सुश्री शोभा जोशी
इंद्रधनुष्य
☆ “कृष्ण…” – लेखक : अज्ञात ☆प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆
नावातील एकही अक्षर सरळ नसणारा हा देव. प्रत्येक शब्द हा जोडाक्षर. जितके नाव कठीण तितका समजायला कठीण.
…. पण एकदा समजला की जीवनाचा अर्थ समजलाच म्हणून समजा. जीवन म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर कृष्ण समजून घ्यावा.
दशावतारी भगवंताचा आठवा अवतार म्हणजे कृष्ण…. सातवा अवतार प्रभू राम
राम ही अक्षरे सुद्धा सरळ अन त्याचे वागणे ही सरळ मर्यादेत म्हणून मर्यादा पुरुषोत्तम.
रामाने आपल्या जीवनात कधीच कोणतीच मर्यादा ओलांडली नाही. तरीही काही जणांनी रामात दोष शोधले त्याच्यावर टीका केली. मग पुढच्या अवतारात प्रभूने सर्व मर्यादा ओलांडल्या करा काय करायचे ते.
जीवनात आचरण रामासारखे असावे अन समजून कृष्ण घ्यावा. कृष्ण आचरणात आणायच्या भानगडीत पडू नये.
कृष्ण म्हणजे श्रीमद भगवद्गीता जीवनाचे सार
प्रभू रामाने जसा भर दुपारी मध्यानी अवतार घेतला तसा कृष्णाने पार मध्यरात्री अवतार घेतला.
जन्म झाल्याबरोबर त्याला ते ठिकाण सोडून गोकुळात जावे लागले.
गोकुळात कृष्ण फक्त वयाच्या आठव्या वर्षापर्यंत राहिला. म्हणजे राधा राणी फक्त तोवर कृष्णा सोबत होती, कृष्ण ८ वर्षाचा होईपर्यंत… जे राधा आणि कृष्ण विषयी चुकीची चर्चा करतात त्यांनी या गोष्टीचा जरूर विचार करावा ८ वर्षाच्या बालकाचे कसल्या पद्धतीचे प्रेम संबंध असतील राधिकेशी.
इतका कमी सहवास लाभून सुद्धा राधेचे नाव कृष्णाशी कायमचे जोडले गेले. किंबहुना तिचे प्रेम इतके नितळ निस्सीम निर्मळ होते की नाव कायमचे कृष्णाच्या आधी लागले.
कृष्ण-राधे कोई ना केहता, केहते राधे-शाम,
जनम जनम के फेर मिटाता एक राधा का नाम.
…… असे हे राधा आणि कृष्णाचे प्रेम किंबहुना प्रेमाचे दुसरे नाव म्हणजेच राधा व कृष्ण.
कृष्णाला १६१०८ बायका त्यांचाही इतिहास….
ज्यांना त्याने मुक्त केले त्या म्हणू लागल्या आता आम्ही आमच्या घरी जाऊ शकणार नाही तेव्हा त्याचा स्वीकार केला. अन नुसता स्वीकारच नाही केला त्या प्रत्येकी सोबत त्याच्या सुख दुःखात सहभागी होता.
आज काही महाभाग म्हणतात कृष्णाने इतक्या बायका केल्या तर आम्हाला काय हरकत आहे. अरे त्याने आग लागलेली ५० गावे गिळून टाकली होती… तू एखादा जळता कोळसा गिळून दाखव की आधी, मग कृष्णाची बरोबरी कर.
आधीच म्हटल्याप्रमाणे कृष्ण आचरणात नाही समजण्यात खरी मजा.
त्या साठी गीता समजून घेणे महत्वाचे. गीते मध्ये काय नाही? तर गीतेत सर्व आहे.
जीवनातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर यात मिळेल. सर्वात महत्वाचे म्हणजे हे जीवन शास्त्र कृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितले.
यावरून अर्जुनाची सुद्धा योग्यता किती मोठी आहे हे समजते. अर्जुन या भूतलावर असा एकमेव मानव झाला जो या नाशवंत देहासह स्वर्गात ५ वर्षे राहिला व शस्त्र चालवण्याचे शिक्षण घेतले.
या देहासह स्वर्गात जाता येत नाही पण अर्जुन एकमेव जो ५ वर्षे तिथे राहिला. म्हणजे अर्जुनाची योग्यता काय आहे ते समजते.
त्या अर्जुनाच्या डोळ्यांवर आलेल मोह माया याचे पटल दूर करण्यासाठी कृष्णाने गीता सांगितली.
गीता समजण्या साठी अर्जुन किती तयार आहे हे आधी कृष्णाने आधीचे ९ अध्याय सांगून पाहिले.
त्याची तयारी करून घेतली. मग पुढे खरा गूढार्थ सांगितला. विश्वरूप दाखवतांना सुद्धा त्याला आधी दिव्य दृष्टी दिली. त्याची तयारी करून घेतली. मग त्याला दाखवले की सर्व काही करणारा मीच आहे. तू फक्त निमित्तमात्र आहेस.
….. असा हा कृष्ण. त्याच्या विषयी किती सांगावे अन किती नको. तो जितका अनुभवू तितका तो जास्त भावतो जास्त आवडतो.
त्याला जितके समजून घेऊ तितके कमीच.
त्याचे तत्वज्ञान म्हणजे संपूर्ण जीवनाचे सार. ते समजून घेतले की जीवन समजले. जीवन सफल झाले. मनुष्य जीवनमुक्त झाला.
अशा या कृष्णाला वंदन.
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी,
हे नाथ नारायण वासुदेव,
प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ,
मुकुंद विष्णू भगवन नमस्ते!!
जय श्री राधे कृष्णा.
श्री कृष्णाला समजून घेण्यासाठी आपणाला श्री कृष्ण परमात्मा बुद्धी प्रदान करो हीच प्रार्थना.
कुरुक्षेत्रात युध्दभूमीवर जेव्हा कर्ण व अर्जुन समोरा-समोर आले तेव्हा कर्णाने वासुकी नामक अस्त्र धनुष्याला लावून अर्जुनाच्या दिशेने सोडले. प्रत्येकाला वाटले आता हे अस्त्र अर्जुनाचा शेवट करणार. तितक्यात, श्रीकृष्णाने आपल्या पायाचा भार रथावर दिला. रथ थोडा खाली खचला. व ते अस्त्र अर्जुनाच्या गळ्याचा वेध न घेता मुकुट उडवून गेले.
नंतर सूर्य अस्ताला गेल्यानंतर जेव्हा युध्द विराम होत असे. तेव्हा पहिल्यांदा श्रीकृष्ण रथाच्या खाली उतरत असे व नंतर अर्जुनाला खाली उतरण्यास हात देत असे.
जेव्हा पूर्ण युध्द संपले व पांडवांचा विजय झाला. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला,
“आधी तू रथाच्या खाली उतर. ” त्यानुसार अर्जुन रथाच्या खाली उतरला.
त्यानंतर श्रीकृष्णाने घोड्यांचे लगाम घोड्यांच्या अंगावर टाकले घोडे बाजूला काढले व नंतर च स्वतः रथाच्या खाली उतरला.
दोघेही थोडे पावले चालून गेली तोच, रथाने धड धड करत प्रचंड पेट घेतला.
जमलेले सर्व जण आश्चर्याने ते दृश्य पाहत होते.
तेव्हा अर्जुन म्हणाला, आपण रथातून उतरल्या उतल्या रथ आपोआप कसा काय पेटला “अरे श्रीकृष्णा हा काय प्रकार आहे? “
तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की,
“युध्दात जितके शस्त्र-अस्त्र तुझ्या दिशेने सोडण्यात आले होते, ते माझ्या मुळे तुला स्पर्श ही करू शकले नाहीत.
ते सर्व अस्त्र अदृश्य रूपाने रथाच्या भवती फिरत राहिले व आता जेव्हा मी तुझ्या रथाची धुरा सोडून दिली.. तेव्हा, ह्या अस्त्रांचा परिणाम आता तु पाहत आहेस. “
त्याच प्रमाणे मानवी देह आहे.
जोपर्यन्त परमेश्वरानेआपले जीवनरुपी लगाम पकडले आहेत तो पर्यंत आपल्या देहात प्राण आनंद सुख ऐश्वर्य नांदत आहे. पण जेव्हा तो आपणास सोडतो.. तेव्हा आपलीही अवस्था त्या रथासारखीच होते.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुश्री शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






