अरुणा मुल्हेरकर
विविधा
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २१ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
मायाजालात अडकलेला सर्वसामान्य माणूस प्रपंचात अडकलेल्या सर्वसामान्य माणसांसाठी सुद्धा तुकाराम महाराजांनी गाथेत भरपूर अभंग लिहिले आहेत. सर्वसामान्य माणसांना ऐहिक जीवनाचा लोभ असतो, त्यातून त्यांना परावृत्त होणे फार अवघड आणि कष्टाचे असते. तुकाराम महाराज या संदर्भात आपल्यासारख्या सामान्यांना अत्यंत कळकळीने त्यांच्या वाणीत जागोजागी सांगत आहेत.
आहे ते सकळ कृष्णासी अर्पण/
* नकळता मन तुझे भावी*//
म्हणवुनी पाठी लागतील भुते/
येती गिवसीत पाच जणे//
ज्याचे त्या वंचले आठव न होता/
दंड न हा निमित्त कारणे//
तुका म्हणे काळे चेपीयला गळा/
मी मी वेळोवेळी करीतसे//
आपण प्रापंचिक लोक हे जाणतच नाही की जी काही कर्मे आहेत, आणि जे जे काही अस्तित्वात आहे ते एका कृष्णाच्या सत्तेने आहे. कर्ता-करविता तोच आहे. आपण अविवेकी, हे जाणत नाही आणि सर्व काही मी केले अशी मनात भावना धरतात. त्यामुळे “येती गिवसित पाच जणे”, म्हणजे आपला पंचमहाभूतांचा हा देह आपल्याला शोधत येतो. याचाच अर्थ आपण जन्म मरणाच्या चक्रातून फिरत राहतो, आपला पुनर्जन्म होतो. सर्व कर्मे हरीचीच असून ती त्याची त्याला अर्पण करण्याची आठवण न ठेवल्यामुळे आपल्याला जगण्याचा आणि मरणाचा दंड मिळतो. हा दंड भोगायचा नसेल त्याने प्रथमतः अहंकाराने मी मी करणे सोडून दिले पाहिजे. ज्यावेळी अशी अवस्था होईल त्याचवेळी लोभ, मोह, सर्व मायापाश यातून माणसाची कायम सुटका होईल.
ते सामान्य संसारी माणसाला सांगतात,
वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपर्जीती/
जाणार त्या निश्चिती देव नाही//
भाडेकरी वाहे पाठीवरी भार/
अंतरीचे सार लाभ नाही//
देवपूजेवरी ठेवूनिया मन/
पाषाणा पाषाण पूजी लोभे//
तुका म्हणे फळ चिंतीती आदर/
लाघव हे चार शिंदळीचे//
फळाची इच्छा मनात ठेवून प्रपंचासाठी अर्थार्जन करणाऱ्या प्रापंचिकांविषयी तुकाराम महाराज वरील अभंगात सांगत आहेत. एखादा चरितार्थाचा व्यवसाय मिळवून जमीन, घर, द्रव्य, राज्य, प्राप्त करून घेणारे जे लोक असतात त्यांनी परमार्थात कितीही धडपड केली, तरी त्यांना परमेश्वर प्राप्ती होणे असंभवनीय आहे. ओझे वाहणारा भारवाहक त्याच्या हमालीचे पैसे घेईल, परंतु त्या ओझ्यातील सारभाग त्याला कसा मिळेल? काही एक प्राप्त करण्याची वासना मनात ठेवून जो देवपूजा करतो तो दगडाची पूजा करणारा दगडच म्हणावा लागेल. अनेक प्रकारचे उद्योग करून त्यापासून फलप्राप्ती इच्छिणारे जे लोक आहेत त्यांची सर्व धडपड म्हणजे तुकाराम महाराजांच्या मते गणिकेच्या शृंगाराप्रमाणे निंद्य आहे.
रोजच्या जीवनातील उदाहरणे घेऊन तुकारामांची सामान्यांना परिस्थिती पटवून, समजावून देण्याची पद्धत खरोखरच आपल्या मनाचा ताबा घेऊन त्या दृष्टीने आपल्याला विचार करण्यास लावणारी आहे. आता हे दोन अभंग पहा…
(1)
माया ब्रह्म ऐसे म्हणती धर्मठक/
आपणा सरिसे लोक नागविले//
विषयी लंपट शिकवी कुविद्या/
मनामागे नांद्या होऊनी फिरे//
करुनी खाता पाक जिरे सुरण राई/
करिता अतित्यायी दुःख पावे//
औषध द्यावया चाळविले बाळ/
दावूनिया या गुळ दृष्टी पुढे//
तरावया आधी शोधा वेदवाणी/
वांझट बोलणी वारा त्याची//
तुका म्हणे जया पिंडाचे पाळण/
न घडे नारायण भेट तया//
(2)
मृगजळ दिसे साचपणा ऐसे/
खोटीयाचे पिसे ऊर फोडी//
जाणूनी का करा आपुलिया घात/
विचारा रे हित लवलाही//
संचित सांगती बोळवण सवे/
आचरण द्यावे फळ लेणे//
तुका म्हणे रोखी स्मशान ते वरी/
संबंध गोवरी आगीसवे//
आपल्या देहाचे पालनपोषण करण्यातच आयुष्य वेचणाऱ्या आणि दुसऱ्यांना उपदेश करून स्वतः पापे करणाऱ्या लोकांविषयी पहिल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात की, हे धर्माचे स्तोम माजविणारे लोक माया आणि ब्रह्म एकच आहे असे म्हणतात आणि याच धारणेने स्वैर वागतात व अज्ञान्यांना फसवितात. ( या लोकांना महाराजांनी धर्मठक ही अगदी योग्य संज्ञा दिली आहे.) विषयासक्त मनुष्य दुसऱ्याला कुविद्या शिकवतो आणि स्वतः नंदीबैलाप्रमाणे मन मानेल तिकडे जातो. सुरण आणि मोहरी शिजवून खाल्ली तरच पचन होते, अन्यथा कच्चे खाणाऱ्यांना दुःख भोगावे लागते. आजारी मुलाला कडू औषध देताना त्याची आई त्याला एवढे औषध घेतल्यावर गुळाचा खडा देण्याचे आमिष दाखवते. महाराज सांगतात की, हा भवसागर तरुन जाण्यासाठी त्याचा नीट विचार करून, ज्ञान संपादन करून ( सुरणासारखा शिजवून आणि स्वर्गरूपी गुळाचा खडा महत्त्वाचा न मानता त्याग रुपी औषध घ्यावे) हेच आयुष्याचे सार आहे. माया आणि ब्रह्म एकच आहे असे समजून आणि देहाला सर्वस्व मानून त्याचे चोचले पुरविणाऱ्यांना नारायणाचे दर्शन कधीही होणार नाही.
दुसऱ्याही अभंगात मृगजळापाठी धावणाऱ्या हरिणाचे उदाहरण देऊन तुकाराम महाराज सामान्यांना हीच गोष्ट अधिक पटवून देण्याचा प्रयत्न करतात. ज्याप्रमाणे मृगजळ हरिणांना खरे वाटते आणि ऊर फुटेपर्यंत मोठ्या आशेने हरणे तेथे धाव घेतात, त्याचप्रमाणे देहादिक प्रपंच खोटा आहे हे जाणूनही स्वतःचा घात करतात. स्वहित कशात आहे याचा विचार करीत नाहीत. जे आपले संचित कर्म आहे ते आपल्या बरोबर या जन्मातून त्या जन्मात येत राहते आणि पूर्वकर्माप्रमाणे ते भोगावे लागते. प्रपंचात्मक माणसाचा देह स्मशानात जातो, तेथे तो अग्नीमध्ये मिसळतो. ( अग्नीशी त्याचे लग्न लागते.) याचाच अर्थ असा की, त्याचा जन्म ईश्वर साधना न करता फुकट जातो.
संसारी लोकांबद्दल महाराज काय म्हणतात ते आपण या अभंगात पाहू.
काय एकाच जाले ते का नाही ठावे/
काय आहे सांगावे का म्हूण//
देखतील डोळा ऐकतील कानी/
बोलिले पुराणी तेही ठावे/
काय हे शरीर साच की जाणार/
सकळ विचार जाणती हा/
का हे कळो नये आपुले आपणा/
बाळत्व तारुण्य वृद्धदशा//
का हे आवडले प्रिया पुत्र धन/
काय काम कोण कोणा आले//
का हे जन्म वाया घातले उत्तम/
काहे राम राम न म्हणती//
काय भूली यांसी पडली जाणता/
देखती मरता आणिकांसी//
काय करीती हे बांधिलिया काळे/
तुका म्हणे बळे वज्रपाशी//
महाराजांना वाटते की, संसाराच्या संगतीने यांची ही काय दुर्दशा, अवस्था झाली आहे. यांना काय काय म्हणून सांगावे? प्रपंच संगतीने जीवाची किती दैना होते हे ते पाहतात, ऐकतात आणि पुराणातही सांगितलेले त्यांना माहित आहे. हे शरीर खरे आहे की नाशीवंत आहे याचे ज्ञान त्यांना आहे. कारण त्यांनी सर्व ऐकले आहे. आपल्या देहाला बाल्य, तारुण्य, वृद्धत्व या अवस्था अटळ आहेत हे माहीत असूनही त्यांना कळत कसे नाही? बायको, मुले, पैसा याविषयी इतकी प्रीती का असावी? ही माणसे कधी कुणाच्या उपयोगी पडू शकतात का? हे लोक त्यांना मिळालेला उत्तम नरजन्म वाया घालवीत आहेत. रामनामाचे चिंतन का करीत नाहीत? कित्येक लोक मरतात हे पाहिल्यावर आपल्यालाही मरायचे आहे हे जाणूनही लोकहो तुम्ही या वरपांगी देहाला का भुलता? काळाने त्याच्या बलिष्ठ वज्रपाषाने यांना बांधल्यावर हे काय करतील? गीतेमध्ये जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, व दोष यांचे जाणीवपूर्वक दर्शन करणे हे ज्ञानाचे लक्षण सांगितले आहे. संसारातील दुःखांची सतत जाणीव ठेवून हरी भजन करावे हेच महाराज आपल्यासारख्या मायाजालात फसलेल्या सामान्य जनतेला सांगत आहेत.
पुढील भागात याच संबंधी गाथेतील आणखी काही अभंगांचा परामर्श घेऊ.
क्रमशः… २१
© अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर ≈







