सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ३ ☆ सौ. मंजिरी येडूरकर

आजच्या तिसऱ्या भागात भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सर्वस्वाची आहुती देणाऱ्या दुर्गा ज्यांना इतिहासाने महत्वाचे स्थान दिले नाही. त्यांनी बलिदानाने मिळवलेले स्वातंत्र्य ‘यावश्र्चंद्र दिवाकरौ’ अबाधित  ठेवण्याची जबाबदारी आता पुढच्या पिढ्यांनी घेणे हीच त्यांना श्रद्धांजली!!

६) कनकलता बरुआ

यांचा जन्म 22 डिसेंबर 1924 ला आसामच्या दरांग जिल्ह्याच्या बोरंगबाडी गावात झाला. त्या पाच वर्षाच्या असताना आईचा मृत्यू झाला. तर तेरा वर्षाच्या असताना वडील गेले. आपल्या लहान भावा बहिणींचे पालन पोषण करण्यासाठी त्यांनी शाळा सोडली.

भारत छोडो आंदोलनाच्या वेळी अवघ्या 18 वर्षाच्या होत्या आणि मृत्यू वाहिनी मध्ये त्या सामील झाल्या. वाहिनीने स्थानिक पोलीस स्टेशनवर राष्ट्रीय ध्वज  फडकवायचा असे ठरविले  यावेळी निशःस्त्र ग्रामीण लोकांच्या मोर्चाचे नेतृत्व कणकलताने केले.त्यावेळी तिने केलेले भाषण सर्वांना प्रेरणा देणारे होते. पोलिसांनी गंभीर परिणामाची चेतावणी दिली पण त्याकडे दुर्लक्ष करून मोर्चा पुढे जातच राहिला. पोलिसांनी गोळ्या झाडल्या पण कनकलतेने  तिच्या हातातील झेंडा मुकुंद काकोटीला दिला व आपण शहीद झाली. त्यालाही गोळी लागली तोही पडला पण शेवटी रामपति राजखोवाने तो झेंडा अखेर पोलीस स्टेशनवर फडकवला. अशा या वीरबालेला सलाम!!

७) उदादेवी

1857 च्या उठावाच्या वेळी लखनऊच्या सिकंदर बागेत दोन हजार लोकांचा जमाव जमला होता. इंग्रज सैनिक सिकंदर बागेत घुसले पण बागेच्या जवळ असणाऱ्या झाडापाशी गेलेला ब्रिटिश सैनिक जिवंत परत येत नव्हता. एक-दोन नव्हे 36 ब्रिटिश सैनिक मारले गेले. त्यामुळे इंग्रज अधिकाऱ्याला कळेना की सैनिक झाडाजवळ गेल्यावर का मरतो? त्याने झाडावर बघितले तर त्याला कोणीतरी बसलेले दिसले. लगेच त्याने तिथे गोळ्या झाडल्या आणि लष्करी गणवेश घातलेली एक महिला खाली पडली. ही महिला म्हणजेच 1857 च्या उठावात महत्त्वाची भूमिका बजावणारी उदादेवी होती. जखमी उदादेवी खाली पडल्यावर सैनिकांनी तिला गोळ्या घालून तिच्या शरीराची चाळण केली. आणि नंतर सर्व दोन हजार लोकांना मारले. ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या उदादेवीला योग्य ती प्रसिद्धी आणि सन्मान मिळाला नाही. उदादेवी यांचा जन्म अवध येथे झाला. इतिहासात हिच्याबद्दल फारशी माहिती लिहिली गेली नाही. 1856 मध्ये अवधचा नवाब वाजिद अली शाह हद्दपार झाला आणि अवधचा लगाम त्याची बेगम हजरत महल च्या हातात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी महिलांची लष्करी तुकडी तयार केली. उदादेवी त्यामधीलच एक होती. या तुकडीत सामील होऊन उदा देवीने  इंग्रजांशी लढा दिला व त्यातच आपल्या प्राणांची आहुती दिली.

वंदे मातरम्!!

८) कुमारी मैना

1857 च्या कानपूरच्या उठावाचे नेतृत्व नानासाहेब करत होते. त्यांची दत्तक मुलगी कुमारी मैना होती. तिचा जन्म उत्तर प्रदेशातील बिठूर येथे 1844 मध्ये झाला. 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात नाना साहेब भूमिगत होते. त्याच्या अटकेवर आणि माहितीवर ब्रिटिश सरकारने एक लाखापर्यंतचे बक्षीस जाहीर केले होते. इंग्रजांनी नानासाहेबांची मुलगी कुमारी मैना हिला बिठूर येथून अटक करून कानपूरला आणले. ते मैनाला नानासाहेब आणि इतर क्रांतिकारकांचा पत्ता विचारत राहिले. 13 वर्षांच्या मुलीला इंग्रजांनी झाडाला बांधले होते. छळ केला, पण तिने तोंड उघडले नाही. अखेरीस इंग्रजांनी तिला जळत्या चितेत फेकून दिले. आयुष्याची ओळख होण्यापूर्वीच ते संपले. या वीरागंनेच्या बलिदानाचा देशाला अभिमान आहे.

९) सुशीला दीदी

वीरांगना, क्रांतिकारक भगतसिंगांची दीदी सुशीला दीदी.दि. 5 मार्च 1905 रोजी पंजाब येथे एका सैनिकी परिवारात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सैन्यात डॉक्टर म्हणून कार्यरत होते.त्या स्वत: फार सुंदर कविता रचायच्या, ज्यात प्रामुख्याने देशाभिमान, देशप्रेम, राष्ट्रप्रेम असे विषय असायचे. जालंधरला विद्यालयीन शिक्षण घेताना तिथल्या तत्कालीन मुख्याध्यापिका शन्नो देवी आणि आधीच्या मुख्याध्यापिका लज्जावती ह्या स्वत: क्रांतिकारक विचारांच्या होत्या. त्यामुळे अभ्यासाबरोबरच क्रांतीचे पाठसुद्धा सहज गिरवले गेले. पुढे कालांतराने त्या भगवतीचरण व्होरा आणि दुर्गादेवी व्होरा ह्यांच्या संपर्कात आल्या आणि एका क्रांतिकारक संघटनेचा भाग झाल्या. इथून त्यांच्या आयुष्याने वेगळं वळण घेतलं.

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात काकोरी रेल्वे लूट ही एक मोठी घटना होती. त्या क्रांतिकारकांना जेव्हा फाशी सुनावण्यात आली, तेव्हा ह्या घटनेच्या वकिली कामासाठी त्यांनी आपल्या सोन्याच्या बांगड्या सहज देऊन टाकल्या.वडिलांसाठी मुलीचं इंग्रजांविरुद्ध बंड आपल्या नोकरीसाठी धोकादायक ठरू शकणार होतं, पण आपल्या वडिलांच्या ह्या विरोधाला न जुमानता त्या घराबाहेर पडल्या आणि दोन वर्षं आपल्या घरी परतल्या नाही. दोन वर्षांनंतर तेव्हाच परतल्या, जेव्हा त्यांच्या वडिलांनीसुद्धा आपल्या सरकारी नोकरीला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ स्वातंत्र्यचळवळीचं काम सुरू केलं.

साँडर्स आणि स्कॉर्ट ह्यांच्या हत्येनंतर क्रांतिकारक भगतसिंग आणि दुर्गाभाभी दोघेही लाहोर सोडून कलकत्त्याला आले. सुशीला देवींनी तेव्हा त्यांच्या भूमिगत राहण्याची व्यवस्था केली. आपल्या कलकत्त्याच्या निवास काळात त्यांनी क्रांतिकारक महिलांचं संघटन केलं, ज्याचं नेतृत्व सुभाष चंद्र बोस करत होते. त्याअंतर्गत त्यांनी सायमन कमिशनला जोरदार विरोध केला. दिल्ली बाँबहल्ल्यानंतर भगतसिंग आणि इतर मोठे क्रांतिकारक अटकेत होते, त्याच वेळी व्हाइसरॉय इर्विन ह्यांना मारण्याचा कट रचला गेला. त्यांच्या प्रवासाची संपूर्ण माहिती काढायचं काम सुशीला दीदींनी पार पाडलं. त्या वेषांतर करून युरोपियन स्त्री झाल्या आणि इर्विन ह्यांच्या प्रवासाचा बारीकसारीक तपशील गोळा केला. दुर्दैवाने ही योजना सफल होऊ शकली नाही. सुशीलादेवी आपली नोकरी सोडून एका शीख मुलाच्या वेषात लाहोरला दाखल झाल्या. भगतसिंगांना तुरुंग तोडून बाहेर काढायच्या कामात स्वत:ला जुंपून दिलं. हत्यारं गोळा करणं, पैसा जमा करणं, माहिती गोळा करणं, निरोप्याची कामं करणं अशी सगळी जय्यत तयारी केली. एका बाँब परीक्षणाच्या वेळी दुर्दैवाने भगवतीचरण व्होरांना वीरमरण आलं आणि ही योजना थांबवावी लागली.

वकील श्याम मोहन ह्यांच्याशी त्यांचा विवाह झाला. 1942 सालच्या भारत छोडो आंदोलनातसुद्धा त्यांनी आणि त्यांच्या पतीने सक्रिय सहभाग नोंदवला. त्यात त्यांना 6 महिन्यांचा सश्रम कारावास झाला. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि सुशीला देवींनी स्वत:ला समाजकार्यात लोटून दिलं. हस्तकला शाळा उघडून महिलांना त्यात निपुण करणं, त्यांना रोजगार मिळवून देणं, दलित वस्त्यांमध्ये काम करणं असं त्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहिल्या. त्यांनी देशसेवेचं जे व्रत हाती घेतलं होतं, त्याला 13 जानेवारी 1963 रोजी पूर्णविराम मिळाला.

– क्रमशः भाग ३/२

संकलनकर्ता – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted