नीलिमा खरे
काव्यानंद
☆ मावळतीवर… कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – नीलिमा खरे ☆
☆
प्रत्येक आरंभाचा अंत निश्चित, अटळ व अनिवार्य आहे. किंबहुना ते त्याचे प्राक्तनच असते म्हणा ना ! अर्थात जो उगवतो ,उदय पावतो तो मावळतो. जो जन्माला येतो त्याचे मरण अटळ असते.अशा प्रकारे उदय -अस्त व जन्म -मरण हे चक्र सृष्टीत, चराचरात अव्याहतपणे चालू असते .जातस्य हि ध्रुवो मृत्यु: हे संस्कृत वचन सारे जण जाणतो.तो निसर्गाचा नैसर्गिक नियमच आहे हे आपणास ज्ञात आहे. या जगात कोणीही अविनाशी ,अमर नाही. मात्र जेव्हा या जाणीवेचा, भावनेचा जगण्याशी ,आयुष्याशी संबंध जोडला जातो तेव्हा मन कातर होते. अनामिक भयाचे भय अंतरी दाटून येते. कळीकाळाचे कालातीत भय काळजाला वेदना देवून त्याला उदासीन बनवते. इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करायला हवी की अशा प्रकारे अंताच्या नियमाला अपवाद नसला तरी अंताकडे कसे पाहावे , त्या संदर्भात दृष्टिकोन कसा ठेवावा हे ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत जाणीवांवर व नेणीवांवर अवलंबून आहे.विचारशक्ती, बुध्दिमत्ता यांना वास्तव भावनेची जोड असेल तरच हे जमू शकते. अंत या संकल्पनेकडे तटस्थ बुद्धीने पाहणे व सत्याच्या जाणिवेचे आकलन झाल्याने तिचे भान ठेवणे शक्य होते. प्रत्यक्ष मरणापेक्षाही “पॅसेज टू डेथ “हा माणसाला जास्त भिवविणारा व घाबरवणारा असतो.आयुष्याच्या या प्रवासाकडे सजगतेने पाहणे , विचार करणे व तसे आचरण करणे यासाठी माणूस वेगळ्या मुशीचाच असावा लागतो असे म्हटले तर वावगे ठरू नये . माणूस मावळतीवर जरी आला तरी असा वेगळा दृष्टिकोन व विचार जाणीवपूर्वक विकसित केला तर तो स्वतःचे आयुष्य समाधानी वृत्तीने जगू शकतो.सर्वांना आपल्याशा आणि जवळच्या वाटणाऱ्या या विषयावरची डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांच्या “मावळतीवर” या कवितेचा आज रसास्वाद घेऊ या.
डाॅ. निशिकांत श्रोत्री
☆ मावळतीवर ☆
☆
निसर्गाने नेमलेल्या नियमांनी
नियतीने आखून दिलेल्या चाकोरीत
आयुष्याने नेलेल्या मार्गावर
जीवनक्रमण करत आलो
विहित कर्मे समर्पित निरपेक्ष बुद्धीने करता करता
मावळतीच्या क्षितिजासमीप
नकळतच येऊन पोहोचलो
*
उगवतीच्या कोवळ्या उन्हाचे
मध्यान्हाला झालेले रणरणते ऊन
हळू हळू कसे क्षीण होत गेले
मावळतीच्या क्षितिजावर
समजलेच नाही
*
तरीही याच लोभसवाण्या
भेडसावणाऱ्या मावळतीच्या क्षितिजावरून
हातून सुटलेले कित्येक छंद
जाणवतायत मोहकशी साद घालतांना
माझ्यातल्या लपलेल्या कौशल्यांना
उदयोन्मुख व्हायचे आव्हान देतांना
किती आतुरतेने
*
तिन्हीसांजेला उषःकालासाठी
मध्यरात्रीला भेटावेच लागेल
निसर्गाचे हे चक्र
उलटे कसे फिरेल माझ्यासाठी
पुन्हा उदयाची आंस असली तरी
परतीचा मार्ग
केव्हाच बंद झाला आहे
*
पुन्हा प्राचीवर यायला
मावळतीच्या क्षितिजा पलीकडे
बुडी मारायलाच हवी
पश्चिमेला मावळायालाच हवे
अस्त करून घ्यायलाच हवा.
©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
रसग्रहण: मावळतीवर
निसर्गाने नेमलेल्या नियमांनी
नियतीने आखून दिलेल्या चाकोरीत
आयुष्याने नेलेल्या मार्गावर
जीवनक्रमण करत आलो
विहित कर्मे समर्पित निरपेक्ष बुद्धीने करता करता
मावळतीच्या क्षितिजासमीप
नकळतच येऊन पोहोचलो
यथार्थ व अत्यंत समर्पक काव्य शीर्षक देण्याचे डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांचे साहित्यिक भान व कसब या कवितेच्या शीर्षकातही जाणवते. कवितेच्या अंतरंगाकडे व आशयाकडे हे काव्यशीर्षक सुस्पष्टपणे निर्देश करते. “मावळतीवर” या काव्यशीर्षकातून काव्यवाचकांना साधारणतः या कवितेतील व कवितेचा विषय लक्षात येतो . त्यासाठी आवश्यक असलेली मानसिकताही तयार होते व त्याचे शब्दरूप व भावरुप जाणून घेण्याची उत्कंठा प्रकर्षाने होते.
अंत,शेवट हा जरी अटळ असला तरी त्याचीही एक प्रक्रिया आहे. उदय हा अस्त होण्याआधी मावळतीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपतो. निसर्गातील ही बाब अतिशय सहजगत्या घडताना दिसते.हा संध्यासमय ,ही कातरवेळ नेहमीच मनाला स्पर्शून जाणारी असते कारण यावेळची भावावस्था काहीशी उदासीन, निराशाजनक होते. अशा परिस्थितीत व याच वेळेला अत्यंत विचारपूर्वक वागणे गरजेचे असते. निसर्गाचे रूपक घेऊन कवी हीच भावना आयुष्य जगताना ही अशाच प्रकारे जतन करावी हा संदेश सांकेतिक स्वरूपात देत आहे . आयुष्याच्या या टप्प्यावर कसे आचरण असावे याचा वस्तुपाठ देणारी ही कविता आहे.
मनात उदासीन भावनांना थारा न देता सकारात्मक विचार जपणे, जोपासणे गरजेचे असते. कवीच्या मनात या संदर्भात जे काही भावभावनांचे तरंग उमटले आहेत ते कवीने शब्दांकित केले आहेत. स्वतःच्या आयुष्याचा पट स्पष्टपणे मांडलेला दिसून येतो .कवी खरोखरच अशा पद्धतीने जगला आहे.ही केवळ कवी कल्पना वा कल्पनेचे मनोरे नाहीत तर त्याला वास्तविक सत्याचा स्पर्श झालेला आहे.
निसर्गाने नेमलेल्या नियमाने व नियतीने आखून दिलेल्या चाकोरीत कवीने आपल्या आयुष्याची मार्गक्रमणा केली आहे. असे करताना कधीच ,कुठल्याही प्रकारे का , कधी , केव्हा , कसे अशा पद्धतीचा विचारही त्याच्या मनाला शिवलेला नाही. अतिशय सहजतेने जीवनाची ही वाट त्यांनी अंगीकारलेली आहे व त्यावर वाटचाल केलेली आहे.नियतीने ,प्राक्तनाने अर्थात विधिलिखित असलेली कर्मे करणे व तसे करताना संपूर्ण समर्पित भावना व निरपेक्ष बुद्धी निरंतर जपणे हे सत्य मांडले आहे . विहित कर्मे ही पूर्णपणे पूर्वसंचितानुसार प्राक्तनी लिहिलेली असतात.ही सर्व कर्मे करत करत आता कवी मावळतीच्या समीप येऊन पोहोचलेला आहे. ही गोष्ट अगदी सहजपणे त्याच्याही नकळत घडून गेलेली आहे हेही स्पष्ट केले आहे. अशी ही सहज नैसर्गिक भावना जपणे ,जाणणे हे शक्य आहे हे स्वतःच्या आचरणातून जाणवून दिलेले आहे. निसर्गाच्या नियमांचे उल्लंघन करणे शक्य नाही व तसा विचार व्यावहारिक ही नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे. नियम पाळताना त्याला मनाने ,अंतर्गत विरोध केलेला नाही. प्रत्यक्षात,वास्तवात तर नाहीच नाही. त्यांचे काटेकोर पालन करून नियतीने दिलेल्या प्रत्येकाच्या आयुष्याची चाकोरी असते ती स्वीकारून जीवनक्रमणा केली असे म्हणताना ती आयुष्याने केली असे म्हटले आहे. इथे साधलेला हा चेतना गुणोक्ती अलंकार अतिशय समर्पक आहे. जे काही केले, घडले यात “मी” पणाचा अजिबात लवलेश नाही.यामुळे कवीच्या मनातील निरपेक्ष भावना ठळकपणे लक्षात येते.कवीने नियतीप्रती पूर्णतः समर्पित भावना व्यक्त केली आहे. व असे करताना कर्माप्रतीची प्रीती व श्रद्धा जाणीपूर्वक जपली व जोपासली आहे.
भारतीय संस्कृती व परंपरेनुसार आश्रम व्यवस्था मानण्यात आली आहे.
ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास हे चार आश्रम मानवजातीच्या जगण्यातील चार महत्त्वाचे टप्पे मानले आहेत.प्रत्येक टप्प्यावर त्या समयी कोणती कर्तव्ये उचित व अपेक्षित आहेत यासंबंधी मार्गदर्शन केले आहे.बालपण ,तारुण्य , गृहस्थाश्रम आणि जरा अर्थात म्हातारपण हा आयुष्याचा जीवनक्रम जसा आला तसा कवीने स्वीकारला आहे . या कवितेत मांडलेला विचार हा संन्यासाश्रमाच्या मुक्कामी पोहचल्यावर पार केलेल्या आधीच्या तीन आश्रमाचे सिंहावलोकन आहे.त्यावर टाकलेला सहेतुक दृष्टिक्षेप आहे.चाकोरी या शब्दावरील श्लेषात्मक अर्थ अतिशय यथार्थ आहे.या शब्दातून जीवनाच्या या चार अवस्था ,हे चार आश्रम व त्यातील सर्वांच्या बाबतीत असलेली समानता सूचित केली आहे. यात कोणाच्याही बाबतीत कसलाही बदल होत नाही या अर्थाने हे चाकोरीबद्ध आयुष्य असा भावार्थ अपेक्षित आहे. तसेच ही चाकोरी नियतीने आखून दिलेली आहे. त्या अंतर्गतच आयुष्य सीमित आहे, मर्यादित आहे हे लक्षात आणून दिले आहे.
“जीवनक्रम” यामधील श्लेष ही अतिशय सुंदर आहे.जीवनाचा क्रम आणि ज्या क्रमाने तो येतो तो भाव जाणून तसे जगणे , मार्गक्रमणा करणे हे दोन्ही अर्थ अभिप्रेत आहेत. अतिशय मार्मिकतेने व तितक्यात सहजतेने कवितेचा भाव जपून कवितेतील आशय वृद्धिंगत केला आहे.”विहित”या शब्दातून अपेक्षित तसेच शास्त्र व समाज यांनी मान्य केलेली आणि मनाने निर्धारित केलेली कर्मे करणे हा विचार सुस्पष्टपणे व्यक्त केला आहे. तसेच पूर्व संचिताकडे निर्देश केला आहे.
कवीने कुठल्याही अनैतिक वा गैरमार्गाचा वापर व तशी कृत्ये केलेली नाहीत हा गर्भितार्थ लक्षात येतो. कुठल्याही प्रलोभनांशी हात मिळविणी केलेली नाही. नैतिकतेशी समझोता केलेला नाही.नैतिकता व सद्सदविवेक बुद्धीला स्मरून,जागून सरळ मार्गाने जीवनक्रमणा केली. एवढेच नव्हे तर असे आचरण करताना निरपेक्ष बुद्धीने त्यांच्या फळाची अपेक्षा न ठेवता श्रद्धापूर्वक आयुष्य जगण्याचा सफल प्रयत्न केलेला आहे.”इदम न मम” तसेच “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन”ही श्रीभगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णाची शिकवण ग्राह्य धरून, अंगीकारून तसे आयुष्य जगण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे. केलेल्या कर्माची फळे स्वतः करता आहेत,असतात अशी अपेक्षा केली नाही व ती समाजाप्रती, ईश्वराप्रती समर्पित केली. आणि अशा तऱ्हेने अतिशय उच्च दर्जाचे श्रद्धापूर्ण व कर्माधिष्ठीत जीवन जगता जगता मावळतीच्या क्षितिजापर्यंत म्हणजेच जीवनाच्या संध्यापर्वात कवीने प्रवेश केला आहे. मावळतीच्या उंबरठ्याची समीपता कवीला कळाली आहे हे सूचित केले आहे. अर्थात हे सारे अगदी सहजगत्या घडले आहे, निसर्ग नियमानुसार घडले आहे हा भाव व्यक्त केला आहे. मावळती म्हणजे पश्चिम दिशा, ज्या दिशेला सूर्य अस्त पावतो. क्षितिज हे असीम ,अमर्याद, अथांग, अज्ञात आहे. अशा या क्षितिजाची समीपता जाणवल्याने सहजपणे त्याच्याही नकळतच वास्तवाची जाणीव झालेली आहे. अत्यंत सहजतेने अत्यंत मनःपूर्वक व रूपकात्मक पद्धतीने निसर्ग नियमानुसार , नियतीने आखून दिलेला जीवनक्रम व तसे विहित कार्य करणे हा अतिशय महत्त्वाचा मानवधर्म कवीने अंतःकरणापासून निरंतर जपला आहे. व त्यानुसार जगण्याचा प्रामाणिक, प्रांजल प्रयत्न केलेला आहे.
या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ती मुक्त छंदात रचलेली प्रथम पुरुषी एकवचनी कविता आहे.निसर्गाने नेमलेल्या नियमांनी यामधील अनुप्रास अतिशय लोभस आहे. यथोचित उपमा ,रूपके , श्लेष व चेतनागुणोक्ती यांची अर्थपूर्ण मांडणी कवितेतील आशय मनावर पूर्णपणे ठसविण्यात यशस्वी होते. कवितेतील भावनेला सुयोग्य ,समर्पक साहित्यिक अलंकारांचा साज सुशोभित करतो. व असे करताना त्यातील सुलभपणा जपलेला जाणवतो. साहजिकच यातून कवीचा विचारातील प्रामाणिकपणा, प्रांजळपणा व विषयाशी असलेली बांधिलकी प्रकर्षाने लक्षात येते.
उगवतीच्या कोवळ्या उन्हाचे
मध्यान्हाला झालेले रणरणते ऊन
हळू हळू कसे क्षीण होत गेले
मावळतीच्या क्षितिजावर
समजलेच नाही
“मावळती” ही या कवितेची मुख्य कल्पना व संकल्पना आहे . तदनुषंगिक झालेला, घडलेला आयुष्याचा प्रवास समांतर पद्धतीने या कवितेत शब्दबद्ध केलेला आहे. साहजिकच सूर्याचे उगवल्यानंतरचे हवेहवेसे वाटणारे कोवळे ऊन, त्याचा सोनसळी स्पर्श, त्याची चमक मनाला मोहून टाकते तसेच जीवनाचे झालेले आहे. सुंदर हवेहवेसे वाटणारे साजिरे बालपण सुखात ,आनंदात व्यतीत होते. आयुष्यातील नानाविध क्षेत्रे खुणावत असतात. जीवन हे मोहक आहे असे वाटू लागते. अर्थात ते तसे आहे ही.परंतु तेव्हा जीवनातील संकटांचा, अडचणींचा सामना करावा लागतो ही भावना बालमनाला माहीतच नसते .तारुण्य आणि गृहस्थाश्रम यात पदार्पण केल्यानंतर मात्र त्या भवसागरातील अडचणींचा, समस्यांचा ,आपदांचा ,विपदांचा सामना करणे अटळ ठरते आणि या सर्वांची तुलना मध्यान्हीच्या रणरणत्या उन्हाशी केलेली आहे. अतिशय सुयोग्य, अर्थवाही व अर्थपूर्ण रूपकातून ही भावना व्यक्त केली आहे. सूर्याच्या सुरुवातीच्या कोमल , उबदार, आश्वासक स्पर्शानंतर त्याचे मध्यान्हीचे ऊन भोगणे क्रमप्राप्तच असते. सूर्योदयानंतर साऱ्या चराचराला जगण्याची प्रेरणा व चेतना मिळते हीच भावना आयुष्याच्या सुरुवातीला असते. जसजसा सूर्य माथ्यावर तळपू लागतो व त्या बरोबरीनेच आयुष्य ही चालू राहते तेव्हा त्याची दाहकता ,धग, झळ ,अफाट व अटळ असते. ती सोसणे , अनुभवणे याला तरणोपाय नाही. चढल्यानंतर उतरणे क्रमप्राप्त आहे. जीवनाची उन्नत व प्रगत अवस्था उपभोगल्यानंतर शारीरिक दृष्टीने आयुष्य उतरणीला लागते . सूर्याची मध्यान्हीची सर्वात उंच अवस्था हळूहळू लोप पावू लागते. त्यातली दाहकता, त्याचे तेज, त्याचा तेजस्वीपणा हळूहळू क्षीण होत जातो.जोश , उत्साह व त्याची प्रभा क्षीण होत होत,मंदावत संपूर्णपणे समाप्तीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचते. हे सर्व होताना नेहमीप्रमाणेच सूर्यास्त होतो आणि तो क्षितिजापार अंतर्धान पावतो हे मानवी मनाने सहजपणे स्वीकारलेले आहे. किंबहुना त्याकडे एखादी वेगळी घटना म्हणूनही पाहिले जात नाही, ती अत्यंत नैसर्गिक बाब आहे हे मनाने जाणून घेतलेले आहे. तद्वतच आयुष्याचे मावळतीवर येणे ही भावनाही अत्यंत सहज व नैसर्गिक आहे हे कवीने लक्षात आणून दिले आहे. या सर्व घटना नकळतच सहजरीत्या घडत असतात त्यामुळे त्याची जाणीव मनाला त्या स्थितीपर्यंत आल्यानंतरही सहजपणे ध्यानात येत नाही. ही कविता मुक्तछंदातील असूनही त्यातील लय व नाद कवीने जपलेला आहे त्यामुळे ती कुठेही क्लिष्ट वाटत नाही .तिला गेयतेचा सुंदर स्पर्श झालेला आहे.
तरीही याच लोभसवाण्या
भेडसावणाऱ्या मावळतीच्या क्षितिजावरून
हातून सुटलेले कित्येक छंद
जाणवतायत मोहकशी साद घालतांना
माझ्यातल्या लपलेल्या कौशल्यांना
उदयोन्मुख व्हायचे आव्हान देतांना
किती आतुरतेने
काही अंशी नव्हे खरे तर बऱ्याच प्रमाणात व तीव्रतेने भेडसावणारी व त्यामुळे मनाला उदासीन बनवणारी अवस्था सामोरी ठाकली असतानाही कवीला मात्र ती जाणीव मनात असूनही विविध सकारात्मक भावना साद घालत आहेत.
लोभसवाणा हा अत्यंत सुंदर शब्दयोजून हवाहवासा ,त्याकडे खेचणारा ,आकृष्ट करणारा, आमंत्रण देणारा असा अपेक्षित भाव अतिशय सुंदर पद्धतीने व्यक्त केलेला आहे.आयुष्याच्या क्षितिजावर प्रसन्न आभा पसरलेली आहे आणि हातातून निसटून गेलेले क्षण काही छंद मन कातर करत आहेत. मावळण्याची हुरहुर आहे व “संध्या छाया भिवविती हृदया” अशी मनाची भावावस्था झालेली आहे.
भेडसावणारा हा ही अत्यंत अर्थवाही शब्द आहे. त्यात लपलेल्या विविध छटा कवितेतील आशयाला पूरक आहेत .घाबरवणारा ,दहशत घालणारा, भीती देणारा, भिवविणारा ,धमकी देणारा असे विविध भाव या एका शब्दातून आपल्याला समजतात.त्याबद्दल कवीच्या मनात कुठलाही त्रागा, खंत ,खेद वा दुःख नाही. उलट पक्षी हे मावळतीचे क्षितिज त्याला लोभसवाणे वाटते आहे.मनातली उमेद अजूनही ताजीतवानी, जागी व सक्षम ही आहे. सुटून गेलेली, राहिलेली, कालौघात ,जीवनाच्या रहाटगाडग्यात,संसारात व व्यवसायात गुरफटल्याने समाजास दृगोचर न झालेली, दृष्टीस न पडलेली ,संधी न मिळाल्याने प्रगट न झालेली कौशल्ये त्याला खुणावत आहेत. उदयोन्मुख या शब्दातूनही प्रथम
प्रादुर्भूत होणारे ,अस्तित्वात येणारे, दिसणारे ,विकसित होणारे या अर्थाच्या सर्व अपेक्षित छटा अधोरेखीत होतात. छंदांवषयी त्याच्या अंतरंगातली ओढ त्याला जाणवते आहे. अर्थात ते राहिले म्हणून त्याला वाईट अजिबात वाटत नाही. कारण त्यावेळी मनापासून स्वीकारलेल्या पेशाप्रती शंभर टक्के योगदान देण्याचा त्याचा प्रयत्नही तितकाच प्रांजळ व मनापासूनचा होता. त्यामुळे काही “सुटून गेल्या” मधील खेदाचा भाव अजिबात मनात बाळगलेला नाही. साहजिकच या भेडसावणाऱ्या क्षितिजाला घाबरून न जाता त्यातील लोभसपणाकडे आकर्षित होऊन कवीच्या मनात अजूनही काही ठोस,भरीव कामगिरी करण्याची भावना आहे. व्यावसायिक पेशातील कार्यबाहुल्यामुळे व व त्या प्रती अतिशय समरसून काम करताना वेळेअभावी जपता न आलेले , सुटून गेलेले अंतरीचे छंद त्याला मोहकशी, मोहात पाडणारी साद घालत आहेत. शारीर अवस्थेपेक्षाही प्रबल असलेली ही भावनिक अवस्था जपणे व जाणणे ही अतिशय कौतुकाची बाब आहे.अंगातील विविध कला कौशल्य उदयोन्मुख होण्यासाठी, उदयास येण्यासाठी त्याला नुसती खुणावत नाहीत तर आव्हान देत आहेत. ही कला कौशल्ये आत्मसात करून त्यांच्यातही कसब प्राप्त करणे हे अजूनही शक्य आहे ही भावना खूप महत्त्वाची आहे आणि हे सर्व काही अतिशय आतुरतेने , आनंदाने घडत आहे. साहजिकच जीवनातील विविध अंगांचा, अंगातील सुप्त कलागुणांचा पाठपुरावा करणे हा मोह व त्याचे आकर्षण कवीला या वयातही पडत आहे. मावळतीच्या उंबरठ्यावर असतानाही अस्ताची भीती न बाळगता या भेडसावणाऱ्या क्षितिजापलीकडील वेगळेच क्षितिज त्याला साद घालत आहे. आव्हाने पेलण्याची त्याची मानसिक ताकदही अजून अस्तित्वात आहे, शिल्लक आहे हे लक्षात येते.
तिन्हीसांजेला उषःकालासाठी
मध्यरात्रीला भेटावेच लागेल
निसर्गाचे हे चक्र
उलटे कसे फिरेल माझ्यासाठी
पुन्हा उदयाची आंस असली तरी
परतीचा मार्ग
केव्हाच बंद झाला आहे
तिन्ही सांज अर्थात कातरवेळ येऊन ठेपलेली आहे. या समयी साधारणत: सूर्यास्ताची वेळ असते .सकाळ व दुपार हे दोन समय सरून गेलेले असतात. व रात्रीच्या पर्वाला सुरुवात होण्याआधीचा हा तिसरा समय म्हणून त्यास तिन्ही सांज संबोधतात. हेच कालचक्र माणसाच्या आयुष्याशी निगडित आहे.
यथावकाश अंताकडे वाटचाल होणार आहे .उत्पत्ती नंतर लय व लयानंतर उत्पत्ती या नियमानुसार रात्री नंतर येणाऱ्या उषःकालासाठी रात्रीला नव्हे तर मध्यरात्रीला म्हणजे रात्रीच्या परमोच्च बिंदूलाही आता भेटावेच लागणार आहे. रात्रीची नुसती सुरुवात होऊन उपयोग नाही तर तिचा चरमबिंदू साधला गेल्यानंतरच उषेचे सोनेरी सुप्रभातीचे सत्य प्रत्यक्षात येणार आहे. मध्यानंतर परत सामोऱ्या येणाऱ्या उतरत्या किंवा चढत्या अवस्थेला सामोरे जावे लागते ,त्या अवस्थेतून भ्रमण करावे लागते. निसर्गाचे हे चक्र नियमित व अटळ आहे. निसर्गाचा हा नियम पाळल्यानंतरच ते निसर्गाचे चक्र त्याने घालून दिलेल्या चाकोरी प्रमाणे चालू राहणार आहे. साहजिकच कवी म्हणतो की केवळ माझ्यासाठी हे निसर्गाचे चक्र उलटे कसे फिरेल ,अर्थातच ते फिरणार नाही याची जाणीव त्याला मनोमन आहे.. उदयाची आस कितीही तीव्र व खरी असली तरी त्या साचेबद्ध चाकोरीतून गेल्याशिवाय म्हणजेच अस्ताविना परत उदयाला येणे, अस्तित्व लाभणे हे होणे नाही .मध्यातून परतीचा मार्ग केव्हाच बंद झालेला आहे हे निमूटपणे व मनापासून मान्य करणे हेच केवळ हातात उरलेले आहे.त्यामुळे मरणाची भीती न बाळगता त्याला सामोरे जाणे, त्याला भेटणे, त्याच्यात सामावून जाणे हे गरजेचे आहे. त्याला पर्याय नाही.येथे क्षणभंगुर देह नष्ट होऊन अविनाशी आत्म्याचा उदय परत होणार असा अर्थही अभिप्रेत असावा असे वाटते.पुनरपि जननम् पुनरपि मरणम् मधील आशावाद मनात रुंजी घालत आहे.भारतीय परंपरेत पुनर्जन्म मानला जातो.नष्ट वा अंत झालेल्या देहातील आत्मा अमर आहे व तो पुन्हा जन्म घेतो या कडे कवीने लक्ष वेधले आहे.या दृष्टीने या कवितेचे भावनिक मोल अमूल्य आहे.
निसर्गातील रूपकांचा दाखला देत संपूर्ण मानवी जीवनाचा चलपट शब्दांकित केलेला आहे. सहज सोपे सुलभ शब्द वापरून अत्यंत मोठा जीवनविषयक अर्थ या कवितेतून मांडलेला आहे.
पुन्हा प्राचीवर यायला
मावळतीच्या क्षितिजा पलीकडे
बुडी मारायलाच हवी
पश्चिमेला मावळायालाच हवे
अस्त करून घ्यायलाच हवा.
मावळतीवर पोचल्यावर दृष्टिकोन कसा असावा, कसा ठेवावा याचे विवेचन करून झाल्यानंतर त्याचे सार या शेवटच्या कडव्यात सांगितले आहे. संपूर्ण कवितेचा कळसाध्याय म्हणता येईल असे हे कडवे आहे. पुन्हा प्राची (पूर्वेला) उगवण्याकरता सूर्याला जसे मावळतीला (पश्चिमेला) क्षितिजा पलीकडे बुडी मारणे गरजेचे आहे तद्वतच अगदी तसाच दृष्टिकोन माणसाने जीवनाप्रती ठेवला पाहिजे ही जाणीव सुस्पष्टपणे करून दिलेली आहे .व ती करून देताना अत्यंत सकारात्मक भावना ठेवलेली आहे .दुःखाचा लवलेशही त्यात नाही. “बुडी मारणे” या शब्दातून पूर्णतः ,संपूर्णतः हा भाव स्पष्टपणे सांगितला आहे. ही जाणीव हृदयातून पूर्णपणे स्वीकारायला हवी ,अंशतः नाही हे लक्षात आणून दिले आहे. पुन्हा उदयाची आस मनात ठेवल्याने वा असल्याने मावळतीच्या मार्गे अस्ताला पोहोचणे हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे अज्ञात , अथांग ,असीम क्षितिजाच्या पलीकडे बुडी मारल्या विना ,पश्चिमेला मावळल्याविना पूर्वेला उदय होणार नाही हे लक्षात घेणे किती गरजेचे आहे हे ध्यानात येते. सूर्य व माणसाचे जीवन यांचा आयुष्यपट समांतर तऱ्हेने मांडून जीवनाची उकल सोपी ,सहज करून सांगितली आहे . प्रत्येकाला आपला जीवनक्रम डोळ्यासमोर येतो तेव्हा हीच गत होते. त्यामुळे या भावनेशी संबंध जोडला जातो ,ती भावना अंतःकरणापासून उमगते.
संपूर्ण कवितेत जगण्याचे भान दिले आहे. आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वर्णिला आहे .कर्म करता करता फळाची अपेक्षा न धरता निसर्ग नियमाने चालावे ,वागावे व अटळ सत्याकडे डोळसपणे पाहण्याचे ध्येय बाळगणे श्रेयस्कर आहे हे स्पष्ट केले आहे. आयुष्यामध्ये रुसवा ,राग , कुठल्याही प्रकारचा सवाल उपस्थित करणे योग्य नाही. पूर्णपणे आशावाद आणि सकारात्मकता जागवणारी ही कविता आहे. जीवनाचा दर्जा ,जीवनमान ,जीवनस्तर चांगल्या प्रतीचा होण्याकरिता जो मार्ग अनुसरायला हवा तो सोदाहरणातून कवीने दाखवला आहे. म्हातारपणाकडे नेणारा अटळ प्रवास दुःखदायी होणार नाही याकरता विचारांची व आचारांची सहेतुक सांगड घालणे हा महत्त्वाचा संदेश यात दिलेला आहे. कवितेतील यथार्थ शब्दयोजना अत्यंत महत्त्वाची आहे. कवितेत योजलेला शब्द न शब्द त्याचा स्वतःचा विशिष्ट अर्थ घेऊन काव्यवाचकांच्या समोर प्रकट झाला आहे .अर्थातच त्यामुळे कवितेत मांडलेल्या भावनेला कमालस्तर प्राप्त झाला आहे. व कवितेच्या अर्थाला उंची व खोली लाभलेली आहे. कवितेचा काव्यरसिकांच्या मनावर होणारा परिणाम परिणामकारकतेने साधला गेला आहे. मुक्तछंदातील या काव्यरचनेला लय ताल लाभलेला आहे .उगाचच साहित्यिक अलंकारांचे अवडंबर व अवास्तव आग्रह न धरता,सर्वांना सहजपणे सुलभतेने कळेल अशी ही रचना केलेली आहे. व असा दृष्टिकोन कवितेतील आशयाला व भावार्थाला अनुरूप आहे. या कवितेतील अर्थ सजगपणे ,सखोलपणे ,सूज्ञपणे व समंजसपणे समजून घेतला तर मावळतींचा उंबरठा उदासीन कुणाला ही बनवणार नाही. भूत व वर्तमान यांचे भान ठेवून भविष्यकाळाचा वेध घेणारी नजर कवीला लाभली आहे. आपल्यालाही अशी नजर लाभावी असा विचार नक्कीच मनात डोकावतो. ही कविता म्हणजे आयुष्याच्या प्रवासाचे सुंदर व लोभस प्रतिबिंब आहे. त्यात सरणारा काळ आणि माणसाच्या प्रतिभेचा व आवडीचा आविष्कार व त्याच्या शोधातला पाठपुरावा यामधला प्रवास स्पष्ट केला आहे. भाषा संपन्न, अलंकारिक व उद्बोधक आहे .जीवनचक्र त्यातील चढ-उतार यांना सूर्याच्या रूपकातून स्पर्श करण्याची कल्पना प्रेरणादायी व विचार करायला प्रवृत्त करणारी आहे. सूर्योदय ते सूर्यास्त हा सूर्याचा जीवनक्रम माणसाच्या जीवन चक्राशी साधर्म्य दर्शवतो. सांजवेळ ही संध्या प्रकाश दाखवते तर क्षितिज हे आयुष्याची सीमा दर्शवते. ही कविता प्रत्येकाला विचार करायला प्रवृत्त करते. मातृभाषेतून व्यक्त केलेली भावना संस्कृतीला व परंपरेला धरण्याचे महत्त्वाचे कार्य करते .कवितेचा आकृतीबंध व रचना कवितेचा सर्वांगीण व सर्वंकष प्रभाव वाढवते.
© नीलिमा खरे
२५-८-२०२४
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈







खूप सुंदर रसग्रहण केले आहे. डॉ. श्रोत्री यांचे लेखन अत्युच्च दर्जाचे असते.