सुश्री विनिता तेलंग

? मनमंजुषेतून ?

॥ हरिनामाचा सरवा ॥ ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

(अगा वैकुंठीच्या राया …)  

विठ्ठल हा मालनीचा जिवलग .त्याला एकदा भेटून तिचं मन निवत नाही. पण संसाराची ,मुलालेकरांची, गायीगुरांची जबाबदारी तिच्यावर असते .ती जबाबदारी तिला दर वारीला जाऊ देत नाही .मग तिला वाटतं की आपण ‘बाईमाणूस’ म्हणून जाऊच नये .पंढरीच्या वाटेवरचं काहीही होऊन रहाणं तिला चालणार आहे .

किंवा कदाचित मनुष्यजन्म सरल्यावरही तिला त्याचा सहवास हवा आहे .तो कसा ? तर 

पंढरपुरीचाऽ           

मी का व्हयीन खराटा ऽऽ

इट्टलाच्या बाईऽ       

लोटंऽन चारी वाटा ऽऽ

पंढरपुरीची ऽ           

व्हयीन देवाची पायरी ऽऽ

ठेवील गऽ पाय ऽ      

सये येता जाता हरी ऽऽ

पंढरपुरीची ऽ           

मी गं व्हयीन परात ऽऽ

विठूच्या पंगतीला ऽ   

वाढीन साखरभात ऽऽ

याचा अर्थ कळण्याजोगा आहे ..पण याचा शेवट मोठा लोभस आहे ! 

पंढरपुरामंदी ऽ          

मी का व्हयीन ऽ पारवा ऽऽ

येचीन मंडपात ऽ        

हरिनामाचा सरवा 

तिला पारवा होऊन हरिनामाचा सरवा वेचायचा आहे !

किती विलक्षण प्रतिभा आहे या मालनीची ..

शेतातल्या पिकाची कापणी, मळणी करताना धान्याचे काही दाणे भुईवर सांडतात .तो सरवा .त्याला पाखरं टिपतात . पंढरपुरात मंदिरात जागोजागी हरिनामाचा गजर होतच असतो .नामसंकीर्तन ,भजन ,कीर्तन झाल्यानंतर भक्त बाहेर पडतात. त्यांच्या मुखातूनही तेच ऐकलेलं नाम बाहेर सांडत असतं .हा नामाचा सरवा तिथं मंदिराच्या सभामंडपात, प्रांगणात सांडून रहातो तो तिला वेचायचा आहे ! 

अशाच एका मालनीला वाटेवरचं गवत होऊन , वारकर्‍यांनाच विठू समजून त्यांचे पाय कुरवाळायचेत ! मातीचा डेरा होऊन त्यांचे पाय आपल्या आतल्या पाण्यानं, मायेनं भिजवायचेत .पण पुढं तिला बाभूळ, तुळस व्हावं वाटतं यामागे मात्र वारकर्‍याचं मोठं मन दिसून येतं .ती म्हणते ,‍

पंढरीच्या वाटं ऽ       

मी तं व्हयीन बाभूळ ऽ ऽ 

येतील मायबाप ऽ    

वर टाकीती ऽ  तांदूळ ऽ ऽ

पंढरीच्या वाटं ऽ     

मी  ग व्हयीन तूळस ऽ ऽ

य‍ेतील मायबाप ऽ   

पानी देतील मंजूळसं ऽ ऽ

वारीला जाताना वारकरी सोबत पीठमीठ घेतात ,तसे तांदूळही घेतात .आपल्यासोबत चालणारा, भेटणारा कुणीही उपाशी रहायला नको ,याकरता ते दक्ष असतात. एकांड्या साधू संन्याशाला ते तयार भाजी भाकरी देतात .कुणाला ते चालत नसलं तर त्याला शिधा म्हणजे तांदूळ देतात .चालताना बाभळीचं झाड आलं की पालवी दाट नसल्यानं त्यावरची पाखरं लगेच दिसतात .मग ते त्यांना तांदूळ टाकतात . पाखरांनाही दाणे फेकलेले दिसतात व खाली येऊन ती ते टिपू लागतात.

बाभळीच्या झाडोर्‍यासारखी ही मालन .तिच्याकडं काहीच साहित्य नाही .पण ही सार्‍यांची सेवा करते.  सामान वहाते, पाणी आणते, भाकर्‍या बडवू लागते ,पाय चेपून देते .ही वारीची लेक होते .मग मायबाप तिलाही दाणा घालतात ,जेवू घालतात .वारीत बाया डोईवर तुळस नेतात .तिला, किंवा वाटेतही तुळस दिसली की तिला पाणी द्यायची रीत आहे .वारकरी या तुळसाबाईलाही जवळचं पाणी देतील .पण ती पिईल कशात ? तर ओंजळीत हलकेच ओतलेलं मंजुळसं पाणी तिला मिळेल ! वारीला जाण्यामागं विठ्ठलाची ओढ तर आहेच पण कदाचित तिच्या रूक्ष, खडतर संसारात तिला न मिळणारी माया, आपलेपणा तिला वारीत मिळतो . रोजच्या कामच्या रगाड्यातून सुटका तर होतेच पण मुक्तपणाचा एक निर्भर आनंदही तिला हवाहवासा वाटत असणार .वारीत सारे सारखे … एकमेकांकडे सख्यभावानं, आत्मीय भावानं पहाणारे.  तिथल्या सार्‍या बंधूंना ती साधू म्हणते .तिथं ती सासुरवाशीण नाही. कपड्याचे, केसाचे -तिच्या संस्कृतीतल्या नियमांचे काच वारीत नसतात .मग तीही जरा सैलावते आणि निगुतीनं तेलपाणी करुन जपलेले आपले केस मोकळे सोडू शकते .वारीत उन्हापावसात चालणं ,कधी घामानं तर कधी पावसानं भिजणं, नदीत स्नान करणं ,यामुळंही ती कायम केस बांधत नाही .कितीतरी मालनी या साध्याशा सुखाबाबत भरभरून बोलतात ..

पंढरीला जातेऽ         

मोकळी माझी येनी 

साधूच्या बराबरी ऽ    

मी ग आखाड्या केला दोनी ऽ ऽ

पंढरीच्या वाटं ऽ       

मोकळा माझा जुडा ऽ ऽ

साधूच्या संगतीत      

मीळाला दूध पेढा ऽ ऽ

पंढरी मी गऽ जातेऽ    

मोकळं माझं क्यास ऽ ऽ

साधूच्या संगतीनं ऽ    

मला घडली एकादस ऽ ऽ 

हे एक प्रकारचं प्रबोधन, एक प्रथा मोडण्याचं इवलं धाडसच ती करते आहे .असे केस सोडले तरीही माझं काही वाईट तर झालं नाहीच ,उलट एकादशा -उपवास- दर्शन यानं मी पुण्यच जोडलं असं ती सांगते ..

पण या प्रतीकात्मक मुक्तीशी मालन थांबत नाही . तिचं सुखनिधानच इतकं उंचावर आहे की त्याच्या ओढीनं ती देहभोगांच्या पार जाते ! 

पंढरीच्या वाटं ऽ       

वाटंऽ पंढरी कीती दूरऽऽ

नादावला जीवऽ      

वाजंऽईना गऽ बिदीवर ऽ ऽ 

पंढरीची वाट, मुक्तीची वाट दूरची खरी .अती खडतर .पण त्या वाटेवर चालताना त्याच्या नामात स्मरणात त्याच्या ओढीत पावलं अशी दंग होतात की कसलंच भान रहात नाही. जीव नादावतो .बीदी म्हणजे वाट .त्या वाटेवर आता तिला नादही ऐकू येईना .ती वाट म्हणजे एकतारीची तार आणि तिची पावलं हाच त्याचा झणात्कार .तिचं चालणंच वीणेचं वाजणं झालंय .आता तिला ना देहाची जाणीव उरलीय ना चालीची .सारं एकच झालंय .सगळ्यातून एकच नाद उमटतोय ..

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ….. 

© सुश्री विनिता तेलंग

सांगली. 

मो ९८९०९२८४११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted