सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ विविधा ☆ आमची अंदमान सफर… भाग-5 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
आता आमच्या ट्रिपचा शेवटचा टप्पा होता. सकाळी साॅ मिल बघायला गेलो. जंगलातील सांगवान सारखे पालव लाकूड तोडून त्याच्या फळ्या समुद्रावरील जहाजातून इंग्लंडला नेण्याच्या दृष्टीने ब्रिटिशांनी ही मिल उभारली होती.तिथे रेल्वे मार्ग ही ब्रिटिशांनी केला होता. अजूनही ती मिल चालू आहे. पाल्लव लाकूड खूप टिकाऊ आणि वाळवी न लागणारे असल्याने त्याला खूप किंमत आहे. आम्ही मिल पाहिली आणि बाहेर असलेल्या लाकडी वस्तूंच्या दुकानात थोडीफार खरेदी केली. आत्तापर्यंतचा प्रवास समुद्रावर झाला होता.इतका समुद्रप्रवास मी तर प्रथमच केला होता. मन सतत समुद्रावर तरंगतच होतं जणू! प्रसन्न हवा होती, त्यामुळे फिरणे कंटाळवाणे वाटले नाही.
परतीच्या प्रवासात पाॅंडेचरी बीचवर राहायला मिळाले. तेथेही पोंगल सणाच्या सुट्टी मुळे माणसांचा समुद्र च होता! उत्साही तरुणाई येथे एन्जॉय करत होती.. ऑरोव्हिलाची छोटीशी ट्रीप करून आम्ही चेन्नई ला जाण्यासाठी निघालो.
वाटेत महाबलीपुरम चे मंदिर आणि इतर मंदिराचे भग्नावशेष पाहून भारतीय संस्कृती किती प्राचीन आहे हे दिसून येत होते. तिथून चेन्नई ला आलो. एक दिवस चेन्नई मुक्काम होता.
या दहा-बारा दिवसात समुद्राची किती रुपे डोळ्यासमोर येत होती! कॅमेरात स्वतःला बंदिस्त करून त्या प्रत्येक ठिकाणाची साक्ष आम्ही इथे आल्यावर पाहू शकत होतो.
अंदमानच्या ट्रीपचे ध्येय जरी ‘सावरकरांचा सेल्युलर जेल’ बघण्याचे असले तरी निसर्गाचा हा समुद्रावरचा नजारा बघणे हे सुद्धा अवर्णनीय सुख होते. रोज बघितलेल्या त्या समुद्राच्या लाटा माझ्या मनात विचारांच्या असंख्य लाटा उमटवत असत! त्या लाटा मनाच्या किनार्या वर आपल्या पाऊलखुणा उमटवत होत्या, त्यांना थोडं कोरीव रुप देण्याचा हा माझा प्रयत्न!
समाप्त
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