सुश्री अरुणा मुल्हेरकर
विविधा
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ४ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
भक्तीतून तुकारामांना प्राप्त झालेली अधिकार वाणी-
गाथेतील एकेक अभंग वाचत गेले की संत तुकाराम महाराजांना विठ्ठलाच्या भेटीची अत्यंत तळमळ लागून राहिली आहे, हे आपण पहिल्या तीन भागात पाहिले. अशी अनन्य भक्ती करत असताना पांडुरंगाशी ते कित्येक वेळा मोठ्या अधिकार वाणीने बोलत आहेत याची जाणीव होते.
पांडुरंगाने त्यांना भेट द्यावी म्हणून या अभंगातील महाराजांचा युक्तिवाद पहा.
ठाईची ओळख ही येईल टाकू टाका सुखी
तुमचे जाईल इमान माझे कपाळी पतन
ठेवीला तो ठेवा अभिलाषा बुडवावा
मनी न विचारा तुका म्हणे हे दातारा
स्वतःचा उद्धार करण्यासाठी तुकाराम महाराज विनवणी करत आहेत. ते म्हणतात, ” देवा, तुझी आणि माझी फार जुनी ओळख आहे, ती तू विसरू शकत नाहीस. जर विसरलास तर तूच बदनाम होशील. तुझे इमान जाईल आणि माझे पतन होईल. ” यासाठी ते दृष्टांत देतात. म्हणतात, ” एखाद्या जवळ कोणी काही ठेवा ठेवण्यासाठी म्हणून दिला आणि त्याच्याकडून तो काही कारणास्तव बुडाला, तर तो लोभाने बुडाला असेच म्हटले जाईल. म्हणून हे दातारा
या गोष्टीचा तू विचार कर (आणि मला दूर लोटू नकोस.)
कारे माझा तुज ये कळवळा
असोनी जवळा हृदयस्था
अगा नारायणा निष्ठा निर्गुणा
केला शोक नेणा कंठस्फोट
काय चित्त नाही पावत विश्रांती
इंद्रियाची गती खुंटेचीना
तुका म्हणे का हो धरीयेला कोप
सरले नेणो पाप पांडुरंगा
पांडुरंगा तू माझ्या हृदयात आहेस. इतका जवळ आहेस तरी तुला माझी करुणा का येत नाही?
हे नारायणा, तू देव असून गुणातीत आहेस, मग इतका निष्ठूर का आहेस? घसा फुटेपर्यंत मी रडलो तरी तू माझ्याकडे जराही लक्ष देत नाहीस. माझी विषयासक्ती दिवसेंदिवस वाढतच आहे, ती का थांबत नाही? माझे चित्त अजून शांत का होत नाही? देवा तू माझ्यावर रागावला आहेस का?
मधूनच ते विठ्ठलाशी अशा प्रकारे सलगीने बोलतात.
दीनानाथ तुझी ब्रिदे चराचर
घेशील कैवार शरणागता
तू दीनांचा स्वामी आहेस आणि तुला शरण आलेल्या तुझ्या भक्तांचा तू कैवारी आहेस.
पुराणी जे तुझे गरजेची पवाडे
ते आम्हा रोकडे कळो आले
आपल्या दासाचे न साहसी उणे
उभा त्या कारणे राहिलासी
तुका म्हणे तुज भक्तीचे कारण
करावया पूर्ण अवतार*
वेद पुराणात तुझी कीर्ती वर्णिली आहे. तुझ्या दासांवरची संकटे तुला सहन होत नाहीत. तू ती तात्काळ दूर करतोस. त्याच्यासाठी तू सदैव उभा आहेस. भक्ताचे कार्य पूर्ण करण्यासाठीच तुझे अवतार आहेत.
शिवाजी महाराजांवर परचक्रं आली, तेव्हा महाराज विठ्ठलाला अधिकाराने सांगतात.
न देखवे डोळा ऐसा हा आकांत
परपीडे चित्त दुःखी होते
काय तुम्ही येथे नसालसे झाले
आम्ही न देखीले पाहिजे हे
परचक्र कोठे हरिदासांच्या वासे
न देखजे ते देशे राहातिया
तुका म्हणे माझी लाजवीली सेवा
हीन पणे देवा जिणे झाले
देवाला निर्वाणीच्या शब्दात गाऱ्हणे घालतात. विठ्ठला, हा दुःखद प्रसंग मला पाहवत नाही. हे असे का व्हावे? त्यावेळी तू तेथे नव्हतास का?
अशा प्रकारचे दुःख आम्हाला दिसता कामा नये. हरिदासाच्या घरी परचक्र येतेच कसे? मी तुमची इतकी सेवा केली, तिला तुम्ही लाज आणली आणि मलाही न पणे जगणे प्राप्त झाले. — किती ही अधिकार वाणी!
पुढच्या अभंगात महाराज विठ्ठलाला सांगतात, हरी किर्तन आणि सर्व भक्त तरले जावेत, हे त्याचे खरे फळ आहे. हे जे परचक्र आले आहे, त्यावरून आपणच सगळा उच्छाद मांडला असावा असे वाटते. पूर्व जन्मातील पाप असल्याशिवाय असे पाप पुढे येत नाही हे या प्रसंगाने उघड आहे, पण जेथे तुमचे दास राहतात तेथे तुम्ही पण राहता हे मी खरे कसे मानावे? असा परखड प्रश्न महाराज देवाला विचारतात.
पुढील भागात अधिकारवाणीच्या आणखी काही अभंगांचा विचार मांडण्याचा प्रयत्न असेल.
क्रमशः… १
© सुश्री अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈





