सुश्री तृप्ती कुलकर्णी
इंद्रधनुष्य
☆ दीप अमावस्या! ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
चातुर्मासातली आवडत्या कथांमधली दिव्यांची कथा ही माझ्या फार आवडीची. लहानपणापासून मला या कथेचे विलक्षण आकर्षण आहे. आजही अगदी झाडांवरती येऊन बसलेले दिवे, त्यांच्या आपसातल्या गप्पा आणि मग त्यावेळेला राजाला कळलेली आपली चूक आणि मग त्याने आपल्या सुनेचा प्रेमाने स्वीकार करणं. या सगळ्या गोष्टी विलक्षण वाटायच्या. चातुर्मासातल्या कुठल्याही कथेला वेगवेगळे कंगोरे आहेत. ते पाहणं ही एक मजा आहे.
मला नेहमी मानवी स्वभावाचे गुढ वाटत आलं आहे. कारण माणसाला कुठल्याही कृती मागे, परंपरेमागे एखादा कथानक रचण्याची, असण्याची सवय झाली आहे. विचार करायला लागल्यावर मला असं जाणवलं की बऱ्याचदा आपण कथानकांमधून घडत जातो. म्हणजे एक प्रकारचे आपण कथेतली पात्रंच आहोत. मग या कथा आपल्या घराण्यातल्या कुळाचार, चालीरीती यातून सांगितलेल्या असतील. काही सार्वजनिक सण, परंपरा यांच्यामधून आल्या असतील किंवा धार्मिक सोहळ्यांमधुन आल्या असतील. त्या सगळ्या आपल्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे काहीतरी देत असतात. घडवत असतात.
कालौघात नक्कीच चातुर्मास कथा वाचनाचं प्रमाण कमी झालं असेल. परंतु लहानपणी वाचलेल्या कथांचं गारुड आजही अनेकांच्या मनावर आहे. ज्यांच्या घरात वयस्कर व्यक्ती आहेत त्यांच्याकडे आजही चातुर्मासाच्या काळात त्या कहाण्यांचं वाचन होत असेल.
आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की या कथा आजच्या काळाशी अगदी विसंगत आहेत. आणि ते काही अंशी बरोबर आहे. दिव्यांच्या झगमगटाच्या काळामध्ये पणतीचं किंवा समईच महत्त्व असलं तरी त्यांचं महात्म्य मान्य करणं हे जरा अवघड जाऊ शकतं. कारण पूर्वीच्या तुलनेत त्याची उपयुक्तता कमी आहे. पण तरीही या प्रथा पाळल्या जातात. काही बदल विरंगुळा हे एक कारण नक्कीच आहे. परंतु गंमत म्हणजे त्या मागचं हे कथानक जुनं झाली तरी ते टाकून द्यायला आपण तयार नसतो. आपल्याला त्यातलं एक भाबडेपण, एक सश्रद्ध आणि एक साधं नैसर्गिक वातावरण लोभसवाणं वाटतं.
मला या कथा रचणाऱ्या रचनाकाराचं विशेष कौतुक वाटतं. म्हणजे माणूस आणि वस्तू यांच्यामधलं नातंसुद्धा किती सघन आहे ते यातून दिसतं. दिव्यांना बोलता येतं, ते इकडे तिकडे फिरू शकतात, झाडावर येऊन मस्त माणसांप्रमाणे गप्पा मारू शकतात, ही गोष्ट मला फार अचंबित करते. लहानपणी खूप प्रश्न पडायचे. काहींची उत्तरं मिळायची काहींची नाही. पण ही गोष्ट ऐकताना माझी एक सुंदर समाधी लागायची. सगळे दिवे आपापल्या घरातल्याप्रमाणे रूप धारण करून एका वडाच्या झाडावर येऊन बसलेत. छान पाय मोकळे सोडून फांद्यांना घट्ट धरून गप्पा मारत बसलेले ते दिवे मी माझ्या नजरेसमोर आणायचे. शेतकऱ्याचा दिवा कसा साधा फेटा घातलेला समाधानी असेल.. एखादा मजुराचा दिवा कसा मिणमिणता थकलेला असेल… सरदाराचा दिवा कसा जरा डौलदार असेल आणि राजांचा दिवा तर काय विचारूच नका त्याला फार छान, मुकुट छान, अंगरखा वगैरे असेल… आणि त्याचा खूप मोठा प्रकाश पडत असेल असं मला वाटायचं. साहजिकच ते बोलताना झाडांवर सगळे प्रकाश कमी-जास्त होत असतील. त्यांच्या सावल्या कशा गमतीशीर पडत असतील. ते झाड कसं दिसत असेल. अशा अनेक गोष्टी मी कल्पनेतूनच रंगवत राहायचे.
या गोष्टीने बाकी काही दिलं नाही दिलं पण कल्पनेतून छाया प्रकाशाचा खेळ कसा कमी जास्त होतो हे मात्र दिलं. मग ती राजाची सून तिने, खाल्लेला पदार्थ उंदरावर घेतलेला आळ आणि त्याने चिडलेल्या उंदराने घेतलेला सूड त्यामुळे खुश होऊन मिशीला पीळ मारून फिरणारा उंदीर, रागावलेले पाहुणे, राजाच्या घरची माणसं, सगळे नोकरचाकर, राजाच्या सुनेचा होणारे हाल आणि मग शेवटी थकून भागून येऊन झाडाखाली बसलेला देखणा राजबिंडा राजा, यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकणारा मनातच आपण कसलीच खातरजमा केली नाही म्हणून खजील होणारा आणि सरते शेवटी सत्य समजल्यावर मोठ्या मनाने आपली चूक कबूल करून सुनेला माफ करणारा… अशी चित्रांची एक मालिका डोळ्यांपुढे तयार व्हायची.
कधी उंदीर चांगला तर कधी खलनायक, कधी राजाची सून चांगली तर कधी ती खलनियिका, कधी राजा चांगला, त्याचा परिवार चांगला तर कधी तो आणि त्याचा परिवार खलनायक. या गोष्टीत मला जाणवलेली गंमत अशी की यामधली सगळी पात्रं दिवे सोडून चांगलीही वागलीत आणि वाईटही वागलीत. पण शेवटी सगळ्यांनाच आपल्या चुका कळतात. थोडक्यात सगळ्यांचाच अंधार अज्ञानाचा, मोहाचा, अविश्वासाचा दूर होतो. दिवेच तो अज्ञान दूर करतात तटस्थपणे घटना सांगून. आणि मग राजा घरी सगळीजण एकत्र येतात. सुखाने नांदतात. म्हणजे हा दिवा अज्ञानाचा पडदा दूर करतो आणि ज्ञान देतो त्याने सगळ्यांनाच आपापल्या चुका कळून त्या सुधारण्याकडे त्यांचा कल राहतो.
गोष्ट आवडत राहते याचं कारण हेच आहे. अज्ञान आहेच ते दूर करण्यासाठीच अनेक कथानकं, घटना घडतात, कधी घडवाव्याही लागतात आणि त्यानंतरच ज्ञानाचा प्रकाश पडतो. त्यामुळे कथा जुनी आहे प्रतीकंही जुनी आहे परंतु त्यातला मतीतार्थ मात्र आजही लागू आहे. आजच्या घडीला ताजाही आहे.
त्यामुळे
“काजळी जमण्याची खंत बाळगावी कशाला
तो तर तेवण्याचा जिवंत पुरावा आहे”
हे लक्षात घ्यावं. चातुर्मासाच्या या कथा वाचताना आणि आपापल्या परीने कल्पनेत रंगावं आणि आपल्या परीने त्याचे अर्थ शोधताना पुन्हा पुन्हा प्रकाशमान होत राहावं.
याच सर्वांना दीप अमावस्येच्या शुभेच्छा!
फोटो – पिंटरेस्ट
© सुश्री तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






