श्री मंजिरी येडूरकर
इंद्रधनुष्य
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ८ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
रविंद्रनाथांचे पिता व वडील बंधूंचा वेद, उपनिषदांचा अभ्यास होता. त्यामधील संकल्पनांचा पुरस्कार (एकेश्वरवाद, अद्वैतवाद, निर्गुण उपासना) त्यांनी ब्राम्होसमाजाची जडणघडण होतांना केला कारण राजा राम मोहन रॉय यांच्याबरोबर रविंद्रनाथांच्या वडिलांनीच ब्राम्हो समाजाची स्थापना केली होती. वडिलांच्या निधनानंतर, रविंद्रनाथांचे वडील बंधू ब्राम्हो समाजाचे अध्वर्यू बनले.
रविंद्रनाथांचाही वेद व उपनिषदांचा अभ्यास होता व सुरवातीच्या काळात त्यांच्यावर ब्राम्हो समाजाच्या तत्वज्ञानाचा प्रभावही होता. मात्र ब्राम्हो समाजाच्या विभाजनानंतर हा प्रभाव हळूहळू कमी होत गेला. संत तुकारामांच्या अभंगांनी ते एवढे प्रभावित झाले होते की त्यांनी त्यांच्या कांही अभंगांचे बंगाली भाषेत रूपांतर केलं. आणि आपल्याला चांगलच ठाऊक आहे की संत तुकाराम सगुणोपासक होते. यावरून असं सिद्ध होतं की टागोर सगुण उपासनेच्या विरोधात तरी नव्हते.
‘ऋग्वेदी’ या टोपणनावाने लेखन करणारे पु ल देशपांडेंचे आजोबा (आईचे वडील) श्री. वामन मंगेश दुभाषी यांनी रविंद्रनाथांच्या हयातीतच गीतांजलीचं अभंग रूपात भाषांतर केलेलं आहे. टागोरांनी ऋग्वेदींना पाठविलेल्या आपल्या संदेशात स्पष्टपणे म्हटलं आहे की ऋग्वेदींनी माझ्या कवितांचं यथार्थ भाषांतर करून माझे विचार मराठी वाचकांपर्यंत पोचविले आहेत. ऋग्वेदींनी तर आपल्या अभंगांत परमेश्वराला उद्देशून हरी, नारायणा, अनंता, विश्वनाथा म्हटलं आहे. कुठे त्याच्या मुरलीचा उल्लेख आहे तर कुठे त्याच्या भासमान सगुण रूपाचा संदर्भ आहे. पूजन, अर्चन यांचा उल्लेख तर अनेक ठिकाणी आहे. पूजाअर्चा तर सगुण रूपाचीच होते ना!
ऋग्वेदींच्या अभंग गीतांजलीत असे उल्लेख आहेत की परमेश्वर भक्तांना विविध रूपात भेटतो, तसेच तो विविध नावांनी ओळखला जातो. मात्र टागोरांच्या इंग्रजी गीतांजलीत असे उल्लेख नाहीत कदाचित् मूळ बंगालीत ते असावेत. कारण ऋग्वेदींनी मूळ बंगाली व इंग्रजी अशा दोन्ही भाषांतील कवितांचा अभ्यास करून मग हे भाषांतर केले आहे. कदाचित भाषांतराच्या इंग्रजी भाषेच्या संस्कृतीच्या संदर्भात असे उल्लेख गैरलागू ठरले असते म्हणून ते इंग्रजी गीतांजलीत आले नसावेत. पण आपण सामान्य मराठी वाचक तर परमात्म्याला राम, कृष्ण, विठ्ठल अशा विविध रूपातच ओळखतो व हीच रूपं आपल्याला जवळची, ओळखीची वाटतात. म्हणून आम्ही आमच्या भावानुवादात परमेश्वराच्या या रूपांचा संदर्भ जागोजागी वापरला आहे.
—–
☆ गीत : २२ ☆
In the deep shadows of rainy July, with secret steps, thou walkest, silent as night, eluding all watchers.
To-day the morning has closed its eyes, heedless of the insistent calls of the loud east wind, and a thick veil has been drawn over the ever – wakeful blue sky.
The woodlands have hushed their songs, and doors are all shut at every house. Thou art the solitary wayfarer in this deserted street. Oh my only friend, my best beloved, the gates are open in my house — do not pass by like a dream.
—–
☆ मराठी भावानुवाद : गीत: २२ ☆
*
आषाढातील संध्याकाळी
हळुच उतरते नीरव रजनी
वर्षा ऋतूतील रिमझिम वेळी
तव पदरव, मी अधीर नयनी॥
*
सजग निळ्या, आतुर आभाळी
पांघरुन शामल, मेघांची दुलई
अशा शांत, निद्रिस्त सकाळी
लगबग कसली ऐकू न येई॥
*
सुस्तावलेले आसमंत सारे
परांत चोची पक्षी घालती
घर दरवाजे पण बंदच सारे
झाडे झुडपे गीत न गाती॥
*
एकच तू मम सखा प्रियतम
फिरसी एकटा निर्जन वाटेवर
जाशील निसटुनी तू स्वप्नासम
म्हणुनि उघडले द्वार नि अंतर॥
*
भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर
संपर्क: ९४२१०९६६११
—–
☆ गीत: २३ ☆
Art thou abroad on this stormy night on the journey of love, my friend? The sky groans like one in despair
It have no sleep to-night. Ever and again I open my door and look out on the darkness, my friend!
I can see nothing before me. I wonder where lies thy path!
By what dim shore of the ink-black river, by what far edge of the frowning forest, through what mazy depth of gloom art thou threading thy course to come to me, my friend?
—–
☆ मराठी भावानुवाद : गीत: २३ ☆
*
रात्र वादळी अन् अंधारी
उदास नभ हे कण्हत उरी
नीज न ये मज ऐशा काळी
नेत्र पाहती तुझी वाटुली॥
*
प्रेमरथावर स्वार होउनि
येशील वाटे अंधारातुनि
पाही राजसा मी दाराशी
येई उदासी, तू नच दिसशी॥
*
कुठुनि? कशी? वाट कोणती?
काळोखाच्या नदी जवळ ती?
की उपवनीच्या फुलाफुलातून?
की दुःखाच्या चक्रव्यूहातून? ॥
*
शोध शोधिले वाट दिसेना
तव भेटीची आस मिटेना
शोधी तू मार्गा, ये मजपाशी
सखया, लवकरी ये दाराशी॥
*
भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर
संपर्क: ९४२१०९६६११
—–
☆ गीत : २४ ☆
If the day is done, if birds sing no more, if the wind has flagged tired, then draw the veil of darkness thick upon me, even as thou hast wrapt the earth with the coverlet of sleep and tenderly closed the petals of the drooping lotus at the dusk.
From the traveller, whose sack of provisions is empty
before the voyage is ended, whose garment is torn and dust-layden, whose strength is exhausted, remove shame and poverty, and renew his life like a flower under the cover of thy kindly night.
—–
☆ मराठी भावानुवाद : गीत: २४ ☆
*
जरी दिवस तो असेल सरला
पक्षी कोटरी असे परतला
*
वारा शिणुनी, दमुनी बसला
मिटल्या कमली, भृंग गुंतला
*
निसर्ग निद्रेच्या अधीन झाला
दे अंधाराची गोधडी मजला
*
संचित सरले, प्रवास उरला
धोतर फाटे, सदरा मळला
*
प्राणांमध्ये त्राण न उरला
असा प्रवासी शरण तुजला
*
प्रवाशाची त्या लाज राखण्या
दारिद्र्य तयाचे दूर करण्या
*
पुनर्जन्म जणु त्याला देण्या
मिटली कमले पुन्हा उमलण्या
*
येई लवकरी दीनानाथा,
अंगुलीवरी गिरीराज तोलण्या
*
– क्रमशः भाग आठवा
मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.
भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





