श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

महावस्त्राचे पदर – भाग २ – ‘आई’ (मायेची पैठणी) ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

नात्यांचं महावस्त्र – ‘आई’ (मायेची पैठणी)

​ज्याच्याशिवाय नात्यांचं हे महावस्त्र जन्मालाच येऊ शकत नाही, असा या वस्त्रातील एक अनोखा आणि सर्वात मौल्यवान पदर म्हणजे ‘आई’. नात्यांच्या या वस्त्रातील ती खरी सुवर्णमयी ‘पैठणी’ असते. विधात्याने अत्यंत कुशलतेने आणि निगुतीने घडवलेली! ज्यामुळे आपण या जगात येतो आणि आपल्याला आपली ओळख मिळते असे एक नाते म्हणजे आई. प्रत्यक्ष परमेश्वराने सुद्धा जेव्हा पृथ्वीवर अवतार घेतला, तेव्हा त्यालाही आईमुळेच सर्वश्रेष्ठ ओळख मिळाली. राम झाला कौसल्यानंदन, कृष्ण झाला देवकीनंदन. अंजनेय(हनुमंत)आणि राधेय(कर्ण) हे देखील आपल्या आईच्या नावामुळेच ओळखले गेले. ‘ आईची महती ‘ एवढी थोर की जगातल्या अनेक थोर साहित्यिकांनी तिच्यावर भरभरून लिहिले.

​’आई’ हा शब्द जरी उच्चारला, तरी डोळ्यांसमोर प्रेमाची अशी एक मूर्ती उभी राहते जी वैश्विक आहे. माणूस असो वा प्राणी, भारत असो की जगाच्या पाठीवरचा कुठलाही देश; आईचे प्रेम सर्वत्र सारखेच असते. म्हणूनच मी आईला प्रेमाची वैश्विक मूर्ती म्हणतो. इतरांचं प्रेम भलेही ‘माया’ असेल, पण तिचं प्रेम म्हणजे ‘आभाळमाया’! आपल्या मुलांवर असलेली तिच्या प्रेमाची शाल केवळ ऊब देत नाही, तर एक अभेद्य कवच बनून आयुष्यभर त्यांचे रक्षण करते. “घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी… ” तशी आई शरीराने कुठेही असली, तरी तिचे चित्त मात्र सदैव आपल्या लेकरापाशीच असते.

​परमेश्वराने तिला पृथ्वीवर पाठवतानाच तिच्या काळजात ‘अखंड माया’ भरून पाठवली आहे. आई म्हणजे परमेश्वराचे दुसरे रूप. कोणीतरी खूप छान म्हटलं आहे की, परमेश्वराला सगळीकडे उपस्थित राहणे शक्य नाही म्हणून त्याने आईला पाठवले आहे. ती स्वतः उपाशी राहील, पण लेकराचं पोट भरल्याशिवाय तिचं पोट भरत नाही. तिची स्वतःची झोप होवो न होवो, आपल्या तान्हुल्याची झोप नीट व्हावी म्हणून तिची धडपड असते. “निजल्या तान्ह्यावरी माउली दृष्टी सारखी धरी” अशी तिची अवस्था असते. जी स्त्री जन्माला येते, अशी प्रत्येक स्त्री ‘बाई’ होते; पण तिचे बाईपण ‘आई’ झाल्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि त्यासाठी तिने मुलाला जन्म दिलाच पाहिजे अशी काही अट नसते, तिला फक्त ‘आई’ होता आलं पाहिजे, मायेचं पांघरूण घालता आलं पाहिजे. किंबहुना, आई होण्यासाठी स्त्री असण्याचीही अट नाही; ज्याच्या हृदयात सगळ्यांबद्दल प्रेम आणि कळवळा काठोकाठ भरला आहे, अशी कोणतीही व्यक्ती आई होऊ शकते.

​पंढरपूरला विटेवर उभा असलेला पांडुरंग सर्व भाविकांचे, वारकऱ्यांचे दैवत. हा सावळा विठ्ठल काही करत नाही, काही बोलत नाही, काही देत नाही आणि घेतही काही नाही. पण तो ‘विठू माउली’ झाला. का बरं? कारण तो सगळ्यांचं दुःख ऐकून घेतो, सगळ्यांना उराशी धरतो. त्याच्याजवळ कोणताच भेदभाव नाही. तो जरी बोलत नसला, तरी सगळ्यांना खात्री असते की “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” असा आशीर्वाद प्रत्येकाला तो नक्कीच देतो.

​”ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभावीण प्रीती. “

जिच्यामुळे हे विश्व निर्माण झाले अशी माता पार्वती जगज्जननी झाली. आमचे संत देखील ‘माउली’ झाले. समाजाने ज्यांचा अपार छळ केला, तरीही ज्यांच्या मुखातून विश्वाच्या कल्याणासाठी ‘पसायदान’ नावाचे अमृत बाहेर पडले, ते संत ज्ञानेश्वर म्हणूनच ‘ज्ञानेश्वर माउली’ झाले. अहिल्याबाई होळकर लोकांसाठी समाजसेवेची अनेक कामे करून ‘लोकमाता’ झाल्या. अनाथ, निराधार मुलांवर मायेचे छत्र धरणाऱ्या सिंधूताई सपकाळ याच व्यापक मातृत्वाचे रूप झाल्या. ज्या आदीवासी, अशिक्षित स्त्रियांनी वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन वृक्षांचे संरक्षण केले, त्या वृक्षमाता झाल्या. अशी मातेची अनेक रूपे.

​आपल्या मुलांवर प्रेम करते ती ‘आई’; सर्वांबद्दल प्रेमभाव जिच्या मनात असतो ती ‘माता’; आणि अखिल विश्वाला कवेत घेणारी अपार माया जिच्या काळजात असते, ती ‘माउली’!

​”न मातु: पर दैवतम” असे आपल्याकडे म्हटले जाते; म्हणजेच आईसारखे दुसरे दैवत नाही. इतर देवतांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते, नवस बोलावे लागतात. पण हे मातृत्व नावाचे दैवत असे आहे की, त्याला प्रसन्न करण्यासाठी कोणतीही उपासना करावी लागत नाही. तिच्या पोटी केवळ जन्म घेतला, की ही देवता प्रसन्न होते आणि आयुष्यभर त्या बाळाची काळजी वाहते. प्रसूती वेदना काय असतात, ते फक्त माताच जाणे! पण जेव्हा ते नवजात अपत्य ती पहिल्यांदा आपल्या जवळ घेते, तेव्हा तिच्या त्या प्रसववेदनांचे शीतल चांदणे होऊन तिच्या मुखावर एक अद्भूत हास्य विलसते. तिच्या उरातील माया अमृत होऊन तिच्या स्तनातून बाळासाठी पाझरू लागते. तिच्या कुशीत जेव्हा तिचं बाळ असतं, तेव्हा ती जगातली सर्वात समृद्ध स्त्री असते. आयुष्याच्या विद्यापीठातली ‘आई’ नावाची सर्वोच्च पदवी निसर्गाने तिला बहाल केलेली असते.

​बाळ अजाणतं असतं, असहाय असतं, त्याला काहीच करता येत नाही तेव्हापासून आई त्याला सावरते. जेव्हा त्याच्या चिमुकल्या ओठांतून ‘आई’ हा पहिला शब्द उमटतो, तेव्हा तिच्या काळजाचा झालेला आनंद गगनात मावत नाही. याच एका शब्दासाठी ती नऊ महिने नऊ दिवस आसुसलेली असते. मग ती हळूहळू त्या सानुल्याला बोलायला शिकवते, पाऊल पाऊल टाकत चालायला शिकवते आणि त्याला स्वतःच्या पायावर उभे करते. तीच त्याची पहिली शाळा आणि पहिला गुरू असते. या शाळेत कुठलीही फी नसते, उलट काळजी आणि प्रेम मात्र अपार असते.

​बाळ जसजसं मोठं होतं, तसतसं तिचं काळीज आनंदाने फुलत जातं. बाळाच्या पंखात ताकद येते आणि ते स्वतःचे आभाळ शोधायला उडू लागतं. पण कधी कधी, आकाशात उंच भरारी घेणाऱ्या या पाखराचे लक्ष जमिनीवर एकटीच बसलेल्या आपल्या वृद्ध आईकडे जात नाही. अशा वेळी ती केवळ दोन शब्दांच्या प्रेमासाठी आसुसलेली असते. आता तिच्या पंखातले बळ कमी झालेले असते. आता वेळ असते त्या मुलाची—परतफेड करण्याची. खरं तर, आईच्या ऋणातून मुक्त होणे किंवा त्याची परतफेड करणे जन्मांतरातही शक्य नाही, पण कृतज्ञतेने त्या ऋणातून उतराई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र नक्कीच करता येतो.

​आई नावाच्या नात्याचा परिसस्पर्श ज्यांच्या आयुष्याला झाला, त्या आयुष्याचं सोनं झालं! कौसल्येने रामाला घडवलं, यशोदेने कृष्णाला, जिजाऊ मातेने छत्रपती शिवरायांना, भुवनेश्वरी देवींनी स्वामी विवेकानंदांना, आणि ‘श्यामच्या आई’ने साने गुरुजींना घडवले. असा हा मातृमहिमा अपार आहे.

​सखोल आणि योग्य मार्गदर्शन आणि अचूक निर्णयक्षमता यासारख्या गोष्टी म्हणजे आईच्या सल्ल्याचे वैशिष्ट्य! आईनं ज्यांना मार्गदर्शन केलं आणि आईचा सल्ला ज्यांनी शिरोधार्य मानला, त्यांनी जीवनामध्ये फार मोठे कार्य करून दाखवले आणि ते यशस्वी झाले. पांडवांनी आपल्या माता कुंतीचा सल्ला प्रत्येक वेळी शिरोधार्य मानला; त्याच वेळी त्यांचे बंधू असलेल्या कौरवांनी मात्र आपल्या आईचा (गांधारीचा) सल्ला नेहमीच धुडकावून लावला. या दोन्ही गोष्टींचे परिणाम काय झाले, याची साक्ष महाभारतात आपल्याला मिळते. पांडवांना सर्वत्र विजय मिळाला आणि कौरवांचा मात्र पराभव झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील माता जिजाऊंचा सल्ला प्रत्येक प्रसंगी शिरोधार्य मानला, म्हणूनच ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले.

​आई या नात्याचे अनेक पदर आहेत. गुरूची पत्नी जेव्हा ‘गुरुमाता’ होते, तेव्हा ती आश्रमातील सर्व बटूंना स्वतःच्या मुलासारखे सांभाळते. वशिष्ठांच्या आश्रमात जेव्हा राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचे शिक्षण पूर्ण झाले, तेव्हा निघताना प्रभू रामचंद्रांनी गुरुमातेचे पाय धरून म्हटले, “तुम्ही आईच्या मायेने आम्हाला सांभाळले, कशाचीच उणीव भासू दिली नाही. आमच्या वागण्यात काही चुकले असेल, तर आईच्या मायेने आम्हाला क्षमा करा. ” खरोखरच धन्य ती गुरुमाता आणि धन्य ते संस्कारी भावंडे! रामायणाने अशी नाती कशी जपावीत याचा आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. रामाला वनवासात पाठवले म्हणून जग कैकयीला दोष देत असताना, राम लक्ष्मणाला समजावतो, “आई कोणीही असो, ती सदैव आदरणीयच असते. मला वनात पाठवण्यामागे तिचा नक्कीच काहीतरी चांगला उद्देश असेल. माझ्या शिक्षणात काही उणीव राहिली असेल, ती पूर्ण करण्यासाठीच ही वनाची योजना असावी. ” ही उदात्तता आजच्या पिढीने शिकायला हवी.

​ज्याच्या डोक्यावर मातृछत्र छाया धरून असतं, त्याच्या भाग्याची थोरवी काय वर्णावी? प्रत्यक्ष परमेश्वराला देखील हे भाग्य लाभत नाही म्हणून तो सुद्धा मानवी अवतार धारण करून पृथ्वीवर येतो. ‘दिवार’ या चित्रपटातील एक संवाद मला आजही आठवतो. त्या चित्रपटात इन्स्पेक्टर असलेला शशी कपूर आणि चोराची भूमिका करणारा अमिताभ यांच्यातील संवाद फार लोकप्रिय झाला होता. अमिताभ शशी कपूरला म्हणतो, “मेरे पास गाडी है, बंगला है, नोकर चाकर, पैसा है… तुम्हारे पास क्या है? ” तेव्हा शशी कपूरने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. तो म्हणतो, “मेरे पास माँ है! ” आईची बरोबरी कशानेच होऊ शकणार नाही, कुबेराची संपत्ती देखील तिच्या तुलनेत फिकी आहे.

​पण आज आम्हाला केवळ या महापुरुषांची आणि त्यांच्या मातांची थोरवी सांगून भागणार नाही. असे सुपुत्र आजच्याही काळात घडावेत आणि त्यांना जन्म देणाऱ्या माता धन्य व्हाव्यात, ही भारतभूमी धन्य व्हावी, ही काळाची गरज आहे. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा; जसा आकार द्यावा तशी मूर्ती घडते. ही सुसंस्कारी मूर्ती घडवण्याची पहिली आणि मुख्य जबाबदारी आईची असते. खाण तशी माती असे आपण म्हणतो. आई जर सुसंस्कारित आणि सुशिक्षित असेल तर तिची मुले सुद्धा तशीच होतील. अशा आया घरोघरी असतील तर सुसंस्कारित समाज निर्माण होईल.

​वर्तमानकाळातील मातांपुढे आजच्या युगाने खूप मोठी आव्हाने उभी केली आहेत. पूर्वीची आई मुख्यतः ‘गृहिणी’ होती, त्यामुळे मुलांवर संस्कार करण्यासाठी, त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी तिच्याकडे पुरेसा वेळ असायचा. आजच्या आईला मात्र नोकरी, करिअर आणि घर अशी दोन्ही आघाड्यांवर दुहेरी कसरत करावी लागते. कधी कधी यामुळे तिच्या मनात एक अनामिक ‘अपराधित्व’ (Guilt) डोकावते की, मी माझ्या मुलाला वेळ देऊ शकत नाही. पण अशाही परिस्थितीत ती आपला पदर खोचून खंबीरपणे उभी आहे. ती केवळ मुलांचे संगोपन करत नाही, तर आपल्या कर्तृत्वाने मुलांसमोर स्वावलंबनाचा एक नवा आदर्श ठेवत आहे.

​तथापि, बदलत्या काळाच्या पार्श्वभूमीवर आजच्या आईला काही जाणीवपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आजी-आजोबा, काका-काकू असायचे, मुलांवर सहज संस्कार व्हायचे. आज बहुतेक घरात एकच मूल असते आणि ते एकलकोंडे होते. आजी-आजोबांच्या गोष्टींचे माध्यम आता बऱ्याच घरांतून नाहीसे झाले आहे. मुले पाळणाघर किंवा प्ले-ग्रुपमध्ये वाढतात, पण तिथे आवश्यक कौटुंबिक संस्कार मिळतीलच असे नाही; ही पोकळी आईलाच भरून काढावी लागेल.

​आजची मुले ‘डिजिटल’ युगातली आहेत. ती नुसते सांगून किंवा उपदेश ऐकून शिकत नाहीत; त्यांच्यासमोर स्वतःचा आदर्श ठेवावा लागतो. “सारखा मोबाईल पाहू नकोस, पुस्तक वाच, अभ्यास कर” असे ओरडून मुले ऐकणार नाहीत. आई-बाबांनी कामावरून आल्यावर स्वतः मोबाईल आणि टीव्ही बाजूला ठेवून हातात एखादे चांगले पुस्तक धरले, तर मुलेही त्याचे अनुकरण करतील. आईचा पदर आणि तिची अंगाई यातून जी भावनिक ऊब मुलाला मिळते, ती ‘यूट्यूब’वरील बालगीतांमधून कधीच मिळू शकत नाही, हे आजच्या मातेला समजून घ्यावे लागेल. सुट्टीच्या दिवशी पालकांनी मुलांसाठी वेळ द्यायला हवा, घरातील छोटी-मोठी कामे करताना त्यांना सोबत घेतले, तर श्रमाची आणि जबाबदारीची सवय त्यांना आपोआप लागेल.

​नात्यांच्या या भरजरी ‘महावस्त्रा’चा हा मातृत्वाचा पदर जर संस्कारांनी आणि ओलाव्याने संपन्न राहिला, तरच पुढची पिढी निकोप आणि सुदृढ होईल. आई नावाच्या या पैठणीची जरतारी चमक कधीच फिकी पडू न देणे, ही आजच्या प्रत्येक मुला-मुलीची आणि समाजाची नैतिक जबाबदारी आहे.

(पुढील भाग दर रविवारी)

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted