वाचताना वेचलेले
☆ राग… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष ☆
☆
परवा एका मर्डर केसमधील आरोपीला जमानतकामी भेटण्याकरता आणि वकीलपत्रावर सही घेण्याकरता येरवडा येथील जिल्हा कारागृह येथे गेलो होतो. परंतु जायला थोडा उशीर झाल्यामुळे वकीलपत्रावर सही आणि भेटण्या करता 3. 30 वाजेपर्यंत थांबावे लागणार होते.
त्यामुळे थोडी विचारपूस करण्याकरता इकडे तिकडे व्यक्ती शोधत असताना, मला एक कैद्याचे कपडे घालून असलेला एक माणूस दिसला. तो कारागृहासमोरील मैदानाची साफ सफाई करीत होता. मी त्याच्याकडून कारागृह प्रशासनाविषयी आणि इतर माहिती घेतली. तो स्वभावाने अतिशय शांत आणि संयमी व्यक्तीसारखा भासत होता. मी त्याचा स्वभाव बघून त्याला त्याचे नाव गाव विचारले. त्यावर त्यानी रमेश (बदललेले नाव) आणि गाव पुणे. (बदललेले ठिकाण)सांगितले. त्यानंतर संभाषण वाढविण्यासाठी मी त्याला कोणत्या गुन्ह्यामध्ये अटक आहात आणि केस अंडर ट्रायल चालू आहे का? हे विचारले.
त्यावर तो म्हणाला की, “मी 302(खून) च्या केसमध्ये अटक आहे आणि सध्या अंडर ट्रायल नाही तर मला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. परंतु मी व माझ्या घरातील लोकांनी सदर शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केली असल्याचे सांगितले. “
मी त्याला सहजपणे विचारले, ” तू तर एकदम शांत आणि संयमी दिसतोस आणि बोलण्यावरून सुशिक्षित आणि चांगल्या कुटुंबातील मुलगा दिसतोस. तू मर्डर केला या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही. ” त्यावर रमेश म्हणाला की, “हो साहेब. मी सुशिक्षित आणि चांगल्या घरातील आहे. वडील नोकरी करीत होते आणि मी मेडिकल (बी ए एम एस) करीत होतो, परंतु खून मीच केलेला आहे. ” त्यावर अवाक होऊन मी त्याला विचारले, ” एवढे असताना खून का केला? ” तर तो म्हणाला, “तो खून मी नाही केला तर माझ्या ‘रागाने’ केला. “
त्याने माझ्या समोर बसून सांगायला सुरुवात केली, “मी 18-19 वर्षाचा असताना खूप जास्त रागीट होतो आणि चीड चीड करीत होतो. एक दिवस त्याच्या वडिलांचे आणि बाजूच्या व्यक्तीचे थोडे भांडण झाले होते. समोरचा व्यक्ती त्याच्या वडिलांना दारू पिऊन शिवीगाळ करीत होता. त्यामुळे त्याला राग अनावर झाला आणि त्याने बाजूला पडलेला टिकाव (जमीन खोदण्याचे हत्यार) उचलला आणि सरळ त्याच्या डोक्यात मारला आणि त्यावर तो तिथेच खाली पडला आणि जागेवरच मेला. त्यानंतर मला पोलिसांनी पकडले आणि तेव्हापासून मी जेलमध्ये आहे. त्या घटनेला माझ्या वडिलांनी स्वतःला जबाबदार धरले आणि खूप जास्त मानसिक ताण घेतला आणि इतका हुशार आणि सुशिक्षित मुलगा जेलमध्ये माझ्यामुळेच गेला, असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्यामुळे त्यांची नोकरी गेली आणि त्यानंतर ते वेड्यासारखे करायला लागले आणि आता इकडे तिकडे फिरत असतात. खूप साऱ्या वकिलांनी माझ्या आईला तुमच्या मुलाला जामीन मिळवून देतो, त्याला निर्दोष सोडवतो, असे सांगून माझ्या आईकडून बरेच पैसे घेतले आणि इकडे मला शिक्षा झाली. मला एक भाऊ व एक बहीण आहे, केसकरता पैसे लागले आणि बाबांची नोकरी गेल्यामुळे घरची परिस्थितीसुद्धा खूप खराब झाली. मी खून करून जेलमध्ये आल्यानंतर कोणीच माझ्या बहिणीशी लग्न करायला तयार नसल्यामुळे तिचे लग्न माझ्या आत्याच्या दारुड्या मुलाशीच करुन दिले आणि माझा भाऊ फार्मसी करत होता, परंतु वडिलांची मानसिक स्थिती बिघडलेली असल्यामुळे आणि केससाठी पैसे लागत असल्यामुळे त्याने त्याचेसुद्धा शिक्षण सोडले आणि आता तो शेतात आणि बाहेरचे काम करून आई वडिलांना पोसत आहे. “
त्यावर मी रमेशला विचारले, ” तुला या गोष्टीचा पश्चाताप होत नाही का? ” त्यावर तो म्हणाला, ” मी ज्याला मारले तो तर काही वेळातच मेला. पण त्याला मारल्यानंतर मी रोजच मरत असतो. मी रोज मरणयातना भोगत असतो. आणि साहेब, त्या दिवशी माझ्या रागाने फक्त एकच खून नाही केला, तर मी माझ्या घरातील सर्वांचा खून केला. ” असे म्हणून रडतच निघून गेला आणि नकळत माझ्या डोळ्यात पाणी आले.
वरची घटना किती मोठी शिकवण देणारी आहे! छोट्याश्या रागाने एक सुशिक्षित आणि सुसंकृत कुटुंब मातीला मिळवले. एक नोकरीवाला व्यक्ती रस्त्याने वेडा म्हणून फिरतो. एक डॉक्टर होणारी व्यक्ती जेलमध्ये आहे. एक औषधशास्त्राचा विद्यार्थी शेतात काम करतो. एका सुंदर मुलीला दारुड्या व्यक्तीशी संसार करावा लागत आहे. एका आईला एका मुलाशिवाय आणि पतीशिवाय जगावे लागत आहे.
त्यामुळे सर्वांनी रागावर नियंत्रण ठेवा. संयम आणि प्रेमाने विचार करुनच सर्व करा. वाचा आणि दोन मिनिटाचा राग किती मोठे पारिवारिक नुकसान करते. याचा विचार करा…
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: सौ. वर्षा राजाध्यक्ष
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



