श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ पुण्यतिथी… एका हनुमान अंशाची! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
नीम करोली बाबा ऊर्फ महाराजजी ५३वी पुण्यतिथी, शुक्रवार ११ सप्टेंबर!
जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे! त्या दिवशी महाराजजींच्या देहावरील ते वस्त्र घसरून खाली पडलं!
देह हे आत्म्याने व्यवहारासाठी तात्पुरते परिधान केलेलं वस्त्रच. पण पंचमहाभूतांच्या अधिपत्याखाली असलेल्या मानवी देहाला एखादे भौतिक, धाग्यांनी विणलेलं वस्त्र अंगाभोवती गुंडाळून घ्यावंच लागतं कित्येकदा… जगासाठी!
काळाच्या प्रभावामुळे आपले नाविन्य क्षणोक्षणाने गमावत जाणारे हे वस्त्र इतके जुने होऊन जाते की ते त्यागावेच लागते… जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे!
देहाच्या आवरणातून आत्मा बाहेर पडतो आणि कालांतराने ‘मग नूतन वेढिजे’ अशी अवस्था होते. माऊली ज्ञानोबारायांनी भगवान श्रीकृष्ण यांचा ‘तैसें देहांतरातें स्वीकारिजे’ हा संदेश त्यांच्या अमृतशब्दांत सामान्यजनांपर्यंत पोहोचवला आहे!
लोककल्याणासाठी देहात अवतरलेल्या देवांनाही हा क्रम चुकला नाही… किंबहुना त्यांनी तो आदर्श जगापुढे ठेवण्याची लीला केली! हनुमान अंश असलेले ‘महाराजजी’ही या जन्म-मृत्यूच्या क्रमास आणि कर्मास अपवाद ठरले नाहीत!
नीम करोली आश्रम, कैंची धाम.. जिल्हा नैनिताल, उत्तराखंड. ८ सप्टेंबर, १९७३. शनिवारचा दिवस. दुपार उलटून गेलेली. महाराजजी त्यांच्या नेहमीच्या जागी, मोकळ्या जागेतल्या बाजेवर त्यांची ती चौकोन विणलेली कांबळ, घोंगडी पांघरून बसलेले आहेत. आश्रमातल्या एका कक्षात सत्संग भजन गायन सुरु आहे.
“नीम करोली बाबा मर गया! ” महाराजजी मोठ्याने म्हणाले आणि त्यांनी आकाशाकडे बोट केलं… आणि म्हणाले, ”उपर गया! ” तिथे उपस्थित असलेल्या लोकांना याचे आश्चर्य तर वाटलेच पण संत मंडळीपुढे कुणी काय बोलणार? त्यांच्या शब्दांचे, कृतींचे अर्थ नंतरच समजू लागतात! तेवढ्यात कुणीतरी महाराजजींना म्हणाले, ”खाजगीत थोडं बोलायचं आहे! ” महाराजजी म्हणाले, ”आता वेळ नाहीये! ” त्यावर ती व्यक्ती म्हणाली, ”मग उद्या सकाळी? ” त्यावर महाराजजी उत्तरले, ”मी आज जिवंत राहिलो तर उद्या! ” आता यावरही कुणाला काही बोलता येईना. शनिवार उलटून गेला.. रविवारी महाराजजी सकाळी तयार होऊन बसले. अकरा वाजेपर्यंत दर्शन इत्यादी उपचार पार पडल्यावर त्यांनी त्यांच्या जवळच बसलेले त्यांचे परमशिष्य किशनदास तिवारी यांना म्हटलं, ”ध्यान करा! ” त्यावर ध्यान धारणेत पारंगत असलेले तिवारीजी क्षणार्धात खोल ध्यानात अर्थात समाधीवस्थेत गेले! खूप वेळ झाला तरी ते त्या स्थितीतून बाहेरच येईनात. अगदी एका डॉक्टरांनी त्यांना तपासले तेंव्हा लक्षात आले की श्वास सुरु आहेत… मात्र त्यांची मनोवस्था जणू कोमामध्ये गेल्यासारखी आहे! त्यावर महाराजजी उदगारले… ”यह रहेगा… मैं जाउंगा! ”
खूप वेळाने महाराजजींनी स्वत: तिवारीजींना ध्यानातून बाहेर देहावर आणले!
त्यांच्या भोवती बसलेल्या भक्तांना त्यांनी ‘हनुमान चालिसा’, ‘संकट मोचन’ आणि ‘प्रणाम’ गायला सांगितले आणि शेवटी साश्रू नयनांनी आज्ञा दिली… ”आता ओम जय जगदीश हरे! गा! ” काही वेळाने आरती झाली, प्रत्येकाच्या कपाळावर चंदन तिलक लावला जाऊ लागला. महाराजजी यांनी यावेळी त्यांच्या भक्तांनी त्यांच्या कपाळावर लावलेला चंदन तिलक पुसला नाही… त्यादिवशी तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी महाराजजी यांच्या कपाळावर चंदन तिलक रेखला!
दुपारचा भोजन-प्रसाद झाला आणि अडीच वाजता महाराजजी त्यांनी अचानक आग्र्याला जायला निघाले… चार-पाच दिवसांनी परतेन असं त्यांनी काही जवळच्या लोकांना सांगितले होते. कुणीतरी आजच निघणं गरजेचे आहे का? त्यावर उत्तर मिळाले होते, “मला अकरा सप्टेंबर रोजी एक महत्त्वाचे काम आहे! ” त्यावर प्रश्नकर्त्याने विचारले, ”आम्ही तुम्हांला भेटायला कधी येऊ? ” त्यावरही उत्तर आले, ”मंगळवारी भेटू! ” अकरा सप्टेंबर रोजी मंगळवार होता… अनंत चतुर्दशी होती!
निघण्याआधी आश्रमातील सेवेकरी महिलांचे त्यांनी वारंवार आभार मानले… ”तुम्ही खूप उत्तम सेवा केलीत माझी! ”
आश्रमातल्या श्री हनुमानजींना वंदन केल्यावर इतर सर्व देवतांना नमस्कार करून महाराज वेगाने पावले टाकीत मोटारीकडे निघाले… जाताना मागे वळून म्हणाले “कारागृहातून निघून चाललो आहे! सेंट्रल जेल छोडूंगा…! ” आणि तेवढ्यात त्यांच्या अंगावरची चादर ओघळून खाली आली… सेवकाने ती लगबगीने त्यांच्या अंगावर पुन्हा घातली खरी… पण आधी असं कधी झालेलं नव्हतं!
देहरुपी वस्त्र आता सांडण्याची, सोडून देण्याची वेळ बहुदा यातून प्रतीत झाली होती! पण कुणाला याची तसूभरही कल्पना आली नाही!
ते निघाले! मोटार रेल्वे स्टेशनच्या दिशेने धावू लागली… आभाळात क्षितीजावर एक लखलखीत ठळक इंद्रधनुष्य आभाळाची शोभा वाढवत होतं… ते जणू या वाहनाचा पाठलाग करीत होतं… महाराजजी म्हणाले… ”केवळ निसर्गच ही किमया करू शकतो! माणसाच्याने हे शक्य नाही! ” ते इंद्रधनुष्य मोटार काठगोदाम रेल्वे स्टेशनजवळ पोहोचेपर्यंत दिसत राहिलं!
तिथून रात्रीची ट्रेन होती… महाराजजी आग्रा येथे निघाले. येथे एका हृद्यशल्य विशारद डॉक्टरांची त्यांना भेट घ्यायची होती. रेल्वे भल्या पहाटे आग्रा स्टेशनला पोहोचली. महाराजजी प्रवासात झोपले नाहीत.. त्यांच्या राम-दैनंदिनीमध्ये राम राम लिहित राहिले. रविवार उलटून सोमवार उजाडला होता. त्यांनी पुढच्या पानावर मंगळवार, ११ सप्टेंबर तारीख घालून ठेवली!
एका भक्ताच्या घरी महाराज उतरले. दर्शन, भजन करण्यासाठी अल्पावधीत अनेक लोक तिथे जमा झाले. सर्वांची चौकशी, चेष्टा-मस्करी करीत राहिले महाराजजी. अकरा वाजून गेले. “आणखी बारा कसे वाजले नाहीत? ” असे महाराजजी वारंवार विचारत राहिले. दुपारी बारा वाजता भोजन झाले. महाराजांनी यावेळी केवळ पालेभाज्या घेतल्या जेवणात. नंतर एक सेवक वगळता सर्वांना त्यांच्या खोलीतून बाहेर जायला सांगितले आणि त्यांनी संस्कृतमधील श्लोक म्हणायला सुरुवात केली… बहुदा ते श्लोक आईसंदर्भात असावेत!
दुपारी महाराजजी बाहेर पडले आणि डॉक्टरांना प्रकृती दाखवून आले. “तुमचं हृद्य ठीक आहे. फक्त आराम मात्र करा! ” असं डॉक्टरांनी सांगताच महाराजजी केवळ स्मित हास्य करीत राहिले!
रेल्वेने आग्रा येथून कैंची धामकडे जाण्याचे तिकीट काढण्यात आले. प्रवासात कैंचीला परतण्याचा बेत रद्द करीत महाराजजींनी मथुरा स्टेशनवर उतरून वृंदावन धामला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते आणि त्यांच्या सोबतची माणसं मथुरा स्टेशनवर उतरले. वृंदावनधाम कडे जाण्यासाठी मोटारीची व्यवस्था होईपर्यंत महाराजजी स्टेशनवरच्या पाय-यांवर बसलेले असताना त्यांची प्रकृती बिघडू लागली… त्यांनी डोळे उघडझाप करायला सुरुवात केली. त्यांचे अंग खूप गरम झाले. “वृंदावनला घेऊन चला”… महाराजजी बोलले… मोटारीतून त्यांचा प्रवास सुरु झाला… पण त्यांची प्रकृती खालावत चालल्याचे पाहून त्यांना वृंदावन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले… तातडीने उपचार आरंभ झाले… कृत्रिम प्राणवायू देण्यास सुरुवात होताच महाराजजी उद्गारले… ”याचा काही उपयोग नाही! ” रात्रीचा एक वाजला होता… मुखातून ‘जय जगदीश हरे! ’ मंत्र उमटत होता… देहाची मर्यादा संपुष्टात आली… महाराजजी देहातून बाहेर पडले!
देश-परदेशातील असंख्य माणसांना जीवनाची दिशा दाखवणारा, वेळप्रसंगी अलौकिक चमत्कार घडवणारा परंतू कोणत्याही कर्माचे कर्तृत्व स्वत:कडे न घेणारा, शेकडो भक्तीमंदिरे, सेवाकार्ये, अन्नादान छत्रे उभारणारा एक दैवी अंश निमाला होता… ११ सप्टेंबर, १९७३. वर्ष १९०० मधल्या कोणत्या तरी दिवशी सुरु झालेला हा देहाच्या जन्माचा प्रवास ७३ वर्षांनी मरणाचे निमित्त होऊन संपुष्टात आला! आत्मा? तो तर अनादी नित्य सिद्धू… निरुपाधी विशुद्धु… शस्त्रादिकाने छेदला न जाणारा, अग्नी जाळू शकणार नाही, पाणी बुडवू शकणार नाही, वारा सुकवू शकणार नाही असा आहे… तो चिरंजीव आहे! संत जीवनमुक्त होऊन जाऊ शकतात… पण तो स्वार्थ ते साधत नाहीत… जगाच्या कल्याणार्थ दीर्घ काळ आत्मस्वरूपाने जगात वास करीत राहतात!
लौकिकार्थाने हे जग सोडून जाण्यापूर्वी म्हणजे त्यांच्या जीवनकाळातला अखेरचा भंडारा (महाप्रसाद) अभूतपूर्व व्हावा, अशीही योजना त्यांनी करून ठेवली… जून १९७३ मध्ये भोजन आणि दर्शनासाठी कैंची धाममध्ये आलेल्या भाविकांची संख्या आजवरची सर्वाधिक ठरली!
आपल्या मृत्यूनंतरही भंडारा सुरु रहावा. किंबहुना आपल्या मृत्यूनंतर केंचीधाम आणि वृंदावन येथे भेट देण्यासाठी असंख्य लोक येणार हे लक्षात घेऊन महाराजजींनी दोन्ही आश्रमांमध्ये तितक्या लोकांना पुरेल एवढा धान्यसाठा, इंधनसाठा कित्येक महिने आधीच करून ठेवला होता. तब्बल १७ ट्रकभरून जळणासाठीची लाकडे आणून घेतली होती… आणि विचारले होते.. ही लाकडं ऑक्टोबरपर्यंत पुरतील ना?
इतकंच नव्हे, तर आपल्या दहनविधीसाठी जी जागा लागणार होती, तीही निश्चित करून ठेवली होती… कुणाला काहीही न सांगता. आश्रमातील एका मोकळ्या जागेत जेंव्हा वृक्ष लावण्याचे काम सुरु होते, त्यावेळी महाराजजींनी एक विशिष्ट स्थान पुरेसे मोकळे ठेवण्याची आग्रहाची सूचना कित्येक महिने आधीच करून ठेवली होती! एवढंच नव्हे तर काही कारणांनी काही जुन्या भक्तांची आणि त्यांची कित्येक वर्षे भेट होऊ शकली नव्हती, त्यांना आवर्जून भेटीस बोलावून घेतले होते… एकंदरीत निर्वाणापूर्वीची नीरवानीरव सुरु होती…! एका भक्तांच्या घरी मुक्काम व्हायचा, पण ते घर भाड्याचे होते. आणि भक्ताची स्वत:ची जागा विकत घेण्याची, घर बांधण्याची ऐपत नव्हती… ही बाब चर्चेत येताच.. ”सब ठीक हो जायेगा” असं म्हणून महाराजजी तिथून परतले. काहीच महिन्यांत त्या व्यक्तीचे स्वत:चे नवे घर बांधून तयार होते.. महाराजजींचा पुढचा मुक्काम मग त्याच घरी झाला!
वडिलांवर रुसून शेकडो किलीमीटर्स अंतरावर निघून गेलेल्या मुलाला चमत्कारिकरीत्या दोन मिनिटांत स्वत: प्रत्यक्ष भेटून निरोप देऊन येणारे व त्याला परत येण्यास उद्युक्त करणारे, रेल्वे प्रवासात तपासनीसाने अपमानित करून उतरवून दिल्यावर ती रेल्वे कित्येक तास रोखून धरणारे, पुढे होणा-या घटना आधीच सांगणारे, पाण्याचे तुपात रुपांतर करणारे, एकाच वेळी दोन दोन ठिकाणी प्रकट होणारे, डोळ्यांसमोरून क्षणार्धात अदृश्य होणारे, युद्धात लढणा-या सैनिकाच्या दिशेने येणा-या बंदुकीच्या गोळ्या त्याच्यापासून शेकडो मैल दूर असताना स्वत:च्या अंगावर झेलणारे, कित्येकांची असाध्य दुखणी चुटकीसरशी दूर करणारे आणि असे ज्ञात अज्ञात हजारो चमत्कार नावावर असणारे लक्ष्मी नारायण शर्मा, किंवा लक्ष्मण दासजी महाराज, किंवा तलैय्या बाबा, हांडीवाले बाबा, तिकोनिया वाला बाबा, पाश्चात्य लोकांसाठी miracle बाबा किंवा नीम करोली किंवा नीम करोडी किंवा केवळ महाराजजी… एका बाजूला आणि…
शेकडो हनुमान मंदिरे स्थापन करणारे, कैंची धाम-उत्तराखंड, वृंदावन आश्रम आणि महासमाधी मंदिर, नीम करोली आश्रम-उत्तर प्रदेश, हनुमान सेतू मंदिर-उत्तर प्रदेश, जौनापुरा आश्रम आणि अन्नछत्र-नवी दिल्ली, हृषीकेश आश्रम, हनुमान गढी-नैनिताल, भूमिआधार आश्रम, काकरीघाट आश्रम यांच्या उभारणीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग-श्रेय असलेले महाराजजी…
Richards Alpert नावाच्या वेगळ्या वाटेवर गेलेल्या परदेशी व्यक्तीला सन्मार्गाला लावून त्याचे बाबा रामदासमध्ये रुपांतर करणारे, (की ज्याने अमेरिकेत जाऊन सेवा फाउंडेशन ही आरोग्य क्षेत्रात काम करणारी सेवाभावी संस्था स्थापन केली)
Jeffrey Kagel नावाच्या इंग्लीश कलाकाराचे कृष्ण दास या आध्यात्मिक गायक कलाकारात रुपांतर करणारे,
Larry Briliant नावाच्या बुद्धीमान डॉक्टरला जागतिक देवी रोग निर्मुलनाच्या कार्यात तन-मन-धनाने सहभागी होण्यास प्रवृत्त करणारे
‘Love Serve Remember Foundation’ ही सेवाभावी संस्था, NKB Divine Meditation Foundation अध्यात्मिक प्रशिक्षण संस्था स्थापन व्हाव्यात यासाठी स्वत:च्या मृत्यूपश्चातही प्रेरणा देणारे महाराजजी…
ज्यांच्या आयुष्यावर Windfall of Grace, Moved by Grace, American Yogi हे माहितीपट निघाले, श्री नीम करोली बाबा महाराज आणि हनुमान अंश हे हिंदी चित्रपट निर्माण झाले ते महाराजजी,
Apple संस्थापक स्टीव्ह जॉब्स, Whatsapp संस्थापक मार्क झुकेरबर्ग, प्रसिद्ध इंग्लीश अभिनेत्री जूलिया रॉबर्ट्स यांना मृत्यूपश्चातही प्रेरणा देणारे महाराजजी…
सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा, अन्नदान करा, परमेश्वाराचे स्मरण करीत रहा, सत्य वचनी व्हा… अशी शिकवण देताना ती स्वत:च्या आचरणात आणून आदर्श निर्माण करून ठेवणारे महाराजजी…
बालपणी नकळतेपणी लावून दिलेल्या विवाहाची पुढे संसारात काही वर्षांसाठी बूज राखणारे, गावचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे, लांब-लचक प्रवचने, पुस्तकांचे लेखन, प्रसिद्धीसाठीचे उपक्रम, संपत्ती संचय यांपासून दूर राहणारे, सर्वांशी एखाद्या निरागस बालकासारखे प्रेमाने वागणारे महाराजजी…
भारताचे वैभवच नव्हेत का?
पाखंडी तथाकथित बुवा, महाराज, गुरू आणि नीम करोली बाबा महाराजजी, स्वामी समर्थ, गजानन महाराज, शंकर महाराजप्रभृतींना एकाच तराजूत तोलाणारे, धार्मिक, वैचारिक राजकारण करत संतांविषयी अभद्र भाषेचा उपयोग लोकही समाजात आहेतच. त्यांच्या आक्षेपांचा प्रतिवाद करण्यात आपण आपली शक्ती व्यर्थ दवडू नये, हेच श्रेयस्कर. रामजी सब देख लेंगे… असं म्हणून मोकळं व्हावं!
आणखी एक छोटीशी विनंतीवजा सूचना करावीशी वाटते… सर्वांनीच आता धावत-पळत जाऊन केंची धाम, वृंदावन इत्यादी ठिकाणी जाण्याची व विनाकारण प्रचंड गर्दी करण्याची, व्यावसायिकतेला अधिकचे खतपाणी घालण्याची आवश्यकता नाही. आपल्या जवळपासही उत्तम तीर्थक्षेत्रे आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे संतांनी दिलेल्या शिकवणुकीचा व्यावहारिक आयुष्यातही अंगीकार करण्याचा प्रयत्न करीत राहणे… कारण आपल्या प्रत्येकात केवळ हनुमानाचाच नव्हे तर सर्वच देवांचा अंश असतो!
‘हनुमान अंश’ या चित्रपटाचे आणखी दोन भाग येणार आहेत, असे समजते. आपले महापुरुष, आपले संत, गुरु, शूर सैनिक यांच्या आयुष्यावर असेच उत्तम चित्रपट निर्माण होत रहावेत… हे चित्रपट आपला राष्ट्रीय ठेवा होतील… कारण चित्रपट हे खूप प्रभाव टाकणारे माध्यम आहे. असो.
संत, महात्मे, युगपुरुष ज्या तिथीला हे जग सोडून जातात त्या पुण्यतिथी म्हटले जाते. या थोर व्यक्तींनी आपले संपूर्ण आयुष्य लोकांचे कल्याण, ज्ञान प्रसार आणि भक्ती यामध्ये घालवलेले असते. त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण पुण्याचा (सत्कर्माचा) असतो. त्यांनी कमावलेल्या या प्रचंड पुण्याचा आणि ऊर्जेचा प्रभाव त्यांनी देह ठेवल्यानंतरही त्या तिथीला ब्रह्मांडातील वातावरणात जास्त प्रमाणात जाणवतो, म्हणून तिला ‘पुण्यतिथी’ म्हणतात.
नीम करोली बाबा महाराजजींची ११ सप्टेंबर, २०२६ ही ५३वी पुण्यतिथी. या तिथीला आपण त्यांचे पुण्य-स्मरण करणे ही आपल्या कल्याणाचीच बाब ठरेल, असा विश्वास वाटतो! सीताराम!
☆
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






