सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
इंद्रधनुष्य
☆ रात्रंदिन मन राघवी असावे… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆
रात्रंदिन मन राघवी असावे
चिंतन नसावे कांचनाचे
….. श्री समर्थ रामदास स्वामींचा हा अभंग आहे. हनुमानाच्या सर्व कथा रामभक्तीने भारलेल्या आहेत. त्याला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी रामच दिसत होता. त्याची राम भक्ती पाहून सीतामाता प्रसन्न झाली. तिला वाटले श्रीरामांच्या या सेवकाला आपण काहीतरी भेट द्यावी. तिने एक सुंदर मोत्याची माळ त्याला भेट दिली. हनुमानाने माळ घेतली पण तिचे काय करावे हे त्याला कळेना.
तो समोर जाऊन एका खडकावर बसला. माळेतील एक एक मणी काढायला सुरुवात केली. प्रत्येक मण्याचा प्रथम वास घेतला. नंतर प्रत्येक मणी सगळीकडून अगदी निरखून निरखून पाहिला. आणि फोडून टाकला. आत काय आहे ते बघितले. आणि टाकून दिले. असे करत करत त्याने त्या माळेतील ते सर्व मौल्यवान मणी फोडून टाकले. हे सारे सीतामातेने पाहिले. तिला खूप राग आला. आपण प्रेमाने याला माळ दिली. आणि याने प्रत्येक मणी फोडून टाकला. इतकी मौल्यवान माळ पण याला मात्र त्याचे काहीच नाही.
तिने त्याला विचारले, ” तू असे का केलेस”? तेव्हा हनुमान म्हणाला, ” मला त्या माळेत किंवा माळेतल्या कुठल्याही मण्यात राम दिसलाच नाही. मला माझा राम कुठे दिसतो का हे बघण्यासाठी मी प्रत्येक मणी फोडला. ज्याच्यात राम नाही ते माझ्या काय कामाचे? म्हणून मी ते सगळे टाकून दिले. “सीता अवाक् झाली. मग तिच्या लक्षात आले की आपण माळ दिली पण ते श्रीरामाचे स्मरण न करताच मी माळ दिली. श्रीरामच सर्व काही करत असतो. तिने हनुमानाची क्षमा मागितली. आणि दुसरी माळ श्रीरामाचे स्मरण करून त्याला दिली. श्रीरामाच्या नामजपाने सिद्ध झालेली ती माळ हनुमानाने भक्ती भावाने आपल्या गळ्यात घातली. सीतेला खूप आनंद झाला.
लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






