श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
।। श्री नारद उवाच ।।
(नारद भक्तिसूत्रे १२ व १३ – लेख क्र. १२)
भवतु निश्चयदार्ढ्यादूर्ध्वं शास्त्ररक्षणम ॥१२॥
अन्यथा पातित्याशङ्कया ॥१३॥
अर्थ : (अलौकिक अशा भगवत्प्रेमाचा मनात) निश्चय दृढ झाल्यानंतर शास्त्राचे रक्षण व्हावे. ॥१२॥
अन्यथा पातित्याची संभावना आहे. ॥१३॥
विवेचन:~ मागील सूत्रात लौकिक व वैदिक कर्मापैकी भगवद्भक्तीस अनुकूल कर्मे करावीत व भगवद्भक्तीविरोधी व्यवहारात उदासीनता राखावी, असे म्हटले आहे. त्याचा विचार त्या सूत्राच्या विवेचनात झाला आहे. भक्ताचे विशेष कर्तव्य अंतःकरणात भगवान् व त्याच्या प्राप्तीचे साधन भक्तिप्रेम याच विषयाचा निश्चय दृढ राखणे हे आहे; आणि हाच साधकाचा धर्म सांगितला आहे.
याविना अन्य धर्माचरणात भक्ताने स्वतःला बांधून घेऊ नये. श्रीतुकाराममहाराज हेच पुढील अभंगात सांगतात –
निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म । निर्धार हें वर्म चुकों नये ॥१॥
निष्काम निश्चळ विठ्ठलीं विश्वास । पाहों नये वास आणिकांची ॥२॥
तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला । नाहीं ऐकिला ऐसा कोणीं ॥३॥
(अभंग क्रमांक. ९४०, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)
मी साधक झालो, साधक म्हणून माझी प्रगती सुरू झाली, आता मला कोणताही नियम पाळण्याची अथवा बंधने पाळण्याची गरज नाही असे काही साधकांना वाटू शकते.
श्रीमद्भगवद्गीतेतील बाराव्या अध्यायात जी भक्तलक्षणे सांगितली आहेत, त्यांत ‘यतात्मा दृढनिश्चयः’ असे एक महत्त्वाचे लक्षण आहे.
विनोबाजी याचे गीताई मध्ये पुढील प्रमाणे भाषांतर करतात.
सदा संतुष्ट जो योगी संयमी दृढ निश्चयी|
अर्पी मज मनो_बुद्धि भक्त तो आवडे मज||
(गीताई १२. १४)
मन शुद्ध केल्याशिवाय साधकाची अध्यात्मातील प्रगती होऊच शकत नाही. साधकाचा ‘मन ते अमन‘ असा प्रवास असतो.
संत तुकाराम महाराज यांचा पुढील अभंग आपल्याला खूप काही सांगून जातो.
नाही निर्मळ जीवन । काय करील साबण॥ १ ॥
तैसे चित्तशुद्धी नाही । तेथे बोध करील काई ॥२॥
वृक्ष न धरी पुष्पफळ। काय करील वसंत काळ ॥ ३ ॥
वांजे न होती लेकुरे । काय करावे भ्रतारे ॥ ४ ॥
नपुंसका पुरुषासी । काय करील बाईल त्यासी ॥ ५ ॥
प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार ॥ ६ ॥
तुका म्हणे जीवने विण । पिक नव्हे नव्हे जाण ॥ ७ ॥
(अभंग क्रमांक ४०४, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)
ज्याला परमेश्वराची प्राप्ती करवून घ्यायची आहे त्याने अनेक पथ्ये पाळण्याची गरज असते. संत तुकाराम महाराज म्हणतात, “जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणें पथ्ये सांभाळावी”. अर्थात हा नियम दैनंदिन व्यवहारात देखील पाळावा लागतो. ज्या कार्यालयात आपण नोकरी करतो, तेथील नियम आणि अटी मनुष्याला कधी नाईलाजाने तर कधी आवडीने पाळाव्याच लागतात आणि इथे तर साक्षात भगवंताची चाकरी आहे तर मग नियम अधिक कठोर असणार आणि लबाडी चालणे शक्यच नाही. सर्व संत असे सांगतात की देव कुठे बाहेर भेटत नाही तर तो आपल्या अंतरंगात असतोच, फक्त मन आणि शरीर शुद्ध झाले की तो प्रगट होतो, साधकाचेला आत्मप्रचिती होते.
