श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४५ आणि ४६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
मश्लोक क्र. ४५ – – –
जयाचेनि संगे समाधान भंगे |
अहंता अकस्मात येऊनि लागे |
तये संगतीची जनी कोण गोडी |
जिये संगतीने मति राम सोडी |४५|
अर्थ : ज्यांच्या संगतीत मनाचे समाधान नष्ट होते आणि अहंकार वाढीस लागतो अशा लोकांची संगत चांगली नाही. ज्यांच्या संगतीत आपण बुद्धीने परमेश्वरापासून दूर जातो अशांच्या संगतीत राहण्यात गोडी ती कोणती ?
विवेचन : या श्लोकात समर्थांनी अप्रत्यक्षपणे सत्संगतीची महती सांगितली आहे. व्यवहारात आणि परमार्थातही संगत अतिशय महत्त्वाची असते. आपण ज्याच्या संगतीत राहतो त्याचे गुण किंवा दोष आपल्याला लागतात. संत तुकाराम महाराज म्हणतात …..
ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला
कुसंगे नाडला साधू तैसा ||
हिरा अत्यंत कठीण असतो परंतु त्याला ढेकणाचे रक्त लागले की तो भंग पावतो असे म्हणतात. त्याप्रमाणेच दुर्जनांच्या संगतीत राहिले की साधू देखील बिघडतो एवढे संगतीचे महत्त्व आहे. ‘संगती संग दोषेंण’ असे म्हटले जाते. म्हणूनच मोरोपंत म्हणतात, ” सत्संगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो” व्यसनी माणसाच्या सतत सहवासात राहिल्यामुळे आपल्यालाही व्यसन लागण्याची शक्यता असते. सतत खोटे बोलणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात जर आपण राहत असू तर आपल्याला तसे वागणे योग्यच वाटायला लागते. श्रीमंत व्यक्तीच्या सहवासात राहिल्यानंतर आपल्यालाही तसेच श्रीमंत व्हावेसे वाटते. या सगळ्या अशा प्रकारच्या संगतीत आपण भगवंताला मात्र विसरतो आणि आपला अहंकार मात्र वाढत असतो. ‘मी ‘पणाला खतपाणी मिळते.
संत नामदेवराय म्हणतात ….
अहंकाराचा वारा | न लागो राजसा | माझिया विष्णुदासा | भाविकांसी ||
क्षमा हे वीराचे भूषण आहे. नम्रता हे विद्येचे भूषण आहे. गर्व नसणे हे श्रीमंतीचे भूषण आहे. परंतु ज्या माणसांना हे माहिती नसते त्यांचा अहंकार बळावतो. अशांच्या संगतीत राहिल्याने आपलाही अहंकार आपण जोपासत राहतो. संत कबीर यांचा एक दोहा फार सुंदर आहे…
‘बडें बडाई न करे, बडे न बोले बोल| हिरा मुख से न कहे, लाख टका मम मोल||
“मैं मैं” बडी बलाई है, सके निकल तो निकले भाग| कहे कबीर कब लग रहै, रुई लपेटी आग||’
समर्थ म्हणतात, “प्राप्त झालेले ज्ञान ‘अहंकारामुळे’ नष्ट होते. ” अहंकारामुळे काम, क्रोध आदी दुर्गुण वाढीस लागतात. वैज्ञानिक आणि भौतिक प्रगतीमुळे अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये आर्थिक सुबत्ता आहे. परंतु शांतता आणि समाधान मात्र हरवलेले दिसते. आपल्याला त्यांची प्रगती जरी आकर्षक वाटली तरी त्यातील फोलपणा समजून घेतला पाहिजे.
तात्पर्य, ज्या संगतीने भगवंताचे नाम मुखात येऊन ते संगत म्हणजे सत्संगत ! सत्संगती धरली तर सद्गुणांची वृद्धी होऊन भगवद्कृपा प्राप्त होते.
स्वसंवाद ::
१) ज्या लोकांच्या सहवासात गेल्यानंतर मला अशांत वाटते किंवा स्वतःबद्दल उगाचच बडेजाव (मीपणा) मिरवावासा वाटतो, असे लोक माझ्या लक्षात येतात का ?
२)माझ्या मित्रांच्या किंवा परिचितांच्या वर्तुळात गेल्यानंतर आमचा संवाद भगवंताकडे/सद्गुणांकडे वळतो की केवळ परनिंदा आणि ऐहिक सुखांच्या गोष्टींकडे ?
३) श्रीमंतांच्या संगतीत स्वतःबद्दलचा न्यूनगंड आणि सत्ताधीशांच्या संगतीत वाढलेला माझा अहंकार मला जाणवतो का ? (हे देखील समाधान भंग पावण्याचे लक्षण आहे).
४) ‘अहंकाराचा वारा’ लागून माझी बुद्धी रामापासून (सत्यापासून) दूर जात आहे, हे ओळखण्याची सतर्कता माझ्यात आहे का?
– – – –
श्लोक क्र. ४६ – –
मना जे घडी राघवेवीण गेली |
जनी आपुली ते तुवा हानी केली |
रघुनायकावीण तो सीण आहे|
जनी दक्ष तो लक्ष लाऊनि पाहे|४६|
अर्थ : हे मना, जो क्षण राघवाच्या स्मरणाशिवाय गेला त्याने तू आपले नुकसान करून घेतले असे समज. ज्या गोष्टीत रामाचे अधिष्ठान नाही अशा गोष्टी करणे म्हणजे व्यर्थ शीणणे असे समजून या जगात तू अत्यंत सावधपणे वावर.
विवेचन : श्रीराम हे समर्थांचे आराध्य दैवत. एक क्षणही आपण श्रीरामाच्या स्मरणाशिवाय घालवावा असे त्यांना वाटत नाही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज देखील हेच आपल्याला सांगतात. आपण जर स्वतःला साधक मानत असू आणि संतांनी सांगितलेल्या मार्गावर आपल्याला वाटचाल करायची असेल तर भगवंताच्या नामाशिवाय एक क्षणही व्यर्थ घालवू नये. असा वाया घालवलेला वेळ म्हणजे साधकाने आपले स्वतःचेच करून घेतलेले नुकसान.
आपल्याला दृश्य गोष्टी जास्त आकर्षित करतात. परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे म्हणून त्याची ओढ आपल्याला वाटत नाही. त्यासाठीच संतांनी आपल्याला सगुण भक्ती करायला सांगितले आहे. डोळ्यासमोर भगवंताची मूर्ती आणि चित्तात त्याचेच ध्यान अशी साधकाची अवस्था असावी. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम अशी संत परमेश्वराला प्रार्थना करतात यासाठीच.
विज्ञानाच्या प्रगतीने आणि भौतिक समृद्धीने माणसाला ज्या सुखसोयी उपलब्ध करून दिल्या आहेत त्यातच माणूस सुख मानतो. त्या प्राप्त करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय समजतो आणि ज्याने आपल्याला जन्म दिला त्या परमेश्वराला आपण विसरतो. भगवंताशिवाय आपल्या हिताचे कोणी नाही आणि उपासनेशिवाय आपल्याला पर्याय नाही हे साधकाने पक्के लक्षात ठेवले पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीचे जीवनामध्ये कोणते तरी ध्येय असते हे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याला त्या ध्येयाचा विसर पडून चालत नाही म्हणजेच त्या ध्येयाकडे सतत लक्ष असावे लागते. ते साध्य होण्यासाठी दक्ष असावे लागते. परीक्षेमध्ये उत्तम गुण प्राप्त करणे हे विद्यार्थ्याचे ध्येय असते. त्यासाठी अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागते. इतर गोष्टींमध्ये आपला फार वेळ जाणार नाही याबाबत दक्ष असावे लागते. एखाद्याला उत्तम गायक व्हायचे असेल, तर त्याला रोजचा रियाज करणे आवश्यक आहे. आपल्या गळ्याचे आरोग्य बिघडणार नाही याबाबतीत त्याला दक्ष असावे लागते. थंड, तेलकट पदार्थ खाल्लेले त्याला चालत नाहीत.
त्याप्रमाणेच साधकाने देखील सदैव दक्ष असावे असे समर्थ म्हणतात. सर्वत्र सावधानता बाळगावी असा समर्थांचा आग्रह आहे. मग साधना मार्गावर तर सावधानता अत्यंत आवश्यक आहे. कारण साधकाला आपल्या मोहात पाडून त्याला त्याच्या ध्येयापासून विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी असतात. त्यासाठी विवेक हवा.
रोज मी भगवंताच्या नामस्मरणासाठी किती वेळ देतो याचा विचार प्रत्येक साधकाने करायला हवा. आजकाल सगळ्या गोष्टी आपण अतिशय घाईने उरकतो. भगवंताची पूजा, नामस्मरण यासारख्या गोष्टी रोजचा उपचार म्हणून उरकल्या जातात. ज्या गोष्टी मनापासून किंवा समर्पण भावनेने केल्या जात नाहीत, त्या गोष्टी उपचार ठरतात. इतरही अनेक गोष्टींमध्ये आपण आपला वेळ घालवत असतो. परंतु समर्थ म्हणतात की भगवंताच्या स्मरणाशिवाय वेळ घालवणे म्हणजे आपली हानी आपण करून घेणे. तो केवळ ‘ सीण आहे ‘ म्हणूनच आपण आपला एक क्षणही परमेश्वराच्या स्मरणाशिवाय जाणार नाही याबाबत दक्ष असले पाहिजे.
स्वसंवाद (नवीन)
१) मी स्वतःला साधक मानतो का?
२) माझी पूजा, नामस्मरण या गोष्टी मनापासून होतात की केवळ रोजचा उपचार म्हणून उरकल्या जातात ?
३) ध्येयापासून विचलित करणाऱ्या कोणत्या गोष्टी माझ्या जीवनात आहेत असे मला वाटते ? त्याबाबत मी खरोखर दक्ष आहे का ?
– क्रमशः श्लोक ४५ आणि ४६.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






