राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ ये दोस्ती हम नही तोडेंगे… ☆ राधिका माजगावकर पंडित

एस. पी. चा आमचा आवडता कट्टा आज बरेच दिवसांनी टोळभैरवांनी भरगच्च भरला होता. प्रत्येकाच्या हातात मस्त रंगीत फुलांचे बुके नाचत होते.

 हो! आज अभ्याचा वाढदिवस आहे ना! शिक्षणाच्या कोर्सच्या वाटा बदलल्या म्हणून काय झालं! ‘येदोस्ती हम नही तोडेंगे’ चा नारा आम्ही आधीपासूनच पक्का केला होता. भेटल्यावर पहिली सलामी शिव्यांचीच असायची, “साल्या कुठे कलमडला होतास? भुतासारखा कुठल्या पिंपळावर बसला होतास आज उगवलास? ” अशीच सुरुवात व्हायची पण प्रेमाने दिलेली शिवीही एकमेकांना वडापाव सारखी वाटायची. खरं प्रेम होतं आमच्या मित्रांमध्ये.

कुणाला मदत करताना आम्ही ‘साथी हाथ बढाना’ होतो तर माजलेल्या गुंडांचा माज उतरवण्यासाठी आम्ही रांगडे पैलवान व्हायचो. आपल्याच मस्तीच्या विचारात मी असताना पोरं खिंकाळली, “अरे अभ्या आला रे आला! उचला त्याला मिरवत आणूया आणि नाचणाऱ्या मित्रांच्या खांद्यावरून तोल सांवरत अभ्या अवतरला.

सगळ्यांची वर्णी लागली होती पण मन्याचा पत्ता नव्हता अभयनी विचारल्यावर कोणीतरी किंचाळल “अरे तो मजनू पार कामातून गेलाय त्याची लैला त्याला सोडून गेलीय नां म्हणून तो जन्तर मंतर झालाय. परवा तर आत्महत्येची भाषा करत होता. ” नऱ्याचं टाळकच् सटकलं, सोडून गेली? म्हणजेकांय? माझ्यासमोर प्रेमाचा, लग्नाचा पाढा वाचलाय त्यांनी. आणि आता ती पळून जाते म्हणजे काय? बघतोचं तिच्याकडे. ” 

त्याच्या डोक्यावर बर्फाचे लादी ठेवत मी म्हणालो, “समंधा शांत हो तिच्याकडे आपण नंतर बघू आधी त्या मजनुला ताळ्यावर आणू. “

अभ्या बोलला, “माझा बर्थडे उद्या होणार आज आपली धाड मनोजच्या घरावर पाडायची. आमचा मोर्चा मनोजच्या घराकडे वळला शिट्ट्या वाजल्या. मन्याला आम्ही घराबाहेर रस्त्यावर खेचला. गॅलरीतून त्याची आई कळवळली, “अरे सांभाळून न्यारे त्याला” तर बाबा ओरडले, “बरं झालं तुम्ही आलात ते, चार दिवस झाले सुतकी चेहरा करून, त्या पोरी पायी टाळकं फिरवून बसलय कार्ट, डोकं ठिकाणावर आणा त्याचं” 

काकांचं म्हणणं बरोबर होतं मन्याला धोपटून ब्रेन वॉश करणं आवश्यक होतं. दाढी काय, डोळे काय, देवदास झालेल्या मन्याला अगदी रामदास नाही पण वास्तवदास करायचा चंग आम्ही बांधला. “मी नाही येत रे” चा पाढा वाचणाऱ्या त्याला आम्ही उचलला आणि बाकावर आदळला. सम्या करवादला “अरे तिच्यापाई काय अवस्था करून घेतलीस स्वतःची. आणि रडतोस काय बायल्या हातभर बांगड्या भर लेका” आमच्याकडून मुक्ताफळांची उधळण चालली होती. आमच्यात अभ्या जरा शांत डोक्याचा आणि सीनियर आहे मन्याच्या भोवतांलचं आमचं कोंडाळ फोडून तो आत शिरला. त्या फडतुस मुलीसाठी वेड्या झालेल्या वेड्याला त्यांनी चुचकारत विचारलं, ” काय झालंय मन्या? कोण ही पोरगी? अरे! तिच्यासाठी तू जीव द्यायला निघाला होतास? चल त्या पोरीकडे सरळ करतो तिला. “

एकानी शंख केला, “अरे अभ्या सरळ करायला ती इथे आहे कुठे, पैसेवाल्याचा हात धरून केव्हाच पळालीय ती. ” 

मन्याला पुन्हा दुःखाचा उमाळा आला. त्याच्या नरड्यात आम्ही अख्खी बिसलरी ओतली तेव्हा त्याचे उसासे थांबले. तो म्हणाला, “अरे चांगली होती, सुंदर होती रे ती मला आवडली होती. ह्या बजरंगापुढे आम्ही आणाभाका घेतल्या, सात जन्म एकत्र राहण्याचा वचन दिलं होतं तिनं मला. दोन्हीकडचे आई-बाबा एकदम खुश होते सगळीकडून हिरवा सिग्नल मिळाला. लग्नाची तारीख पक्की झाली पत्रिका कशा छापायच्या, तुझी आवड सांग म्हणून मी तिच्या घरी विचारायला गेलो तर आई-वडिलांनी हात झटकले. तुमच्या घरात तिची हौस नसती पुरवली गेली म्हणून तिने पैसेवाल्याशी लग्न केलं” असं म्हणून त्यांनी मला अक्षरशः हकललं रे!

मध्या दात ओठ खात मन्याला मारायला धावला, “मुर्खा त्यांनी सांगितलं आणि तू ऐकलंस? हा सगळा त्यांचा आधीपासूनचा प्लॅन असेल. लबाड साले”एवढं महाभारत घडूनही आमचा हा हिरो रिंगणाबाहेर यायला तयारच नव्हता. “अरे पण ती चांगली होती रे माझं प्रेम होतं तिच्यावर” मन्याचं गाणं चालूच होतं. अजूनही हे पात्र तिच्या प्रेमातून बाहेर यायला तयारच नव्हतं. त्याच्यापुढे डोकं आपटायचंच बाकी राहयलं होत. त्याला धोधो धुवावासा वाटत होतं. आता मात्र मध्या भडकून म्हणाला “चुलीत घाल तिचं प्रेम, अरे मुर्खा फसवलय तिने तुला. तुझं घर, पैसा, इन्कम, बचत बघायला तुझ्या घरात आणि गोड बोलून तुझ्या आई बाबांच्या मनात शिरली ती बया. तुझा मासा गळाला लागला होता. पण पैसा हातात येत नव्हता मग काय सोडलं तुला आणि गाठला तिने मोठा लक्षाधीश मासा 

आणि हे येडं अजूनही अडकलय तिच्यात. अरे सोड! छपन्न मुली आणून उभ्या करतो तुझ्या पुढे” आम्ही हिरवा सिग्नल दाखवला. तरी पण आमचं हे बाळं तुणतुण वाजवतच राह्यलं, ” 56 राहू दे रें एक तरी मुलगी लग्न करायला तयार आहे का माझ्याशी? वय वाढतय माझं. आई बाबा थकलेत. मी नाही गुडघ्याला बाशिंग बांधलं पण आई माझ्या डोक्यावर अक्षता टाकायला उतावळी झालीय. आता कोण देईल मला मुलगी? आमचं हे बेनं दळण दळतच होतं. आम्ही वास्तवात आलो या रड्याच्या बोलण्यात तथ्य होतं त्याचं म्हणणं बरोबर होतं. आमची लग्नाची वय मागे पडताहेत. गुडघ्याला बाशिंग बांधलय खरं पण नवरीचा पत्ता नाहीये. केविलवाणी परिस्थिती झालीय आमची. तरी पण मन्याला स्वप्नातून कसंबसं आम्ही खाली आणलं.

आता पुढे काय? हा गुंता सुट्ता सुटत नव्हता. निराश झालेला आमचा दोस्त आणि उदास झालेल्या त्याच्या आई बाबांचा चेहरा डोळ्यासमोरून हालत नव्हता आता काय करायच? हा राक्षसी प्रश्न ‘आ’वासून गिळायला बघत होता.

त्याच तिरीमिरीत चंद्याकडे गेलो दार त्याच्या बहिणीने उघडलं. आणि डोळ्यासमोर लख्ख वीज चमकली, मेंदू हलला, झटका बसला आणि झटक्यात विचारआला ‘अरे ही पोरगी तर लग्नाची आहे की. मन्यासाठी हिला विचारलं तर.. चंद्या नुकताच चतुर्भुज झाला होता आणि गेला होता त्याच्या चंद्राला घेऊन मधुचंद्राला. मग काय थेट त्याच्या आबांना गाठलं खडा टाकून बघितला, मनोजची वकिली करून त्याच्याबद्दल त्यांना पटवलं. बाबातर एकदम खुश झाले चंद्याची आई देवापुढे साखर ठेवायला धावली. पडद्याआडून डोकावणाऱ्या मनालीकडे मी बघितलं. मनोजला ती ओळखत होतीच. खुणेने मी तिला विचारलं तर पोरगी झक्कास लाजली. चला अर्धा गड तर सर झाला.

आता मन्याला घोड्यावर बसवायचं. एस. पी. चा कट्टा गाठला. मोबाईल खणखणले मित्रांचा अड्डा जमला. मन्याला मधे घेतला, चारी बाजूंनी हल्ला करून ‘अरे मारो गोली उस छोकरीको असं म्हणून त्या पळालेल्या पोरीचं त्याच्या मानगुटीवर बसलेलं भूत उतरवलं. अखेर त्याचा भेजा ठिकाणावर आला आणि या बैलाने मुंडी हलवली,

लगेच आमचं दोस्त मंडळ तयारीला लागलं. हो! हे खुळं परत बिथरलं तर काय करा! कारण मन्या त्या पोरीपायी पार कामातून गेला होता. येरवड्याला न्यायचंच बाकी होतं अनेक रात्री त्याने जागवल्या. दिवसा तो मनांत रडायचा. त्याचा उदास आणि केविलवाणा चेहरा बघून त्याच्या आई-बाबांचा जीव धास्तावला होता.

त्याला ह्या निराशेच्या डोहातून बाहेर काढणं आवश्यक होतं. अशावेळी फक्त त्याच्यावर फोकस करून आमच्या दोस्त मंडळींनी त्याला माणसात आणण्याचा विडा उचलला चंद्या ला निरोप गेला तो हनिमून सोडून धावत पळत आला.

चक्र वेगाने फिरत होती. मनाली तर खुश होतीच, पण आमचं हे ध्यान मन्याही आता लग्नाला उतावळा झाला होता. अंतरपाट वर धरला तरी टाचा उंच करून तो मनालीला न्याहाळत होता. ते बघून आमचं मित्रमंडळ पुढे सरसावलं, नवरदेवाला उंचावर नेण्यासाठी दहीहंडी केली आणि म्हणालो “कशी घालतोस माळ बघु लेका, आता माळ घालूनच दाखव ” 

पण ह्या l बहाद्दराने दहीहंडी फोडून उडी मारली आणि तो धपक्कन मनालीच्या पुढेच पडला. आम्ही तिथे पोहोचायच्या आतच चलाखीने नवरीच्या गळ्यात त्याने माळ घातली, मनालीने पण तितक्याच चपळाईने त्याच्या गळ्यात हार घातला. आणि काय म्हणाली माहित आहे कां “.. हमभी कुछ कम नही..

अक्षतांचा मारा झाला हास्याची लाट उसळली, फुलांची उधळण झाली आणि.. आणि.. शुभमंगल एकदाचं पार पडलं. आम्ही रोखलेले श्वास सोडले.

आज डोकं ठिकाणावर आलेलं आमचं हे यडखुळं हनिमूनला निघालय. त्याला पोहोचवायला वीस गाड्या बाहेर पडल्यात. विमानतळावर त्याला सोडताना आम्ही आरोळ्या ठोकल्या.

“बाय मनोज… बाय मनाली… हॅप्पी जर्नी”

© राधिका माजगावकर पंडित

सन सॅटॅलाइट पुणे – 51  

मो. 8451027554

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted