सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “हूल दिवस – संथालांचा नरसंहार…” ☆ माहिती संग्राहिका व लेखिका – सुश्री शोभा जोशी

(इंग्रजांपासून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लाखो लोकांनी प्राणांचं बलिदान दिलं आहे हे आपल्याला ज्ञात आहेच. १८५७ चा उठाव – खरं तर ते पहिलं स्वातंत्र्य युध्द मानलं जातं, पण त्याही आधीपासून हे प्रयत्न सुरू होते. लोकांनी देशासाठी प्राणांचं बलिदान दिलेले काही प्रसंगच किंवा काही वीरांची नावंच आपल्याला माहित आहेत. पण जनजातीतील शेकडो लोकांनी दिलेलं बलिदान कधी आपल्या समोर आलंच नाही.)

स्वातंत्र्य युध्दात, संथाल परगाण्यात म्हणजेच आत्ताच्या छत्तीसगडमध्ये, ३० जून १८५५ला संथालांकडून झालेलं युध्द हा मैलाचा दगड आहे. त्या ही पूर्वीपासून स्वातंत्र्य युध्दाची सुरूवात झाली होती.

संथाल परगणा हे शेतीप्रधान वनवासी क्षेत्र आहे. हे वनवासी लोक धर्मप्रेमी, निसर्गप्रेमी आणि साधेभोळे आहेत. जमीनदार याचा फायदा नेहमीच उठवत. जंगलांमधील किमती वस्तू (उदा. मध, वनौषधी, डिंक इ.) त्यांच्याकडून घेऊन त्या बदल्यात त्यांना स्वस्तातल्या काही किरकोळ वस्तू त्यांना देत.

इंग्रज आल्यानंतर हे जमीनदार त्यांना जाऊन मिळाले. त्यामुळे या लोकांवर दुहेरी संकट आले. या जनजाती, घरगुती कारणांसाठी ५ ते ५० टक्क्यांपर्यंत व्याज देऊन सावकारांकडून कर्ज घेत आणि उपजीविका चालवत.

१७८४ मध्ये संथालांमधील तिलका मांझी या शूरवीराने आपल्या शिष्यांना बरोबर घेऊन इंग्रजांविरूध्द अनेक वर्षं संघर्ष केला होता. जनजाती समाजात त्यांना मान होता. इंग्रजांनी त्यांना पकडून भागलपूरमध्ये घोड्याच्या शेपटीला बांधून, फरफटत फरफटत नेऊन त्यांना अर्धमेले केले आणि भागलपूरमध्ये एका झाडावर फाशी दिले. यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन सिध्दू- कान्हू, चाॅंद- भैरो, फुलो – झानो या बंधू भगिनींनी हा लढा पुढे चालू ठेवला.

३० जून १८५५ ला संथालांनी पंचकठीया गावात हूल क्रांतीला सुरूवात केली, जी पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात सर्व क्षेत्रात पसरली. हे आंदोलन हूल क्रांतीची सुरुवात होती. या आंदोलनामुळे इंग्रजांना कित्येक ठिकाणी माघार घ्यावी लागली आणि संथालांचा विजय झाला.

एक वेळ अशी आली की या क्रांतीचा संदेश घरोघरी पोहोचला. याचा परिणाम असा झाला की, त्या क्षेत्रांमधून इंग्रज शासन संपले. यामुळे उत्साहित होऊन एके दिवशी ५०००० संथालांनी इंग्रजांना मारत, काटत कलकत्त्याच्या दिशेने पिटाळून लावले.

अर्थातच इंग्रजांना हे सहन झाले नाही. त्यांनी मेजर बुरीच्या नेतृत्वाखाली सैन्य पाठवले. ५ तासांच्या रक्तरंजित लढाईत इंग्रजांचा पराभव झाला आणि संथालांनी पाकडू जिल्ह्यावर वर्चस्व मिळवले. शेकडो इंग्रज सैनिक मारले गेले. त्यामुळे साहजिकच इंग्रज अधिकारी घाबरले. त्यांनी मार्शल लाॅ लाऊन तो सारा प्रदेश सेनेच्या स्वाधीन केला. त्यामुळे इंग्रज सेनेला रान मोकळे मिळाले. इंग्रज सेनेकडे आधुनिक शस्त्रे होती आणि संथालांकडे धनुष्यबाण होते. त्यामुळे बाजी पलटली. सगळीकडे रक्ताचे पाट वाहू लागले. जवळ जवळ २०,००० संथालांनी प्राणांची आहुती दिली.

प्रसिध्द इतिहासकार हंटरने या युध्दाविषयी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, ‘संथालांना आत्मसमर्पण सारखा शब्द माहित नव्हता. जोपर्यंत ढोल वाजत राहिला तोपर्यंत ते लढत राहिले. अगदी शेवटी एक माणूस राहिपर्यंत ते लढत राहिले. इंग्रज सेनेमध्ये एकही सैनिक असा नव्हता की जो या साहसापुढे लज्जीत झाला नाही. ‘

या संघर्षात सिध्दू- कान्हू बरोबरच त्यांचे भाऊ चाँद- भैरो सुध्दा मारले गेले. या घटनेचे स्मरण म्हणून दर वर्षी ३० जून हा हूल दिवस मानला जातो. या दिवशी ठिकठिकाणी लोक एकत्र येऊन या क्रांतीवीरांना श्रध्दांजली अर्पण करतात.

कार्ल मार्क्स या लेखकाने आपल्या ‘नोटस् ऑफ इंडियन हिस्ट्री ‘ या पुस्तकात जन- क्रांती‘ असे या घटनेचे वर्णन केले आहे.

या शूर वीरांना जनजाती कल्याण आश्रम पुणे महानगरातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली.

माहिती संग्राहिका व लेखिका : सुश्री शोभा जोशी.

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted