श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ # कितना हंसीन है मौसम… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
कितना हसीन सफ़र है… साथी भी खुबसुरत है ये तो मौसम को भी खबर है…
“… हे देवा काय म्हणून हे कवि असलेलं ध्यान माझ्या नशीबी मारलंस! … त्याला तो निसर्ग, ते चंद्र तारे, निर्झराचे गाणे आणि पौर्णिमेचे चांदणे एव्हढे मिळाले कि त्याच्या कवितेला उधाण येते! … सारे सारे भोवतालचे जग विसरून जातो आणि कवि कल्पनेच्या जगात विहरत बसतो.. ना खाण्या पिण्याची शुद्ध ना घरच्या कामाची, ना घरातल्या माणसांची सुधबूध… सुचलेली कविता जोवर कागदावर उतरत नाही तोवर याची तंद्रीतून बाहेरच येत नाही! .. आपलं नुकतंच लग्न झालयं… दिसायला सुंदर आणि मनमोकळी स्वभाची गोड नि मृदू बोलणारी नवयौवयना बायको आहे… तिच्याशी दोन घटका प्रेमाचा वार्तालाप करायला हवा की नको? … आपण नाही तर तिच्याशी कोण बरे बोलणार? … त्या एकांतातल्या सलज्ज कुजबुजणे आपण दोघांनी शेअर करायचे नाही तर कोण करणार? … आणि आणि हे सगळं त्या मठ्ठ, बथ्थड कविच्या डोक्यात कोण कसं घालणार? … प्रेम होईना तुझ्याने हि का तक्रार सांगायची असते इतरांच्या समोर! … ते काय म्हणतील आपल्याला! … “
“अगं कवि हा सौंदर्याचा भोक्ता असतो ना! त्याच्या कवितेला देखील कुणीतरी प्रेरणा दिली तरच त्याची काव्य प्रतिभा फुलून येते ना! त्याची भावनोत्कटता, त्याचं शब्द प्रभुत्व आणि त्याच्या तरल हळवं संवेदनशील मनात एखादी कल्पना सुचते, रूजते तेव्हा त्याला सृजनशीलतेचा अलौकिक अनुभव येतो… तो सृष्टीच्या सौंदर्याने प्रभावीत होतो आणि दिन हो या रात हम रहे तेरे साथ… अशी त्याची झपूर्झा स्थिती होते! … मग तो ना घरचा ना दारचा त्याचं जगंच वेगळं असतं…
आणि काय गं तू आणि तो लग्नाच्या आधीपासूनच काॅलेजमध्ये असतानाच तुमचं जमलं होतं म्हणालीस ना तू.! .. कवि मनाचा आणि सुंदर सुंदर प्रेमभावनेने ओथंबलेल्या कविता रचून तुला तर त्याने आपल्या प्रीतीच्या पावसात चिंब चिंब भिजवून टाकले असंच म्हणायचीस ना तू? … आणि हे तर काहीच नाही तुला तर त्या नवरंग सिनेमातील संध्या सारखं त्याच्या कवितेची तूच तर प्रतिभा असा तुमच्या प्रेमाचा मोठा सन्मानच केला हे ही तूच आम्हाला सांगितलसं ना त्या वेळी! … आम्ही तुला त्यावेळेला सांगत होतोच की बाई गं हे कवि लोक वेडे असतात! … यांचं खरंखुरं प्रेम फक्त त्यांच्या कवितेवरच असतं… या मंडळींना संसार हवा असतो तो त्यांना त्यांची केअरटेकर घेणारं माणूस घरात असावं म्हणून… बाकी या स्वच्छंदी माणसाला काय गं? … पण तू मारे नाक उडवून आम्हाला सांगितलेस कि मी माझ्या सौंदर्याच्या जाळ्यात त्याला असं जखडून ठेवेन! माझ्या प्रेमाचं अस्त्र असं सोडेन कि त्याने कविता वगैरे विसरून जाईल आणि माझ्या पदराला सारखं धरून मागं मागं घेऊन जाईन… मग आता काय झालं तुमच्या लग्नानंतर? … का तुझं मोहीनी अस्त्र कुचकामी ठरलं! का तुझ्या प्रेमातलं सामर्थ्य पेबळं ठरलं? … का तू आता त्याची हक्काची लग्नाची बायको झालीच आहेस म्हटल्यावर त्यानं आता जाशी कुठे नवनवीत चोरा सारखं तुला वागवायला लागला! .. त्याचा तुला सांगताही येईना आणि सहन ही होईना त्रास होऊ लागल्यावर सारं आठवलं काय? … पण तुला आता आम्ही काय सल्ला देणारं.? .. तुझं तुलाच सारं निस्तारलं तर पाहीजे… बघ एकेक नव्या नव्या क्लुप्त्या काढून कवि नवरा मुठीत येतोय का पहा… आणि जोवर तुझ्या मनासारखं होत नाही तोवर एकच पालुपद त्याच्याजवळ अष्टौप्रहर गात रहा… आज मी रूसूनी आहे…!!!
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






