सुश्री शीला पतकी 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “सरिता वहिनी आणि पेकाडे भाऊजी” भाग – २ ☆ सुश्री शीला पतकी 

नमस्कार वहिनी नमस्कार… सुहास भाऊजी आत येत म्हणाले. सरिता वहिनी म्हणाल्या, ” या पेकाडे भाऊजी अहो पाहिलंत का कोण आलयं… तुमचे परममित्र सुहास पेकाडे आले आहेत”… नवरा बाहेर आला आणि म्हणाला, ” ये ये सुहास अरे किती दिवसांनी? … आणि लंगडायला काय झालं तुला? . “” अरे काही नाही परवा विमानतळावर गेलो होतो मुख्यमंत्री येणार होते ना… वृत्त संकलनाला मला पाठवले होते. गर्दीमध्ये जरा चेंगराचेंगरीत पाय पडला आणि… ” इतक्यात सरिता वहिनी म्हणाल्या, ” आणि तुमचे पेकाड मोडले…! भाऊजी कशाला करता ती पत्रकारिता… एवढी मोठी शेती… गावाकडे जाऊन करा ना… “” सरिता आता तो विषय नको”, नवऱ्याने तिला दटावले अर्थात प्रेमानेच आणि म्हणाला, ” फक्कड दोन कप चहा टाक..! तुझ्या हातचा चहा सुहासला आवडतो… “. ती म्हणाली, ” हो हो करते “.. सुहास म्हणाला, ” कराल हो वहिनी बसा… बाकी कसे आहात तुम्ही? … आणि प्रगती आणि विकास काय म्हणतोय? “… ” भाऊजी मी छान आहे! “मी छान नसायला काय झालं सरकारची लाडकी बहीण आहे ना! … मी फुकट खाऊ… प्रगती मात्र खुंटली आहे आणि विकास उडाण टप्पू निघाला त्यामुळे तो भकास झालाय”… “वहिनी असं कोड्यात बोलू नका ना…! ” अगबाई! कोड का काय हे भाऊजी मी सरळ सरळ सांगते… मला सांगा प्रगती खुंटली आहे का नाही? पेपर मध्ये खोटे आकडे देऊन सरकार, न परवडणारी आश्वासन देऊन अमिषं दाखवून सत्ता मिळवतात आणि बळकट करतात त्यानंतर देशाची किती छान प्रगती झालेली हे तुम्ही लिहिता आणि विकासाचे खोटे खोटे आकडे देता… हे बांधलं ते बांधलं… ते उभं केलं… अहो… सगळी तरुणाई बेकार फिरते… गुटक्याच्या थुंक्याने रस्ते रंगलेत… त्या भ्रष्ट नेत्यांच्या मागे बोंबलत फिरते तरुणाई… देशाचा विकास म्हणजे बिल्डिंगा नाहीयेत… आपल्या तरुण मुलांचा विकास झाला पाहिजे… सोलापुरात एक उद्योग धंदा नाही एक उद्योजक हे इथे यायला तयार नाही… का तर दहशतवाद…! इथली माणसं गुंड आहेत… मुंबई धडा धडा गोळ्या घालतात ते चालते काय? इथल्या माणसाना पोटाला खायला.. द्या हाताला काम द्या… त्यांच्या लेकरा बाळांना चांगले शिक्षण द्या… हो आणि यातलं फुकट काही देऊ नका. या सगळ्या फुकट्यांमुळे तरुण मुलांचं फावले काम नाही धंदा नाही मोकाट फिरतात गाव सोडून काम सुरू झाले गेलेत पोरं आणि फिरत आहेत पुढाऱ्यांच्या मागे म्हाताऱ्यांचा गाव झाले आमचं… हा आता विकासाच म्हणत असाल तर झालाय ना खूप झालाय… नगरसेवकांचा झालाय.. सरपंचाचा झालाय.. त्यांच्या पोरा बाळांचा झालाय… आमची गुलामगिरी ची मानसिकता जोपासण्यात ही सगळी मंडळी हुशार झालेत. पिढ्यान पिढ्या तीच माणसं खुर्च्यांवर बसली पाहिजेत त्यांच्याच घरातले सगळे सत्तेत हवेत अण्णासाहेब दादासाहेब मग भैय्यासाहेब ताईसाहेब मग बाळासाहेब आम्हाला आमच्या पोराबाळाना… कोणाला काही स्वप्न नाही.. कोणाला इच्छा नाही… हुशार हुशार पोरं गुजरेगिरी करण्यात आपला आयुष्य घालवतायेत.. आणि त्या पुढार्‍यांची बावळट कार्टी कुठलाही अभ्यास नाही… बापाच्या, आज्याच्या, आईच्या नावावर सत्तेवर बसतात आणि लगेच कोट्याधीश…? आणि तुम्हा पत्रकारांना एकालाही विचारवसं वाटत नाही का हो.. की बाबा रे तू नगरसेवक होऊन एक वर्ष झालं तू आमदार होऊन एक वर्ष झालं… तुझ्या नावावर एवढा पैसा कुठून आला? ते धाडस काय फक्त नाना पाटेकरांनी करायचं का? तुम्ही काय करणार? … तुमच्या वृत्तपत्रातनं मारा की बोंबा जरा… पण ते नाही, सगळी भलावण करायची… तुम्ही सगळे कुणाच्यातरी दावणीला बांधलेले… भाऊजी तुम्हाला पत्रकारांना दिसत नाही का हे सगळं? महात्मा गांधी म्हणाले होते. “खेड्याकडे चला” तर बरोबर उलटे झाले खेडी ओस पडायला लागलीत सगळे पळतायेत… मुंबई पुणे…! शहरालगत असलेल्या शेतकऱ्यांनी तरी आपल्या जमिनी करून विकून टाकल्या मग आलेल्या पैशातून तरी काही चांगलं केलंय? नाही.. व्यसनात आणि चैनीत घालून कफ्फलक झालेत… कसला बोडक्याचा विकास आणि काय? ” अहो वहिनी, भावजी म्हणाले” मी आपल्या प्रगती आणि

विकास बद्दल बोलतोय”… हो हो मला कळतं ते… मीही आपल्याच प्रगती आणि विकास बद्दल सांगितले तुम्हाला हे लक्षात घ्या! … ” सरिता जाऊ दे ना ग विचारा खूप दिवसांनी आलाय त्याला एक कप चहा दे ना करून”… “समीर म्हणाला. ” हो देणार देणार अगदी छान कडक चहा देणार आणि झणझणीत चिवडा सुद्धा…

बघू काय तिखटपणा येतोय का आज लेखणीला…! ” असं म्हणत सरिता वहिनी आत गेल्या समीर म्हणाला, “जाऊ दे लक्ष देऊ नको तिच्याकडे” “नाही रे समीर, लक्ष देण्यासारखंच बोलल्या त्या चूक काय आहे त्यांचं? आम्हालाही असा विचार करण्याची मुभा असती आणि लिहिता आल असत तर फार छान झालं असतं. “चल छोड यार तुझं कसं चाललंय… अशा गप्पा चालू असताना सरिता वहिनी चहा आणि चिवडा घेऊन आल्या चहा चिवड्या वर ताव मारून पेकाडे भाऊजी सरिता वहिनींचा निरोप घेऊन गेले. जाताना म्हणाले, ” वहिनी उद्या येतोय परत नवीन विषय घेऊन… तुमचे आशीर्वाद घ्यायला.. ” हो हो या या भाऊजी नक्की या मी बसले आहेच आशीर्वाद द्यायला” सगळेच हसत हसत निरोप घेऊन कामाला लागले.

– समाप्त – 

© शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted