कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # ३०५ – विजय साहित्य
☆ नारळी पुनव…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(अष्टाक्षरी)
☆
आली श्रावण पौर्णिमा
कोळी बांधवांचा सण
शांत झाला दर्या राजा
देई रोजी रोटी धन…!
*
सुरू झाली मासेमारी
शिरे दर्यामधे होरी
बघ नटल्या सजल्या
गोड कोलियाच्या पोरी.
*
रंग रंगोटी करून
बघ सजविली नाव
पूजा करू सागराची
मिळो अंतरात ठाव…!
*
दर्या राजा द्येव त्याचा
आहे नारळाचा मान
भात नारळाचा केला
सजे नैवेद्याचे पान…!
*
गंध फूल अक्षतांनी
होई सागराची पूजा
कर आमुचे रक्षण
ठेव बळकट भूजा…!
*
मासेमारी करताना
ठेव सुरक्षित धनी
तुझ्या पुजेसाठी बघ
किती जमल्या साजणी..!
*
कृपा प्रसादाने तुझ्या
राहो भरलेले घर
होरी खेळू देत माझी
तुझ्या लाटा लाटांवर…!
*
तुझ्या जीवावर करे
कोळी बांधव संसार
आली नारळी पुनव
कर पुजेचा स्विकार…!
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




