श्री जगदीश काबरे
इंद्रधनुष्य
☆ समर्थ रामदासांच्या मुसलमानी अष्टकांविषयी… ☆ श्री जगदीश काबरे ☆
संत तुकाराम, संत नामदेवाप्रमाणे समर्थ रामदासांच्यादेखिल हिंदी रचना पुष्कळ आहेत. त्यांच्या हिंदी रचनेत ‘मुसलमानी अष्टके’ ही रचना मनाच्या श्लोकासारखीच आहे. समर्थांच्या दृष्टिकोनातून अल्ला आणि राम यामध्ये काहीएक भेद नाही. अल्लाला समजून घेणे म्हणजे स्वत:ला समजून घेणे होय, असे समर्थ म्हणतात. मुसलमानी अष्टकांचे वैशिष्ट्य असे की, समर्थांनी आपल्या ग्रंथात परब्रह्मााचे अथवा रामचंदाचे वर्णन करण्यासाठी जी विशेषणे वापरली, ती सारी विशेषणे अल्लासाठी वापरली आहेत. मात्र श्रीराम, गणेश, शारदा, परमेश्वर असे शब्द न वापरता खुदा, इलाही, पैगंबर, पीर, अल्ला अशा शब्दांचा वापर समर्थ मनमोकळेपणे करतात. अल्ला ही संकल्पना धर्म, जात, गोत्र या सगळ्यांच्या पलीकडे आहे, असा तर्कशुद्ध विचार समर्थ मांडतात. त्याला कोणताही रंग नाही. ब्राह्माण मोठा की मुसलमान मोठा असा वाद घालण्यापेक्षा अल्लाला जाणून घेणे जास्त चांगले, असे त्यांचे मत होते.
समर्थ रामदास म्हणतात—
अल्लख वो निरंजन कैसा यह रे आलखवो।
किसेहि सारिखा नाहीं क्या कहुरे।।
नहि रंग ना रूप रेखा कछुही।
मुँह से हि कहेसा नूहि वोईलाहि।।
– – धर्माधर्मातील संघर्ष समर्थांना अजिबात मान्य नव्हते. या ठिकाणी अध्यात्मातील अत्युच्च शिखर गाठताना पुढे समर्थ म्हणतात—
नही वो मुसलमान हिंदू कछुहि ।
सयथ्बी नहीं क्या कहूँ मैं ई सेही ।।
सभी ज्यातसे वो है रे नियारा।
कहे रामदासो चला वेहि सारा।।
याचा अर्थ खरा परमेश्वर हिंदूही नसतो अथवा मुसलमानही नसतो. ईश्वराला जाती आणि धर्म यांच्या चौकटीत अडकविणे बरोबर नाही. या प्रकारे धर्माच्या बाबतीत सगळ्याच संतांचा दृष्टिकोन व्यापक होता.
स्वामी विवेकानंद एका पत्रात लिहितात-
‘आपण आता हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, जैन, बौद्ध हे शब्द वापरायचे थांबवले पाहिजे; कारण या शब्दांची उपयोगिता आता संपली आहे. केवळ धर्म हा शब्द पुरेसा आहे.’
अगदी हाच विचार समर्थ ’मुसलमानी अष्टकात’ मांडतात. स्वधर्माची व्याख्या सांगताना दासबोधात ते म्हणतात-
सकळ धर्मांमध्ये धर्म।
स्वरूपि रहाणे हा स्वधर्म।
हे चि जाणावे मुख्य वर्म।
साधु लक्षणाचे।।
*
एका गीतात साहिर म्हणतो-
मालीकने हर इन्सानको इन्सान बनाया।
हमनें उसे हिंदू या मुसलमान बनाया।
कुदरतने तो बक्षी थी हमें एकही धरती।
हमनें कहीं भारत इरान बनाया।।
भक्त हा भक्त असतो. जाती, पंथ संप्रदाय, धर्म या सर्व गोष्टी माणसाने निर्माण केल्या आहेत. मानवाच्या विकासासाठी त्या उपयोगी ठरतात तोपर्यंत त्याला महत्त्व आहे. धर्म हा द्वेषाचा अथवा संघर्षाचा विषयच असू शकत नाही. मुसलमानी अष्टकात तर धर्माच्या नावाखाली संघर्ष करणाऱ्यांना समर्थ बजावतात की मस्जिद तोडल्याने अल्ला तुटत नाही किंवा मंदिर फोडल्याने राम मरत नाही. जे मंदिर आणि मस्जिद तोडतात, ते नष्ट होऊन जातात. मुसलमानी अष्टकात समर्थांच्या तर्कबुद्धीने विचारांचे एव्हरेस्ट शिखर गाठले आहे.
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






