सुश्री शोभा जोशी
इंद्रधनुष्य
☆ “महान योद्धा राणी दुर्गावती…” ☆ सुश्री शोभा जोशी ☆
(२४ जून, राणी दुर्गावती बलिदान दिवस)
आपल्याला माहित आहे की ब्रिटीश भारतात येण्यापूर्वी भारतावर कोणाचाच एकछत्री अंमल नव्हता. देशामध्ये छोटी मोठी स्वतंत्र राज्यं होती. छोटी मोठी संस्थानं होती. प्रत्येक राज्याचा, संस्थानाचा राजा आणि त्याचे सरदार, मंत्री असत ते आपल्या राज्याचा कारभार करत.
आपल्या राज्याचे संस्थानाचे शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी अनेक वीर पुरूषांनी लढता लढता मरण पत्करले. त्यामध्ये स्रियाही मागे नव्हत्या. अशाच शूर स्रियांपैकी एक म्हणजे राणी दुर्गावती. आत्ताचा मध्य प्रदेश त्या वेळी गोंडवाना म्हणून प्रसिध्द होता. या गोंडवानातील माहोबाचे राजा कीर्तीसिंह हे चंदेल या रजपूत घराण्यातील होते. त्यांची दुर्गावती ही मुलगी. तिचा जन्म ५ ऑक्टोबर १५२४ मध्ये कालिंजर किल्ल्यात दुर्गाष्टमीला झाला म्हणून तिचे नाव दुर्गा ठेवले. ती नावाप्रमाणेच प्रसंगी दुर्गावतार धारण करायची. ती दिसायला खूप सुंदर होती. खूप हुशार तर होतीच पण खूप शूर आणि धाडसी होती. लहानपणापासूनच तिला धनुष्यबाण चालविणे, तलवारबाजी करणे, शिकार करणे या सर्वांची आवड होती. वाघ, चित्ता दिसला तर त्याला मारल्याशिवाय ती पाणीही पीत नसे.
माहोबाच्या राज्याच्या शेजारीज गढमंगला राज्य होते. या राज्याचा राजा संग्रामशहा गोंड जमातीचा होता. त्याचा मुलगा दलपत याच्याशी दुर्गावतीचे लग्न झाले. त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव वीरनारायण. तो चार वर्षांचा असतानाच दलपतचा मृत्यू झाला. राणीने छोट्या वीरनारायणला राज्याभिषेक केला आणि त्याच्या नावाने ती स्वतः राज्यकारभार करू लागली.
चितोड, मेवाड, गोंडवाना अशी काही राज्यं सोडली तर आजूबाजूला सगळी मुस्लीम राज्ये होती. दिल्लीत अकबराचं राज्य होतं. राणीला कल्पना होती की ही मुस्लीम राज्यं आपलं राज्य बळकावण्यासाठी आपल्यावर नक्कीच हल्ले करणार. म्हणून तिनं पहिल्यांदा काय केलं तर आपलं सैन्य चांगलं तयार केलं. त्या सैनिकांना युद्धाचं चांगलं शिशण दिलं. त्यांना शूर वीर बनवलं. हेकरत असतानाच तिनं खूप मोठे मोठे तलाव बांधले. विहिरी खोदल्या. मंदिरं, मठ बांधले. धर्मशाळा बांधल्या. चांगले रस्ते तयार केले. तिनं आपलं राज्य समृध्द बनवलं. त्यामुळे राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे. ती एक कुशल प्रशासक होती. त्यामुळे प्रजा तिला देवी मानत असे. एक स्री राज्यकारभार चालवते आहे म्हटल्यावर मुस्लीम राजे आपल्यावर आक्रमण करणार हे तिला माहित होतं म्हणून तिनंच आधी काही राज्यांवर आक्रमणे करून, त्यांचा पराभव करून आपल्या राज्याचा विस्तार केला. तिनं बाजबहाद्दूरला सुध्दा हरवले.
तिच्या पराक्रमाची कीर्ती दिल्लीचा मोघल बादशहा अकबराच्या कानावर गेली. त्याने तिच्यावर आक्रमण करण्यासाठी दोनदा सैन्य पाठवले. पण राणीने दोन्हीवेळा त्यांचा पराभव करून त्यांना परत पाठवले.
अकबरानं दोन वर्षांनी प्रचंड सैन्यासह पुन्हा तिच्यावर हल्ला केला. राणीनं आपल्या तुटपुंज्या सैन्यानिशी अकबराशी निकराचा लढा दिला. राणीच्या दोन्ही डोळ्यांना बाण लागले. तिला दिसेनासं झालं. तरीपण दोन्ही हातात तलवारी घेऊन ती लढतच राहिली. तिच्या मानेत, गळ्यात बाण घुसले आणि ती बेशुध्द झाली. शुध्दीवर आली तेव्हा तिला कळून चुकलं होतं की आपण युध्द हरलो आहोत. आपण जिवंतपणे अकबराच्या हातात सापडलो तर तो आपला खूप छळ करेल आणि जन्मभर आपल्याला त्याच्या जनानखान्यात खितपत पडावं लागेल म्हणून त्या शूर विरांगनेनं आपली कट्यार आपल्या छातीत खुपसली आणि वीर मरण पत्करलं. १६ वर्षं कुशल राज्यकारभार केलेली ही पराक्रमी, शूर, वीर, धैर्यवान राणी अकबरासारख्या बलवान, शक्तीशाली राजाला शरण गेली नाही. त्याच्यापुढं हार न पत्करता तिनं सरळ मरण जवळ केलं आणि इतिहासात अजरामर झाली. अशा राणी दुर्गावतीला मानाचा प्रणाम आणि श्रध्दांजली.
माहिती संग्राहिका व लेखिका : सुश्री शोभा जोशी.
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






