कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ खंत… ☆ कल्याणी केळकर बापट ☆
काही वेळा असं वाटतं आपण खूप भ्रमात जगतोय, जणू स्वप्नरंजनात रमलोय की काय असा प्रश्न मनाशी पडतो. आधी भारत पारतंत्र्यात होता. इंग्रजांचे जुलूम अराजकता त्यावेळच्या लोकांनी खूप सहन केली. अत्याचाराचा सामना केला आणि खूप स्वातंत्र्य सेनानींच्या प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्य मिळालं, अर्थातच खूप मोलाची माणसं पण गमवून त्याची खूप जबरी किंमत मोजली आपण सगळ्यांनी.
स्वातंत्र्यानंतर लोकशाही आली. आपण स्वमर्जीने निवडून दिलेले आपले प्रतिनिधी सरकार बनवून सगळा कारभार बघायला लागले. देश चालवणे, सगळ्यांचे हित जोपासून निःपक्षपातीपणे सगळा देश चालवणे म्हणजे काही येरागबाल्याचे काम नव्हे. आपण समस्त डोळे झाकून ह्या सगळ्या प्रतिनिधींवर जबाबदारी टाकून निर्धास्त राहू लागलो. जे करतील ते आपल्या हिताचं, फायद्याचं असत ह्यावर डोळेझाकून विश्वास ठेवायला लागलो.
काही वेळी जनतेला असे अनुभव आलेत की त्या लोकप्रतिनिधींवरील विश्वास डळमळू लागला. ह्याचबरोबर जनता सुशिक्षित, सुजाण झाली, आपलं हित त्यांना कळायला लागलं, प्रगती कडे त्यांची पावलं वळायला लागली, विकासाकडे मन ओढ घेऊ लागलं. आणि हे सगळ साध्य करायचच ह्या निश्चयाने त्यांनी सत्ताबदल सुद्धा केला. आता मनासारखं सगळं झालं त्यामुळे आता प्रगती, विकास, अच्छे दिन मिळणारच ह्याची प्रत्येक नागरिकाला खात्रीच पटली.
काळ बदलला, दिवस पालटले, नवीन पिढी खूप खूप शिकू लागली, उद्योगधांना चालना मिळाली, पण मनात मात्र खूप सारे प्रश्न साचू लागले. उच्चशिक्षित प्रजा वाढू लागल्यावर निश्चितच समंजसपण, चांगली वृत्ती, मेहनतीच्या जोरावर इप्सित ध्येय गाठणे हे ओघानेच आले, पण विचार आला, खरंच असं दृश्य बघायला मिळतं का, निदान सरसकट बघता तरी हे चित्र दुर्दैवाने दिसत नाही. खुप प्रगती झाल्याने खरंतर कुणालाच काहीच फुकट देण्याची देशाला गरज पडायला नको पण इकडे तर सगळेच उलटे मूठभर करदात्यांच्या जीवावर ढीगभर जनतेला वेगवेगळ्या स्वरूपात खिरापत वाटणे सुरूच. जेव्हा आपल्याकडील जनता घरी गाडी घोडी, बंगला असताना, स्वतः चांगली नोकरी करून बक्कळ पगार घेऊन वर “लाडकी बहीण” योजनेअंतर्गत अनुदान घेताना जनतेची कीव करावी की ते अनुदान खोटेपणाने लाटणाऱ्या बहिणींची कीव करावी की अभ्यास न करता निव्वळ मतांसाठी ते सढळ हाताने देणाऱ्या त्या देशसेवक प्रतिनिधींची कीव करावी ते कळत नाही.
नुकतीच नीट परीक्षा नीट न घेण्याची शाई वाळते न वाळते तोच आज दुसऱ्या अजून एका शिक्षकांच्या परीक्षेची पेपर फुटीची बातमी कळली. खूप मेहनतीने खडतर परिस्थितीत परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांना काय काय समस्यांना तोंड द्यावे लागत असेल ह्याची सगळ्यांना पूर्ण कल्पना आहे तरीही अशा भोंगळकारभाराने, मूठभर अप्रामाणिक लोकांमुळे कठीण परिस्थिती उद्भवलीय आणि ते ही जनता जनार्दनाच्या खिशातूनच. कमी उत्पन्नाचे खोटे दाखले आणून सवलती घेणाऱ्यांची खरंच कीव येते, नुसते दरिद्री रेषेखालील हे लोक नसून हे कर्माने दरिद्री असतात. असं स्वतः चा वैयक्तिक फायदा करून घेऊन देशाचे कुठले हित साध्य होते हे एक न उलगडलेलं कोडंच.
अर्थात ही सगळी खंत कुठल्याही अमुक एका पक्षाविरुद्ध, अमुक एका व्यक्तीबद्दल नसून ही सगळी खालावलेल्या, पातळी सोडलेल्या मनःस्थिती विरुद्ध आहे हे कृपया सुजाण वाचकांनी लक्षात घ्यावे.
© कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




