श्री मयुरेश उमाकांत डंके
इंद्रधनुष्य
☆ “बारा अमावस्यांचा हा गराडा सुटेल का कधी?” – भाग – 2 ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
अनेक मानसशास्त्राचे अभ्यासक असं सांगतात की, अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या आयुष्यातल्या महत्वाच्या गरजा असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठीच माणसं वेगवेगळ्या प्रकारची कामं करुन जगण्याचा प्रयत्न करतात. हे खरं आहे. पण भारतासारख्या अत्यंत प्राचीन अस्तित्व असणाऱ्या देशात ही थिअरी सगळ्यांनाच सरसकट लागू पडत नाही. प्राथमिक भौतिक गरजांपेक्षाही वेगळं काही उदात्त ध्येय असणाऱ्या आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी सर्वस्वाची होळी करणाऱ्यांची मांदियाळी आपल्या देशात फार मोठी आहे.
‘देव, देश आणि धर्म’ यांना आयुष्यात सगळ्यात पहिलं प्राधान्य देणाऱ्यांची नावं आपला इतिहास विसरलेला नाही. पण दुर्दैव हे आहे की, आपण त्या इतिहासालाच विसरलो. आणि हे कमी की काय म्हणून, आपलं महादुर्भाग्य इतकं थोर आहे की, आपल्याच देशातले अनेकजण त्या इतिहासाचं व्यक्तिगत स्वार्थासाठी भांडवल करतात.
केवळ स्वतःचं राज्य नव्हे तर, “हिंदवी स्वराज्य” उभं करण्याचं स्वप्न पाहिलेल्या आणि अनेक आव्हानांवर मात करुन मराठी साम्राज्याचं अभिषिक्त सिंहासन स्थापन करणाऱ्या शिवरायांना इतिहास कसा विसरेल? “मातृभूमी आणि तिची संस्कृती” मस्तकी धरुनच शिवरायांनी आयुष्यभर स्वराज्यसाधना केली. साधुसंत, लेकीबाळी, आयाबहिणी, गाईवासरं यांना सुखाचे दिवस आले. आपलं शील पवित्र राहिल का, याच्या चिंतेत अहोरात्र जगणारी स्त्री आणि वरुन दुष्काळ अन् खालून सुलतानी लूट अशा दुहेरी वरवंट्याखाली रोज भरडून निघणारा पुरुष, यांनी सुखाची आशाच सोडलेली..! कुठल्याही संवेदनशील माणसाची गात्रं सुन्न करणारं हे वास्तव महाराष्ट्र तीनशे वर्षं भोगत होता.
मराठी माणसाच्या कमरेला तेव्हाही तलवार होतीच. मनगटात ताकद होतीच. धमन्यांमध्ये शौर्य होतंच. बुद्धीचं बळ होतंच. पण, एकाच गोष्टीची कमतरता होती. आपल्याच आयाबहिणींच्या अब्रूला हात घालणाऱ्याचा हात तोडण्यासाठी ती तलवार म्यानातून बाहेर येत नव्हती. प्रजेवर चाललेला इस्लामी राजवटीचा जुलूम मोडून काढण्यासाठी मनगट फुरफुरत नव्हतं. देवळातले देव भ्रष्ट होत होते, तरीही शौर्य पांघरूण घेऊन झोपून होतं.
हे सगळं मोडीत काढून, नवं निष्कंटक राज्य निर्माण करण्याची प्रेरणा शिवाजीराजांच्या रूपानं महाराष्ट्राच्या भाग्यात अवतरली. वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी राजांनी स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली. त्यावेळी त्या कोवळ्या वयात राजांनी त्यांच्या सवंगड्यांना जे सांगितलं, ते कवयित्री शांताबाई शेळक्यांनी किती अचूक शब्दबद्ध केलंय पहा –
स्वयें शस्त्र देशार्थ हाती धरावें,
पिटावे रिपुला रणीं वा मरावें,
तुझ्या रक्षणां तूच रें सिद्ध होई,
तदा संकटी देव धावून येई ||
मराठी मनगटातली कर्तृत्व प्रेरणा आणि शौर्य राजे वयाच्या सोळाव्या वर्षी जागी करु पाहत होते. “हे हिंदवी स्वराज्य व्हावें ही तो श्रींचीच इच्छा” अशी सामान्य जनमानसाची धारणा तयार करत होते. त्यांच्यातला वन्ही चेतवत होते. अन्यायाला, गुन्ह्याला तात्काळ शिक्षा करत होते. रांझ्याच्या पाटलाचा म्हणजे बाबाजी बिन भिकाजी गुजर याचा चौरंग करण्याची शिक्षा देताना शिवरायांचं वय किती? केवळ सोळा वर्षं..!
