श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘नर-नारायण…’ ☆ श्री दिवाकर बुरसे

कुष्ठरोग्यांची सेवा आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आयुष्यभर परिश्रम घेणारे व्रतस्थ समाजसेवी स्वर्गीय बाबा आमटे (जन्मः २६ डिसे. १९१४, मृत्यूः ९ फेब्रु २००८) सर्वांना माहित आहेत. त्यांचे कार्य महान आहेच पण त्यांच्या आधी पुण्याच्या अवतार मेहेरबाबा (जन्म: २५ फ्रेबु १८९४, मृत्यूः ३१ जाने १९६९) या पारसी सत्पुरुषाने कुष्ठरोगी, महारोगी, मनोरुग्ण, वेड्या लोकांची सेवा करून समाजापुढे एक आदर्श घालून दिला होता.

मेहेरबाबाबा आपल्या शिष्यांसह ज्या गावी जात तिथे, समाजाने उकिरड्यावर टाकून दिलेल्या महारोग्यांना आणि रस्त्यावर सोडून दिलेल्या वेडयांना उचलून घरी आणत. स्वतः कुष्ठरोग्यांचे व्रण काळजीपूर्वक धुवून स्वच्छ करत. त्यावर मलमपट्टी करत. मनोरुग्णांच्या हातापायाची वाढलेली नखे, अस्ताव्यस्त वाढलेले, उवा पडलेले डोईचे आणि दाढीचे केस कापत. त्यांना स्नान घालून, उत्तम नवी वस्त्रे नेसवून, मिष्टान्नाचे भोजन स्वहस्ते भरवीत. वर दक्षिणा देऊन त्यांची यथासांग पूजा करीत. त्यांच्या चरणावर मस्तक टेकवून, नमस्कार करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेत. बाबा म्हणत, ‘ हा खरा नारायण आहे ‘. मनोरुग्णांना, वेड्यांना ते ‘मस्त’ म्हणत.

जगविख्यात आणि भारतातील अग्रगण्य ऑटोमोबाईल कंपनी ‘टाटा मोटर्स’चे चेअरमन, पद्मभूषण स्वर्गीय सुमंत मुळगांवकर (जन्म: ५ मार्च १९०६, मृत्यू : १ जुलै १९८९) यांना ऑटोमोबाईल क्षेत्रातले महर्षी म्हणता येईल. सारं जग त्यांना उद्योजक व ऑटोमोबाईल मॅन म्हणून ओळखत असलं तरी त्यांनी आणि त्यांच्या पत्नी पद्मश्री स्वर्गीय लीलाताई मुळगावकर (जन्म: १० ऑक्टो १९१६, मृत्यू: २० मे १९९२) यांनी रक्त संकलन, रक्त पेढ्या, दिव्यांग व्यक्तींचे, अंधांचे, महारोग्यांच्या सेवेचे, त्यांच्या पुनर्वसनाचे महान कार्य जन्मभर केले हे फार कमी लोकांना माहित असावे.

दृष्टीहीन, लेप्रसी ग्रस्त, पोलिओ झालेले, युद्धात अवयव गमावलेले सैनिक असे काही दिव्यांग कर्मचारी आमच्या टाटा मोटर्स, पुणे कंपनीच्या सेवेत होते. लेप्रसीमुळे बोटे झडलेले पण आता रोगमुक्त झालेले कर्मचारी चेअरमन आणि त्यांच्या बरोबर आलेल्या पाहुण्यांना आवर्जून चहा-पाणी देत. अशा कामी त्यांची नियुक्ती जाणीवपूर्वक केली जाई. त्यांतून समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न असे की लेप्रसी बरी होऊ शकते. तो संसर्गजन्य रोग नाही. रोगमुक्त व्यक्तीची घृणा न करता त्यांच्याशी सर्वसामान्य व्यवहार निर्धोकपणे करता येतात, नव्हे करावेत.

कंपनीतील सोफे व खुर्च्यांचे केनिंग करणे अशी कामे अंधांकडून करवून घेतली जात. इंजि. ड्राईंग्जच्या घड्या घालणे, बुक व रेकॉर्डस् बाईंडिंग, इलेक्ट्रॉनिक कांपोनन्टस् जोडून छोट्या असेम्ब्लीज करणे, क्वालिटी कंटोल, कार्यालयांतर्गत पत्रांचे संकलन व वितरण इ. कामे रोगमुक्त झालेल्या कुष्ठरोग्यांकडून करवून घेतली जात. हे लोक सामान्य कर्मचाऱ्याच्या बरोबरीने, गुणवत्तेने करीत असत.

सामाजिक दायित्व म्हणून कंपनी काही विशिष्ठ कामाचे ठेके ब्लाईंड मेन असोशिएशन, लेप्रसी पेशंट असोशिएशन, सैनिकांचे पुनर्वसन करणाऱ्या संस्था अशा संस्थाना आवर्जून देत असे. त्यामळे ही अंध मंडळी, लेप्रसीतून बरे झालेले रुग्ण, अपंगत्व आलेले सैनिक कंपनीत इतर सामान्य कर्मचाऱ्यासारखेच वावरत, काम करत, उठत, बसत, जेवत, कंपनीच्या बसमधून ये-जा करीत. समाज विकास हा टाटांच्या औद्योगिक धोरणाचा महत्वाचा अविभाज्य भाग आहे.

मी भाग्यवान की अशा उदात्त जीवनमूल्ये व व्यावसायिक मूल्ये असणाऱ्या औद्योगित परिवारात मी जन्मलो, शिकलो, वावरलो, वाढलो, मोठा झालो!

‘ जे जे भेटेल भूत ते ते मानी भगवंत ‘ ही शिकवण आम्हाला आमच्या महान भारतीय संस्कृतीनं आणि आमच्या संतांनी दिली आहे. त्यानुसार नरातही नारायण पाहणाऱ्या स्वर्गीय सर्वश्री अवतार मेहेरबाबा, बाबा आमटे, सुमंत मुळगांवकर, लीलाताई मुळगांवकर यांच्या सेवाकार्याचे स्मरण करुन या महानुभावांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.
0

खूप छान नवीन माहिती मिळाली.