आपण कुठे बाहेरगावी फिरावयास गेलो तर आपल्या आवडीचे आणि खिशाला परवडेल असे राहण्याचे ठिकाण शोधतो. इथे तर साक्षात भगवंत राहायला येणार असेल (अंतरंगात प्रकट होणार! ) तर आपले शरीर आणि मन त्याला आवडेल असे ठेवायला नको का? समजा तसे ते नसेल तर तो एखादवेळेस येईल पण कायम राहील याची शाश्वती कोण देणार? म्हणून साधकाने आपले आचार, विचार आणि आहार अतिशय शुद्ध ठेवायला हवा. शरीर शुद्ध राहण्यासाठी साधकाने योग्य तितका व्यायाम नियमितपणे करावा तसेच सात्विक आहार घ्यावा. आहार पचायला हलका असावा, तसेच चवीला तीव्र नसावा. पोट भरेल आणि सुस्ती येणार नाही याची काळजी साधकाने जरूर घ्यावी. वाढत्या वयाबरोबर जिभेची चव आणि पोटाची भूक कमी व्हावी तसेच जिभेलाही थोडा आराम द्यावा. पचनसंस्थेस आराम मिळावा म्हणून साधकाने महिन्यातून किमान दोनदा किंवा जास्तीतजास्त चार दिवस उपवास करावा (निराहार राहावे). “एकादशी आणि दुप्पट खाशी” असे होऊ नये. अतिउपवास केल्यामुळे नैसर्गिक भूक मरते आणि शरीरात विकृती निर्माण होतात, असे पू. बाबा आपल्याला सांगतात. आहारावर नियंत्रण आले की झोपेवर नियंत्रण मिळविणे सोपे होते.
“ज्याने जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला” असे म्हणतात ते याचसाठी.
या विषयाशी निगडीत संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराजांचा एक अभंग महत्त्वाचा आहे.
“हरिनाम स्मरतो म्हणोनि आचरसी दोष । श्रवण स्मरण भक्ति तेणें पडली वोस ॥१||हरिनामाचेनि बळे करिसी अदर्ध । देवाचेनी तुमचें शुद्ध नोहें कर्म ॥२॥ दुर्वासाचेनि कोपे अंबऋषीस शाप । देवाचे चक्रें त्या दिधलें संताप ॥३॥ सत्यवती धर्म सदयज्ञनिष्ठ । असत्य वचनी त्याचा झाला अंगुष्ठ ॥४॥ निष्पाप मांडव्य शुळीं वाइला । इतुकियास्तव यम दासीपुत्र केला ॥५॥ एका जनार्दनीं संत सोयीनें चाले । सदगुरुवचनें सबाह्म शुद्ध जालें ॥६॥”
(अभंग क्रमांक १६७१, एकनाथी अभंग गाथा)
याच दृष्टीने नारद महर्षीनी अन्यथा पातित्याशंकया’ असे सूत्रात म्हटले आहे की साधकाचे विहित कर्माचरण सुटले, अधर्मप्रवृत्ती वाढली तर कदाचित भक्तिमार्गापासून साधक पतित होण्याचा संभव आहे.
संतांची उच्छिष्टें। बोलतों उत्तरे।
काय म्यां पामरें। जाणावें हें।।
– संत तुकाराम महाराज
जय जय रघुवीर समर्थ!!
(वरील दोन्ही सूत्रे एकमेकांशी निगडीत असल्याने त्यांचे विवेचन एकत्र केले आहे.)
– क्रमशः लेख क्र. १२ व १३
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





