श्री जगदीश काबरे
इंद्रधनुष्य
☆ विचार तर कराल…? ☆ श्री जगदीश काबरे ☆
काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडलो असताना रस्त्यात गणपती मूर्तींची विक्री करणाऱ्या दुकानांची रांग लागली. भक्तगण गणपती मूर्तीं विकत घेण्याच्या लगबगीत होते. कुतूहलाने त्या दुकानांमधील गणपतीच्या मूर्ती न्याहाळू लागलो. कारागिरांनी खरंच सुबक पद्धतीने मूर्ती रंगवल्या होत्या. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. (छायाचित्र झूम करून पहावे)
यावेळेस मूर्तींचे निरीक्षण करताना एक गोष्ट ठळकपणे लक्षात आली, ती म्हणजे अनेक गणपतीच्या मूर्ती विविध प्रकारच्या कृत्रिम चमकदार रंगीत खड्यांनी सजवलेल्या होत्या. काही गणपतीच्या गळ्यात खड्यांची माळ होती, तर काही गणपतींच्या खांद्यावरून खड्यांचा शैला पांघरलेला होता आणि काही गणपतीच्या मुकुटावर खडे चमकत होते. अर्थात त्यामुळे त्या उठावदार दिसत होत्या हेही खरेच.
पण… हा पणच मला धोकादायक वाटत होता. या एकजात सगळ्या मूर्ती POP (प्लास्टर ऑफ पॅरिस) ने बनवलेल्या होत्या. अर्थात सरकारनेच प्रदूषणकारी POP वापरायला परवानगी दिल्यावर आणखीन वेगळे ते काय घडणार! म्हणजे आत्तापर्यंत आपण नद्या, नाले, विहिरी, समुद्रामध्ये या पीओपीच्या गणपतींचे विसर्जन करून मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रदूषण करत होतोच; पण आता यावर्षी मात्र या जलप्रदूषणात आणखी एक भर पडणार आहे, ती या न विरघळणाऱ्या चमकदार खड्यांची. पाण्यातील जलचर या चमकदार रंगीत खड्यांकडे आकर्षित होतील आणि त्यांना गिळतीलही. अर्थातच त्यामुळे ते मरणपंथाला लागतील हे वेगळे सांगायला नकोच.
देवभक्तीच्या उन्मादात रंगलेल्या भक्तगणांना जलचर मेले काय, जलप्रदूषण झाले काय, त्याचे फिकीर बाळगण्याचे कारण नाही. ढोलताशे जोरजोराने बडवून आणि दणदणाटी आवाजाने डीजे लावून ध्वनीप्रदूषण करणे तसेच लेझरबीमच्या साह्याने प्रकाशप्रदूषण करणे हा तर भक्तगणांना आताशा हक्कच वाटायला लागलेला आहे. या तरुणाईला अशा उन्मादी आणि उन्मत्त देवभक्तीपुढे आरोग्याची तमा वाटेनाशी झाली आहे. ’आम्ही भलेही आंधळे होऊ, बहिरे होऊ, अपंग होऊ, ध्वनीप्रदूषण, जलप्रदूषण, वायूप्रदूषण अशा सगळ्या प्रकारच्या प्रदूषणात भर घालू! पण आमचे धर्मरक्षण करू’, असे त्यांना वाटू लागलेले आहे.
मला या भक्तगणांना काही प्रश्न विचारावेसे वाटतात की, तुमच्या कुठल्या धर्मग्रंथात अशा प्रकारे आरोग्याची हेळसांड करून आणि लोकांना त्रास देत धर्मरक्षण करण्याचे लिहिलेले आहे? धर्मरक्षण म्हणजे उद्दामपणे वागणे आणि उन्मत्तपणा करणे असते काय? सगळ्या प्रकारचे प्रदूषण करून लोकांच्या आरोग्याशी खेळणे म्हणजेच धर्मरक्षण करणे असते काय? गणपतीच्या आगमन-विसर्जनाच्या मिरवणुकीत दारू पिऊन आयटम गाण्यांवर आचकट-विचकट नाचणे म्हणजे धर्मरक्षण असते काय?
पर्यावरणपुरक सण साजरा करण्यास कोणाची आडकाठी असण्याचे कारणच नाही. कोणताही सण हा लोकांनी एकत्रित येऊन आनंदाने आणि शांततेने साजरा करण्यासाठी असतो… धांगडधिंगा करण्यासाठी नाही. तेव्हा समस्त भक्तगणांना पुन्हा एकदा विनंती करतो की, गणपती विकत आणून बसवायचाच असेल तर तो पाण्यात सहज विरघळणाऱ्या शाडूच्या मातीच्या मूर्तीचा असावा. त्याचे विसर्जन करताना घरातील बादलीतील पाण्यात विसर्जन करावे, आणि ते पाणी घरातील कुंड्यात लावलेल्या झाडांना जगवण्यासाठी वापरावे. निर्मल्य ’निर्मूलन कलशा’त टाकून परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करावी. म्हणजे पर्यावरणपूरक सण साजरा केल्याचे समाधान सगळ्यांनाच मिळेल. भक्तगणांच्या लाडक्या पंतप्रधान मोदींनी ’स्वच्छ भारत’ घोषणा केली आहे, तिला अशाप्रकारे हातभार लावून खऱ्या अर्थाने आपण उच्चसंस्कृत आहोत, हे सिद्ध करण्याची संधी सोडू नये.
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







