सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “श्रीराम आणि श्रीकृष्ण…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

हे दोघेही भारतीय इतिहासातील दोन अतुल्य महानायक आहेत.

एकाने ‘अयोध्या ते रामेश्वर’पर्यंतचा

तर दुसऱ्याने ‘द्वारका ते आसाम’पर्यंतचा भूभाग आपल्या चरित्राद्वारे सांधत, गेली हजारो वर्षे ह्या भारतभूमीला संस्कारांच्या अनोख्या बंधनात बांधून ठेवले आहे.

तसं तर दोघांच्या चरित्रात जन्मापासूनच किती विरोधाभास आहे, नाही का?

एकाने जन्म घेतला तो रणरणत्या उन्हात आणि तोही भरदुपारी, तर दुसऱ्याने जन्म घेतला तो मुसळधार पावसात आणि तो ही मध्यरात्री!

एकाचा जन्म राजमहालात तर दुसऱ्याचा जन्म कारागृहात!

साम्य म्हणाल तर दोघांच्याही हातून पहिल्या मारल्या गेल्या त्या राक्षसिणीच…..

एकाकडून त्राटिका आणि दुसऱ्याकडून पुतना!

शबरीची बोरे आणि सुदाम्याचे पोहे हे त्यांच्या मनमिळाऊ मैत्रीपूर्ण स्वभावाचे उदाहरण म्हणून आजही सांगितले जाते.

ज्यांच्यामुळे यांच्या चारित्र्याला वेगळे वळण लागले, त्या दोघी म्हणजे कैकेयी आणि गांधारी या एकाच प्रांतातल्या…

ह्या दोघी मातांच्या कटू शब्दांना वंद्य मानत त्या दोघांनीही आनंदाने स्वीकारले.

एकाने सुग्रिवाला त्याचे राज्य मिळवून दिले. तर दुसऱ्याने युधिष्ठिराला!

एकाने लोकापवादाखातीर पत्नीचा त्याग केला. तर दुसऱ्याने लोकापवादाची चिंता न बाळगता सोळा सहस्त्र स्त्रियांचा स्वीकार केला.

एकाने वडिलांचे शब्दासाठी आणि क्षात्रधर्मासाठी कुटुंबीयांचा त्याग करत वनवास स्वीकारला. त्यात गैर मानले नाही. तर दुसऱ्याने क्षत्रियधर्मासाठीच कुटुंबीयांवर शस्त्र उगारण्यासदेखील गैर मानले नाही.

एकाने जन्मभूमीला स्वर्गासम मानले. तर दुसऱ्याने कर्मभूमीला स्वर्ग बनवले.

एकाने अंगदाकरवी शिष्टाई करुन तर दुसऱ्याने समक्ष शत्रूच्या दरबारी जाऊन शिष्टाई करत युद्धहानी टाळण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत केला.

एकाने समुद्र ओलांडून सोन्याची लंकापुरी नष्ट केली. तर दुसऱ्याने समुद्र ओलांडून सोन्याची द्वारकापुरी उभारली.

एकाने झाडामागून बाण मारल्या गेलेल्या वालीच्या मुखातून झालेली निंदा स्वीकारली. तर दुसऱ्याने झाडामागून बाण मारणाऱ्या व्याधाच्या हातूनच मृत्यू पत्करला.

पहिला Theory…. आहे. तर… दुसरा Practical आहे.

दोन प्रचंड विरोधाभास असलेल्या ह्या व्यक्तिरेखा गेली हजारो वर्षे नाना विविध प्रक्षिप्त कथांचा स्वीकार करत आपल्या चारित्र्याच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता ह्या देशापुढे ‘दीपस्तंभ’ बनून उभे आहेत आणि इथून पुढे देखील असेच रहातील.

जय श्रीराम… जय श्रीकृष्ण!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments