डॉ. नेहा भटकर
मनमंजुषेतून
☆ वार्डरोब… ☆ डॉ. नेहा भटकर ☆
परवा शांता शेळके यांची सुप्रसिद्ध पैठणी नावाची कविता पुन्हा एकदा वाचली. यावेळी केलेलं तीचं, अर्थात कवितेच माझ्याकडून होणार हे कितवं वाचन असेल, माहिती नाही. कवितेतील आजी कितीतरी प्रसंगांमध्ये फडताळात ठेवलेल्या गाठोड्यातील धानी रंगाची पैठणी नेसून मिरवली. पैठणीने आजीच्या आयुष्यातील कितीतरी उन्हाळे पावसाळे बघितलेत. ती कितीतरी प्रसंगांची साक्षीदार होतांना नकळतपणे वेगवेगळ्या मंगल प्रसंगातील दरवळ तिच्यामध्ये कायमचे भिनलेत, इतके की कवयित्री आजही त्यांना अनुभवते व आजीच्या आयुष्याचा संपूर्ण कालपट पैठणीच्या निमित्ताने कवयित्री समोर उलगडतो. अशा आशयाची अगदी पैठणी इतकीच तलम व सर्वांग सुंदर असलेली ही आशयघन कविता. ती वाचून संपली तरी मला मात्र डोळे मिटून पैठणीच्या नारळी पदरासोबत बराच वेळ रेंगाळावं असं वाटत असतानाच, हाताशी असलेला मोबाईल वाजला व फोनवर पलीकडे असलेल्या माझ्या मैत्रिणीशी बोलायला लागले. दोन्हीकडून सलामीची एक दोन वाक्ये झडली आणि मैत्रिणीने मूळ विषयाला हात घातला. मैत्रीणीला माहेरच्या नातेवाईकांकडील एका लग्नसोहळ्यात केवळ हजेरी लावायची नसून, लग्न निकटस्थ नातेवाईकांकडचे असल्यामुळे हौसेने भरपूर मिरवायचं होतं. मिरवण्यासाठी लागणाऱ्या विशेष महत्त्वाच्या बाबींपैकी एक बाब म्हणजे विविध वस्त्र प्रावरणे. म्हणूनच हल्लीच्या लग्न समारंभातील वेगवेगळ्या प्रसंगानुरूप निरनिराळ्या साड्या, काही देशी तर काही विदेशी पद्धतीच्या कपडे (Indian and western style outfits) खरेदीसाठी तिला माझी मदत हवी होती. मदत अर्थातच केवळ एक सोबत म्हणून आणि एखादवेळी निवड करतेवेळी उद्भवणाऱ्या अत्यंत बिकट किंवा निर्णायक प्रसंगी माझं मत देखील द्यायला हरकत नव्हती परंतु ते स्वीकार्य असेलच असे मुळीच नाही. मुळात या सगळ्या खरेदीच्या खटाटोपालाच मी नापसंती दर्शवत म्हटले, अगं सहा महिन्यापूर्वीच तर तुझ्या सासरच्या नातेवाईकांकडे झालेल्या लग्नप्रसंगासाठी तू बरीचशी खरेदी केलीय. आता आणखी कशाला वेगळी करायचीय तर ती म्हणते कशी; अगं तुला कसं कळत नाही, लग्न जरी माझ्या माहेरच्या नातलगाकडचं असलं तरी माझ्या सासरचे काही लोक तिकडे येणारच आहेत आणि मग बरं दिसत का, तेच ते कपडे घालून मिरवलेलं. य़ा युक्तिवादावर मी तिला परत आठवण करून देत म्हणाले, अगं मागे दीडेक वर्षांपूर्वी नाही का, आपल्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नासाठी सुद्धा तू बरंच काही नवीन घेतलं होतंस, तेही चालेल ना गं यावेळी वापरायला कारण इकडे आपल्या मैत्रिणीकडच्या लग्नातलं कुणीही असणार नाही तुला बघायला, मी हसतच म्हणाले. ती आवाजाचा पोत जरा चिडका करंत म्हणाली अगं अशी काय म्हणतेस, वर्षाभरापूर्वीच्या कपड्यांचा आणि साड्यांचाही ट्रेंड आता बदललाय, आहेस कुठे, तेव्हाचे कलर कॉम्बिनेशन, डिझाईन, मटेरियल आता आउटडेटेड झालेत, म्हणून तर नवीनच घ्यायचं म्हणतेय. माझ्या डोक्यातून आपली कवितेतली धानी रंगाची पैठणी काही निघता निघेना, मी आपली नेटाने किल्ला लढवतच राहिले आणि तिला म्हणाले, अगं कसला आलाय ट्रेंड वगैरे आपण जे घातलं किंवा नेसलं त्यालाच आज घडीचा ट्रेंड म्हणायचं, नाहीतर काय वर्षभरापूर्वी आवडीने खरेदी केलेल्या महागड्या साड्या आणि ड्रेसेस कसे काय हद्दपार करायचे. सहाएक महिन्यात अगदी मोजून एखादे वेळेस वापरलेली कापडं पुन्हा नकोत, केवळ ती आपल्या अंगावर आधी कोणीतरी बघितलेली आहेत म्हणून, का ग बाई. हे ऐकल्यावर तिने ठीक आहे म्हणून बहुतेक रागानेच फोन बंद केला. तो दिवसच तसा होता, एक वेगळच वळण घेतलेला, पहिले पैठणी कविता आणि नंतर हे फोनवरचं संभाषण. दोन्ही प्रसंग मला एकमेकांपासून वेगळे करताच येईनात, नुसती सरमिसळ चाललेली. एवढे कमी होते की काय, म्हणून वस्त्र प्रावरणे आणि त्या अनुषंगाने वेळोवेळी अनुभवलेल्या जुन्या नव्या प्रसंगांची मालिकाच जणू, एका मागून एक सरकायला लागली.
कोणे एके काळी सर्वसाधारणपणे ठेवणीतले कपडे ठेवायला कापडाचे गाठोडे पुरेसे असावे, हे पैठणी कवितेवरून अगदी स्पष्टपणे लक्षात येतं. जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसे गाठोडे जाऊन पेटी किंवा ट्रंक आली आणि नंतर कुठे भिंतीतील तर कुठे वेगळ्या लाकडी वा लोखंडी कपाटांची ठेवणीतल्या कपड्यांचा रूबाब सांभाळायला मदत व्हायला लागली. मला आठवतं, माझ्या शाळकरी वयामध्ये घरातील सगळ्यांचे दररोज वापरायचे कपडे मागच्या ओसरीमध्ये बांधलेल्या दोरी वा आडव्या बांबूवर नीटपणे घड्या घालून तर काही भिंतीतील खुंट्यांवर टांगलेले असायचे. आताशा ओसरीवरची ही दोरी कुठेच दिसेनासी झालीयं. कुठे भिंतीतील लाकडी फळ्यांचे कप्पे असलेली उघडी वा क्वचितच पटं असलेली कपाटंही दिसंत. गाठोडे, पेटी, कपाट… असा हा मजल दर मजल करीत वर्षानुवर्षे चाललेला प्रवास, अख्खा ड्रेस वा सूट जसाच्या तसा घडी न घालता किंवा, रेशमी भरजरी, कडक खळाच्या सुती, कृत्रिम धाग्यांच्या सुळसुळीत; अगदी कांजीवरंमपासून ते बनारसी, गढवाली पर्यंत तर कलकत्ता, मणिपुरी पासून ते सुरत, इचलकरंजी मीलपर्यंत, कितीतरी प्रकारच्या साड्यांच्या लांबलचक घड्या सामावून घेणाऱ्या आताच्या वॉर्डरोब या मुक्कामी येऊन ठेपलाय. हा विचारांचा प्रवास कधी कालच्या ट्रंका, पेट्यांशी घुटमळे तर कधी आजच्या वार्डरोब या संकल्पनेशी येऊन थबकायचा. विचारांची आंदोलनं कधी मागे तर कधी पुढे हेलकावू लागली.
रागावलेल्या मैत्रिणीच्या फोनच्या पार्श्वभूमीवर, आठवणींच्या खोल डोहात पार तळाला जाऊन बसलेली ही एक हकीगत नकळत उसळी मारून वर आली. वर्षाकाठी हंगामावर कापसाच्या बंड्या अमरावतीच्या कापूस बाजारात विकल्यानंतरच, एक ना दोन पातळांच्या जोड्या खरेदी होत, त्याही परस्पर कापसाच्या बंडीसोबत गेलेल्या पुरुष मंडळींकडून. एखादवेळी म्हणजे अगदी अपवादात्मक प्रसंगी, जसे की घरच्या लग्नकार्यासाठी आणखी एखादं बऱ्यापैकी पातळ वाट्याला येत असे. आणि हो, घरच्या प्रत्येक शुभमंगल प्रसंगी तर नाहीच नाही. त्याकाळी एका पाठोपाठ मंगलकार्ये उरकतांना कर्त्या माणसांची चांगलीच दमछाक होत असे. त्यामुळे मागच्या वर्षी पुतणीच्या लग्नात सगळ्यांनी पाहिलेलं पातळ यावर्षी परत लेकाच्या लग्नात नेसलं तर बरं दिसेल का? हा असला विचार कुणाच्या गावीही नव्हता किंवा तसली चैन बहुसंख्य लोकांना परवडणारीही नसे म्हणा. लहान भावंडांच्या कुंडलीमध्ये तर मोठ्यांना आखूड झालेले कपडे वापरण्याचा तो कुठलासा योग कायमच ठाण मांडून बसलेला असायचा. परंतु अशाही आर्थिक ओढाताणीच्या दिवसांत अगदी सहजपणे घडणारी गोष्ट अगदी लख्खपणे आठवली. नवीन कोरं करकरीत पातळ किंवा साडी स्वतः नेसण्याआधी घरातल्याच दुसऱ्या कुणाला म्हणजे जावेला, सुनेला नंणंदेला किंवा अगदी शेजारणीला वा दोन घराआड राहणाऱ्या आपल्या सखीला प्रथम नेसायला द्यायचे. याला घडी मोडायला देणे असे म्हणत. तिने ते दिवसभर अंगावर मिरवायचे दुसऱ्या दिवशी धुवून मूळ मालकिणीला घडी घालून नेऊन द्यायचे. त्या ओढगस्त काळातील हा मनाच्या श्रीमंतीचा पदर आज जरा आणखीच जरतारी भासला, तेव्हा तो कधीही तितकासा ध्यानीही आला नव्हता. वाऱ्याच्या सुखद झुळकेसारखी ही आठवण विरण्याचाच अवकाश तर तेवढ्यात दारावरची बेल वाजली. जाळीच्या दारातूनच पलीकडे उभ्या असलेल्या माझ्या शेजीबाई, कुंदाताई आल्याचं कळलं. त्या आत आल्या, जरा थकलेल्याच दिसल्या. त्या कुठलेसे परदेश पर्यटन करून दोन दिवसापूर्वीच परत आल्या होत्या. प्रवासाच्या दगदगीने थकल्यात या जाणिवेने त्यांना उल्हासित करावे म्हणून मी सहजच विचारले काय छान झालाय ना तुमचा फॉरेन टूर तर त्या अगदी उसळल्याच, अहो कसलं काय इतकी तयारी केली होती या टूरची पण बाई त्या वाह्यात टूर मॅनेजरचा सारखा धोशा लागलेला की बघून घ्या सगळं नीट. प्रत्येक ठिकाणी स्वतःचे फोटो काढण्यात फार वेळ घालवू नका, त्यात म्हणे फार वेळ वाया जातो आणि वेळापत्रक बिघडतं. फार फार तर नेमक्या स्थळांना जसे की तिथली स्मारकं, सृष्टीसौंदर्य, वास्तुशिल्प वगैरे वगैरे कॅमेरातून टिपत चला. मी बोलण्याला वेगळं वळण द्यावं म्हणून मध्येच विचारलं, पण झालं ना तुमचं सगळं नीट बघून तर त्या म्हणतात कशा, ते झालं म्हणा पण टूरसाठी म्हणून कितीतरी कपडे, त्यावर वेगवेगळ्या मॅचिंग एकसेसरीजची खरेदी केली होती हो, पण नीट फोटोच काढता आले नाहीत. त्यामुळे काही मजाच आली नाही. मी समजावणीच्या स्वरात म्हटले अहो यावेळी असं झालं असेलही पण पुढल्या सहलीला तुम्हाला कामी येईल, ही नवीन खरेदी, तर त्या आणखीच वैतागल्या आणि माझा निरोप घेता घेता म्हणाल्या नको ग बाई पुन्हा नवीन घेईल सगळे, नकोच यावेळीचे ते नाट लावे कपडे.
मैत्रिणीची संपूर्णपणे नवीन खरेदी करून लग्नात मिरवण्याची हौस तर शेजीबाईंचा पुढील फिरस्तीसाठी पुन्हा नवीन खरेदीचा मनसुबा, वार्डरोबमध्ये नवनवीन भर पडण्याची ही पण निमीत्त्ये असावीत, असतीलही कदाचित आणि मन परत आजीच्या जीवनपटातील नानाविध गंधात मुरलेल्या धानी रंगाच्या, नारळी पदराच्या पैठणीमध्ये गुंतले.
┉❀꧁꧂❀┉
© डॉ. नेहा विनोद भटकर
अमरावती
मो ९९७५०३०६२७
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




