नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ श्रीपाद वल्लभ दिगंबरा… कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – नीलिमा खरे ☆

भावना प्रधान, भावुक मन आजूबाजूला व समाजात घडणाऱ्या घटनांकडे सजगतेने आणि सहृदयतेने पाहत असते. जागृत झालेल्या जाणिवा आणि आलेल्या अनुभूती यांच्याशी भावनांचा संबंध जोडू पाहते. त्यात आपल्या जगण्याच्या आचार- विचारांचे प्रतिबिंब शोधू लागते. प्रत्येक वेळी/ दरवेळी ते मनाला आवडेल, रुचेल असे असेलच असेही नाही. अशावेळी मनातल्या विचारांना केवळ स्वतःच्या आचरणाची जोड देऊन भागणार नाही हे लक्षात येते. समाजातल्या लोकांच्या मनाचे परिवर्तन घडावे, त्यात चांगले हितकारक बदल व्हावेत असे मनोमन वाटू लागते. परंतु हे विचार प्रत्यक्षात उतरणे आणि उतरवणे खूप अवघड असते. काही वेळा प्रत्यक्ष कृती करूनही ध्येय साध्य होईलच असेही नाही. साहजिकच हतबल, व्याकुळ झालेले मन नेहमीप्रमाणेच सर्व विश्वाचा स्वामी, निर्माता, कर्ता करविता जो ईश्वर त्याच्याकडे धाव घेते. त्याला भक्तिभावाने साद घालते. अशा आर्त भक्ती भावनेचा प्रत्यय देणारी डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांची “श्रीपाद वल्लभ दिगंबरा “ही कविता आज आपण वाचणार आहोत. त्यातील विचार, त्यातला भक्तिभाव जाणून घेणार आहोत. ही नुसती कविता नाही तर भक्ती भावनांनी ओथंबलेले कवन आहे..

☆ श्रीपाद वल्लभ दिगंबरा – डाॅ. निशिकान्त श्रोत्री ☆

कलियुग जगती जगदोद्धारा घेउनि या अवतारा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||ध्रु||

*

परधर्माचा नाही आदर स्वधर्माची ना जाण

मी अन् माझे यातच गेले गुरफटुनी जीवन

पीडितास पाहुनी मनी ना आपुलकीचा झरा

माणुसकीचा खेळ मांडुनी मानवास उद्धरा ||१||

*

मानवतेची ओळख नाही स्वार्था जोपासले

चैन दाम अन् ऐशोरामी देवाला पाहिले

मोहाच्या जाळ्यात गुंतला वैभवाचा तोरा

भवसागरी नर बुडून गेला हात देऊनी तारा ||२||

*

बुद्धीचा त्या माज चढला ज्ञानयोग विसरला

कर्मयोगाची नाही जाण कर्मकांडी रमला

भक्तीचा बाजार मांडिला धनवैपुल्य गुबारा

द्युलोका सोडूनी येउनी मानवास आवरा ||३||

*

चराचरांचा स्वामी म्हणवित मानव हा मातला

दया कणव न याला ठावे क्रौर्याचा हा पुतळा

वृक्षवल्लींचा पशुपक्ष्यांचा निर्घृण हा हत्यारा

इह्लोकाव्र अवतारुनी या सृष्टीला सावरा ||४||

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम. डी. , डी. जी. ओ
दत्तजयंती – २६ डिसेंबर २०२३

☆ रसग्रहण ☆

श्रीपाद वल्लभ दिगंबरा या शीर्षकातून ही कविता सदृश्य आरती श्री गुरुदेव दत्त यांच्या प्रती लिहिलेली आहे हे लक्षात येते. श्रीपाद वल्लभ दिगंबरा या त्रि अक्षरी नामाचा महिमा इतका जबरदस्त आहे की निव्वळ शीर्षक वाचल्यावर आपल्या मनातही भक्तीचे भावतरंग उमटू लागतात. आपल्या डोळ्यासमोर श्री दत्तगुरूंची सात्विक मूर्ती साकार होते. साहजिकच ही कविता वाचताना त्या भक्ती भावाने ती आतुरतेने वाचण्याची इच्छा होते.

*

कलियुग जगती जगदोद्धारा घेउनि या अवतारा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||ध्रु||

*

कलियुगातील अस्थिर, अनैतिक, अनिर्बंध, अविचारी, अविवेकी आचार विचार सुज्ञ माणसाला रुचणे खरंच अवघड आहे. चुकीच्या मार्गाचा विचार करणारी व त्या नुसार जगणारी माणसे ही समाजाला लागलेली कीड आहे. त्यांचे अंतर्बाह्य परिवर्तन करणे /होणे अत्यंत जरुरी आहे. यासाठी केवळ मानवी प्रयत्न पूरे पडणारे नाहीत हे सत्य आहे. हा बदल घडवून आणणे केवळ ईश्वरालाच शक्य आहे. ब्रम्हा, विष्णू, महेश या अनुक्रमे सृष्टीचा निर्माता, पालक व विनाश या तिन्ही शक्तींचे प्रतीक असलेल्या श्री दत्तगुरूंना कवी आवाहन करतो आहे. या जगती कलियुगाच्या बजबजपुरीतला अंधःकार दूर करण्यासाठी, जगाच्या उद्धारासाठी तुम्ही अवतार घ्या असे कवी विनवतो आहे. “अवतार घेऊन या “यातील श्लेष महत्त्वाचा. स्वतः श्री दत्तगुरूंनी अवतरावे. किंवा निदान अशी शक्ती /विभूती बनून भूतलावर यावे जी दैवी अवतारा सम असेल. त्याला घेऊन/ तसे बनून तुम्ही पृथ्वीवर या अशी याचना/आंतरिक प्रार्थना कवी करत आहे. “दिगंबरा दिगंबरा “या सुप्रसिद्ध जपातून कवी श्री दत्तगुरूंना आवाहन करतो आहे. श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे सारे शब्द मूळ संस्कृत भाषेतील आहेत. संस्कृत ही देववाणी असल्याने या शब्दांना मंत्र रूप लागले आहे, मंत्र सामर्थ्य लाभलेले आहे. या मंत्ररुपाने कवी श्री दत्तगुरूंची आराधना करून त्यांना साद घालतो आहे. हा मंत्र सत्व, रज, तम या त्रिगुणांच्या परे आहे. अशा या परमात्म्याचे अनुसंधान करून त्याला जगताच्या उद्धारासाठी कवी मनापासून आवाहन करतो आहे. जगती जगदोद्वारा हा अनुप्रास व अवतारा- दिगंबरा हे यमक अतिशय सहजतेने या कवितेच्या ध्रुवपदात आले आहे. त्यामुळे ध्रुव पदाला एक उत्तम लय लाभलेली आहे. साहजिकच ध्रुवपदापासूनच या कवितेची गेयता लक्षात येते जी या आरती स्वरुप कवितेच्या रचनेसाठी अत्यंत जरुरी आहे.. यामुळे कवीच्या साहित्यिक जाणीवांची जाण वाचकांना होते.
*

परधर्माचा नाही आदर स्वधर्माची ना जाण

मी अन् माझे यातच गेले गुरफटुनी जीवन

पीडितास पाहुनी मनी ना आपुलकीचा झरा

माणुसकीचा खेळ मांडुनी मानवास उद्धरा ||१||

*

समाजातील परिस्थितीचे /वातावरणाचे अतिशय मोजक्या व प्रांजल शब्दांत वर्णन केले आहे. ही परिस्थिती पूर्णपणे वास्तविक, सत्यदर्शी आहे. यात कुठेही कवी कल्पना नाही. धर्माच्या आधारावर विशिष्ट गट निहाय संस्कृती /धर्म जाणून-बुजून निर्माण केले जात आहेत. सर्वधर्मसमभाव ही संकल्पना कोणीही मानत नाही/ जाणत नाही. परधर्माविषयीचा आदर, त्यासंबंधी जाणीव, त्यातील जीवनमूल्ये, धर्मविषयक विचार कुणालाही जाणून घेण्याची इच्छा नाही. परधर्माला नावे ठेवणे एवढा एकच क्षुल्लक आणि निकृष्ट विचार सर्वांच्या मनावर राज्य करतो आहे. साहजिकच परधर्माविषयी आदरभाव मनात नाही आणि त्याचवेळी स्वधर्माची ही पुरेशी किंबहुना किंचितही जाणीव नाही असे आढळून येते. स्वधर्म आणि परधर्म या शब्दांवरील श्लेष अतिशय उत्तम. येथे केवळ धार्मिक, अध्यात्मिक ग्रंथ, वेद पुराणे यांचा संदर्भ नक्कीच अपेक्षित नाही. स्वतः सोडून जो दुसरा तो परका असे मानले जाते. अशा व्यक्तीविषयी माणूस म्हणून काही धर्म, काही कर्तव्ये आहेत असा विचार किंवा असे आचरण बिलकुल ही नाही. अशा दृष्टीने परधर्माविषयी आदरभाव/जाण नाही. एवढेच काय स्वधर्म म्हणजे स्वतःची स्वतःबद्दलची व इतरांना अपेक्षित असलेली कर्तव्ये यांचीही पुरेशी जाणीव नाही. थोडक्यात परधर्म आणि स्वधर्म या दोन्ही विषयी समाजात घोर अज्ञान आहे किंवा ज्ञान असूनही त्याप्रमाणे वागण्याचा सूज्ञपणा व विवेक बुद्धी नाही. मी, माझा स्वार्थ, माझे हित इतक्या संकुचित वृत्तीत जनसामान्यांचे मन गुरफटून गेले आहे. त्या व्यतिरिक्त कुठलीही भावना, वेदना, संवेदना कुणाच्याही मनात जागी होत नाही. एखाद्या दु:खी, खिन्न, गरजू व्यक्तीला पाहून मनात आपुलकीचा झरा वाहत नाही. ही खरंतर सहज सोपी गोष्ट ती ही अतिशय दुर्मिळ झाली आहे. कुणाच्याही मनाला पाझर फुटत नाही. सर्वांची मने पाषाण हृदय झालेली आहेत. येथे “मन गुरफटून गेले आहे” हा जो शब्द प्रयोग केला आहे तो अतिशय समर्पक. या शब्दातून एखाद्या गोष्टींमध्ये अडकणे, गुंतणे, गुंतागुंतीच्या जाळ्यात सापडणे ही अपेक्षित भावना सुस्पष्टपणे व्यक्त होते. ती या कवितेतील आशयाला पूरक आहे.

कुणाला वेदना /पीडा असतील तर त्यांना मदत करून त्या दूर करणे हा साधा विचारही हल्ली पटकन कोणाच्या मनात येत नाही. त्याप्रमाणे आचरण करणे तर दूरच!! सर्वज्ञानी परमेशाने जगाची निर्मिती करून संसाराचा/ भवसागराचा हा खेळ मांडला आहे असे पण मानतो. आता कवी त्याला विनवितो आहे की हे ईश्वरा! तू आता माणुसकीचा खेळ मांड. कुठल्याही खेळात माणूस जसा रमून जातो तसा माणुसकीच्या खेळात माणसाने रमावे अशी इच्छा कवी व्यक्त करत आहे. प्रत्येकाच्या मनात माणुसकी जागव, त्याचे महत्व त्यांना पटवून दे आणि असे करून मानवाचा उद्धार कर असे प्रतिपादन कवीने केले आहे. येथे संपूर्ण मानवजातीचा उद्धार अपेक्षित आहे.
परधर्म व स्वधर्म यातील श्लेष, पीडितास -पाहुनी मधील अनुप्रास, झरा -उद्धरा हे यमक हे अतिशय सुलभतेने साधले आहे. त्यामुळे ध्रुवपदापासून कवितेला लाभलेली गेयता जपली गेली आहे..

*

मानवतेची ओळख नाही स्वार्था जोपासले

चैन दाम अन् ऐशोरामी देवाला पाहिले

मोहाच्या जाळ्यात गुंतला वैभवाचा तोरा

भवसागरी नर बुडून गेला हात देऊनी तारा ||२||

*

मानवतेची ओळख मानवालाच राहिली नाही हे सखेदपूर्वक मांडून कवी म्हणतो की माणसाने स्वार्थ फक्त जाणले नाही तर ते जोपासले. स्वार्थाच्या पलीकडे जाऊन मानवतेची माणसाचीच ओळख उरलेली नाही. संबंध उरला नाही. किंवा त्याला त्याची जाण नाही, जाणीव नाही या अर्थानेही ओळख हा शब्द वापरलेला आहे. ओळख या शब्दावरील हा श्लेष अतिशय समर्पक आहे. येथे जाणीवपूर्वक स्वार्थाने वागणे या सत्याकडे निर्देश केला आहे. चैन, दाम म्हणजे पैसा व ऐशोराम यालाच आणि याच्यातच देव पाहिला. स्वार्थ लोलुप, स्वार्थाने अंध झालेला हा समाज आहे. कितीही लाभले तरी अजून हवेच हा माणसाच्या मनाचा व मनातला जप काही संपत नाही. त्याला सतत” अजून काहीतरी हवे “याची आसक्ती आहे, त्याचा मोह आहे. या मोहाच्या जाळ्यात मानव गुंतला. मोहाचे जाळे मधील श्लेष अतिशय समर्पक.. अजून हवे हा मोह व ते मिळवण्यासाठी वापरले जाणारे चुकीचे मार्ग यांचा मोह..

येथे अजून एक अर्थ आपल्याला लक्षात येऊ शकतो. सध्याच्या युगात देवाची मंदिरे ही पूजा, अर्चना, साधना, आराधना यासाठीची ठिकाणे राहिली नसून तेथेही देवाला अद्ययावत सुख सोयी देऊन त्याला करोडोंचे अलंकार घालण्याची प्रथा रुजली आहे. देवाला दागिन्यांनी मढवून स्वतःच्या वैभवाचा तोरा मिळवणे म्हणजेच भक्ती असा चुकीचा अर्थ लोकांच्या मनात रुजू पाहत आहे. वैभवाचा तोरा मिरवणे यातच प्रत्येकाला आपल्या आयुष्याची इति कर्तव्यता वाटते. वैभव मिळवणे त्यासाठी प्रयत्न करणे हे पाप नाही, गुन्हा नाही. पण त्यासाठी/ त्याच्या प्राप्तीसाठी माणूस मोहाच्या जाळ्यात गुंतला. या वास्तवाकडे सुस्पष्टपणे निर्देश केला आहे अतिशय सहजतेने आणि प्रभावीपणाने. वैभवाचा तोरा मिरवणे यामध्ये बडे जाव दाखवण्याची आसक्ती दिसून येते. हा शब्दप्रयोग एकदम यथार्थ आहे. कवितेतील आशयाला ठोसपणे मांडणारा व पुष्टी देणारा. वैभवाचा तोरा मोहाच्या जाळ्यात गुंतला.. येथे योजलेल्या रुपक व चेतना गुणोत्ति अलंकारांनी कवितेतील भावना प्रकर्षाने मांडली आहे. भव सागरात नर म्हणजे मानव जात बुडून गेली आहे असे म्हणून कवी मानवाला तारा, त्याला सांभाळा असे विनवतो आहे. “बुडून” या शब्दावरील श्लेष अतिशय उत्तम. एक अर्थ त्यात गुरफटला, गुंतला व दुसरा अर्थ म्हणजे लोप पावला, हरवला, त्याचे अस्तित्व संपले. अशा या बुडणाऱ्या नराला आधाराचा हात देऊन, त्याला योग्य ज्ञान देऊन, मार्गदर्शन करून त्याचा तारणहार बना असे कवी श्री गुरुदेव दत्तांना विनवितो आहे. नराचा नारायण करायचा असेल तर खुद्द नारायणाने, ईश्वरानेच त्याला मदत करणे आता आवश्यक आहे व ते केवळ त्याला शक्य आहे. वैभवाने आणि दिखाऊ पणाने देव मूर्तीला सजवून आपल्या भक्तीचे प्रदर्शन करणे ही चुकीची प्रथा सध्या रुजलेली दिसते. देव मूर्तीत नाही, त्याच्या सजावटीत नाही तर मानवतेच्या/ माणुसकीच्या आचरणात देव असतो. माणसाने माणसाशी चांगले वागणे हाच खरा धर्म आणि हीच खरी देवपूजा. आता नारायणाने स्वतः अवतार घेऊन नराला या सर्व परिस्थितीत तारावे अशी कामना कवी व्यक्त करतो आहे.

जोपासले -पाहिले, तोरा -तारा अशी शब्द योजना करून सहजपणे यमक अलंकार साधला आहे. तसेच ओळख व बुडून या शब्दावरील श्लेषही अतिशय सुंदर..

*

बुद्धीचा त्या माज चढला ज्ञानयोग विसरला

कर्मयोगाची नाही जाण कर्मकांडी रमला

भक्तीचा बाजार मांडिला धनवैपुल्य गुबारा

द्युलोका सोडूनी येउनी मानवास आवरा ||३||

*

माणसाला स्वतःच्या बुद्धीचा सार्थ अभिमान न उरता तो माजला आहे. तसे पाहिले तर बुद्धीचे दान हे ही ईश्वर मर्जीनेच /ईश्वर कृपेनेच लाभलेले आहे. तरीही त्या बुद्धीच्या जोरावर वाटेल ते करता येते आणि तसे केले तरी अडवणार कोण असा मस्तीचा /मिजाशीचा भाव मानवाच्या मनात राज्य करतो आहे. मला हवे तसे, हवे तेव्हा, हवे तेवढे मिळवण्यासाठी बुध्दीचा वापर करणे यात त्याला काही ही गैर वाटत नाही. असे करताना इतरांना त्रास झाला, काही गोष्टींचा ऱ्हास झाला तरी तो बेफिकीर असतो. ज्ञानाने सर्वांचे हित साधावे कुणाला त्रास देऊ नये हा अर्थ तो सोईस्करपणे विसरला आहे येथील ज्ञानयोग या शब्दावरील श्लेषही अतिशय सुंदर आणि समर्पक. जीव, जगत व परब्रम्ह यांचे यथार्थ ज्ञान शास्त्रांच्या, वेदांच्या अभ्यासाने व गुरुच्या साह्याने करून घेणे आणि त्यातून ब्रह्म ऐक्य जपणे/ अनुभवणे याला ज्ञानयोग म्हणतात. पण दुर्दैवाने माणूस हेही विसरला आहे. त्या प्रती त्याच्या मनात आस्था उरलेली नाही. या प्रमाणे अध्यात्मिक ज्ञान व विविध विषयांबाबतचे ज्ञान असे दोन्ही अर्थ इथे अभिप्रेत आहेत. माणूस ज्ञानयोग तर विसरलाच पण कर्मयोगाची ही जाणीव तो बाळगत नाही. आपल्या वाट्याला आलेले कर्म फळाची अपेक्षा न करता करावे हा खरंतर कर्मयोग! कर्मयोग साधता साधता मोक्षाची अपेक्षा करणे, त्या दिशेने प्रवास करणे हा भावही मनात उरलेला नाही. केवळ कर्मकांडात म्हणजे मूर्ती पूजा, जपतप, व्रत वैकल्ये यातच तो रमला. त्याचा खरा अर्थ जाणून न घेता मंदिरात व घरीही विविध याग, होम अशा प्रकारे कर्मकांड करण्यात तो धन्यता मानत आहे. देवा संबंधी विविध कर्मे करणे चूक नाही. किंवा वाईट तर मुळीच नाही. पण त्यामागचा खरा अर्थ जाणण्याची इच्छाशक्ती किंवा प्रयत्न माणूस करत नाही. हे सर्व केले म्हणजे आपण देवधर्म केला असा खोटा अहंकार आणि खोटा आनंद माणूस मिळवतो आहे. हा समज नक्कीच चुकीचा आहे. खरा भक्ती भाव, समर्पण भाव दूरच राहिला एवढेच नव्हे तर त्याचा केवळ बाजार मांडला आहे. बाजार शब्द योजिताना त्याचे केलेले प्रदर्शन हा भाव अभिप्रेत आहे. तसेच येथे बुवाबाजीकडे अंगुली निर्देश असावा असे वाटते. हे लोक देव असल्याचा आविर्भाव आणतात, त्यातून स्वतःचे हित साधतात. या भक्तीतून समाजाचे प्रबोधन किंवा हित करणे हा हेतू बरेचदा मनात नसतो ही. भक्तीचा बाजार मांडून त्यात विपुल धनाचा /संपत्तीचा देखावा मांडतात. त्याचा गुबारा म्हणजे फुगा होतो ही शब्दयोजना अप्रतिम. केवळ टाचणीने फुटणारा हा गुबारा किंवा फुगा अर्थात त्याला तेवढे मोल नाही, महत्त्व नाही तो खोटा पोकळ अभिमान आहे हे लक्षात आणून दिले आहे. अशा बेभान बेफाम, बेलगाम वर्तनापासून /वागण्यापासून मानवाला आवरण्यासाठी, त्याला थांबवण्यासाठी, परावृत्त करण्यासाठी, योग्य मार्गदर्शन करण्यासाठी हे ईश्वरा! द्यू लोक म्हणजे स्वर्गलोक जेथे देवांचा वास आहे(जिथे देव राहतात अशी कल्पना /धारणा आहे) सोडून पृथ्वीवर सत्वर या असे आवाहन कवीने केले आहे. विसरला -रमला, गुबारा -आवरा हे सहज सुंदर यमक कवितेला नादमयता प्राप्त करून देते. तसेच ज्ञानयोग आणि कर्मकांड या दोन शब्दांवरील श्लेष खरोखर अप्रतिम आहेत. कांड करणे म्हणजे चांगला मार्ग सोडून त्याचा त्याग करून चुकीचा मार्ग अनुसरणे, वाईट वागणे जसे द्वेष, वैषयिक वासना इत्यादी.. तसेच दुसरा अर्थ आपल्या वाट्याला आलेले कार्य किंवा कर्म करताना त्याविषयी प्रामाणिक नसणे.

*

चराचरांचा स्वामी म्हणवित मानव हा मातला

दया कणव न याला ठावे क्रौर्याचा हा पुतळा

वृक्षवल्लींचा पशुपक्ष्यांचा निर्घृण हा हत्यारा

इह्लोकाव्र अवतारुनी या सृष्टीला सावरा ||४||

*

स्वतःला चराचराचा, सृष्टीचा, तिच्या वैभवाचा, सौंदर्याचा, संपत्तीचा स्वामी समजून मानव हा माजला आहे. ज्या गोष्टींची निर्मिती करता येत नाही त्या निसर्गाकडून लुटणे, लुबाडणे हेच मानवाचे ध्येय बनले आहे. स्वतःच्या सुखा पलीकडे त्याला दुसरे काहीही लक्षात येत नाही. सृष्टीचे जतन, संवर्धन याविषयी जराही जाण तो मनात बाळगत नाही. स्वामी जसा उपलब्ध साधन सामग्रीचा/ संपत्तीचा उपभोग घेण्यात धन्यता मानतो, त्यावर स्वतःचा हक्क प्रस्थापित करतो तद्वतच मानवाची मनोधारणा झाली आहे. कुठल्याही व्यक्तीबद्दल, प्राणी पक्षी यां बद्दल, झाडांबद्दल कसलीही दया, कणव या भावना मनात उरलेल्या नाहीत. क्रौर्याचा स्वार्थांध पुतळा म्हणावा असे रूप त्याने धारण केले आहे. क्रोध, राग, संताप, वध/ हत्या, असूया, इर्षा, सुखलोलुपता, वासनांधता अशा काम क्रोधादी विकारांनी त्याला पछाडले आहे, तो त्यांच्या अधीन झाला आहे. लता- वेली, झाडे झुडपे, पशुपक्षी यांच्या विषयी कसलाही ममत्त्वाचा, कृतज्ञपणाचा भाव त्याच्या मनात शिल्लक नाही. त्यांची निर्घृण हत्या करताना तो मागे पुढे पाहत नाही. जी झाडे त्याला सावली देतात, फळे -फुले देतात त्यांच्या जतनाबद्दल, त्यांच्या संवर्धनाबाबत अजिबात जागरुकता दिसून येत नाही. मन मानेल तसे झाडे, फुले, पाने तोडणे, झाडे मुळासकट नष्ट करणे, त्यांचे अस्तित्व नेस्तनाबूत करून त्या जमिनी बळकावणे असे कृतघ्न पणाचे कार्य मात्र अविरत चालू आहे. पक्षांची -प्राण्यांची शिकार करणे हेही तो साहसाचे/धाडसाचे लक्षण समजतो त्यामुळे त्यांचा जीव जातो त्याची थोडीही जाण तो ठेवत नाही. संपूर्ण सृष्टीच्या जीवन चक्राचा ऱ्हास होतोय हे लक्षात घेत नाही किंवा लक्षात आले तरी तसे आचरण करत नाही. साऱ्या चराचराचा स्वामी स्वतःला समजून, अप्पलपोटेपणा मनात बाळगून, स्वार्थ साधून स्वतःचा जास्तीत जास्त फायदा करून घेऊन, चराचराचा ऱ्हास मात्र तो करतो आहे. कवी श्री दत्तगुरुना विनंती करतो आहे की इहलोकी अवतार घेऊन या सृष्टीला सावरा, सांभाळा. अन्यथा तिला अपरिमित हानी पोहोचवण्याचे क्रूर काम मानव करतच राहील. म्हणून- मानव हा अनुप्रास, हत्यारा -सावरा हे यमक सहजपणे साधून कवितेतील लय आणि नादमयता जपली आहे.

अतिशय वास्तववादी कविता आहे ही. सांप्रत स्थितीचे विदारक शब्दचित्र रेखाटले आहे कवितेतून. साध्या सोप्या शब्दातून, बोजड शब्दांचा वा अतिरेकी अलंकारिक भाषेचा मोह अजिबात ठेवलेला नाही. साहजिकच सर्व स्तरातील लोकांना समजेल, कळेल अशी ही कविता. कवितेतील वास्तव/ सत्यता नाकारता न येण्यासारखी आहे. डोळ्यात अंजन घालणारी, माणसाला माणूसकीच्या भावनांची जाणीव करून देणारी कविता. सध्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे, हाताबाहेर गेली आहे ही केवळ परमेश्वरच या परिस्थितीतून मानवाला आणि सृष्टीला तारून नेऊ शकतो. माणसाला लवकरात लवकर या साऱ्या परिस्थितीचे भान येवो, सद्बुद्धी लाभो अशी प्रार्थना ही आजच्या काळाची नितांत गरज आहे. उच्च शिक्षित, विद्याविभूषित डॉक्टर या नात्याने जगताना संवेदनशील जाणीव जपल्याने कवीला या भावना समजल्या आहेत. आणि त्यांनी त्या कवितेत शब्दबद्ध केल्या आहेत. ही कविता म्हणजे एक सामाजिक भक्ती काव्य आहे. मानवतावादी प्रार्थना आहे असे म्हणणे उचित ठरेल. मानवतेप्रती/समाजाप्रती अतिशय दुर्मिळ ठरेल अशा ध्येयवादी भक्ती भावनेने शब्दबद्ध केलेली प्रार्थना आहे. अशा प्रकारची प्रचारक, सुधारक भूमिका मांडण्याचे धैर्य आणि धाडस कवीने केले आहे. त्या साठी सादर प्रणाम!!!

© नीलिमा खरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments