श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ पुरस्काराचा सोस☆ श्री जगदीश काबरे ☆

समाजकारणातून राजकारणात प्रवेश करणाऱ्या एक युवा कार्यकर्त्या मित्राला पुरस्कार मिळाल्याचे वाचून आनंद झाला. तेव्हा फोन करून त्याचे अभिनंदन केले आणि मी त्याला विचारलं की, ’तुला कोणत्या संस्थेचा पुरस्कार मिळाला आणि काय म्हणून मिळाला? ‘

त्याने मला त्या संस्थेचे नाव सांगितले आणि पुरस्कार ’समाज भूषण’ म्हणून दिला गेला, असे सांगितले. मला आश्चर्य वाटले की, त्याने सामाजिक कार्याला सुरुवात करून दोन वर्षेच झाली होती. त्यातून त्याने राजकारणात प्रवेश केला होता. मग एवढ्यातच तो समाज भूषण कसा काय झाला?

ही शंका मनात आल्यानंतर मी ज्या संस्थेकडून त्याला पुरस्कार दिला गेले होता त्या संस्थेचा गुगलवर धांडोळा घेतला. त्यांचा फोन नंबर मिळवला आणि त्यांना विचारले की, तुम्ही पुरस्काराचे निकष काय ठरवलेले आहेत?  

त्यावर त्यांनी जे उत्तर दिले ते ऐकून मी उडालोच.

ते म्हणाले, “साहेब, आम्ही पुरस्कार देताना त्या व्यक्तीकडून देणगी स्वीकारतो आणि त्या देणगीच्या रकमेप्रमाणे त्या व्यक्तीला कोणता पुरस्कार द्यायचा हे ठरवतो. एक हजार रुपयेपासून पंधरा हजार रुपयापर्यंतच्या देणगी रकमेप्रमाणे ’उत्कृष्ट कार्यकर्त्यापासून समाजभूषण’ पर्यंतचे विविध पुरस्कार दिले जातात. सोबतच आमच्या संस्थेचे सन्मानचिन्ह. त्यामुळे त्या व्यक्तीचे जसे नाव होते तसे संस्थेला कार्य करण्यासाठी आर्थिक हातभारही लागतो. अशाप्रकारे ’एकमेका सहाय्य करू’ पद्धतीने आमचे काम चालते. समजा उद्या तुमची कोणी शिफारस केली तर आम्ही तुम्हाला फोन करून विचारू की, तुम्ही किती रक्कम द्यायला तयार आहात. तुम्ही समाजसेवक, कवी, लेखक आहात की नाट्यचित्रवाणी कलाकार आहात, अशा कुठल्याही क्षेत्रात पुरस्कार हवा असेल त्याप्रमाणे तुम्हाला तो देण्यात येईल. “

याचा अर्थ सध्या जसा ’पेड बातम्यां’चा जमाना आलेला आहे तसाच ’पेड पुरस्कारां’चाही जमाना आलेला दिसतोय. काही वर्षांपूर्वी पुरस्कार हे माणसाच्या कलागुणांना जोखून दिले जायचे, नव्हे अजूनही दिले जातात. कारण त्याच्या कर्तृत्वाला दिलेली ती एक आदरणीय सलामी असते. पण आता सगळ्याच गोष्टीचे बाजारीकरण झाल्यामुळे हे क्षेत्र तरी कसे मागे राहील?  

पण या संस्थाना तरी का दूषण द्या?  कारण पैसे देऊन पुरस्कार विकत घेणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते आहे. लोक खोट्या प्रतिष्ठेला भुलून प्रत्यक्ष कार्य करण्यापेक्षा त्यांना पुरस्कारांची घरात रांग लागलेली दिसली म्हणजे आपण कोणीतरी मोठे झाले आहोत असे वाटू लागते आणि त्यांचा अहं सुखावतो. लोकांनाही ते खरे वाटते. अशा प्रकारे समाजात सगळाच बेगडी बटबटीतपणा बोकाळला आहे. समाजसेवेचे किंवा त्यांना हवेहवेसे वाटणाऱ्या क्षेत्राचे रूपांतर एका शो पीसमध्ये झालेले आहे.

पण यामुळे एक मोठे नुकसान होते ते ज्यांना त्यांच्या कलागुणामुळे आणि कर्तृत्वामुळे खरे पुरस्कार मिळाले आहेत त्यांचे. कारण अशा लोकांकडेही मग माणसे, त्यांनी पुरस्कार विकत घेतले असतील, या नजरेने बघायला लागतात. एकूणच समाजाचे गढूळेल्या नजरेने कर्तृत्ववान व्यक्तींच्या पुरस्कारांकडे पाहणे ही समाजाची अधोगती दर्शवते. ती अधोगती झाली आहे पुरस्कार विकत घेणाऱ्या लोकांमुळे, असे खेदाने नमूद करावेसे वाटते. विचार तर कराल?

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted