गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ रेण्टल फॅमिली… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆
☆
काल ‘Rental Family’नावाचा चित्रपट पाहिला.
वरवर पाहताना ही गोष्ट अशा एका व्यवसायाची वाटते जिथे तुम्ही पैसे देऊन वडील, आई, किंवा जोडीदार ‘भाड्याने’ घेऊ शकता. पण जसजशी कथा पुढे सरकते, तसतसं जाणवते की हे केवळ पैशांचे व्यवहार नाहीत, तर ते आपल्या समाजातील ‘एकाकीपणाचं’ एक भयाण वास्तव आहे.
त्या चित्रपटात असे अनेक प्रसंग आहेत जे माझ्या काळजाला भिडले.
त्यातला एक प्रसंग म्हणजे, एका माणसाला तो मेल्यावर त्याच्या फ्युनरलला इतर माणसं कशी त्याची आठवण काढत रडतायत, हे फिलींग अनुभवायचं असतं. त्यासाठी तो ही सर्विस घेतो.
खरंतर त्या व्यक्तीला माहीत असतं की ही समोरची माणसं फक्त ‘अभिनय’ करत आहेत, तरीही त्यांच्याकडून मिळणाऱ्या दोन शब्दांच्या मायेसाठी तो लाखो रुपये खर्च करायला तयार असतो.
आणि त्यांच्या त्या शब्दांनी त्याला पुन्हा नव्याने जगण्याची उमेद निर्माण होते.
हा चित्रपट पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे माणसाला अन्नाइतकीच भावनिक ओलाव्याचीही भूक असते.
‘Rental Family’ मध्ये आपण पाहतो की, लोक केवळ संवाद हवा म्हणून पैसे मोजतात. पण जेव्हा आपलं हेच नातं नैसर्गिक आणि भावनिकदृष्ट्या घट्ट असतं, तेव्हा ते आपल्याला केवळ आनंदच नाही, तर ‘गगनभरारी’ घेण्याचं बळ देतं.
जेव्हा आपल्याला माहीत असतं की, “जर मी गोते खात पडलो, तर मला सावरणारे हात आहेत,” तेव्हा आपण आयुष्यात मोठे निर्णय घ्यायला घाबरत नाही.
हे नात्यातील डीप इमोशनल कनेक्शन आपलं ‘सिक्युरिटी नेट’ बनतं.
या चित्रपटातून मला पुन्हा एकदा जाणवलं की, हजार दिखाऊ नात्यांपेक्षा आपल्या आयुष्यात ती ‘एक’ व्यक्ती महत्त्वाची असते, जिच्याकडे आपण आपलं मन मोकळं करू शकतो आणि असं सिक्युरिटी नेट असलेलं नातं निर्माण करण्यासाठी आपल्याला स्वतःच्या रिलेशनशिप स्किलवर काम करणं अत्यावश्यक आहे.
खरी नाती आपल्यासाठी आरसा बनतात . ती आपल्या चांगल्या गुणांचे कौतुक करतात आणि त्याचबरोबर आपल्या चुकांचीही जाणीव करून देतात.
Love relationship is an opportunity to take ownership of our shadow parts.
जेव्हा आपण आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या नजरेतून स्वतःकडे पाहतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला स्वतःमध्ये सुधारणा करण्याची आणि एक चांगली व्यक्ती बनण्याची प्रेरणा देते.
संशोधन सांगतं की, ज्यांची कौटुंबिक आणि सामाजिक नाती घट्ट आहेत, त्यांची निर्णयक्षमता अधिक चांगली असते.
‘रेण्टल फॅमिली’ मधला तो एकाकीपणा माणसाला आतून पोखरतो, पण याउलट, खरी माया माणसाला ऊर्जा देते.
भावनिक आधार = कमी ताणतणाव
कमी ताणतणाव = कामात जास्त एकाग्रता
एकाग्रता = हमखास यश
अनेकदा माणसं करिअरच्या मागे धावताना जवळच्या नात्यांना ‘टेकन फॉर ग्रांटेड’ धरतात.
पण लक्षात ठेवा, नोकरी/बिझनेस रिलेशनशिप फक्त त्यांच्या ग्रोथसाठी आपल्या सोबत असतात.
आपण आजारी पडल्यावर, खरोखरच भावनिक ओलाव्याचीही गरज असते. तेव्हा बिझनेस रिलेशनशिप कामी येत नाहीत.
एखादा मोठा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मिळालेल्या तुमच्या यशाचा आनंद साजरा करायला प्रेमाची व्यक्ती सोबत कोणी नसेल, तर त्या यशाला काहीच अर्थ उरत नाही.
पैशाने आपण ‘माणसं’ गोळा करू शकतो, पण ‘माया’ नाही. आणि प्रगतीसाठी माणसांच्या गर्दीपेक्षा मायेची ऊब जास्त कामाला येते.
म्हणूनच आजपासून एक गोष्ट करायला सुरुवात करा.
नोकरी /व्यवसायाच्या ‘रेण्टल’ जगात सतत राहण्यापेक्षा, आपल्या खऱ्या जवळच्या माणसांशी दिवसातून एकदा तरी मनमोकळं बोला.
तुम्हाला सायलेंटली सपोर्ट करणाऱ्या व तुमच्या यशात ज्यांचा वाटा आहे, त्यांना “तुझ्यामुळे मी इथवर पोहोचलो,” असं सांगायला विसरू नका.
लक्षात घ्या, कधीकधी जवळच्या व्यक्तीला फक्त तुमचं ऐकून घेणं हवं असतं, तुमचा वेळ हवा असतो आणि ही गोष्ट कोणत्याही महागड्या भेटीपेक्षा त्यांच्यासाठी मौल्यवान असते.
चला तर मग, आपण आपली नाती इतकी घट्ट करूया की आपल्याला कोणत्याही ‘रेण्टल’ आधाराची गरज पडणार नाही. कारण जेव्हा मनं जोडलेली असतात, तेव्हाच आयुष्याची खऱ्या अर्थाने वाढ होते!
तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रगतीत तुमच्या जवळच्या व्यक्तीचा भावनिक पाठिंबा किती मोलाचा ठरला?
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