स्वराज्य स्थापनेची शपथ घेणं, रांझ्याच्या पाटलाचा चौरंग करणं आणि तोरणा जिंकणं या घटना राजांच्या वयाच्या सोळाव्या वर्षातल्याच आहेत. टाकोटाक त्यांनी तोरण्याच्या बाजूचा मुरुंबदेवाचा डोंगरही ताब्यात घेतला. कुवारीगड घेतला. दौलतराव मोऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या विधवा पत्नीच्या विनंतीवरून राजांनी नवा चंद्रराव गादीवर बसवण्यासाठी जावळी ताब्यात घेतले तेव्हा त्यांचं वय होतं सोळा पूर्ण..! म्यानातून तलवार बाहेरही न काढता कोंढाणा घेतला अन् लगेच तलवार उपसून सुभानमंगळ सुध्दा घेतला.
शहाजीराजे आपल्याच पदरी असतानाही त्यांचा मुलगा आपलीच दौलत स्वतःच्या ताब्यात घेऊन बंड करतो आहे, हे कळून इकडं विजापुरात बादशाह अस्वस्थ होताच. १६४७… याच वेळी शहाजीराजांचा मुक्काम कर्नाटकात जिंजीच्या पायथ्याशी होता. त्यांचेपाशी पंधरा हजाराची फौज होती. पण शहाजीराजांची तक्रार बादशाहकडं आली. ती ज्यानं केली, त्याचं नाव अफझलखान..! अन् १६४८ मध्ये मध्यरात्री बाजी- खंडोजी – अंबाजी – भानाजी घोरपडे, यशवंतराव वाडवे, मंबाजी भोसले, तुळोजी भोसले, याकुतखान, मसूदखान इत्यादींनी राजांच्या छावणीवर अकस्मात हल्ला चढवला. अन् बाजी घोरपड्यांनी बेशुद्धावस्थेत असलेल्या राजांना कैद केलं. सगळा सरंजाम जप्त केला. हातापायात लोखंडी बेड्या ठोकल्या. मुस्तफाखान, बाजी घोरपडे आणि अफझलखान..! १६४९.. लोखंडी बेड्या ठोकलेल्या शहाजीराजांना एका हत्तीवर बसवून अफझलखान विजापुरात पावता झाला..! शिवाजी राजांचं वय केवळ अठरा..!
एकाच वेळी सुभानमंगळावर लढाई, पुरंदरावर फत्तेखानाला तडाखा, आणि दिल्लीच्या मोगल सुलतानाला शाहजहानशी संधान बांधून विजापूरला शह देण्याचा डाव हे सगळं वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी राजांनी प्रत्यक्षात आणून दाखवलं आहे..!
वयाच्या अठराव्या वर्षी कोंढवे, शिवापूर, आंबिल ओढा अशी धरणं बांधणारे, पाट बंधारे बांधणारे शिवाजीराजे आम्हाला शाळेत पाठ्यपुस्तकांमध्ये कधी दिसलेच नाहीत..! आम्हाला शिकवले गेलेच नाहीत..!
१६५६ च्या सुमारास म्हणजे वयाच्या पंचविशीत राजांनी जावळी स्वराज्यात आणली. रायरी ताब्यात घेतला. अन् पारघाटाच्या तोंडावरच्या भोरप्या डोंगरावर गड बांधायला घेतला..! राजांच्या आज्ञेनं मोरोपंत पिंगळे गडाचं बांधकाम आकाराला आणत होते. तोच हा प्रतापगड..! सबंध मावळात असा बिकट अन् अडचणीचा गड दुसरा नव्हता..!
आपल्या वडिलांना झोपेत असताना कैद करून, लोखंडी बेड्या ठोकून, हत्तीवरून विजापुरास आणणारा अफझलखान.. कनकगिरीच्या वेढ्यात शिवाजीराजांचे थोरले बंधू संभाजीराजांना कपटानं मारणारा अफझलखान..! आणि राजांना गिरफ्तार करुन दरबारात पेश करण्याचा विडा उचलणारा अफझलखान…! श्रीरंग पट्टणच्या राजाचा पराभव करणारा अफझलखान..! कर्णपुरम, मदुराई, कांची, बेदनूर, बसवापट्टण, बेलूर, तुमकुर या हिंदूंना नामशेष करण्यासाठीच्या लढाया जिंकणारा अफझलखान..! खान महंमदाचे तुकडे उडवणारा अफझलखान..! अत्यंत विश्वासघातकी आणि हिंदूद्वेष्टा असलेला अफझलखान..! शिरेपट्टणच्या कस्तुरीरंग राजाला छावणीत भेटीला बोलावून दगाफटका करुन मारुन टाकणारा अफजलखान..! जावळीत येण्यापूर्वी तुळजापुरात अष्टभुजा भवानीमातेच्या विग्रहावर घाव घालणारा अफजलखान..! देवीसमोर गाय मारणारा अफझलखान..! पंढरपूरच्या देवळाला भ्रष्ट करणारा अफझलखान..! राजांचे मेव्हणे बजाजी नाईक निंबाळकरांना गळ्यात साखळदंड बांधून कैद करणारा अन् हत्तीच्या पायी देण्याचा डाव टाकणारा अफजलखान..!
शिवचरित्रातल्या प्रतापगड पर्वाची पूर्वपीठिका आहे ती अशी..!
पण अफजलखानाचा हा परिचय करुन देण्याचं काम प्रतापगडावरचा एकही गाईड करत नाही. अभ्यास नाही, वाचन नाही, माहिती नाही आणि इच्छाशक्ती तर त्याहून नाही..!
वास्तविक, प्रतापगड पर्व हे शिवचरित्रातील अत्यंत महत्वाचं पर्व आहे. ह्या पर्वातला राजांचा पराक्रम, त्यांची मुत्सद्देगिरी यांचं सत्यकथन करण्याचं काम कुणाचं?
प्रतापगडावर आईभवानीच्या मंदिराशेजारी आमच्या चंद्रकांत उतेकरांनी उभारलेलं एक हस्तकला केंद्र आहे. त्यांनी त्या केंद्राच्या बाहेर शिवप्रताप दिनाच्या संग्रामाचा भलामोठा सुंदर नकाशा उभारला आहे. शिवरायांच्या कुशाग्र युद्धनीतीचं, सूक्ष्म नियोजनाचं आणि अभ्यासू स्वभावाचं दर्शनच तिथं घडतं. पण प्रतापगडावर जाणाऱ्या शंभरापैकी फार तर पाच-सात जणच तिथं तो नकाशा पाहत असतील..! गडाच्या पायथ्याशी त्यांनी अपार कष्ट घेऊन उभं केलेलं शिवकालीन गाव आहे. तेही आवर्जून पहायला हवं. पण मराठ्यांच्या इतिहासातल्या पहिल्या सुवर्णपानाचा मान असलेल्या गडाचा पिकनिक स्पॉट करुन टाकल्यावर काय अपेक्षा करावी?
प्रतापगड आणि तिथं येणाऱ्या माणसांची पोशाख आणि आचार विचार संहिता यांचा षडाष्टक योग दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट का होत चालला आहे? हा एक मराठी माणूस म्हणून मला पडलेला प्रश्न आहे.
प्रतापगड हे मराठी इतिहासातलं शौर्यतीर्थ आहे. तिथं मराठी मनगटांचा वीररसाचा आविष्कार घडलेला आहे. पण आता ह्या गडाला शृंगार रस, हास्य रस आणि बीभत्स रस यांत न्हाऊ माखू घालण्याचा जो आचरट आणि निर्लज्ज उद्योग पर्यटकांकडून चालवला जातो आहे, त्याला तातडीनं पायबंद घालणं आता अपरिहार्य झालं आहे..!
|| मर्यादेयं विराजते ||
— क्रमशः भाग दुसरा
©️ श्री मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.
8905199711, 87697 33771
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



