श्री संदीप काळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “देवदूताच्या नावानं चांगभलं..!” – भाग – 2 ☆ श्री संदीप काळे ☆

( तपस्याचे वडील अनेकांचे दरवाजे ठोठावत फिरले, पण कुठेच काही उपयोग झाला नाही. शेवटी एका मित्राच्या मदतीने त्यांनी डॉ. शेटे यांच्याशी संपर्क साधला आणि तिथेच आशेचा किरण दिसला.)

इथून पुढे —

डॉ. शेटे यांच्या प्रयत्नाने तपस्याचं दिल्लीतील नामांकित दवाखान्यात यशस्वी यकृत प्रत्यारोपण झालं. सरकारी योजनेतून ऑपरेशनचा खर्च भागला आणि ‘तपश्या आता माझ्या कुटुंबाचा घटक आहे, या भावनेतून शेटे यांनी त्यांना आर्थिक व मानसिक आधारही दिला.

तपस्याचे वडील मला हकीगत सांगत होते आणि बाजूला उभी असलेली तिची आई वारंवार डोळे पुसत होती. त्यांच्या शब्दांतून जणू त्यांनी सोसलेली सारी वेदना उलगडत होती.

बोलणं संपल्यावर मी शांतपणे तपस्याकडे पाहिलं. लहानशी ती परी, हातात गुलाबाचं फूल आणि डोळे मात्र रस्त्याकडे खिळलेले. जणू ‘माझ्या जीवदानदात्याची मी वाट पाहते आहे’ असं ते निरागस डोळे बोलत होते.

तपस्यासारखीच कहाणी तिथे बसलेल्या प्रत्येकाची होती. कुणी कॅन्सरग्रस्त, कुणी हृदयरुग्ण, कुणी अपघातातून जीव वाचवण्यासाठी झगडणारे, पण सगळ्यांच्या कहाणीत एक समान धागा होता—डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिलेला दिलासा.

एवढंच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यात—गल्लीबोळात, खेड्यापाड्यात, अडलेल्या-नडलेल्या प्रत्येकाला मदत पोहोचवण्यासाठी आज ५,०००हून अधिक लोकांची टीम युद्धपातळीवर काम करते.

मी मनात विचार करत होतो, डॉ. शेटे येण्यापूर्वी आरोग्य क्षेत्रात काम होत नव्हतं का? होत होतं, पण त्याचा ‘रेशो’ फारसा प्रभावी नव्हता. आज मात्र तो रेशो जबरदस्त उंचीवर पोहोचला आहे.

शेटे नावाच्या एका माणसाने आपल्या घरादाराची फार चिंता न करता, हा विडा उचलला आहे आणि त्यानंतर जणू संपूर्ण राज्यातील हजारो आजारी, संकटग्रस्त माणसांसाठी नवी पहाट उगवली आहे. डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्यासोबत त्यांचे भाऊ डॉ. शिवरत्न शेटे हेही तितकेच समाजमन जपणारे व्यक्तिमत्त्व आहे.

शिव हे व्याख्याते असून, त्यांच्या विचारप्रवर्तक भाषणांनी, गडकिल्ल्यांच्या, आयुर्वेदाच्या प्रेमाने असंख्य तरुणांना प्रेरणा दिली आहे. डॉ. शेटे यांच्या पत्नी शिल्पा या मोठ्या उद्योजक आहेत. शिल्पा यांच्यामुळे संसाराचा आर्थिक गाडा ओढण्याची चिंता डॉ. शेटे यांना नव्हती. बीड जिल्ह्यातील दिंद्रुड हे त्यांचं मूळ गाव. त्या गावासाठी आणि परिसरासाठी डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केलेलं कार्य एखाद्या कॅबिनेट मंत्र्यानं करावं इतकं प्रभावी आहे.

लोकांच्या दैनंदिन अडचणी असोत, शिक्षणाचे प्रश्न असोत किंवा सामाजिक उपक्रम, शेटे यांनी आपल्या कर्तृत्वाने गावकऱ्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. त्यामुळे दिंद्रुडच्या लोकांसाठी ‘शेटे’ हे नाव म्हणजे आधार आणि आत्मविश्वासाचं प्रतीक बनलं आहे.

हे सारे काही तिथे असलेले लोक बोलत होते. गुगलवर सापडणाऱ्या माहितीवरून, जनतेच्या अनुभवांवरून डॉ शेटे यांच्या कामाची पोचपावती मिळत होती.

आम्ही गप्पांमध्ये रमलो असतानाच डॉ. ओमप्रकाश शेटे आले. बाहेर जमलेले लोक जिथे बसले होते, तिथेच तेही बसले. कोणाची काय अडचण आहे, कुणाकडे काय काम आहे, ते सर्व शांतपणे विचारू लागले. लगेच कुणाला फोन, कुणाला पत्र… माझ्यासमोर आलेल्या प्रत्येकाचं काम क्षणार्धात मार्गी लागत होतं.

जे चेहरे आत येताना खिन्न, दु:खी, काळजीने भरलेले होते, तेच चेहरे बाहेर पडताना आनंदाने उजळलेले दिसत होते.

दोन तासांनी शेटेजींनी माझा चेहरा पाहिला आणि आम्ही संवाद साधला. त्यांच्या गप्पांमध्ये जो नम्रपणा होता, तो विलक्षण होता. राज्यातील आरोग्यविषयक प्रत्येक गोष्टीची त्यांना असलेली सखोल माहिती तर मला आचंबित करणारी होती.

त्यांच्या पहिल्या वाक्यानेच त्यांच्या स्वभावाची जाणीव झाली,  ‘मला येण्यासाठी उशीर झाला, माफ करा.’

मी विचारलं, “बाहेर कुठला आरोग्य कॅम्प होता का?”

ते हसत म्हणाले, “नाही, सार्थक कोल्हे, शिरूर कासारचा माझा पेशंट होता. २०१७ मध्ये तो मरणाच्या दारातून वाचला. त्याचं लिव्हर ट्रान्सप्लांट झालं होतं. आज त्याने एक मोठा उद्योग उभारला आहे. त्याच्या आग्रहास्तव मी पहाटे त्याचं उद्घाटन करून आलो आणि मग इकडे आलो.”

ते पुढे सांगू लागले, “आज राज्यात १७० ठिकाणी आरोग्य कॅम्प सुरू आहेत. सर्व जिल्ह्यांत आयुष्मान कार्ड काढण्याची मोहीम जोमाने सुरू आहे”. एक नाही, तर दरदिवशी अशी अनेक कामं होती, ज्याविषयी डॉ. शेटे मला सांगत होते.

राज्यातील धर्मदाय संस्थांशी संबंधित प्रत्येक दवाखान्यावर त्यांची पकड कमालीची होती. केंद्र आणि राज्याच्या योजनांमुळे आज दोन कोटी लोकांना मदत मिळाली आहे आणि आता हे काम साडेबारा कोटी लोकांपर्यंत नेण्याचं त्यांचं स्वप्न आहे.

डॉ. शेटे यांना भेटायला आलेले काही लोक भावनिक होऊन अश्रू ढाळत होते. त्याक्षणी शेटे यांनाही स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही.

त्या क्षणी माझ्या मनात एकच विचार आला,

डॉ. शेटे यांनी जे साध्य केलं, ते जर एखाद्या आरोग्यमंत्र्याने साधलं असतं, तर महाराष्ट्र कधीच अनारोग्याच्या संकटातून बाहेर पडला असता.

असं वाटत होतं, ओमप्रकाश शेटे यांच्यासोबत तासन्‌तास बसावं, त्यांच्या ओठांतून नवनव्या कहाण्या ऐकत राहावं. वेळ मात्र मर्यादित होता. शेवटी मी डॉ. शेटे यांचे दोन्ही हात घट्ट पकडले, डोक्याला लावले आणि अगदी भावुक होऊन त्यांचा निरोप घेतला.

बाहेर पडलो तेव्हा मनात एकच विचार घोळत होता, देव जर खरोखर माणसात प्रकट होत असेल, तर तो निश्चितच ओमप्रकाश शेटे यांच्या रूपानं अवतरला आहे.

देवाच्या नावाने कित्येकांचं चांगलं होतं, हे मी आधी ऐकलं होतं, पण प्रत्यक्ष पाहिलं ते इथे. कित्येक उदाहरणं माझ्या डोळ्यांसमोर होती, आणि जेव्हा ती आकडेवारीत मांडली गेली, तेव्हा ती २४ लाखांपेक्षा अधिक लोकांची झाली होती.

हेच काम आरोग्य विभागाने इतक्या वर्षांत ठरवलं असतं, तर महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था किती वेगळी दिसली असती! दवाखान्यांतील मक्तेदारी, राजकीय वरदहस्ताने चालणारा काळाबाजार, पेशंटची होणारी लूट, डॉक्टरांना होणार त्रास हे सर्व एका अर्थाने मोडून काढण्याचं धाडस डॉ. शेटे यांनी दाखवलं.

त्यांच्या मागे प्रचंड इच्छाशक्ती आहे. जर त्यामागे राजकीय इच्छाशक्तीही उभी राहिली असती, तर आज डॉ. ओमप्रकाश शेटे नक्कीच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री झाले असते. पण दुर्दैव असं की, ज्याला चांगलं जमतं त्याला तेच काम देऊ नये ही मानसिकता आपल्या राजकीय संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे. डॉ. शेटे जरी मंत्री नसले, तरी चार मंत्र्यांचं काम एकट्यानं करून दाखवणारा हा माणूस आजही झगडत आहे, आणि त्यातच त्यांचं खरं मोठेपण दडलेलं आहे.

– समाप्त –

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

व्हाइस ऑफ मिडिया, मुंबई 

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted