श्री दिवाकर बुरसे
इंद्रधनुष्य
✦ शास्त्रस्तुती… ✦ श्री दिवाकर बुरसे ☆
ज्ञान, अनुशासन आणि मुक्तीचा दिव्य प्रवास
शास्त्र म्हणजे काय?
शास्त्र या शब्दाचा उगम आणि अर्थवैभव
‘शास्त्र’ या शब्दात ‘शास’ हा मूळ धातू आहे. संस्कृत भाषेतील ‘शास’ धातूला ‘ष्ट्रन्’ प्रत्यय लावून ‘शास्त्र’ हा शब्द निर्माण झाला आहे. ‘शास’ या धातूचा अर्थ— उपदेश करणे, शासन करणे, अनुशासित करणे असा आहे.
म्हणूनच ‘शास्त्र’ म्हणजे—
जे मार्गदर्शन करते, अनुशासन घडवते आणि जीवनाला योग्य दिशा देते ते शास्त्र.
*शास्त्राची तात्त्विक व्याख्या*
भारतीय वैचारिक परंपरेनुसार शास्त्र म्हणजे केवळ संग्रहग्रंथ नव्हे; तर ते क्रमबद्ध, सुसूत्र आणि जीवनदर्शी ज्ञान आहे.
प्राचीन व्याख्या सांगते—
“शासनात् शंसनात् शास्त्रम्”
म्हणजे जे अनुशासन करते आणि ज्ञानाची ओळख करून देते ते शास्त्र. तसेच—
“शास्ति च त्रायते च शास्त्रम्”
म्हणजे जे योग्य-अयोग्याचा निर्णय शिकवते आणि अज्ञानापासून रक्षण करते ते शास्त्र.
*शास्त्र : ज्ञानाचे संरचित रूप*
कोणत्याही विषयाचे क्रमबद्ध, तर्कसुसंगत आणि अनुभवाधिष्ठित ज्ञान म्हणजे शास्त्र.
– – या अर्थाने शास्त्रे अनेक असली तरी भारतीय तत्त्वज्ञानात विशेष मान्यता असलेली षट्दर्शने अशी आहेत—
न्याय, योग, सांख्य, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत (उपनिषदे)
यांखेरीज—
वेद, पुराणे, स्मृतिग्रंथ, तसेच अर्थशास्त्र, वास्तुशास्त्र, खगोलशास्त्र, नाट्यशास्त्र, छंदशास्त्र, आयुर्वेद इत्यादींचाही शास्त्रांत समावेश होतो; परंतु _त्यांचे प्रामाण्य हे श्रुति आणि वेदांताधिष्ठित तत्त्वांवर आधारित असणे आवश्यक मानले गेले आहे. _
*शास्त्रांचे प्रामाण्य : अनुभव, तर्क आणि आचार*
भारतीय तत्त्वज्ञानात शास्त्र हे आंधळ्या श्रद्धेचे नव्हे, तर प्रज्ञेच्या जागृतीचे साधन आहे.
शास्त्रांचा पाया उभा आहे—
श्रुति (अध्यात्मिक परंपरा)
युक्ति (तर्कबुद्धी)
अनुभूति (प्रत्यक्ष अनुभव)
शास्त्र सांगते, पण त्याची सत्यता आचरणातून अनुभवल्याखेरीज ज्ञान परिपूर्ण होत नाही.
म्हणूनच शास्त्र हे—
_वाचनापुरते नसून, जीवन जगण्याची कला शिकवणारे मार्गदर्शक आहे. _
*शास्त्र आणि विवेकबुद्धी*
शास्त्राचा खरा उद्देश मनुष्याला विचारस्वातंत्र्य आणि विवेक प्रदान करणे हा आहे, अंधानुकरण नव्हे.
ते शिकवते—
सत्य आणि असत्य यातील भेद.
नित्य आणि अनित्य यातील भेद
आत्मा आणि अनात्म याची ओळख
परंतु—
शास्त्राचा अभ्यास जर केवळ वादासाठी झाला, तर तो ज्ञान न राहता अहंकाराचे साधन बनतो.
म्हणूनच शास्त्राध्ययनासाठी आवश्यक आहेत—
विनय, श्रद्धा आणि चिंतनशीलता
*शास्त्र आणि साधकाची भूमिका*
नम्र विद्यार्थ्याने, ज्ञानेच्छु साधकाने आणि सूज्ञ व्यक्तीने शास्त्रांचा आदर करावा. त्यांचा सखोल अभ्यास करावा. उथळपणे त्यांना नाकारू नये. एखादा विचार पटला नाही तर
शास्त्राला दोष देण्यापूर्वी स्वतःच्या तर्काची चिकित्सा करावी.
बहुधा दोष आपल्याच आकलनात असतो, आणि सखोल विचारांती हे उमगते आणि मन नम्रतेने शास्त्रापुढे नतमस्तक होते.
*कालपरत्वे शास्त्रांचे पुनर्वाचन*
काळ बदलतो, परिस्थिती बदलते; परंतु शास्त्रातील मूलतत्त्वे शाश्वत असतात. त्यातील काही दृष्टांत, उदाहरणे, तपशील कालबाह्य होऊ शकतात; परंतु तत्त्वे मात्र चिरंतन सत्य असतात.
म्हणूनच प्रत्येक युगात शास्त्रांचे
नव्या दृष्टिकोनातून पुनर्वाचन आवश्यक ठरते.
*शास्त्र : कुमार्गापासून सन्मार्गाकडे*
थोडक्यात—
जे ज्ञान माणसाला कुमार्गापासून दूर नेऊन सन्मार्गावर आणते, त्याचे कल्याण करते—तेच शास्त्र.
शास्त्र हे—
जीवनाला दिशा देते
मनाला स्थैर्य देते
बुद्धीला स्पष्टता देते
*समारोप : प्रकाशाचा अखंड स्रोत*
शास्त्र म्हणजे केवळ अक्षरांचा संग्रह नाही; ते जीवनाचा दीपस्तंभ आहे.
शास्त्र —
अज्ञानातून ज्ञानाकडे नेते
अस्थिरतेतून स्थैर्याकडे नेते
मर्यादिततेतून अमर्यादतेकडे नेते
म्हणूनच—
शास्त्र हे नुसते वाचायचे नसते—ते जगायचे असते,
ते नुसते समजायचे नसते—ते आत्मसात करायचे असते.
☆
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





