श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “समग्र जिम कार्बेट” – लेखक : जिम  कार्बेट – मराठी अनुवाद : सुश्री वैशाली चिटणीस ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : “ समग्र जिम कॉर्बेट “.

लेखक : जिम कॉर्बेट 

अनुवाद : वैशाली चिटणीस 

प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन 

पृष्ठे: ८९०₹

मूल्य: ९९९₹ 

एडवर्ड जेम्स कॉर्बेट ऊर्फ जिम कॉर्बेट (इ. स. २५ जुलै १८७५ ते १९ एप्रिल १९५५) हे एक निसर्गअभ्यासक व निष्णात शिकारी म्हणून विश्वविख्यात आहेत.

जिम कॉर्बेट यांनी जंगली प्राण्यांच्या जीवनक्रमाचा सखोल अभ्यास तर केलाच, पण असंख्य फोटोग्राफ्स, अनेक पुस्तके या द्वारा शहरी माणसाला वन्य जीवनाबद्दल -निसर्गाबद्दल सज्ञान केलं. एकूणच, जिमने निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी बदलून टाकली. इतकेच नव्हे तर, माणसाला निसर्गाच्या अधिकाधिक जवळ नेलं!

ब्रिटीश राजवाटीत मनोरंजनासाठी शिकार करण्याच्या रूढ पद्धतीला जिम कॉर्बेट यांनी आव्हान दिलं! त्याहीपुढे जाऊन जंगली प्राण्यांच्या संरक्षणार्थ कायदे केले जावेत, यासाठी त्यांनी भारतात जे काही प्रयत्न केले, त्याला तोड नाही. त्याची दखल अवघ्या जगाला घ्यावीच लागली.

मूळचे शिकारी असलेल्या द्रष्ट्या जिम कॉर्बेट यांना प्रकर्षाने जाणवले की, जंगलातील नैसर्गिक वाघांची आणि इतर मोठ्या वन्य जिवांची संख्या कमी होत चालली आहे. म्हणून त्यांनी बंदुकीऐवजी कॅमेरा वापरून वाघ आणि इतर वन्य जीव टिपले. फक्त नरभक्षक झालेले वाघ आणि बिबटे यांची शिकार त्यांनी केली. १९०७ ते १९३८ या काळात सुमारे १, ५०० लोकांना मारणाऱ्या डझनभर वाघ आणि बिबट्यांना त्यांनी मारले.

नरभक्षक वाघ व त्यांच्या शिकारींच्या हकीकती व निरीक्षणे जिमने पुस्तक रुपाने प्रकाशित केल्या. एकूण १९ नरभक्षक वाघ आणि १४ नरभक्षक बिबट्यांची शिकार जिम यांनी केली.

चंपावतच्या नरभक्षक वाघाने ४३६ लोक तर पानारच्या नरभक्षक बिबट्याने ४०० लोकांचे बळी घेतले होते. या आणि अशाच इतर नरभक्षकांविषयी आणि जंगलातील त्यांच्या इतर अनुभवांविषयी जिम यांनी लिहिलेली सर्व पुस्तके जगभर गाजली. जगातील सुमारे २७ भाषांमध्ये त्यांची भाषांतरे झाली.

कॉर्बेट यांचा जंगली जनावरांबाबतचा अभ्यास व अंदाज दांडगा होता. हे लक्षात घेऊन १९२५ मध्ये नरभक्षक प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ब्रिटीश शासनाने त्यांना खास बोलावून घेतलं. त्यावेळी गढवाल-रुद्रप्रयाग परिसरात नरभक्षक वाघ व बिबळ्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला होता. तीनशेच्या वर नरबळी घेऊन देखील या प्राण्यांचा बंदोबस्त होत नव्हता! या पार्श्वभूमीवर कार्बेट यांनी सरकारने देऊ केलेल्या सुविधा व स्थानिक लोकांच्या सहाय्याने गढवाल-रुद्रप्रयागच्या विस्तीर्ण क्षेत्राची नाकेबंदी केली आणि तिथल्या नरभक्षक प्राण्यांना ठार मारण्यात यश मिळवलं!

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात देखील युद्धसराव करणाऱ्या जवानांना तिथल्या निसर्ग निरीक्षणाचे धडे देऊन कॉर्बेट यांनी प्रशिक्षित केलं! यासाठी कैसर-इ-हिंद आणि स्टार ऑफ ब्रिटिश एम्पायर या पदव्या देऊन ब्रिटीश सरकारने त्यांच्या कार्याचा उचित सन्मान केला.

खिळवून ठेवणारं लेखन करणारा साहित्यिक आणि निष्णात शिकारी म्हणून कॉर्बेट प्रसिद्ध आहेतच, पण त्याशिवाय त्यांच खरं योगदान हे आहे की, त्यांनी वन्य प्राण्यांच्या संरक्षणाखातर केलेल्या प्रयत्नांमध्ये आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या जंगलतोडीमुळे वनस्पती व कित्येक प्राण्यांच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर असताना त्यांच्या संरक्षणार्थ सरकारने खास कायदे केले पाहिजेत, अशी मागणी करुन कॉर्बेट यांनी त्यासाठी स्वतः प्रयत्न केले. कुमाऊं क्षेत्राचं अभयराण्य व्हावं, अशी जिम यांची मोठ्या प्रमाणावर इच्छा होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं! १९३६ मध्ये रामगंगा खोऱ्याचा परिसर राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर केला गेला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नैनीताल परिसरातील स्वतःची सर्व मालमत्ता जन्माने आयरिश असलेल्या जिम कॉर्बेट यांनी भारतालाच अर्पण केली आणि आपल्या कर्मभूमीतच कमाऊं जनतेच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी अखेरपर्यंत मदत करीत राहिले. त्यांच्या या कामाची दखल घेऊन भारत सरकारने १९५७ मध्ये कुमाऊं परिसरातल्या राष्ट्रीय उद्यानाला जिम कॉर्बेट यांचं नाव देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला.

जिम कॉर्बेट वंशाने भारतीय नसले, तरी त्यांचा जन्म भारतातल्या नैनितालमध्ये झाला आहे. तसंच आपल्याला ते ‘वाघांचा शिकार करणारा शिकारी’ म्हणून परिचित असले, तरी ‘शिकार करण्याचा आनंद घेणारा शिकारी’ या घट्ट, निष्ठुर चौकटीत या माणसाला बंदिस्त करता येत नाही. उलट जंगलं, प्राणी, निसर्ग आणि त्याचाच भाग असलेली माणसं असं तो सगळं एकसंध पाहतो. शिकार करतानाची जिम कॉर्बेटची तन्मयता जितकी लोभस आहे, तितकीच त्या प्राण्याबाबतची आत्मीयताही! म्हणूनच या थरारक कथा रूढार्थाने आपल्याला हिंसक भावनेचा प्रत्यय देत नाहीत. उलट त्या माणसातला निसर्ग जागा करणार्या किंवा शाबूत ठेवणार्या कथा आहेत.

या पुस्तकामधल्या बहुतेक गोष्टी नरभक्षक वाघांसंदर्भातल्या आहेत. त्यामुळे वाघ नरभक्षक का होतात, हे सांगणं क्रमप्राप्त ठरतं.

परिस्थिती वाघाच्या नियंत्रणाबाहेर जाते, तेव्हा कोणताही वाघ परिस्थिती अनुरूप आहार स्वीकारतो. थोडक्यात सांगायचं, तर तो स्वतःहून नरभक्षक झालेला नसतो, तर तसं होणं त्याच्यावर लादलं गेलेलं असतं. परिस्थितीमुळे वाघ नरभक्षक होतात, हे अधिक स्पष्ट करून सांगायचं, तर दहापैकी नऊ प्रकरणांमध्ये वाघ जखमांमुळे, तर एका प्रकरणामध्ये वृद्धापकाळामुळे नरभक्षक झाल्याचं आढळलं आहे. शिकारीदरम्यान शिकाऱ्यांनी निष्काळजीपणे केलेल्या गोळीबारामुळे वाघाला जखमा झाल्याचं दिसून आलं आहे. अशा वेळी संबंधित शिकाऱ्याने माग काढत जाऊन त्या जखमी वाघाला कायमचं वेदनामुक्त करणं गरजेचं असतं, पण शिकाऱ्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाघ नरभक्षक झाल्याचं नरभक्षक वाघाशी संबंधित एका प्रकरणामध्ये निदर्शनास आलं. त्याचबरोबर साळिंदराची शिकार करताना वाघाला झालेल्या जखमांमुळे तो नैसर्गिक पद्धतीने शिकार करू शकत नसल्याने नरभक्षक झाल्याचंही आढळून आलं आहे. ‘माणूस’ हे काही वाघाचं नैसर्गिक अन्न नाही, पण वृद्धत्वामुळे किंवा जखमांमुळे वाघ जेव्हा शिकार करू शकत नाही, तेव्हा तो जगण्यासाठी नाइलाजाने माणसाची शिकार करून त्यावर गुजराण करायला सुरुवात करतो.

या कथा आजही आपल्याला इतकं वेधून का घेतात? कारण पांढरपेशा जगण्यातला चूक-बरोबरचा फास आणि तो आवळण्यासाठीचे गळे या कथांना ठाऊक नाहीत. यांच्या ठायी नर्मविनोद आहे, पण त्यांना उपेक्षा करणं माहीत नाही. त्या उघड्या तोंडाच्या गोष्टी आहेत. राग-लोभासहित माणसातला निसर्ग आणि निसर्गासकटचा माणूस पोटात घेणार्या गोष्टी आहेत. म्हणूनच त्या वाघांच्या शिकारीच्या उत्कंठेसाठी वाचल्या जात असल्या, तरी निश्चितच फक्त वाघांपुरत्या मर्यादित राहत नाहीत… स्वतःतल्या खोल जंगलात उतरायला त्या आपल्याला भाग पाडतात.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments