाळी दसरा l
संत सखु म्हणते,
आनंदाची दिपवाळी l घरी बोलवा वनमाळी l
घालीते मी रांगोळी l गोविंद गोविंद l
अशा प्रकारे सर्व संतानी देवाच्या सान्निध्यात आनंदाची दिवाळी भोगली.
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈





