कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

✈️ मी प्रवासी ✈️

☆ “ओह मॅन ! …” भाग – ७ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

‘वादी बानी खालिद’च्या नैसर्गिक तळ्यामध्ये बराच काळ आम्ही डुंबत आणि नैसर्गिक ‘पेडिक्युअर’ करून घेत राहिलो. आम्ही आल्यापासून तीन तास होत आले होते. आमचा पाय निघत नव्हता. पण वेळेचे भान ठेवून, पाण्यातून बाहेर पडावेच लागले. माझे सासरे, म्हणजे ती. दादा आमच्याबरोबर येऊ इच्छित नसल्याने ते मिनिबसमधेच थांबले होते. आम्ही परत येताच दादांची चौकशी केली. त्यांनी सांगितले की अल नसरने त्यांना केळी, केक आणि थंड पेय आणून दिले होते. शिवाय दोन वेळा त्यांना स्वच्छतागृहापर्यंतही नेऊन आणले होते. साधारण दादांच्या नातवाच्याच वयाच्या त्या ओमानी तरुणाने जणू काही स्वतःच्याच आजोबांची काळजी घेत असल्याप्रमाणे दादांना पाहिले होते हे जाणवून आम्ही भारावून गेलो.

संध्याकाळपर्यंत आम्ही मस्कतच्या ‘फ्रेझर स्युईटस’ मध्ये पुन्हा येऊन पोहोचलो. आमचे ओमानभ्रमण जवळजवळ पूर्ण झाले होते. पुढचा एक दिवस मस्कतमध्ये शॉपिंगसाठी राखीव होता आणि त्याच्या पुढच्या दिवशी सकाळी मुंबईला परतायचे होते.

ओमानसफरीवर निघण्यापूर्वी, “ओमानला कसे काय चाललात?” “तिथे काही पाहण्यासारखे आहे का?” “अगदीच ऑफ-बीट जागा कशी निवडलीत तुम्ही?” असे अनेक प्रश्न आम्हाला विचारले गेले होते. त्या-त्या वेळी सुचतील ती उत्तरे देऊन आम्ही वेळ मारून नेली होती. परत आल्यावर मात्र, “भटो भटो, काय पाहिलंत?” असा प्रश्न कुणी विचारायच्या आतच आपण ‘ओमाननामा’ लिहून काढायचा असे ठरवून, मी ‘ओह मॅन’ हे प्रवासवर्णन लिहायला सुरुवात केली. ओमानमध्ये वेळोवेळी भेटलेल्या काही लोकांशी झालेल्या संवादाचे ओझरते उल्लेखच फक्त केले असल्याने त्याबद्दल जरासे विस्ताराने लिहिणे आवश्यक आहे.

ओमानमध्ये आम्हाला ठिकठिकाणी अनेक दक्षिण आशियाई लोक भेटले. अधिकांश लोक भारतीयच किंवा बांगलादेशी असल्यामुळे भाषेची अडचण कुठेच आली नाही. मस्कतमध्ये ‘फ्रेझर स्युईटस’च्या हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांशी येता-जाता गप्पा व्हायच्या. श्रीलंकेचा एक तरुण आणि एक तरुणी रोजच भेटत असत. आम्ही त्यांना म्हटले, “आम्ही गेल्या वर्षी मलेशियाला जात असताना, कोलंबोजवळच्या नेगोंबो या उपनगरात आम्ही एक रात्र राहिलो होतो. जाता-येताना जेवढे काही नेगोंबोचे दर्शन झाले ते फार छान होते आणि आम्हाला पुन्हा श्रीलंकेला जायची इच्छा आहे. ” आमच्याकडून हे शब्द ऐकताच, मातृभूमीच्या आठवणीने ते दोघेही अगदी हरखून गेले होते.

बांगलादेशी लोक तर आम्हाला ‘फ्रेझर स्युईटस’मध्ये, मस्कत किंवा सूरमधल्या कापड बाजारात, भाजी बाजारात आणि इतरही अनेक ठिकाणी भेटले. त्यावेळी नुकत्याच बांगलादेशात झालेल्या सत्तापालटासंबंधी आम्ही सहजच विचारल्यासारखे करून त्यांचे मत जाणून घेतले. जे झाले त्याबद्दल बहुतेकांनी हळहळ बोलून दाखवली. एका तरुणाने तर खूपच चीड व्यक्त करत म्हटले, “शेख मुजिबुर रहमान आणि त्यांची मुलगी शेख हसीना यांनी आमच्या देशासाठी जे केले, त्याला तोड नाही. अमेरिकेने फुसलावून आमचा देश भडकवलेला आहे आणि सत्तापालट करवून आणलेला आहे. पण आज ना उद्या, जनता त्यांना योग्य उत्तर नक्की देईल! “

सूरमधल्या हॉटेलच्या रिसेप्शन काउंटरवर, सफाईदार इंग्रजीत बोलणारी एक तरतरीत पाकिस्तानी महिला गिरीशला भेटली होती. आम्हाला हॉटेलांमधून भेटलेल्या सर्वच मुला-मुलींनी हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेस केलेले असल्याने, गिरीशने तिलाही विचारले, “तू कुठे ग्रॅज्युएशन केलेस? पाकिस्तानातच का?” त्यावर ती हसून म्हणाली, “सर, यू विल नॉट बिलीव्ह, पण मी फक्त चौथीपर्यंत शिकलेली आहे! ” काहीशा अविश्वासानेच गिरीशने तिच्याबद्दल माहिती विचारली. तिने सांगितले की पाकिस्तानात झेलम नदीच्या पश्चिम तीरावरच्या ‘झेलम’ नावाच्या (भारत-पाक सीमेजवळच्या) गावी तिचा जन्म झाला होता. वडील तिच्या लहानपणीच वारले होते. केवळ कानावर पडेल ते ऐकून-ऐकून ती इंग्रजी बोलायला शिकली होती. कुणाच्या तरी मदतीने, दुबईमध्ये काम करण्यासाठी गेली आणि तिथे अंगावर पडेल ते काम करत तिने हळूहळू प्रगती केली. दुबईमध्ये तिने बरीच वर्षे काम केले होते. पण तिथल्यापेक्षा ओमानमध्ये कामाचे प्रेशर कमी आणि पगारदेखील चांगला असल्याने ती इथे आलेली होती. गिरीशने सहजच तिला पाकिस्तानबद्दल काही प्रश्न विचारले. पाकिस्तानात सर्वच बाबतीत, सैन्यदलांच्या असलेल्या वर्चस्वावर तिने खूप टीका केली. ती असेही म्हणाली की भारत आणि पाकिस्तान एकाच वेळी स्वतंत्र होऊनदेखील आज भारत पाकिस्तानपेक्षा सर्वच बाबतीत कैक पटींनी वरचढ झाला आहे. पाकिस्तानातली एकंदर परिस्थिती इतकी वाईट आहे की तिच्या झेलम गावातल्या घराचे विजेचे बिल घरभाड्यापेक्षा जास्त येते!

ओमानमध्ये भेटलेल्या भारतीयांकडूनही आम्हाला निरनिराळ्या कहाण्या ऐकायला मिळाल्या. सूरच्या हॉटेलात भेटलेली वेट्रेस शौमिता आणि सुपरवायझर शॉप्तर्षि चॉक्रोबॉरती या दोघांनीही हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेस केलेले होते. शौमिता मला म्हणाली की तिला प्रवासाची खूप आवड आहे. पण जगभर फिरता-फिरताच पैसे कमवण्याची तिची इच्छा होती. भारतात, तसेच सिंगापूर व मलेशियामध्ये काही काळ नोकरी केल्यानंतर ती ओमानमध्ये आली होती. शॉप्तर्षिनेही भारतात नोकरी केली होती व काही काळ तो पुण्याजवळ शिरूरला राहिलेला होता. श्री. मित्रा नावाचे एक बंगाली गृहस्थ सूरमधल्या त्या हॉटेलचे जनरल मॅनेजर होते. त्यांच्या शिफारशीने अनेक बंगाली कर्मचारी त्या हॉटेलात नोकरीसाठी आलेले होते. एक केरळी कर्मचारी तर त्याच हॉटेलात गेली २५ वर्षांहून अधिक काळ कामाला आहे!

वाहिबा सँड्स वाळवंटामधल्या Thousand Nights कँम्पमध्येही काळे नावाचे नाशिकचे गृहस्थ जनरल मॅनेजर होते. त्यांच्या ओळखीने अनेक मराठी मुले तिथे कामाला लागलेली होती. नाशिकच्या एयरलाईन अँड हॉटेल मॅनेजमेंट (AHA) कॉलेजमध्ये शिकलेली आणि ओमानमध्ये इंटर्नशिप किंवा नोकरी करत असलेली किमान १५ ते १८ मुले-मुली आम्हाला भेटली. जेमतेम २१ वर्षे वयाच्या त्या मुलांना वर्षातून एकदा भारतात जाण्या-येण्याचा विमानखर्च मिळत होता. कँम्पमध्येच राहून व जेवूनखाऊन, दरमहा सुमारे पंधरा ते पंचवीस हजार रुपये (करमुक्त) त्यांना वाचवता येत होते. जगभरातल्या लोकांना भेटण्याचा आणि त्यांच्याकडून शिकण्याचा अनुभव मिळत होता तो वेगळाच! त्या सगळ्या मुलांकडून एकमुखाने हेच ऐकू आले की या देशातली कार्यसंस्कृती खूपच चांगली आहे.

ओमानमध्ये आम्हाला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. मोठमोठ्या जाहिरातींचा एकही बोर्ड आम्हाला दिसला नाही. रस्त्यांवर प्लास्टिकचा कचरा किंवा घाण पडलेली नव्हती. शहरांमध्ये स्वच्छ उद्याने होती. अगदी लहान गावांमध्येही सरकारी शाळांच्या पक्क्या आणि नेटक्या, दुमजली, वातानुकूलित इमारती होत्या. प्रत्येक शाळेच्या आवारात खेळांची मैदाने, तसेच अगदी लहान मुलांसाठी घसरगुंड्या/झोपाळे वगैरे होते. दुकानांमध्ये आणि इतरत्र ठिकठिकाणी पुरुषांसोबत बायकादेखील काम करीत होत्या. आम्हाला जागोजागी दिसलेले-भेटलेले ओमानी लोकदेखील मृदुभाषी वाटले. संयुक्त अरब अमिरातीप्रमाणेच ओमानमध्येही खनिज तेलाचा मुबलक पैसा आहे. इथेही अनेक श्रीमंत लोक आहेत. मस्कतमध्ये मोठमोठे मॉलही आहेत. पण आम्हाला कुठेही श्रीमंतीचे ओंगळ प्रदर्शन दिसले नाही किंवा कुणामध्येही पैशाचा माज जाणवला नाही. कदाचित ओमानमध्ये शिक्षणाला दिल्या जाणाऱ्या प्राधान्याचा तो परिणाम असू शकेल, किंवा या देशाची एकंदर संस्कृतीच अशी असेल.

ओमानमध्ये पाहण्यासारखे बरेच काही आहे, आणि त्या देशाकडून खूप काही शिकण्यासारखेही आहे.

आमच्या ओमान सफरीबद्दल ऐकून एक मित्र मला म्हणाला, “बापट, हाऊ डिड यू गो टू ओमान, ऑफ ऑल द प्लेसेस?”

मी त्याला इतकेच म्हणालो… “ओह मॅन , यू टू मस्ट गो देअर वन्स! “

– समाप्त – 

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted