सुश्री अरुणा मुल्हेरकर
विविधा
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ३ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
तुकारामांचे मन प्रपंचात, संसारात मुळीच रमत नाही. पांडुरंगाच्या भेटीची त्यांना तळमळ लागून राहिली आहे, म्हणूनच ते एकसारखे म्हणतात,
भेटी लागी जीवा लागलीसे आस
पाही रात्रंदिस वाट तुझी
परमेश्वर प्राप्तीच्या वेडाने
कन्या सासुरासी जाये। मागे परतुनी पाहे।
तैसे झाले माझ्या जीवा ।केव्हा भेटसी केशवा।।
जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. ।
तुकारामांची अवस्था पाण्याबाहेर तडफडणाऱ्या मासोळी सारखी झाली आहे. पांडुरंगाची कृपादृष्टी मिळवण्यासाठी आता काय करावे हा एकच विचार त्यांच्या मनात रात्रंदिवस घोळत आहे.
ते पांडुरंगाला साद घालतात आणि म्हणतात,
तान्हेल्याची धनी फिटे गंगा नव्हे उणी।
माझे मनोरथसिद्धी पाव भावे कृपानिधी।।
तू तो उदारांचा राणा माझी अल्पशी ।
कृपादृष्टी पाहे तुका म्हणे होई साहे ।
एखाद्या तहानलेल्या माणसाने गंगेतले पाणी पिऊन त्याचे समाधान झाले, तरी गंगेचे पाणी काही कमी होत नाही. माणूस मात्र तृप्त होतो. त्याचप्रमाणे हे कृपेच्या सागरा माझ्या मनातल्या इच्छा, माझे सर्व मनोरथ तूच पूर्ण करू शकतोस.
तुम्ही माझ्याकडे कृपादृष्टीने पहावे एवढीच माझी अल्पशी इच्छा आहे. माझ्या साधनेत मला मदत करा.
भक्ती मार्ग हा परमेश्वरा प्रती जाण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. बहुतेक सर्व साधुसंत याच मार्गाने गेले आहेत, कारण या मार्गात कुठेही आड वळणे नाहीत. भक्ती मार्गाची ही वाट अगदी स्वच्छ आहे.
संत तुकारामही याच मार्गाने जात आहेत.
ते साधकांना सांगतात,
नव्हतो सावचित्त तेणे अंतरले हित।
पडिला नामाचा विसर वाढविला संसार।।
लटक्याचे पुरी गेलो वाहूनिया दूरी।
तुका म्हणे नाव आम्हा सापडला भाव।।
ते स्वतः विषयी सांगतात की हरी चिंतनाविषयी सावध नव्हतो, म्हणून विघ्ने आली. हरी नामाचा विसर पडला आणि संसार वाढवत बसलो. मायेच्या पुरात पुरता अडकलो. परंतु आता जागा झालो आहे. हरिभक्तीची नौका सापडली आहे.
तेव्हा आता काय उणे आम्हा विठोबाचे पायी
नाही ऐसे काही तेथे एक
तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी
फुकाची लुटावी भांडारे ती
पांडुरंगाच्या गावाला मोक्षाची भांडारे भरलेली आहेत आणि भक्तांना ती अगदी मोफत आता लुटता येतात.
तुकाराम महाराज या मायामोहातून, प्रपंचातून मुक्त होऊन पांडुरंगाशी एकरूप होण्यासाठी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणावर माथा ठेवण्यासाठी आतुर झाले आहेत. अतिशय व्याकुळ झाले आहेत. ते म्हणतात, ” पांडुरंगा तू मला फक्त भेट दे”. त्यासाठी…
*नलगे हे तुझे ब्रह्मज्ञान। गोजिरे सगुण रूप पुरे।।
लागला उशिर।पतित पावन ।विसरूनी वचन। गेलास या।।*
जाळूनी संसार। बसला अंगणी ।तुझे नाही मनी ।मानसी हे।।
तुका म्हणे नको राग रागेजू विठ्ठला। उठी पावतात देई मला भेटी आता।।
या अभंगातूनही विठ्ठलाच्या भेटीची तुकाराम महाराजांना लागलेली तळमळच दिसून येते. या अभंगात वापरलेला रागेजू हा शब्द मला विशेष लक्षणीय वाटला. लहान मूल जसे लडिवाळपणे त्याच्या मातेकडे काही हट्ट करते, त्याचप्रमाणे तुकाराम महाराज या माऊलीला रागावू नकोस असे मोठ्या लडिवाळपणे सांगत आहेत.
संसारातून तुकाराम महाराजांना पूर्ण विरक्ती आलेली आहे. पंचेंद्रियांवर ताबा मिळवलेला आहे, आणि ते पांडुरंगाला म्हणतात,
संसार हा तीही केला पाठमोरा
नाही द्रव्यदारा जया चित्ती
शुभाशुभ नाही हर्षामर्श अंगी
जनार्दन जगी होऊनी ठेला
तुका म्हणे दिला देह एकसरे
जयासी दुसरे नाही मग
त्यांना आता मान मरातब काही नको. त्यात त्यांना थोडेही सुख वाटत नाही. गोड अन्न सुद्धा त्यांना विष समान वाटत आहे. कोणी त्यांची स्तुती केली तर त्यांचा जीव कासावीस होतो.
ते म्हणतात,
नको मृगजळा होऊ मज
तुका म्हणे आता करी माझे हित
काढावे जळत्या आगीतून.
हा संसार म्हणजे त्यांना जळती आग वाटत आहे.
तुकाराम महाराजांच्या प्रत्येक शब्दातून त्यांची विठ्ठल भक्तीची आणि विठ्ठलाच्या भेटीची तळमळ दिसून येते
विठ्ठला रे तू उदाराचा राशी
विठ्ठला तुझं पाशी सकळसिद्धी
विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड
विठ्ठला तू पुरविशी सर्व कोड
विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले
विठ्ठला रे सोस घेतला जीवे
विठ्ठला रे शोक करीत असे तुका
विठ्ठला तू एका झडकरी
संत तुकाराम हे पूर्णपणे विठ्ठलमय झालेले आहेत.
क्रमशः… ३
© सुश्री अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈






